Friday, July 20, 2012

राजेश खन्ना- पहिला सुपरस्टार


राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार , पहिला रोमँटिक हिरो, ज्यानं सलग 15 सोलो हिट दिले , तो महान अभिनेता बुधवारी हे जग सोडून गेला. वयाच्या 69 वर्षीच त्यानं या जगातून एक्झीट घेतली. राजेश खन्नानं 1970 चं दशक गाजवलं. तो खऱ्या अर्थानं सुपरस्टार होता. त्यानं पहिला चित्रपट केला तो आखिरी खत पण तो खरा स्टार झाला तो आराधना चित्रपटापासून..शर्मिला टागोर बरोबरच्या आराधनामधली गाणी खूपच गाजली. मेरे सपनो रानी की कब आयेगी तू...या गाण्यानं त्यावेळच्या तरुण पिढीला भुरळ घातली होती.. तर तरुणींच्याही सपनों का सौदागर झाला...आराधना नंतर राजेश खन्नानं 15 सलग हिट दिले. त्यातूनच तो सुपरस्टार जन्माला आला...आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, हाथी मेरे साथी, नमक हराम, हम दोनो, आनंद ..एक ना दोन अनेक चित्रपटांनी इतिहास रचला...

राजेश खन्नाचा उल्लेख येताच सर्वात आधी नावं येतं ते आनंद या चित्रपटाचं, या चित्रपटात त्यावेळी नवखा असलेला अमिताभ बच्चन राजेश खन्नाच्या समोर होता..खूप गाजला तो चित्रपट. खऱं तर याच चित्रपटानं अमिताभलाही एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं..आनंद चिॆत्रपटाची कथा, त्यातला राजेशचा मृत्यु आणि सदाबहार गाण्यानं चित्रपट त्यावेळी गाजला तसाच तो आजही पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे. त्यातला बाशू मोशाय आजही लोकांना आठवतो..
राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या यशात गाण्यांचाही मोठा हात आहे..राजेश खन्ना किशोरकुमार आणि आर डी बर्मन या त्रिकुटानं एकसे बढकर एक हिट गाणी दिलीत..मेरे सपनोंकी रानी, रुप तेरा मस्ताना, कुछ तो लोग कहेंगे, ये शाम मस्तानी, ये क्या हुआ, चिंगारी कोई भडकी, जय जय शिवशंकर, ओ मेरे दिल के चैन, ये जो मोहब्बत है, ही आणि यासारखी अनेक गाणी या चित्रकुटानं दिलीत जी ऑल टाईम हिट आहेत..आजही यातली अनेक गाणी गुणगुणावी वाटतात... राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचा आवाज हे जणू समिकरणच बनलं होतं...ही गाणी जशी हिट झालीत तशीच आन मिलो सजना या चित्रपटातील गाण्यांनीही धुमाकुळ घातला होता. अच्छा तो हम चलते है हे गाणही त्यापैकीच एक..निर्माते ओमप्रकाश यांनी गितकार आनंद बक्षी आणि संगितकार लक्ष्मिकांत यांना आणखी एक रोमँटीक गाणं तयार  करण्यास सांगितलं..पण आनंद बक्षी यांनी 20-25 गितांचे बोल लिहिले पण ओमप्रकाश यांना हवं असलेलं रोमँटीक गाणं काही तयार होतं नव्हतं...10 तास मेहनत करुनही गाण्याचे बोल काही  पसंत पडत नव्हते . त्यावेळी आनंद बक्षी जायला निघाले आणि म्हणाले अच्छा तो हम चलते हैं...त्यावर लक्ष्मिकांत यांनी म्हटलं फिर कब मिलोगे...आणि यातून आनंद बक्षी यांना गितांचे बोल मिळाले आणि पुढच्या 25 मिनीटात ते गाणं तयार झालं...ज्या गाण्यानं सुद्धा इतिहास रचला..अशी एक ना दोन अनेक गाणी होती राजेश खन्ना यांच्या चित्रपटात ज्यांनी त्यांना सुपरस्टार पदापर्यंत पोचण्यास मोलाचा हात दिला...

राजेश खन्ना रोमँटिक हिरोच, पण त्याच्या भूमिका तशा इमोशनल होत्या..राजेश खन्ना सुद्धा आपली इमेज ही इमोशनल हिरोची आहे अॅक्शन हिरोची नाही असंच म्हणत होता. राजेश खन्ना हा सर्वार्थानं सुपरस्टार सारखंच जगला..पण त्याची जादू ओसरली तेव्हांही तो त्याच तोऱ्यात वावरत होता. राजेश खन्नाची जागा अमिताभ बच्चननं घेतली, दोघांच्या अभिनयाचा बाज वेगवेगळा आहे..तरिही नमक हराक नंतर अमिताभ राजेश खन्नाला भारी पडतोय हे स्पष्ट झालं. ते राजेश खन्नानं खाजगीत मान्यही केल्याचं चित्रपटसृष्टीतले राजेशच्या जवळचे पत्रकारही सांगतात..पण मी परत येत आहे असा तो नेहमी म्हणायचा..आणि त्यानंतर अवतार, सौतन सारखे हिट त्यानं दिलेही..पण तो काळ अँग्री यंग मॅन अमिताभचा होता..त्यामुळे पुढे राजेश खन्नाची जादू फारशी चालली नाही..त्यानंतर राजेश खन्ना राजकारणात आला..त्यानं दिल्लीतून लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात  निवडणूक लढवली होती...या निवडणुकीत अडवाणी जिंकले पण त्यांना हा विजय मिळवणं कठीण झालं होतं..अडवाणी फक्त दिड हजार मतांनी जिंकले होते...जर ते हरले असते तर राजेश खन्नाही जायंट किलरच्या पंक्तित बसला असता..तसा त्यानं हा पराभवही स्विकारला नाही..त्यानंतर तो खासदार म्हणून 1991 ते 1996 पर्यंत राजकारण होता..त्यानंतर तो निवडणुक प्रचारात सक्रीय भाग घेत होता..

राजेश खन्नासाठी त्याचे चाहते जीव ओतायचे, त्याला खूप मोठे चाहते लाभले होते. तरुण मुली तर त्याच्यासाठी वेड्या व्हायच्या..राजेश खन्ना सतत चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला अभिनेता होता...तो आपल्या चाहत्यांनाच सर्व काही मानत असं..व्ययक्तित आयुष्यातही तो ऐटीत आणि रुबाबातच राहिला..पण डिंपलबरोबरचं त्याचं लग्न फार वर्ष टीकलं नाही..आठ वर्षानंतर दोघे वेगेळे झाले पण शेवटपर्यंत त्यांनी घटस्फोट घेतला नाही....आयुष्याच्या संध्याकाळी त्याला एकटेपणा जाणवत होता..पण शेवटचे काही दिवस डिंपल, दोन्ही मुली आणि जावई अभिनेता अक्षयकुमार त्याच्याबरोबर असायचे...त्यानं शेवटी एका जाहिरातीसाठी काम केलं. मरण्यापूर्वी शूट करण्यात आलेली त्याची एका पंख्याची जाहिरातही खूपच वास्तविक झाली होती...मेरे फॅन हमेशा मेरेही रहेंगे म्हणतच राजेश खन्नानं या जगाचा निरोप घेतला..

No comments:

Post a Comment