Monday, April 23, 2012

विल्यम शेक्सपिअर-एक महान लेखक

विल्यम शेक्सपिअर

विल्यम शेक्सपिअर हा इंग्रजी वांड्मयातील महत्वाचा लेखक..महत्वाचा म्हणजे एवढा की..इंग्रजी वांड्मय म्हणजे दोन तृतीयांश बायबल आणि एक चतुर्थांश शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. यावरुनच शेक्सपियरचं इंग्रजी वांड्मयातलं महत्व अधोरेखित होतं. तर शेक्सपिअरला वगळून इंग्रजी वांड्मयावर लिहणं अश्यकच आहे. एवढं मोठं योगदान या लेखकानं इंग्रजीला दिलेलं आहे. आपल्या अवघ्या ५२ वर्षाच्या आयुष्यात शेक्सपिअरनं ३६ नाटकं लिहिली तर जवळपास १५० सुनितं लिहिली. असं म्हणतात की शेक्सपिअरनं त्याच्या लेखनातून एकही विषय सोडला नाही. त्याच्या लेखनानं सर्व विषयाला स्पर्श केलाय. राजकारण, प्रेम, कौटुंबिक, सामाजिक, यासह जीवनाच्या सर्व अंगाला त्याच्या लेखनीनं स्पर्श केलाय. त्याची नाटकं सर्वात जास्त गाजलेली तसच इंग्रजी वांड्मयाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. ट्रॅजेडी असो वा कॉमेडी, किंवा नाटकाचा इतर कोणताही प्रकार असो त्यात शेक्सपिअर नाही असं होत नाही..ट्रॅजेडीचाच विचार करायचा तर हॅम्लेट, किंग लिअर, ऑथेल्लो, मॅकबेथ, रोमिओ आणि ज्युलियट यांना कोण विसरु शकेल.

सोळाव्या शतकातल्या या लेखकाविषयी जगभरातून लेखन झालय. त्याच्या नाटकांची जगातल्या जवळपास सर्वच भाषेत भाषांतरं झालेली आहेत. तर त्याच्यावर लाखो समिक्षकांनी लेखन केलय. तरीही शेक्सपिअर हा विषय काही संपत नाही. त्याच्या लेखनीनं इंग्रजीच्या अभ्यासकांना तर झपाटूनच सोडलंय. १६ व्या शतकात त्यानं ज्या पद्धतीनं नाटकं बसवली आणि ती अजरामर झाली त्याला तोडच नाही. आजही तुमच्या आमच्यातल्या अनेकांच्या व्यवहारात बोलतानाही शेक्सपिअरच्या नाटकातल्या पात्रांचा विषय येतो तर कधी त्या नाटकातले संदर्भ येतात. हेच पहा ना. to be or not to be असं म्हटलं की हॅम्लेटच नावं ओठावर येतच. तुमची माझी अनेकांची हॅम्लेटसारखी अवस्था अनेकदा झालेली आहे. तर राजकारण किंवा मैत्रिच्या बाबतीत Brutus you too ! हा ज्युलियस सिझरमधला अजरामर डायलॉग येतोच. तर प्रेमाचा विषय निघाल्यावर रोमिओ ज्युलियट शिवाय तर तो पूर्ण होऊच शकत नाही. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. किंग लिअरबद्दल तर कीतीतरी वेळा चर्चा होईन गेलीय. म्हातारा किंग लिअर आणि त्याच्या तीन मुली संपत्तीसाठी काय- काय करतात हा १६ व्या शतकातला शेक्सपिअरनं मांडलेला विषय आजही आपल्या अवतीभोवती अनेकदा आपण पाहतोय.

शेक्सपिअरच्या नाटकांची जगातल्या सर्व भाषेत भाषांतरं झाली त्यात मराठीही मागं नाही. किंग लिअरवरचं नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांचं नाटक तर जगजाहीर आहे. शेक्सपिअरच्या एका-एका नाटकाचं पाच-सहा लेखकांनी त्यांच्या शैलित भाषांतर केलय. यावरुनच शेक्सपिअरच्या लेखनाची महती विषद होतेय. कारण त्या- त्या भाषेत लिहिण्यासाठी विषय नाहीत असं नाही पण शेक्सपिअरनं विषयच असे काही हाताळलेत ते आज पाचशे वर्षानंतरही अजरामर आहेत. त्याचा विषय काय किंवा आशय काय आजही जिवंत आहेत. ते कालबाह्य झालेले नाहीत. हीच त्याच्या लेखनाची ताकद म्हणावी लागेल.

इंग्रजी वांड्मयाला भरभरुन दिलेल्या या लेखकाच्या बाबतीत फारशी माहिती मात्र उपलब्ध नाही. अगदी त्याच्या जन्मतारखेचाही घोळ आहेच. एप्रिल महिन्यातील २३ किंवा २६ तारखेला त्याचा जन्म झाला असावा असं मानलं जातय. तर मृत्युच्या तारखेबद्लही असंच म्हटलं जातय. काही ठिकाणी तर शेक्सपिअरची जन्म तारिख आणि मृत्युची तारीखही एकाच दिवशी येते म्हणजे २३ एप्रिल असाही एका मतप्रवाह आहे. तर त्याच्या जीवनाबद्दलही अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शेक्सपिअरनं त्याच्यापेक्षा वयानं ८ वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं होतं. तो त्याच्या कौटुंबिक जीवनात सुखी नव्हता. यापासून त्याच्या संबंधांबद्दलही बरचं काही लिहलं गेलय. पण त्याच्या इतर बाबींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यानं इंग्रजी वांड्मयाला दिलेली अमुल्य देणगी ही लाख मोलाची आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रीत करुयात...विल्यम शेक्सपिअरचा जन्म इंग्लड मधल्या वारविकशायर परगण्यातील स्ट्रॅटफोर्ड-ऑन- अँव्हान या गावात १५६४ साली झाला. त्यानंतर तो इंग्लडला गेला. तिथच त्यानं आपलं बस्तान बसवलं आणि नाटकात मोठं नाव कमावलं. त्यानंतर तो आपल्या गावी परत आला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यानं आपलं गाव स्ट्रॅटफोर्ड या गावातच घालवले. १६१६ साली शेक्सपिअरचं निधन झालं. शेक्सपिअरच्या जन्मतारखेचा जसा वाद आहे तसाच त्याचा फोटो किंवा पोर्ट्रेटचाही आहे. त्याचा खरा फोटो कोणता हे आजही गुलदस्त्यातच आहे. त्याच्या केलेल्या वर्णावरुन काही पोर्ट्रेट बनवलीत त्यालाच मान्यता देण्यात आलीय. एप्रिलचा महिना आहे आणि शेक्सपिअरचा विषय आठवला म्हणून इंग्रजीचा एक विद्यार्थी या नात्याना त्याच्यावर काही लिहिता येईल का असा विचार मनात चमकून गेला आणि वाटलं शेक्सपिअरवर काहीही हलकं फुलकं लिहूयात म्हणून हा प्रपंच केला. बाकी शेक्सपिअवर लिहायचं म्हटलं तर दोन चार पानच काय अखंडपणे लिहित राहावं एवढा मोठा त्याच्या लेखनाचा पसारा आहे. त्यावर कितीही लिहिलं तर कमीच आहे. पण केवळ शेक्सपिअर कोण होता एवढं तर जाता जाता लक्षात यावं, त्याचं स्मरण व्हावा म्हणून अगदी थोडक्यात या चारोळ्या लिहिलेल्या आहेत..

Friday, April 20, 2012

शिक्षण संस्थातील सावळा गोंधळ

शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून राज्य सरकारच्या करोडो रुपयांवर डल्ला मारणा-या शिक्षण संस्थावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसच अशा संस्थांमधल्या शिक्षकांनाही नोकरीवरुन कमी करणार आहे. हा मात्र त्या शिक्षकांवर अन्याय आहे. कारण शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून सरकारचे पैसे लाटणारे संस्थाचालक आहेत. तर अशा शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारच्या शिक्षण खात्याचीच आहे. त्यांनी आत्तापर्यंत ह्या प्रकाराकडे लक्ष का दिलं नाही आणि त्यांना त्याची माहिती होती तर खरे गुन्हेगार ते अधिकारी आणि संस्थाचालक आहेत. त्यांच्यात बिचा-या शिक्षकांवर अन्याय का..? संबंधित अधिका-याला निलंबित केलं जाणाराय असं सरकार म्हणत आहे. पण त्यांनीच ह्या प्रकाराला रोखलं नाही तर त्याची शिक्षा त्या शिक्षकांना का..त्यामुळे सरकारचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा ईलाज भयंकर असाच म्हणावं लागणाराय..

आता मुळ विषयाकडे वळुयात...राज्यात ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. अशा हजारो संस्था राज्य़ात आहेत. अशा संस्थामध्ये मागच्या सहा महिन्यांपूर्वी पटपडताळणी घेण्यात आली. म्हणजे विद्यार्थांची संख्या मोजण्यात आली, तेंव्हा असं लक्षात आलं की कागदोपत्री जेवढी विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे त्यापेक्षा कितीतरी कमी संख्या वर्गात दिसून आली. हा प्रकार राज्यात अनेक भागातल्या संस्थामध्ये आढळून आला. त्याची सुरुवात नांदेड जिल्ह्यातून करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. तीच पटपडताळणी राज्याच्या सर्व शाळांमध्ये राबवण्यात आली आणि संस्थाचालकांचं पितळ उघड पडलं. लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यी बोगस निघाले. त्यामुळे अर्थातच या शिक्षण संस्थामध्ये चालत असलेला सावळा गोंधळ लक्षात आला. लिद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवून सरकारचं अनुदान लाटण्याचा धंदा या शाळांमधून होत होता. म्हणून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बोगस विद्यार्थी दाखवणा-या अशा जवळपास १५०० शाळा सापडल्यात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणाराय. पण ती केल्यास त्या शाळेतल्या जवळपास ८ हजार शिक्षकांची नोकरीही जाणाराय. विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणाराय. पण ह्या कारवाईत शिक्षक मात्र विनाकारण भरडला जातोय..ज्या शाळा चालवल्या जातायत त्या सर्रास राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याच आहेत. त्यामुळे तिथं होत असलेल्या ह्या धंद्याला कोणीही आजपर्यंत हात लावला नाही. बोगस विद्यार्थी दाखवून हे संस्थाचालक वर्षाकाठी सरकारला जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा चुना लावत होते असं म्हणतात. आकडे थोड्याफार फरक्यानं कमी अधिक असतील. पण यासर्व प्रकरणात बिचा-या शिक्षकांचा काय दोष ? शाळेत विद्यार्थी जास्त दाखवून तुकड्या वाढवायच्या.. त्याच्या जोरावर शिक्षक भरती करायची आणि सरकारच्या पैशाला चुना लावायचा धंदा संस्था चालकांनी केला. तर त्याची शिक्षा त्या संस्था चालकाला तसच ह्यासर्व प्रकाराकडं दुर्लक्ष करणा-या शिक्षण विभागातल्या अधिकारी कर्मचा-यांना व्हायला हवी. पण त्यापेक्षा शिक्षकांना नोकरीवरुन कमी करणे ही त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आहे. तसच संस्था चालक हे शिक्षक भरती करताना त्यांच्याकडूनही लाखो रुपये घेतात. म्हणजे दोन्ही बाजूनी मालामाल झाला तो संस्थाचालक आणि भरडला जातोय तो शिक्षक.. !! त्यामुळे सरकारनं कारवाई जरुर करावी पण ती संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिका-यांवर शिक्षकांवर नाही...!

Thursday, April 19, 2012

चमत्कारी बाबा लोकांची चलती..

निर्मल बाबा

बाबांची संख्या आणि त्यांचे कारनामे हा काही आपल्याला नवीन विषय नाही..तो बाबा कोणताही असो अगदी गंडेदोरे देऊन गंडवणारा बंगाली बाबा, गल्ली बोळातला बाबा किंवा सत्यसाई बाबा सारखे बाबा..बाबा कोणताही असो त्याच्या लिला हा मात्र चर्चेचा आणि संशोधनाचा विषय होऊन बसलाय. आपल्या देशात अशिक्षित लोकच या अशा बाबांच्या आश्रयाला जातात असं नाही तर फार मोठे लोकही त्यांच्या नादाला लागलेत हे सांगायलाच नको...आता बाबांचा हा विषय निघाला त्याचं कारण मागच्या आठ दहा दिवसात असेच एक बाबा सगळीकडे चर्चेत आलेत. मी ज्या बाबाबद्दल बोलतोय ते आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा नाही बरं का..हे अगोदरच स्पष्ट करतो...ज्या बाबाबद्दल आज मी लिहतोय तो बाबा म्हणजे निर्मल बाबा..आता हा नवीन कोण असा तुम्हाला प्रश्न पडला नसलेच. कारण मागच्या दहा दिवसात सर्वच वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ह्या बाबांबदद्ल बरचं काही ऐकायला-वाचायला मिळत आहे.

हे निर्मल बाबा इतर बाबांप्रमाणे लोकांच्या समस्यांचं निराकरण करतात. त्यांचा भला मोठा भक्त परिवारही आहे आणि अर्थातच परदेशातसुद्धा या निर्मल बाबांच्या लिला पोचलेल्या आहेत. सध्या टीव्हीवर याच बाबांच्या जाहीरातींचा एक मोठा प्रोग्रामही दाखवला जातोय. त्यात काही भक्त बाबांना त्यांच्या समस्यांबद्दल विचारतात तसच त्यांच्या समस्यांचं कसं निराकरण झालं असं सांगणारे भक्तही दाखवले जातायत. साहजिकच त्यांच्या या भुलभलैयांला फसून लाखो लोक त्यांचे भक्त झालेत. पण त्यातून बाबांचं बिग फुटलं..हे बाबा त्यांच्या दरबारात दररोज कोटींची कमाई करतात हेही बाहेर आलंय. त्यांच्या बँक खात्यात दररोज कोटींची माया जमा होत होती. त्यातून बाबांनी जवळपास ३००- ४०० कोटींची माया जमा केल्याचंही समोर आलं. आता त्यांची चौकशी वगैरे करण्याचं घाटत आहे...तो भाग वेगळा..

निर्मलबाबा हे प्रस्थ काय आहे हेही प्रकाशात आलं. तर ते महाशय पूर्वी विटभट्टी चालवायचे. त्यात त्यांना फारसं काही करता आलं नाही. त्यानंतर त्यांनी कापड विक्रीचं दुकानही थाटलं पण त्यातही त्यांना काही जमलं नाही..त्यानंतर असेच काही उद्योग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना काही यश आलं नाही..त्यानंतर ते काही वर्षे गायबच होते. त्यानंतर अवतरले ते थेट निर्मलबाबा म्हणूनच...याच निर्मल बाबांनी भक्तांकडून जमा झालेल्या पैशातून स्वतासाठी मोठंमोठी घरं बांधून घेतली. मोठा दरबार बांधला एवढी मोठी माया त्यांनी गोळा केलीय..

निर्मलबाबा सारखे असे अनेक बाबा आपण पाहतो. त्यांच्या चमत्काराच्या कथाही ऐकतो..आणि त्यांनी लोकांनी कसं फसवलं हेही यथावकाश आपल्यासमोर आलेलं आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थीचे सत्यसाई बाबा हेही असंच मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या भक्तांच्या यादीत तर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक व्हीआयपींचा भरणा होता. ते हयात होते तेव्हांही वादाच्या भोव-यात सापडले होतेच पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या महालात सापडलेल्या किंमती वस्तू, रोकड हे ऐकूनच थक्क झालो..एवढी माया बाबालोकांना त्यांचे भक्त कशी काय देतात हाच मुळ प्रश्न आहे. त्यातच स्वतःला शिक्षीत, समजदार म्हणवली जाणारी मंडळीही त्यांचे भक्त होतात हे कशाचं द्योतक आहे. ह्याचा विचार व्हायला हवा.. पण आजही या बांबाचं प्रस्थ समाजात दिसतं त्यावरुन आपण अजूनही काही शिकलेलो नाही असचं वाटतं..

Friday, April 6, 2012

सकाळचा नाष्टा- सांबर इडली

मागच्या अनेक दिवासापासून खाद्यपदार्थांवर काहीतरी लिहावं असं वाटत होतं. माझ्या मित्रांनीही मला काही विशेष भागातल्या मेनूबद्दल लिहण्याची विनंती केली होती. पण कोणत्या पदार्थावर लिहावं याचा विचार करत होतो. अनेक पदार्थ डोळ्यासमोरुन जात होते. आणि त्या पदार्थांची जशी आठवण होत होती तशी जिभ गप्प बसत नव्हती. काही पदार्थांचं नाव घेतलं तरी लाळ टपकायला सुरुवात होते..त्या सर्व पदार्थांबद्दल लिहण्याचा माझा प्रयत्न आहे..पण आज नेहमीच्याच एका पदार्थावर लिहण्याचा विचार केला..काल सकाळीच एका हॉटेलमध्ये इडली सांबरवर ताव मारला. मस्त मजा आली..मग म्हटलं इटली सांबर किंवा वडा सांबरवरच लिहूयात की..
इडली सांबर

हैदराबादमध्ये असल्यामुळे सकाळच्या नाष्ट्यात काय खायचं हा प्रश्न फारसा सतावत नाही..हॉटेलमधे नाष्टा करायचा तर कुठंही जा..इडली, वडा, उथ्थपा, दोसा आपली वाटच बघत असतात. त्यामुळे निवडीला तसा फारसा वावच नसतो..अगदी छोट्याशा टपरीपासून मोठ्या स्टार रेस्टॉरंटमध्ये जा हेच पदार्थ आपली वाट पहात असतात.. बाकी आपल्याकडे नाष्टा म्हटलं तरी काय खाऊ एवढे पदार्थ निवडीसाठी समोर येतात..पण हैदराबाद काय आणि एकूणच दक्षिण भारत काय..आपल्याला याच पदार्थांतून निवड करावी लागते..मागच्या अनेक वर्षांपासून हैदराबादमध्ये असल्यामुळे मलाही आता त्याची सवय झालीय. पण मी दोसा किंवा उथ्थपा यापेक्षा इडली सांबर, सांबर इडली किंवा वडा सांबर आणि सांबर इडली यालाच पहिली पसंती देतो..मला ते आवडतात. डोसा आवडत नाही असं नाही पण एकूण मसालेदार पदार्थ किंवा इतर चव चाखण्यापेक्षा इडली किंवा वडा फारच उत्तम..! शिवाय त्यासाठी वाट पहात बसावी लागत नाही. नाहीतर डोसा उथ्थपा खायचा म्हटलं तर गर्दीच्या हॉटेलमध्ये तर वेंटीग करावचं लागतं..! भले ती सकाळची वेळ असली तरीही...आणि ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा लवकर नाही आला तर नाष्ट्याचा मूडही कमी होत जातो. त्यापेक्षा इडलीच बरी..! त्याशिवाय मला इडली ही सोलापूरला असल्यापासूनच आवडते..त्याबरोबर मिळणारी चटणी आणि सांबर तर विचारूच नका..

सांबर इडली

सोलापूरात असतानाही नाष्ट्याला इडलीची ऑर्डर आवर्जून द्यायचो..आमच्या सोलापूरातही काही हॉटेल्समध्ये इडलीबरोबरची चटणी आणि सांबर मस्तच मिळतं...! मी तर इडली म्हटलं की त्याबरोबर दोन वाट्या गरम सांबर तर ओरपायचोच..मस्त वाटायचं.. आहाहाहाहा...!!! खरं तर इटलीबरोबरच सांबर आणि चटणी जर झकास असेल तर मग काय विचारायलाच नको..! त्यामुळे पहिली पसंती इडली सांबरच...! सांबर इडली हा प्रकारही त्यातलाच.. मोठ्या कटो-यात दोन तीन इडल्या आणि त्यावर गरमा गरम सांबर..! अगदी त्या सांबरमध्ये इडली मनसोक्त डुबलेली असते.. सांबरमध्ये डुबलेल्या इडलीचा एक गरम बाईट घेत त्याबरोबर चटणीची चव चाखली की आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात..व्वा ! मस्त रे...!!!

इडलीबरोबरच वडा किंवा वडा-सांबर हा दुसरा पदार्थ नाष्ट्याला घ्यायला काहीच हरकत नाही..मला स्वतःला वडा फारसा आवडत नाही..पण सांबर- वडा मिळाला तर मात्र नाही म्हणायला होतच नाही..वाटतं एक प्लेट ट्राय करुयातच.. मग काय, दे रे एक प्लेट सांबर वडा, म्हणून ऑर्डर दिलीच म्हणून समजा...सांबरमध्ये डुंबलेला तो वडा आणि मस्त लालसर रंग आलेलं सांबर पाहताच तोंडाला पाणी सुटतं..मग तीन चार मिनटातच झाली की प्लेट फस्त...! खरं तर इडली काय आणि वडा काय माझा यातला विक पाँईट आहे तो म्हणजे सांबर...आणि त्याबरोबर मिळणारी चटणी..! ज्या हॉटेलमध्ये सांबर आणि चटणी उत्तम तिथल्या सांबर इडलीवर हात साफ केलाच म्हणून समजा...
सांबर वडा

इडली आणि वडा हे दोन्ही पदार्थ पचायला फारसे अवघड नाहीत..त्यातच ते मिळतातही सगळीकडे..आता हैदराबादच कशाला आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरातून चौका चौकात इडली सांबर, वडा सांबर, उथ्थपा, दोसा मिळतोच की..आणि त्यात जर हे हॉटेल साऊथ इंडियन मालकाचं असेल तर खुशाल जा आणि सकाळी सकाळी गरम सांबरबरोबर वडा किंवा इडलीवर हात साफ करून बघा..! मस्त मज्जा येईलं..! मग होऊन जाऊयात सांबर इडली...

Thursday, April 5, 2012

शूभम शिर्के अपहरण आणि हत्येनंतर....


पिंपरी चिंचवडमधल्या शूभम शिर्के या शाळकरी मुलाचं अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची बातमी दोन दिवसापूर्वी आली. त्यातच हा सगळा प्रकार त्याच्या वर्गातल्या सहकारी मित्रांनी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याचं समजल्यावर खूपच वाईट वाटलं. ज्याचं अवघं आयुष्य शिल्लक आहे. अजून खेळण्याचं त्याचं वय, उमलण्याच्या अगोदरच फुल चिरडून टाकावं अशी ही घटना तर दुसरीकडं हे कृत्य करणारेही त्याच्याच वयाचे त्याच्याच वर्गातली मुलं असल्याचं समजल्यावर तर डोक्यात ना ना विचार आले. शुभमचं अपहरण हे त्यांनी ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी केलं. त्यातले १५ हजार रुपये त्याच्या वडीलांनी त्या मुलांना दिलं. पण ते देताना त्यांनी ज्या मोटारसायकलचा वापर केला त्याची संपूर्ण माहिती शूभमच्या वडलांनी पोलिसांना सांगितली. त्यामुळे हे गुन्हेगार लगेच हाताला लागले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. हा सगळा प्रकार उजेडात आला तेंव्हा आणखी एक गोष्ट समजली ती म्हणजे त्या मुलांनी हा सगळा प्रकार टीव्हीवरची सीआयडी मालिका पाहून केल्याचं त्या मुलांनी पोलिसांना सांगितलं.

हा सगळा प्रकार डोकं सुन्न करणारा आहे. दहावीच्या वर्गातली ही मुलं ५० हजार रुपयांसाठी आपल्याच एका मित्राचं अपहरण करतात काय आणि त्याचा खून करतात काय हे सगळच विचार करण्याच्या पलीकडे गेलय ! ज्या मुलांनी हा सगळा प्रताप केलाय़ त्यांचं वयही काही एवढा मोठा गुन्हा करण्याचं नक्कीच नाही. पण ही मुलं या थराला का गेली असावीत याचा गांभिर्यानं विचार करावा लागणाराय. त्या मुलांना अपहरणासारखी कल्पना सुचावी त्यातून खून करण्यापर्यंत त्यांची मजल जावी हे सगळंच चित्रपटातल्या कथेसारखं आहे. आता शुभम तर या जगात नाही, त्याच्या आई वडीलांवर दुखःचा डोंगर कोसळलाय. तर दुसरीकडं ज्या मुलांनी हा प्रकार केलाय त्यांच्या आई वडीलांची स्थितीही अशीच आहे.  आपली मुलं अपहरण आणि खूनाच्या गुन्ह्यात अडकलेली आहेत हे कोणत्याही पालकांना  शरमेनं मान खाली घालायला लावणाराच आहे. त्या पालकांना समाजात जगताना गुन्हा न करताही अपराध्यासारखं वाटत राहणाराय. कारण त्यांनाही एकप्रकारे न केलेल्या गुन्ह्याची ही शिक्षाच नाही काय..

ज्या मुलांनी हे अघोरी प्रताप केलाय त्यांचं वय पाहता त्यांना कायद्याच्या चौकटीत कदाचित मोठी शिक्षा होणार नाही. कारण अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या पळवाटातून कदाचित त्यांची सुटका होईलही ! पण त्यातून हा प्रश्न सुटणारा नाही..! या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण झालेत..??? ही मुलं खेळण्या-बागडण्याच्या या वयात एवढ्या मोठ्या गुन्ह्याकडे वळलीच कशी अशा प्रश्न उरतोच. त्यामुळे एकट्या शुभम किंवा हा गुन्हा करणा-या त्या दोन मुलांपुरता हा विषय न राहता सगळ्या पालकांना विचार करायला लावणाराय. तर शूभमच्या विषयालाच धरुन आणखी एक प्रकार मला आठवला तो म्हणजे दोन महिन्यापूर्वीच चेन्नईत एका नववीच्या मुलानं त्याच्या वर्ग शिक्षिकेचा वर्गातच चाकूनं भोसकून खून केला.त्या शिक्षिकेचा गुन्हा एवढाच होता की तो मुलगा अभ्यासात ढ होता. त्यावरुन त्या नेहमी त्याला रागावत आणि घटनेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी त्या मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रारही केली होती. त्याचाच राग मनात धरुन त्या मुलानं आपल्याच वर्गशिक्षिकेचा वर्गातच खून केला..!
पिंपरी चिंचवड मधली घटना आणि चेन्नईतली घटना यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे ह्या दोन्ही प्रकरणात खून करणारी मुलं ही शाळकरी आहेत. म्हणूनच डोक्यात पुन्हा पुन्हा प्रश्न उभा राहतोय तो हा की, ही लहान, सुंदर मुलं आयुष्याचा पाया बांधतानाच खूनासारख्या अत्यंत घृणास्पद प्रकाराकडं झुकतातच कशी. ? एवढा मोठा आणि एखाद्याचं जीवनच संपवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात का घोळत असावा ? ही गुन्हेगारी प्रवृतीची बिजं त्यांच्या मनात या वयात कशी काय रुजली..? त्यांना त्याची भीती का वाटली नसावी ? आणि खून केल्यानंतर होणारी शिक्षा हे आपलं आयुष्य संपवणारी असते ह्यापैकी त्यांना कशाचीच भिती कशी काय वाटली नसावी..? असे अनेक प्रश्न मनात येतात. तर दुसरीकडं ही मुलं या थराला गेली त्याचा दोष कुणाचा असाही प्रश्न निर्माण होतोच..?

लहान मुलं घडत असताना त्यांच्यावर आजूबाजूच्या परिसराचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कारच व्हायला हवेत. पण समाज बदलत चाललाय, शहरीकरण वाढलय. नोकरीच्या निमित्तानं आई वडील दोघेही घराबाहेर पडतात. तर दुसरीकडं विभक्त कुटुंब पद्धतीमुळं घरं लहान झालीत. घरात या मुलांवर संस्कार करायलाच कोणी नाही. त्यामुळं अशी मुलं टीव्ही, इंटरनेट यासारख्या माध्यमाकडं जास्त आकर्षित होताना दिसतायत. त्यातूनच या मुलांमध्ये एकलकोंडेपणाही घर करु पहातोय. त्यांच्यावर घरातले चांगले संस्कार होण्याऐवजी टीव्हीचे संस्कार होऊ लागलेत. काय चूक आणि काय बरोबर, काय करावं आणि काय करु नये, हे सांगणारी माणसचं आज घरात नाहीत. त्याचा दोष ना त्या मुलांचा ना त्या पालकांचा.. त्यातून मुलं काही अनुकरण करण्याच्या फंदात फसतात आणि त्यातून अपहरण आणि खूनासारखे गंभीर प्रकार या मुलांच्या हातून होत आहेत.त्यातून मार्ग काढणं सोप्प नाही. अशा या बदलत्या सामाजिक परिस्थीतीत पालकांची अवस्थाही बिकट झालीय आणि आपण सर्वजण खूपच अवघड वळणावर येऊन ठेपलोय.  

हा सगळा प्रकार झाल्यानंतर पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे असा एक मतप्रवाह बाहेर आला. कारण या लहान मुलांना घडवण्याची पहिली जबाबदारी ही आई वडीलांचीच आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ही मोठी समस्या ऊभी ठाकलीय. एकीकडे महागाईतून जगणं मुश्किल होत आहे. दररोजच्या समस्यांतून मार्ग काढत काढत जगण्यासाठी धडपडणा-या  पालकांची परिस्थीती असे प्रकार पाहून आणखीनच दयनिय होतेय. ही एक मोठी कौटुंबिक आणि सामाजिक समस्या आपल्या समाजासमोर आ वासून ऊभी आहे. त्यातून मार्ग काढताना अर्थातच आपल्या सर्वांची दमछाक होतेय आणि आपल्यासमोर काय वाढून ठेवलय याचा विचार सारखा मनात घोळत राहतोय.
शूभम अपहरण आणि खून प्रकरणानंतर पालकांच्या समस्येत वाढ झालीय. ती म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष देण्याची ! आपली मुलं काय करतात ? कोणाबरोबर फिरतात ? शाळेत ते काय करतात ? त्याची मित्रमंडळी कोण कोण आहेत ? तो शाळेनंतर काय करतो ? यासह सर्वच बाबींकडे लक्ष द्यावं लागणाराय. कामाचा कितीही व्याप असला तरी मुलाच्या आणि आपल्याही भवितव्यासाठी आपल्याला मुलं आणि कुटुंबासाठी वेळ द्यावाच लागणाराय…! मुलांबरोबर दररोज थोडातरी वेळ देऊन त्याच्याशी बोलावं लागणाराय. फक्त मुलांच्या सर्व भौतिक गरजा भागवून चालणार नाही तर त्यांच्या मानसिक गरजाही विचारात घ्यावा लागणारायत. थोडासा वेळ मुलांना देऊन त्यांचा पालक नव्हे तर मित्र बनण्याचा आपण प्रयत्न करावा. काय सांगावं यातूनच कदाचित उद्याचा एखादा धोका टाळता आला तर... !!!

Sunday, April 1, 2012

पिण्याच्या पाण्याचे संकट


राज्याचे पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार लक्ष्मणराव ढोबळे यांचं पाण्यासंदर्भातलं वक्तव्य ऐकलं आणि वाईट वाटलं...लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर जिल्ह्यातले असून ते बोलतात छान. ते प्राध्यापक होते म्हणूनही ते बोलण्यात पटाईत असतील. पण कधीकधी ते बोलतात आणि नाहक वाद ऊभा करतात. आज ते वाढीव पाणीपट्टीवर बोलले तेही वादग्रस्तच..यापूर्वी त्यांनी पत्रकारांना ऊसाच्या दांडक्यानं बडवलं पाहिजे असं म्हणून वाद निर्माण केला होता...तर मुद्दा आहे पाण्याचा.. सोलापूर महापालिकेनं शनिवारी पाणीपट्टीत २५ टक्के वाढ केली.. मुळात सोलापूरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुळीत होत नाही. जे पाणी येतं ते दुषीत असतं. त्यामुळे अर्थातच पाणीपट्टी वाढल्यामुळे लोक नाराज असणं स्वाभाविक आहे. तोच धागा पकडून पत्रकारांनी त्याच विभागाचा मंत्री आणि सोलापूरचा पालकमंत्री या नात्यानं पाणीपट्टी वाढीबद्ल ढोबळे सरांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी त्या पाणीपट्टी वाढीचं जोरदार समर्थन केलं. एवढ्यावरच थांबतील तर ते ढोबळेसर कसले. या मंत्रीमहोदयांनी पाणीपट्टी वाढीचं समर्थन करताना पाण्याची तुलना चक्क सिगारेट आणि तंबाखूशी केली. तंबाखू सिगारेटचे दर जेवढे वाढलेत त्या तुलनेत पाण्याची दरवाढ काहिच नाही अशी मुक्ताफळं उधळून ते मोकळे झाले..


पाणीपट्टी वाढीचं समर्थन करणं त्या खात्याचे मंत्री म्हणून आपण समजू शकतो. पण मुळात त्यांनी त्या पाणीपट्टी वाढीचं समर्थन करताना ज्या दरवाढीचा दाखला दिलाय. पर्यायानं तुलना केलीय तीच मुळात चुकीची आहे. पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. ती पुरवणं हेसुद्धा संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेचं पहिलं कर्तव्य आहे. तसं तंबाखू किंवा सिगारेट पुरवणं ही काही त्यांची जबाबदारी नाही आणि दुसरं म्हणजे या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केलं नाहीतर तर माणूस जगू शकतो. त्याची आवश्यक बाबीत गणनाच होऊ शकत नाही. तसं पाणी हे आवश्यकच नाही तर अत्यावश्यक बाब आहे हे मंत्रीमहोदयांना माहित नाही काय..कमीत कमी तुलना करताना तरी आपण कशाची तुलना कशाशी करतोय याचं मंत्रीसाहेबांना ताळतंत्र असायला हवं होतं..

आता पाण्याचाच विषय निघालाय त्यामुळे त्याच्यावर आपण बोलूयात..आज सगळीकडे पिण्याच्या पाण्याची अवस्था समाधानकारक नाही..निदान उन्हाळ्यात तरी नाहीच..मुंबई असो कि पुणे उन्हाळा आला की पाणी पुरवठ्याचा प्रश्न चर्चेत येतोच. सध्याही पुण्यात पाणी कपातीचं संकट आहे. तर इतर शहरातही तिच बोंब आहे. शहरांना पाणी पुरवठा करण्या-या धरणांमध्ये पाणी कमी झाल्यानं पाणी कपात करावीच लागतेय. हे सत्य आहे. मग आपली वाढती गरज लक्षात घेता आपण पाण्याचा योग्य तो साठा व्हावा याचं नियोजन का करत नाही असा प्रश्नही उपस्थित होतो.मुख्यता धरणातलं पाणी हे पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी वापरलं जातं. -याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा धरणामधूनच होतो. पाऊस भरपूर झाला तरच ही धरणं भरतील आणि आपल्याला हवं तेवढं पाणी मिळू शकेल. पण पाऊस सर्वच भागात समान पडत नसल्यामुळे समस्या वाढतायत. त्यातच पाण्याचे जे स्रोत आपल्याकडं आहेत त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी पावसाचा थेंब न थेंब वापरात यायला हवा. तसे प्रयोग झालेत. पण म्हणावा तसा त्याचा वापर केला जात नाही..हे झालं पाणी कमी पडतय त्याच्याबद्दल...

दुसरा मुद्दा हा तो पिण्याच्या पाण्याचा सुरुळीत पुरवठा...पण अनेक शहरातही पाणी सारख्याचं दाबानं येत नाही. तर काही शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होण्याच्या तक्रारी येतात. सोलापूरचचं पुन्हा उदाहरण देतो. सोलापूर शहराला होणरा पाणी पुरवठा नियमित आणि सुरुळीत होत नाही. अनेकदा हे पाणी रात्री अपरात्री सोडलं जातं. जे पाणी येतं ते दुषित असतं. याच दुषित पाण्यानं मागच्या वर्षी सोलापूरातले २१ बळी घेतले. दुषित पाण्याचा पुरवठा होत असताना आणि २१ बळी जाईपर्यंत महापालिकेचा पाणी विभाग काय झोपा काढत होता काय..पण त्याकडे लक्ष द्यायला आमच्या मंत्रिमहोदयांना वेळ नाही आणि पाणीपट्टी वाढीचं जोरदार समर्थन ते करतात हे पटत नाही. जो पाणीपुरवठा व्यवस्थित, नियमित आणि स्वच्छ होत नाही त्यासाठी पैसे कसले मागता असा प्रश्न जर नागरिक विचारत असतील तर त्यात त्यांचं काय चुकलं..त्याकडे त्या खात्याचे मंत्री म्हणून ढोबळेसरांनी लक्ष द्यायला हवं..मात्र पाण्याची समस्या सोडवण्यापेक्षा त्याची नको त्या पद्धतीनं तुलना करुन मंत्रीसाहेब फसले..

आजही आपण रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, यासारख्या मुलभूत सुविधांच पुरवण्यात अजून यशस्वी झालेलो नाही. विकास होतोय. पण त्याचबरोबर त्याचा समतोल साधाला जात नाही.प्रत्येकवेळी निवडणुका येतात आणि ह्याच प्रश्नावर लोकांची भलावण केली जाते. लोकसंख्या वाढतेय, शहरीकरणही झपाट्यानं वाढत आहे. त्यातुलनेत आपलं नियोजन कुठं तरी चुकतय. म्हणूनच आपण या मुलभूत प्रश्नावर आजही मात करु शकलो नाही..पिण्याच्या पाण्यासाठी आजही झगडावं लागत असेल तर हे चित्र आशादायी नक्कीच नाही..शहरात एकवेळ पाणी मिळतं तर..गावाकडे जाऊन पहा. काय अवस्था आहे पाण्याची..पिण्याच्या पाण्यासाठी लांब कुठंतर शेतात विहिरीवर, तळ्यात किंवा नदीच्या पात्रात जावं लागतं. उन्हाळ्यात नदीचं पात्रही कोरडं पडलेलं असतं. त्या वाळूत छोटे छोटे खड्डे हातानं घेऊन तिथून लहान भांड्यानं घागरभर पाणी घेऊन बायका एक दोन किलोमिटर अंतर चालतात. काही ठिकाणी हातपंपाचा सहारा आहे. तोही जेमतेमच. हे दृष्य पाहिलं की ढोबळेसरांसारख्या मंत्र्यांच्या व्यक्तव्याची किव करावीशी वाटते..तरी बरं ढोबळे सर हे ग्रामिण भागातूनच निवडून जातात. त्यामुळे त्यांना याची कल्पना नाही असं म्हणता येत नाही..

पाण्याचा विषय आहे म्हणून आजची परिस्थीही सांगतो. मुख्यमंत्र्यांनीच परवा अधिवेशनात सांगितलं की राज्यात सध्या जवळपास साडेचारशे टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. ही परिस्थीती मार्चमधली आहे. अजून एप्रिल मे आणि जून पार पडायचाय. तेंव्हा पुढची परिस्थीती काय असेल ह्याचं चित्र डोळ्यासमोर आलं तर भीती वाटते..मग आपण पाण्यावर जो कोट्यवधी रुपये खर्च केलाय तो गेला कुठं..महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून गणलं जातं. या राज्यात आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवावे लागतात हे लाजिरवाणं नाही का..म्हणजे पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी पाणी मात्र काही मिळत नाही असंच म्हणावं लागतय..  

पाणी हे मानवनिर्मित नाही, ते नैसर्गिक आहे, पावसावरच पाण्याचं गणित आहे हे वास्तव आहे..पण आपण त्याचं योग्य निजोयन करत नाही त्याचा दोष आपण पावसाला देऊन चालणार नाही ह्याकडेही लक्ष दिलं पाहिजे...बाकी सिगारेट, तंबाखू महाग झाली म्हणून पाणी महागलं तर बिघडलं कुठं अशी मुक्ताफळं उधळण्यानं हा प्रश्न सुटणार नाही..बाकी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून मीही बसलोय..त्यामुळे वरुन राजा प्रसन्न व्हावा आणि किमान पाण्याचा तर प्रश्न सुटावा हीच आजच्या रामनवमीनिमित्त प्रभूला मागणं आहे...त्यात उपरवाल्यानच लक्ष द्यावं म्हणजे असली मुक्ताफळं तरी ऐकावी लागणार नाहीत..