Monday, July 23, 2012

ये रे ये रे पावसा...


पाऊस म्हटलं की सर्वांच्या मनात कल्पनांचं मोहोळ उभं राहतं..विशेषतः एप्रिल - मे महिन्यात जेव्हा पारा 40 च्या वर जातो तेव्हा सर्वांनाच कधी एकदाचा हा ऊन्हाळा जातो आणि जून महिना उजाडतो असं वाटतं...जून महिना आला की मान्सून बरसेल आणि अंगाची लाही लाही करणारा ऊन्हाळा एकदाचा जाईलं म्हणून सर्व जण त्या पावसाकडे डोळे लावून बसतात.पाऊस सर्वांनाच हवा वाटतो..शहरी असो वा निमशहरी कडक उन्हापासून सुटका हवी असते सर्वांनाच... पाण्याची समस्या तर हल्ली सगळीकडेच आहेत. ती सुटावी म्हणून पावसाची वाट पाहिली जाते..तर शेतकरी शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी त्याची आतुरतेनं वाट पहात असतो..ज्या पावसाची सर्वच जण आतुरतेने वाट पहात असतात त्याच्या पाठीमागची सर्वाची कारणं आणि कल्पना वेगवेगळ्या असतात. पण पाऊस सर्वाना हवा असतो हे मात्र नक्की.. सर्वांना हवा हवासा वाटतो तो पाऊस हलक्या मध्यम रिमझीम सरींचा पाऊस.. सर्वांच्याच मनाला स्पर्श करुन जाणारा तो पाऊस....तर धो धो कोसळणारा पाऊस वेगळाच..हा पाऊस कधी रोमँटीक असतो तर कधी विध्वंसक ठरतो...ज्या पावसाची आपण आतुरतेनं वाट पहात असतो तो जर कोसळायला लागला तर सर्वांची पुरती वाट लावते..मग वाटते पुरे झालं आता....हल्ली तर शहरांची पुरती वाटच लावतो हा पाऊस...शहरातले रस्ते पण थोडासा पाऊस झाला तरी सापडत नाहीत..अनेक भागात पाणीच पाणी..रस्ताच सापडत नाही...तर घरं कोसळून जीवित हानी करतो तो वेगळच...त्यातून त्या पावसाची तीव्रता लक्षात येते आणि वाटतं..नको हा जीवघेणा पाऊस आता....आठवून पहा 26 जुलैची मुंबई...कीती भयानक असू शकतो पाऊस, त्याची शहरातल्या लोकांना आलेली ती मोठी प्रचिती असावी... हे झालं रौद्र रुपातल्या पावसाबद्दल...
..पण जो सर्वांना हवा हवा वाटतो तो हलका पाऊस पडायला लागला की सर्वाना आठवते गरमा गरम भज्जी आणि वाफाळलेला चहाचा कप....पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना.. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत बसून गरम भज्जी आणि वाफाळलेल्या चहाची लज्जत काही औरच....! त्याची मजा शहरातल्या आपल्या सर्वांनाचा हवी हवीशी वाटणारी आहे..आणि हा पाऊस जर रात्रीच्या वेळचा असेल तर...? हातात एक व्हिस्कीचा किंवा रमचा पेग, मंद हवा आणि हलका हलका पेग....व्वा क्या बात है.. ! साधनेला यापेक्षा आणखी कोणता माहौल चांगला असेल...! नुसती कल्पना जरी केली तरी अनेकांची विमानं  लगेच आकाशात झेपवतात.. असो, कल्पना छान आहे...!!! तर मुंबईच्या नरीमन पॉईंट किंवा तशाच काही स्पॉटवर रिमझीम पावसात भिजण्याची मजाही काही औरच नाही का...? आणि समजा कोणत्याही शहरातल्या काही विशिष्ट स्पॉटवर असा पाऊस पडताना एखादी मैत्रीण बरोबर असेल तर....! आठवा आठवा..!!! एका पावसात दोघांनी भिजण्याचा अनुभव काही धम्मालच नाही का... ? एकाच छोट्या छत्रीत न मावणारे दोघेजण...! आतून बाहेरुन ओलंचिंब झाल्याचा अनुभव येतो ना... ? मग छत्रीही नको वाटते...नकळत हातात हात घेऊन जुळलेल्या त्या रेशिमगाठी ...! अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे...

पावसातील मस्तीच्या मुड
आज कदाचित तसाच पाऊस पडत असताना त्या आठवणी जाग्या होतीलही...! असा हा रोमँटीक पाऊस कोणाला नको आहे...! काहींच्या मनाला भरती येऊन छान छान कविताही याच पावसात सुचतात...! पावसाची चाहूल जरी लागली तरी मोर जसा पिसारा फुलवून नाचायला लागतो... तशी सगळ्यांची मनं डोलायला लागतात....भूतकाळातल्या त्या आठवणी आठवल्या तर घरात किंवा ऑफीसात असतानाही नुसत्या आठवणींनीच ओलेचिंब भिजल्या सारखं होतं ना...!! आणि ज्यांची मनं आणि ह्रदय ह्याच पावसानं तोडली असतील... ते "बघ माझी आठवणं येते का..?"  म्हणत बसतील....कारण काहीही असो..पाऊस सर्वानाच हवा हवासा वाटतो...
रोमँटीक पाऊस...
..मनाला स्पर्शून जाणाऱ्या या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच...बच्चे कंपनींची मजा तर वेगळीच..! लहानपणी पावसात भिजताना किती धम्माल यायची..! पावसाच्या साचलेल्या पाण्यातून समोरच्याच्या अंगावर फुटबॉलची किक मारावी तशी त्या पाण्य़ात मारुन कसं भिजवलं..त्याची गम्मत काही न्यारीच ..!! पावसाच्या पाण्यात कागदीची नाव करुन सोडण्याचा मोह कोणाला झाला नसेल...? पावसात भिजणं , राडा करणं ( हा राडा शिवसेनेचा नाही बरं का..हा आपला लहानपणीचा राडा.. ) ही लहान मुलांची नैसर्गिक खोडकर वृत्ती.. त्यावेळी आई बाबा ओरडायचे.. पावसात भिजू नको..सर्दी होईलं...? तेव्हा कोणाचीच मम्मी "दाग अच्छे होते हैं "...असं म्हणत नव्हती....मात्र आई बाबाचं नाही ऐकलं तर मोठा धपाटा मात्र बसायचा.. ! किती आठवणी त्या पावसाच्या..!!! आमचं घर गावात होतं...थोडा मोठा पाऊस झाला की.. घराला गळती लागायची..रात्रीच्यावेळी तर खूपच राग यायचा त्या पावसाचा..घर सगळीकडूनच टप टप गळतय...झोपायलाही जागा नसायची..कुठं कुठं म्हणून भांडी ठेवून  गळतीचं पाणी थोपवायचं....त्यावेळी पावसाचा राग यायचा आणि आपल्या गळक्या घराचाही... पण पत्र्याच्या घरात जर पाऊस पडताना झोपलात तर त्याचा जो काही आवाज होतो ना तो मात्र वेगळीच धम्माल बरकं...अर्थात...घरात एकटेच असताना..लाईट गेलेली असेल तर मात्र कधी कधी त्याच पावसाच्या आवजाची भितीही वाटायची..असा हा पाऊस किती किती आठवाव्या त्याच्या आठवणी.....
पावसात मस्ती करणारी मुलं..
...पण यापेक्षा पावसाची सर्वात जास्त गरज ज्याला असते..जो पावसाच्या आशेनं आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो तो आमचा शेतकरी, हाच खऱा त्या पावसाचा हक्कदार आहे.. जमीन तापलेली आहे...प्यायला पाणी नाही..जनावराला चारा नाही...पेरणीचे दिवस आलेत..पण पावसाचा काही पत्ता नाही..बिच्चारा शेत नांगरुन पावसाची वाट पहात बसतो...पण कधी वेळेवर येईल तर तो पाऊस कसला..? जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरगाचा पाऊस पडल म्हणून तो आभाळाकडे डोळं लावून बसतो पण तो कसला येतोय..मृग गेला..दुसर नक्षत्र गेलं तरी पाऊस काही येत नाही..त्याची चिंता वाढतच जाते...आता तर पेरणी करा पावसाची वाट बघा..नाहीच आला तर दुबार पेरणीचं संकट आ वासून बसलेलंच..! जनावरं सांभाळणंही अवघड होऊन बसलय...वेळेवर पाऊस येत नाही म्हणून हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्याला चिंता असते आणि जेव्हा येतो तेव्हा ऊभ्या पिकाची वाट लावून जातो..शेतीचा बांध फोडून सगळं नुकसान करुन जातो..तरीही आमचा शेतकरी कधी त्यावर रागावत नाही..कारण पाणी हवय...मग ते कसंही येवो..मोठा पाऊस झाला...बांध फुटून पिक वाया गेलं..एखादा हंगाम वाया गेला तरी पाणी तर मिळेल ना या आशेवर तो जगतो...पाऊस हवाच आहे मग तो कोणत्याही रुपात येवो...रोमँटीक भासनारा असो वा सरीवर सरी कोसळणारा असो..पूर येऊन नुकसान करणारा असो ..पाऊस हवाच आहे..मोठा पाऊस होऊ दे...अगदी ओला दुष्काळ पडला तरी चालेल..आमच्या भूमातेची तहान भागवेल एवढा मोठा पाऊस पडू दे...जमीनीची तहान भागली तरच शेती फुलेलं..धरणात पाणी साचेल...पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल..शेतीची, जनावरांची चिंता मिटेल...शेतातली पिकंही डौलानं ऊभी राहतील..कृषी उत्पन्न वाढेल...अन्नधान्याची चिंता राहणार नाही...पण त्यासाठी हवा आहे तो पाऊस..मग तो कसाही येवो धो धो अथवा रिमझीम...जमिनीची तहान भागेपर्यंत पावसाची गरज आहे..तो भरपूर यावा आणि शेतकऱ्याची चिंता मिटावी..त्यातच त्याचं आणि आपलं भलं आहे...म्हणून तर म्हणतात ....ये रे ये रे पावसा....   








No comments:

Post a Comment