Thursday, May 31, 2012

पाणी पुरवठा मंत्री ढोबळे सरांचा दुष्काळ


महाराष्ट्रातील काही भागात यावर्षी भिषण दुष्काळ पडलाय..पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकूनही पाणी मिळत नाही. तर जनावरांना चारा नाही. जमीनी ओस पडल्यात. अशी गंभीर परिस्थीती असताना या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मात्र हा दुष्काळ दिसत नाही. जो काही दुष्काळ हा तो तेवढा तिव्र नाही. तो मिडीयानं उभा केलाय. हा पितपत्रकारितेचा प्रकार असून टीव्हीवाल्यांनी त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी दुष्काळ अतिरंजीत करुन दाखवलाय अशी मुक्ताफळं ह्या मंत्रीमहोदयांनी उधळलीत. आता राज्यात दुष्काळ आहे की नाही हे जर या राज्याच्या मंत्र्याला माहितच नाही तर त्यांना कोण सांगणार. बरं या दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यावर तोच मंत्री दुष्काळ तेवढा काही भीषण नाही असं जर म्हणत असेल तर हे या राज्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. ढोबळेसाहेब ज्या मंतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मोहोळ-मंगळवेढा तालुक्यात पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यांच्याच मतदारसंघाला लागून सांगोला तालुका आहे. तसच सोलापूर जिल्ह्याची सीमा असलेल्या सांगली आणि सातारा भागातही मोठा दुष्काळ आहे. याच भागात काँग्रेसचे युवराज येऊन दुष्काळाची पाहणी करुन गेले. पण ढोबळेसाहेबांना मात्र हा सर्व मिडीयाचा अतिरंजीतपणा वाटतो..जर हा दुष्काळ मिडीयानं उभा केला असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची, जनावरांना चारा डेपोची व्यवस्था कशासाठी केली आहे. पन्नास पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या पण दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागालाही चारा डेपो देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कशासाठी दिलेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत त्यांच्याच मंत्रीमंडळात ढोबळेसाहेब पाणी पुरवठा मंत्री आहेत ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय...

राज्यात दुष्काळाची जर गंभीर परिस्थीती नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे २७०० कोटींची मदत कशासाठी मागितली हे ढोबळेंनी सांगावं. त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि जाणते राजे शरद पवार यांनी दुष्काळ प्रश्नावर राज्यापालांना का लक्ष्य केलं होतं. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला पाहिजे असं पवारसाहेब का म्हणाले.. हे ढोबळेसरांनी लक्षात घ्यावं. याउपर जर राज्यात दुष्काळ नाही असं जर आपणास म्हणाचय तर मग केंद्र सरकार मदत तर कशाला करेल हेसुद्धा या ढोबळेंना कळू नये का.. खरं तर एखाद्या विषयावरुन लक्ष दुसरीकडं वळवण्याचा किंवा जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. ढोबळेसाहेब पाणी पुरवठामंत्री आहेत. त्यांनी जरा या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला असता तर त्यांना या दुष्काळाच्या झळा आणि दुष्काळग्रस्तांच्या व्यथाही कळल्या असत्या. पण केवळ सरकारी आकडेवारी नाचवून दुष्काळाची तीव्रता कमी आहे हे सांगण्यातच ज्या मंत्र्याला धन्यता वाटते त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा नाद सोडावा. कारण आपण जर जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसू तर त्या खूर्चीवर बसण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही...

ढोबळेसाहेब आपण म्हणता तसं अतिरंजीत चित्र मिडीयानं रंगवलं असेल तर या भागातली जनता पाण्याच्या टँकरसाठी दिवसभर वाट का पहातेय. एवढी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण सरकारी कागदांवर विसंबून न रहता प्रत्यक्ष परिस्थीती पाहून या. तुम्हाला त्याची तीव्रता कळेलच. दुसरं असं की दुष्काळ काय आणि दुष्काळ सदृष्य परिस्थीती काय किंवा टंचाई सदृस्य परिस्थीती काय हे झालं सरकारी नियमानुसार दुष्काळाचं केलंल वर्णन..पण दुष्काळ हा दुष्काळच असतो हे तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनीधीला कळू नये यापेक्षा तुमचं अज्ञान ते काय..

दुष्काळ किती आहे. तो मिडीयानं उभा केलाय की निसर्गाचा मार आहे. यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या दुष्काळग्रस्तांना वेळेवर मदत मिळणं गरजेच आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्या गावात दिवसाला चार पाच टँकर पाणी पुरवले जातात असं सांगितलं जातं त्याठिकाणी दिवसातून एकदाच टँकर येतो. ज्या भागात टँकरच्या १०-१५ खेपा व्हायला हव्यात तिथं जेमतेम दोन तीन खेपा होतायत. तर काही गावाला दोन दोन दिवस टँकर येतच नाही ही वस्तुस्थीती आहे. फक्त कागदावर १५०० टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे किंवा १००-१५० चाराडेपो उभा केलेत हे सांगून लोकांची थट्टा करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कीती होतेय यावर भर दिला तर दुष्काळावर काही प्रमाणात तरी मात करण्यास सरकारला यश येईलं. नाहीतर नेहमीप्रमाणे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी एवढे कोटी रुपये खर्च झाले. तर चारा डेपोवर एवढे कोटी खर्च झाले असे सरकारी आकडे फक्त दाखवले जातील..

दुष्काळग्रस्त माणूस निसर्गाच्या ह्या मा-यानं अगोदरच हैराण झालाय. पिण्यासाठी पाणी, जनावराला चारा, पिण्याचं पाणी आणि हाताला काम एवढच्या त्याच्या माफक अपेक्षा आहेत. त्या जर हे सरकार देणार नसेल तर सरकार म्हणून तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही. आपण मायबाप सरकार आहात, लोक तुमच्याकडे आशेनं पहात आहेत. त्यांना मदत करुन त्यांच्या जगण्याला हातभार लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ते सोडून त्याचं खापर दुस-यावर फोडून समस्या संपणार नाही.. ढोबळेसर आपण हुशार आहेत. प्राध्यापक आहेत, ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्याचकडे पाणी पुरवठा विभाग आहे. लोकांना त्याचा फायदा होईल एवढं काम करण्यात आपण आपली ऊर्जा खर्च केली तर ते तुम्हाला शोभून दिसेल. नसते मिडियावर खापर फोडून काही समस्या सुटणार नाहीत हे समजण्याएवढे आपण सुज्ञ आहेत एवढचं या निमित्तानं आपणास सांगणं आहे...

1 comment:

  1. '' महाराष्ट्रात आणि देशभरात प्रत्येक वॉश बेसिन आणि स्वयंपाक घरातील सिंक वरील तोटयांवर तसेच इतर स्थानकांवर " ठराविक मात्रेचे पाणी सोडणारे 'नोजल' लावणें " आवश्यक आणि बंधनकारी केले जावे असा कायदा असावा म्हणजे अपव्यय होणारे पाणी वाचवले जावू शकेल" शासनाने या तांत्रिक व्यवस्थेचे ताबडतोब स्थापन करावे ही आग्रहाची विनंती आहे.''
    कृपाकरून केन्द्रीय कृषि मंत्री श्री शरदराव पवार साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथीराज चव्हाण साहेब व पाणी पुरवठा मंत्री श्री लक्ष्मण ढोबळे साहेब यांनी
    ' मानव जीवनात पाण्याची गरज, जीवन संरक्षणाचे महत्त्व, शासनाचे या संदर्भातील उत्तरदायित्व आणि नैसर्गिक पाणी याची तूट लक्षात घेवून माझ्या वरील आग्रहा वर ताबडतोब वळण देण्याचे करावे. धन्यवाद.
    .................. चंद्रकांत वाजपेयी. { जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.} chandrakantvjp@gmail.com +91 9730500506.

    ReplyDelete