Tuesday, February 28, 2012

जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध किती योग्य..?

जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाचा वाद अजून मिटलेला दिसत नाही..पुण्यात काल ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना शिवसेनेच्या काही लोकांनी जैतापूरच्या प्रकल्पावर बोलण्यास मज्जाव केला.. झालं असं की..काकोडकर हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात अणु ऊर्जा प्रकल्पावर व्याख्यान देणार होते.. हे तिथल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना कळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे..तर मग हे काकोडकरसाहेब कसं काय त्याचं समर्थन करत आहेत..? आपल्या साहेबांचा विरोध असताना काकोडकर या विषयावर बोलतात म्हणजे काय..? झालं की मग दहा वीस टाळक्यांनी मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन काकोडकरांना अणु उर्जा प्रकल्पावर बोलू नका अशी तंबी दिली..! आयोजकांनीही राडा नको म्हणून जौतापूरचा विषय टाळला...शिवसनेच्या नेत्यांनी काम फत्ते झाल्याच्या आविर्भावात प्रसारमाध्यमांना सर्व माहिती दिली..पण अणु ऊर्जेसारख्या गंभीर विषयावर शिवसेनेच्या त्या संबंधित लोकांना तरी किती माहिती आहे याचा त्यांनीच विचार करायला हवा..! दुसरं असं की शिवसेनेचा जरी त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी राजकीय पातळीवर तो करावा.. त्यासाठी अनिल काकोडकर सारख्यांना बोलण्यास मज्जाव करून काय साध्य होणाराय..? का उठसुठ आम्हाला पटत नाही म्हणून, तुम्ही हे करु नका ते करु नका..नाहीतर आमच्या स्टाईलनं धडा शिकवू ही भाषा आता पुरे झाली..!

राज्यात मागच्या पाच सहा वर्षापासून विजेचं भारनियन हे प्रचंड प्रमाणात होत आहे..सरकारी आकडेवारीनुसारच बारा बारा तास विजेचं भारनियमन केलं जातय..प्रत्यक्षात ते त्यापेक्षाही जास्त असतं.. शेतीला पाणी देण्याचा प्रश्न आहे.. शेतीसाठी तर रात्रीच पाणी द्यावं लागतय. मागच्या पंधरा वर्षात एकही वीज निर्मिती प्रकल्प राज्यात उभा राहिलेला नाही असं असताना जैतापूरमध्ये १० हजार मॅगावॅटचा जो अणु ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे त्याला विरोध कसला करताय..कारण काय तर अणु ऊर्जा प्रकल्प हे घातक असतात. त्यासाठी हे मागच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या अणु ऊर्जा प्रकल्पातील अपघाताचं उदाहरण देत आहेत..आणि काकोडकर हे अणु ऊर्जा प्रकल्प धोकादायक नाहीत हे सांगत आहेत.. ! हेच त्या शिवसेनेला पटत नाही..पण आपण विरोध कोणाला करत आहोत याची थोडी या लोकांनी माहिती घ्यावी..प्रकल्प उभा करायचा की नाही ते केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल ना.. आणि तुमच्यात जर धमक असेल तर सरकारला जाब विचारा ना..! त्यांच्याकडे जाऊन विरोध करा..!! काकोडकरांना बोलण्यास मज्जाव करून जैतापूरचा प्रश्न सुटणार आहे का..?

राज्यातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी विधायक करुन दाखवायचे सोडून फक्त विरोध करायचा हे योग्य नाही..ज्या शिवसेनेचा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे त्यांनीच दाभोळच्या एनरॉन प्रकल्पालाही विरोध केला होता..पुढे काय झाले हे त्या विरोध करणा-यांनी थोडं पहावं आणि मग विरोधाची भाषा करावी..एकतर काही चांगलं करायचं नाही, जे करतात त्यांना करु द्यायचं नाही, हे धंदे आता राज्यात थांबले पाहिजेत...स्वतःला समाजाचे ठेकेदार म्हणवणारे हेच शिवसेनेचे लोक कालपर्यंत व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत होते..राडेबाजी करुन ग्रिटिंगची दुकानं फोड. बागेत बसलेल्या जोडप्यांना चोप दे असले उद्योग करणारे हे महाभाग याच वर्षी झालेल्या व्हॅलेटाईन डे ला कुठे होते..? कारण सोप्पं आहे. यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या तरुण मतदाराला त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी विरोध केला नाही..त्यातच त्यांचे युवा सेनापती अजून कॉलेजात जातात त्यांच्या भवितव्याचा विचार करुन व्हॅलेंटाईनच्या विरोधाची तलवार त्यांनी मान्य केली..आज व्हॅलेंटाईनचा विरोध माळवलाय..कारण त्यात त्यांना फायदा दिसू लागलाय..विरोध केला तर युवराजांचे भवितव्य धोक्यात येऊ शकतं म्हणून तरुण वर्गाला दुखावण्याचं त्यांनी टाळलं..उद्या जैतापूरप्रश्नी काही तोडपाणी झालं की त्याचाही विरोध मावळणार..पण ती वेळेयेईपर्यंत ही तालिबानी पद्धत का..? लोकांना त्याचा जो हकनाक त्रास होतोय तो थांबवायला नको का...? सेनेचं नवं नेतृत्व त्यातही लक्ष घालेल आणि उगाचच विरोधाला विरोध न करता योग्य त्या ठिकाणी आपली शक्ती वापरेल अशी अपेक्षा करुयात..

दुसरं असं की राज्यात आज विजेचा प्रचंड तुटवडा आहे..राज्य अंधारात असताना ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणं आपल्या हिताचं नाही हे महाराष्ट्रानं एनरॉन प्रकल्पाला विरोध करुन अनुभवलंय. एका एनरॉनला विरोध केला त्यानंतर राज्यात पुन्हा कोणत्याच विज निर्मीती कंपनीनं गुंतवणुक केलेली नाही..त्याचे चटके राज्याला मागच्या दहा वर्षापासून बसत आहेत..त्याचा आपण बोध घ्यायला हवा..पण पुन्हा तोच कित्ता गिरवला तर हे राज्य अंधारात जाईलं आणि पुन्हा कोणीही महाराष्ट्रात विज प्रकल्पात तरी गुंतवणुक करण्यास धजावणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा राज्याच्या हिताचा आहे..त्याला विरोध न करता तो लवकरात लवकर कसा पुर्ण होईल आणि आणखी ऊर्जा प्रकल्प राज्यात कसे येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शिवसेनेनं सरकारवर दबाव टाकावा आणि राज्य विजेच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघेल याकडं लक्ष दिलं तर जनता त्यांनाही धन्यवाद देईलं...

Monday, February 27, 2012

केजरीवाल..! जरा सांभाळून बोला..!!!

संसदेत लुटारु, बलात्कारी आणि दरोडेखोर बसलेले आहेत, त्यांच्याकडून जनलोकपाल विधेयक पास होईल याची तुम्ही अपेक्षा कशी काय करु शकता ? हे शब्द आहेत याच देशातले महनीय,आदरनिय श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे..आता हे केजरीवाल कोण ? हे आपल्याला सांगण्याची गरज नसावी…. ओळखलं ना..! अगदी बरोबर, आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्याला खांदा लावून लोकपालच्या लढाईत जी कोणी दोन-चार टाळकी सतत टीव्हीसमोर बडबड करत असतात त्यातलेच हे एक विद्वान महाशय..! दुस-या शब्दात आणि अगदीच स्वच्छ मराठीतच सांगायचं झालं तर अण्णांच्या टोळीतले हे एक दिडशहाणे...मी त्यांच्याबाबत एवढी विशेषणं का वापरलीत हेही सांगून टाकतो..जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जो लढा उभा केलाय त्यात किरण बेदी, प्रशांत भूषण ही मंडळी आहेत..हे विधेयक पास व्हावं ही आमचीही इच्छा आहे..त्यासाठी लढा देणं, आंदोलन करणं ही लोकशाहीतली हक्काची हत्यारं आहेत. पण त्याचा वापर करताना इतारांचा आदरही राखलाच गेला पाहिजे...ज्या संसदेत आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांच्याबद्दल ही कसली भाषा..? तेसुद्धा याच समाजातलेच आहेत.आपणच त्यांना निवडूण देतोय..त्यांच्याबदद्लची भाषा वापरताना संयम हवा..! त्यांच्याबद्दल काय कोणाही दुस-या व्यक्तीबदद्ल जाहीरपणे अशा प्रकारची व्यक्तव्य करण्याचा अधिकार ह्या केजरीवालला कोणी दिला..? तो कोण दिडशहाणा लागून गेलाय काय ? अशा व्यक्तव्याची आणि त्या व्यक्तीची जेवढी निंदा करावी तेवढं कमीच आहे...त्यामुळे अरविंद केजरीवाल, बोलताना थोडा लगाम घाला आपल्या जिभेला, नाहीतर तीच जीभ हासडून कोणी भटक्या कुत्र्यासमोर टाकून देतील हे लक्षात घ्या...

लोकपाल विधेयकाच्या लढ्याला लोकांचा पाठिंबा आहे तो अण्णा हजारे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळे हे तुम्ही विसरु नका..पण अण्णांनीही अशा लोकांना तंबी द्यायला हवी.. कारण तुम्ही गांधीवादी म्हणवता आणि अशा शब्दांचा वापर करणा-यांना पाठीशी घालता हे ना तुम्हाला शोभते ना आपल्या संस्कृतीला...यापूर्वीही किरण बेदी यांनी खासदारांबदद्ल अपमानास्पद शब्द काढले होते..अण्णांनीही शरद पवारांना एका माथेफिरुनं दिल्लीत चापट मारली तेव्हा दिलेली प्रतिक्रिया लोकांना आवडली नाही...त्यामुळं इतरांबद्दल आपण आदराची भाषा वापरावी यातच तुमचं भलं आहे...

खरं तर जनलोकपाल विधेयक पास झालं म्हणजे या देशातला भ्रष्टाचार संपेल या स्वप्नात तुम्ही जे वावरत आहात तेच मुळी चुकीचं आहे. या देशात आजही अनेक कडक कायदे आहेत. त्याचा वापर करुनही शिक्षा देता येते...फक्त कायदे करुन त्या समस्येवर मात करता येत नाही हे आपण दहशतवादीविरोधी जो पोटा कायदा केला होता किंवा हुंडा विरोधी कायदा केला होता यावरुन आपण पाहिलेले आहे..उलट त्या कायद्यांचा दुरुपयोगच जास्त झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे कायदा कडक करुन चालत नाही तर त्याची अंमलबजावणी योग्यरितीनं व्हायला हवी...हे झालं त्या लोकपालबाबत...

दुसरं असं की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणे हिरीरीनं प्रचारात भाग घेणार होता..! पण कुठं दिसले नाहीत तुम्ही लोक..? कुठल्या बिळात जाऊन बसला होता तुम्ही हे लोकांना सांगा ना...! अण्णांची तब्बेत ठिक नव्हती म्हणून ते उपचार घेत होते..मग तुमचे ते बाकीचे अतिशहाणे सदस्य काय तुमचे पाय आणि डोकं चेपत होते काय...? महाराष्ट्रातही जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका झाला पण तुमच्यापैकी कोणीही प्रचाराला फिरकले नाहीत...कुठे आफ्रिकेच्या सफरीवर गेली होती की काय तुमची टोळी. ? त्यावेळी तुमचा आवाज गप्प का होता आणि आता निवडणुकीचा माहौल संपला की तुमची वटवट सुरु झाली याला काय म्हणायचे....

राजकीय लोकांना शिव्या घालताना तुम्ही तुमच्याकडे का नाही पहात...? त्यांना भ्रष्टाचारी, लुटेरे म्हणताना आपण काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात काय...? सांगा ना जनतेला त्या किरण बेदीनं विमानप्रवासाच्या नावानं पैसे लुटले ते...आणि ते प्रशांत भूषण आणि त्यांचे पिताश्री शांतीभूषण यांनी कमावलेल्या संपत्तीचे काय...? कुठन आली त्यांची एवढी संपत्ती..? लोकांना काय तुम्ही दुधखुळे समजता काय...? दुस-याला दुषणं देण्यापूर्वी आपण आपल्याकडे पहावं, आपण किती स्वच्छ आहोत आणि नंतरच इतरांना दोष द्यावा..! मग तुमच्या संपत्तीवर तुम्ही सारवासरव करुन आपण बुवा नाही त्यातले हे सांगण्याचा आटापीटा करता हे कशासाठी...? त्यामुळे तुम्हालाही दुस-यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही..

लोकपाल विधेयकासाठी तुम्हाला जे काही तुणतुणं वाजवायचं ते तुम्ही खुशाल वाजवा पण ते वाजवत असताना तुमच्या भाषेला थोडा लगाम असू द्या नाहीतर आज जे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत तेच लोक तुमच्या तोंडात शेण घालायलाही मागंपुढं पहाणार नाहीत हे विसरु नका.. खासदारांना नावं ठेवताना, त्यांच्यावर आरोप करताना पातळी आणि मर्यादा सोडू नका.. कारण त्यांना निवडून देणारीसुद्धा तीच जनता आहे जी तुम्हाला पाठिंबा देत आहे. त्यांचा अनादर करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही..म्हणून यापुढेही तरी आपण लक्ष्मणरेषा ओलांडू नका हीच तमाम लोकांची इच्छा आहे एवढचं आता सांगणं आहे...

धन्यवाद..

Friday, February 24, 2012

भ्रष्टाचाराचे ताजे उदाहरण- कृपाशंकरसिंग

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंगांच्या बेनामी संपत्तीवर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं हातोडा फिरवलाच.. जे काम पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचं आहे ते काम त्या पथकानं चोख पार पाडलं नाही म्हणून शेवटी न्यायालयाला ते करावं लागलं..मुंबई पोलिस आयुक्तांनीच कृपाशंकर यांच्या संपत्तीचा तपास करावा असे आदेश देत त्यांची मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले..यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक तसच विरोधातले काहीलोक मात्र सुखावलेत.. लगेचच कृपाशंकर यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं समजलं.. पण तो तर कोर्टाच्या निर्णयाअगोदरच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानं संभ्रम वाढला.. आणि कारण देण्यात आलं की मुंबईत काँग्रेसचा पराभव झाला, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून कृपाशंकरसिंग यांनीच राजीनामा दिला होता.. तो स्विकारण्यात आलाय अशी सारवासारव काँग्रेसमधून करण्यात आली.. पण नैतिकतेच्या या गप्पांवर आता गल्लीतलं शेंबडं पोरगही विश्वास ठेवणार नाही..

राजीनाम्याचा विषय वेगळा आहे.. आज जो विषय आहे तो या कृपाशंकरांनी अल्पावधितच कमावलेल्या गडगंज संपत्तीचा...जो माणूस कांदे-बटाटे विकून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्याकडे राजकारणातली मोठी पदं आणि तेवढ्याच मोठ्या रकमेची संपत्ती आली कुठून. राजकारणात आजकाल एखादा नगरसेवकही रग्गड पैसा कमावत.. हे काही गुपित राहिलेलं नाही..पण म्हणतात ना घराचे वासे फिरले की घरही फिरतं..! तसाच काहीसा प्रकार कृपाशंकर यांच्याबाबतीत झालाय. ते उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेले आणि सामान्य पदापासून थेट १० जनपथपर्यंत संपर्क ठेवण्यापर्यंत ते यशस्वी झाले. हा त्यांचा प्रवास चित्रपटातल्या कथेसारखा आहे..कृपा यांना दिल्लीतला आर्शिवाद असल्यामुळे ते अगोदर विधानपरिषद नंतर विधानसभा करत गृहराज्यमंत्रीही झाले. त्यांनंतर ते मुंबई काँग्रेसचे अद्यक्ष झाले. या त्यांच्या प्रवासात त्यांनी भरपूर माया जमा केली.. गृहराज्यमंत्री असताना त्यांनी पत्नीच्या नावावर कोकणात २२५ एकर जमीन घेतलीय. या जमिनीची किंमतही २५ कोटीच्या पुढे आहे. त्यातही काही शेतक-यांना फसवल्याच्या तक्रारी आहेत. तसच मुंबईत मोक्याच्या ठिकाणी अलिशान फ्लॅट त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहेत.. जवळपास दहा-बारा बँक खात्यातला व्यवहारही कोटींच्या घरातच आहे...अशी ही कोटींची उड्डाणं होत असताना त्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही..पण झारखंडचे मुख्यमंत्री मधू कोडा हे खाण उद्योगातल्या घोटाळ्यात तुरुंगात गेले तेंव्हा त्याचे धागेदोरे कृपाशंकरसिंग यांच्यापर्यंत येऊन पोचले..पण दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असल्यानं तसच कृपाशंकर यांच्यावर मोठी "कृपा" असल्यानं पोलिसांचे लंबे हात त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते.. पोलीस, अँटी करप्शनमध्ये तक्रारी देऊनही त्यांची दखल घेतली नाही.. विधानसभेतही प्रश्न गाजला..पण चौकशीच्या फार्सपलिकडे काही झालं नाही..एसीबीला तपास करण्यास सांगितलं तरी सत्तेच्या वर्तुळात दिल्लीतूनच मोठी "कृपा" असल्यानं मुंबईतला तपास हा नावापुरताच होता..पण शेवटी हे प्रकरण एका याचिकार्त्यानं उच्च न्यायालयात नेलं तेंव्हा कुठं कृपाशंकरसिंग यांना दणका बसला..!

कृपाशंकरसिंग यांचे मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट्स, ऑफीस, दुकानांचे मोठे गाळे आहेत..ते त्यांना ज्या बिल्डरांनी दिले. त्यांनाही कृपाभैयांची "कृपा" लाभली होती..मुंबईतल्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या पदरात पाडून द्यायच्या आणि त्याबदल्यात त्यांना मोठा मलिदा मिळत होता. हे सत्य आता बाहेर आलय. याच संबंधातून मिळवलेला पैसा सत्तेत बसलेल्या त्यांच्या खास माणसांना आणि दिल्लीतून त्यांच्यावर "कृपाछत्र" धरणा-या नेत्यांपर्यंत पोचवला जात होता.. म्हणूनच या भैयाच्या चौकशीला कुणी जात नसे.पण शेवटी न्यायालयानं चौकशीबरोबरच संपत्ती जप्त करण्याचेच आदेश दिल्यानं त्यांचे धाबे दणालेत..आता पोलिस आयुक्त चौकशी करतील, पण त्यातूनही ते कितपत सत्य बाहेर आणतात, का यापूर्वी एसीबीनं केलेल्या चौकशीतून पळवाटा दाखवून कसं सोडवण्यात आलं होतं तसच होणार हे लवकरच कळेल...! कारण बेनामी संपत्तीचा छडा लावणं सोप काम नसतं ! कारण ते असतानाच बेनामी असतं...त्यातूनच थोडीफार संपत्ती त्यांच्या नावावर निघालीच तर त्यावर कर भरून पुन्हा एकदा ते मोठ्या दिमाखानं वावरु लागलीत..त्यासाठी त्यांच्यावर कृपाछत्र असलेले नेते. त्यांच्याच पक्षाची मुंबई आणि दिल्लीत असलेली सत्ता मदतीला येईलंच..! कायद्याच्या पळवाटातून त्यांना सहिसलामत बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न होणारच. कारण हे कृपाभैया जर तुरुंगात गेले तर त्यांच्याकडून ज्यांना ज्यांना माया मिळालीय त्यांचं पितळ उघडं पडेल ना..! त्यामुळे कृपाशंकर यांना वाचवण्याचा प्रयत्न नक्की होणार...

कृपाशंकर यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा आकडा तीनशे कोटीपर्यंत असल्याचं म्हटलं जातय. पण हा आकडा ऐकून पोटात आकडा आला नाही..यापेक्षा मोठे आकडे ऐकण्याची आपल्याला सवय झालीय...टू जी स्पेक्र्टम, अँट्रीक्स-देवास डिल, राष्ट्रकुल घोटाला यांचे आकडे मोजताही येणार नाहीत एवढे मोठे आहेत..त्यामानानं कृपाभैयांचा आकडा कमी...आपल्यालाही आता अशा भ्रष्ट लोकांची प्रकरणं उजेडात आली तरी फारसं नवल वाटत नाही.. कारण सगळीकडेच भ्रष्टाचार बोकाळलाय. त्यामुळे कुणाला दोष देऊन काय फरक पडणाराय अशीच आपली अवस्था झालीय...असे अनेक कृपा राजकारणात पावलोपावली आढळतात...नंतर ते कायद्याच्या आणि सत्तेतल्या लोकांच्या मदतीनं बाहेर पडतात आणि पुन्हा खेळ सुरु...! कृपाशंकरही यातून बाहेर पडतील..त्यांना बाहेर पडायला तशी मदत केली जाईलं आणि "राजकीय व्देषातून" माझ्यावर आरोप करण्यात आले होते असं नेहमीचं पालुपद गात कृपाशंकर पुन्हा उजळ माथ्यानं राजकारणात सक्रीय होतील हे न समजण्याएवढी जनता आता खुळी राहिलेली नाही..त्यामुळे आज कृपाशंकर तर उद्या दुसरा कोणी नारोशंकर एवढात काय तो फरक असेल....

Thursday, February 23, 2012

सोलापूरी चादर आणि बेडशिट

सोलापूर शहर हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर आहे...चप्पल म्हटलं की जसं कोल्हापूरचं नाव येतं तसं चादर म्हटलं की आपसुकच सोलापूरचं नाव येतं.. त्यामुळचं सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलसाठी या शहराचं नाव आहे..महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागातले व्यावसायिक तसच ज्यांचा सोलापूरशी काही ना काही कारणानं संबंध आलाय ते आवर्जून सोलापूरी चादरीचा आग्रह धरतात.. तुम्ही जर सोलापूरला भेट देणार असाल किंवा तुळजापूर, अक्कलक्कलकोट, गाणगापूर, विजापूर, हैदराबादला भेट देणार असाल तर तुम्हाला सोलापूरातून जावं लागेल..त्यात जर स्वताच्या वाहनानं जाणार असाल किंवा सोलापूरात हॉल्ट घेणार असाल तर, एकदा सोलापूरच्या चादरी आणि टॉवेल्सच्या शोरुम्सना जरुर भेट द्या.. ! त्यातच तुम्ही जर सोलापूर शहराच्या पूर्व भागात गेलात तर तुम्हाला मनसोक्त खरेदीचा आनंद लुटता येईलं... कारण याच भागात चादर- टॉवेल्सच्या कंपन्यांची शोरुम्स आहेत..शहराच्या इतर भागात आणि मुख्य बाजारपेठेतही या चादरी तुम्हाला मिळतातच..पण खरेदीचा आनंद लुटायचा असेल तर या पूर्व भागातल्या शोमरुम्सनाच भेट द्या...!! पुलगम, चाटला, कोंडा, क्षिरसागर, गांगजी अशी अनेक नावं घेता येतील..! कोणत्याही शोरुमला भेट द्या..! तुम्ही चादर, टॉवेल, बेडशिट्स यांचा खजाना पाहून चाट पडाल.. तुम्हाला शॉपींगचा कंटाळा येत नसेल तर मनसोक्त वेळ काढा आणि या दुकानांना भेट द्या..

सोलापूरी चादरींचा दर्जा एकदम उत्तम आहे..अगदी २०० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत तुम्ही एक चादर घेऊ शकता..अनेक व्हरायटी आणि रंगसंगतीच्या चादरी तुम्हाला इथं मिळतील. मयुरी पंखी चादर ही तर सोलापूरी चादरीची खासियतच आहे.. त्यानंतर बेटशिटच्यासुद्धा अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील.. टॉवेल म्हटल्यावर कॉटनच्या टॉवेलपासून टर्किश टॉवेलपर्यंत सर्व प्रकारचे टॉवेल्स तुम्हाला आवडतील असे आहेत..लुंगी हा दक्षिणेतला प्रकार असला तरी आपल्याकडेही अनेकजण लुंगी वापरतात..रंगीत लुंगीचे प्रकारही खूप प्रमाणात तुम्हाला पहायला मिळतील.. माझं हे सर्व वर्णन वाचत असतानाच तुमच्या डोळ्यासमोर सोलापूर चादरीचं शोरुम उभं राहिलं असेल..! हे लिहित असताना माझ्या डोळ्यासमोरही सोलापूरातली १०-१५ शोमरुम्स उभी राहिली... खरंच तुम्ही प्रेमात पडावं अशा उत्तम दर्जाची, रंगाची आणि पाहताच तुम्हाला ती खरेदी करावी असं वाटेल अशाच आहेत या सोलापूरी चादरी आणि टॉवेल्स...!

वस्त्रोद्योगातला चादर आणि टॉवेल निर्मिती हासुद्धा मोठा व्यवसाय आहे..सोलापूरच्या ज्या पूर्व भागाचा मी उल्लेख केला..त्या भागातून तुम्ही फेरफटका मारतानाही तुम्हाला पॉवरलुम्सचा आवाज कानी पडेल.. तर काही ठिकाणी रंग दिलेले धागे वाळत टाकलेले दिसतील..हा झाला छोट्या प्रमाणातला उद्योग...! तर शहराला लागूनच असलेल्या अक्कलकोट एमआयडीसीतसुद्धा अनेक लहान मोठ्या कारखान्यातून या चादर आणि टॉवेल निर्मीतीचा खडखडाट तुम्हाला ऐकायला मिळेल....हा उद्योग जरी सोलापूर शहरात असला तरी तो प्रामुख्यानं तेलुगु भाषिक लोकांचा व्यवसाय आहे. वर मी ज्या काही नावांचा उल्लेख केला त्यावरुनच तुमच्या लक्षात आलं असेल की, ही काही मराठी नावं नाहीत..ती सर्व तेलुगु भाषिक लोकं आहेत.. अनेक वर्षापूर्वी त्यांनी या शहरात ह्या उद्योगाची पायाभरणी केली आणि आजही ते हा उद्योग टीकवून आहेत.. सोलापूरात तयार होणा-या या चादरी आणि इतर माल हा देशभरातल्या बाजारपेठात तर जातोच पण मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यातही होते...सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलला परदेशातूनही मोठी मागणी आहे. म्हणूनच या सोलापूरी चादरीची चमक आजही टीकून आहे..

एक व्यवसाय म्हणून त्यांच्यासमोर आज अनेक अडचणी आहेत..करांचा वाढता बोजा. कामगारांचा पगार, विजेचे भारनियमन, सुताचे वाढलेले दर, व्हॅट यामुळे हा व्यवसाय राहतो की काळाच्या ओघात बंद पडतो अशी अवस्था झालीय. यातून सरकारनं काही कर सवलती दिल्या, वीजेचा मुबलक पुरवठा केला तर हा उद्योग टिकेलच पण त्यात वाढही होईलं.. तसच निर्यातीला चालना देऊन विमानसेवाही सुरुळीत सुरु केली तर सोलापूरची शान असलेला हा उद्योग आणखी भरारी घेईल...त्यासाठी गरज आहे ती सरकारी पातळीवर प्रयत्न होण्याची. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय उर्जा मंत्री आहेत. ते मागची ३५ वर्षे सत्तेत वेगवेगळ्या पदावर आहेत..तर शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री आहेत.. हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी यात लक्ष घातलं तर हा उद्योग तग धरु शकेल आणि तसं झालं तर सोलापूर चादरीचा रंग फिका पडणार नाही...

पण व्यवसाय टीकवण्याची त्या- त्या घटकांची जबाबदारी आहेच..पण सध्या तरी हा उद्योग सुरु आहे, त्यामुळे तुम्ही सोलापूरला भेट दिलीच तर थोडा वेळ हा चादर, बेडशीच्या शॉपिंगसाठी द्या... आणि समजा तुम्हाला जाणं शक्यच नसेल तर तुमचे सोलापूरचे जे मित्र आहेत आणि तुमच्याबरोबर कामाला किंवा शेजारी रहायला असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना सांगा... येतोच आहे तर आमच्यासाठी काही चादरी आणि बेडशिट घेऊन ये बाबा.... मला खात्री आहे..तुम्हाला त्या नक्कीच पसंत पडतील.. मग काय घेणार ना आमच्या सोलापूरी चादरी...!!!!

Monday, February 20, 2012

राज ठाकरेंनी "करुन दाखवलं..”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महानगरपालिका निवडणुकात मिळवलेल्या यशानं या पक्षाची घौडदौड दिसून आलीच पण त्याची दखलही आता इतर पक्षांना घ्यावी लागणाराय..आजपर्यंत फक्त मुंबईतच शिवसेनेला मनसे जड जाईल असं म्हटलं जात होतं. पण दहा महानगरपालिकांमधल्या निकालाचं विश्लेषण पाहिल्यास मनसे हा पक्ष शिवसेनेला जेवढा धोका ठरु पहातोय, तसाच तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपलाही जड जाणार हे निकालावरुन स्पष्ट दिसतय..मुंबईत मनसे किंग मेकर ठरली नसली तरी त्यांनी २८ जागा जिंकून सगळ्याच पक्षांना आश्चर्यचकित केलय. या सर्व जागा काही शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन जिंकलेल्या नाहीत तर त्यातल्या अनेक जागा त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करुन जिंकल्यात. हे झालं मुंबईचं..! पण पुणे नाशिकमधले निकाल काय सांगतात...? पुण्यात राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्तेसाठी खूप जोर लावला..! काँग्रेसकडे सुरेश कलमाडी नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा होईल असा होरा होता..पण मनसेच्या इंजिनानं राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टीक टीकही थांबवली..तब्बल २९ जागा जिंकत भाजप, काँग्रेसलाही मनसेनं मात दिली..मनसे हा पुणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर बसणारा पक्ष ठरलाय. त्यामुळे अजित पवार यांनाही आता कलमाडी नाही तर राज ठाकरेंच्या इंजिनाची धास्ती आहे..नाशिकमध्ये तर मनसेनं कमालच केलीय.शिवसेना भाजपची दहा वर्षाची सत्ता उलथवून टाकलीय. दुसरीकडं छगन भुजबळांची सुभेदारी ठरलेल्या नाशिक महापालिकेत त्यांनाही सत्तेपासून कोसो मैल दूर फेकलंय. स्वतः छगन भुजबळ, पुतण्या समिर आणि सगळीशक्ती पणाला लावूनही राज ठाकरेंच्या मनसेनं सगळ्यांची स्वप्नं धुळीस मिळवली...राजकीय गणित जुळलं तर मनसेचा महापौर नाशकात होऊ शकतो..त्यासाठी भाजपानंही पाठिंबा देण्यासाठी अनुकुलता दर्शवलीय...

हे झालं महानगरपालिकांतले निकाल..!! तिकडं जिल्हा परिषद निवडणुकीतही मनसेनं अनेक जिल्ह्यात खातं उघडलय. अगदी यवतमाळ, चंद्रपूर, नागपूरातही त्यांच्या पक्षाचे एक दोन उमेदवार निवडून आलेत..तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातही मनसेच्या इंजिनानं इतर पक्षांची झोप उडवलीय. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या८ तर इतर जिल्ह्यात २ अशा १० जागा जिंकत मनसेनं मराठवाड्यात आपली चुणुक दाखवलीय. औरंगाबाद जिल्हा परिषदेतल्या शिवसेना भाजप युतीच्या सत्तेला मनसेनं खाली खेचलय. आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची तर मनसेची मनधरणी करावीच लागणाराय..तर चार महिन्यापूर्वीच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेनं कोकणातल्या खेड नगरपालिकेत सत्ता आणलीय. हे खेड शिवसेनेचे आमदार आणि माजी विरोधीपक्ष नेते रामदास कदम यांचा मतदारसंघ आहे..तर मागच्या वर्षी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेनेला विजयासाठी झगडावं लागलं होतं. तिथं मनसेनं दैदिप्यमान कामगिरी केलीय..कल्याणमध्ये शिवसेनेला घाम आणला तर डोंबिवलीत भाजपच्या उमेदवारांना विचार करावा लागेल अशी कामगिरी केलीय.

मनसेचं हे विजयाचं चित्र पाहताच एक गोष्ट आपल्या लक्षात येईलं ती म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या टप्प्यात हा पक्ष वेगानं वाढतोय. याच टप्यात विधानसभेच्या २८८ जागांपैकी जवळपास १२५ जागा आहेत. त्यावर मनसेनं जोर लावलाय. मनसेचा यशाचा हा वाढता आलेख पहाता, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळू शकतं असा अंदाज आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीतही १२ जागा जिंकून मनसेनं सर्व पक्षांना विचार करायला लावलेलाच आहे. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मनसेनं प्रगतीच केलीय. त्यामुळे राज्यात मनसेच्या रुपानं एक नवा पर्याय उभा राहू पहातोय. त्यामुळे भविष्यात मनसेबरोबर सत्तेत भागिदारी करण्य़ासाठी नवी समिकरणं जन्माला येऊ शकतात. शिवसेना-भाजप युती आहेच. त्यांना रामदास आठवले जाऊन मिळालेत.तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. आत्ताचं हे चित्र भविष्यात बदलूही शकतं..त्यामुळे मनसेबरोबर भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं हात मिळवल्यास नवल वाटायला नको..त्यासाठी थोडा अवधी आहे..पण हे घडू शकत नाही असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं..सत्तेचं गणित जुळवताना इतर पक्षांची मदत ही घ्यावीच लागते, त्याशिवाय सत्तेची खूर्ची सहज मिळणं शक्य नाही..त्यातच सध्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असे दिवस राहिलेले नाहीत..

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला त्याला सात वर्षे झाली..या सात वर्षात मनसेनं मागं वळून पाहिलेलं नाही.त्यांच्याकडे राज ठाकरे हेच एकमेव शिलेदार आहेत.त्यांच्याच करिश्म्यावर हे सगळं यश मिळत आहे. या पक्षाला मिळत असलेला पाठिंबा हा युवा वर्गातून आहे. तरुण वर्गाची मतदारसख्याही वाढतेय. तसच महिलांचाही या पक्षाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच उद्याच्या विधानसभेसाठी जर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं संघटनेची बांधणी व्यवस्थित केली तर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतलं चित्र वेगळं असेल हे मात्र नक्की...तोपर्यंत मनसेला आमच्याही शुभेच्छा...!!!



Sunday, February 19, 2012

हा बाळासाहेबांचाच करिश्मा..









मुंबई, ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला..मुंबईत तर १६ वर्ष युतीची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी युतीला संधी मिळालीय..यावेळीही शिवसेनेला निवडणूक सोपी नव्हती..खरच सोपी नव्हती..मनसेच्या इंजिनाचा वाढलेला वेग आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी यामुळे शिवसेनेला निवडणुकीत दगाफटका होण्याची भाकितं वर्तवली जात होती..कदाचित जास्त जागा मिळाल्या तरी राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी हात पसरावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ही सगळी भाकितं खोटी ठरवत शिवसेना भाजप रिपाइं युतीचा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर फडकलाच...

निवडणुकीपूर्वीचं वातावरण लक्षात घेवून शिवसेनेनं रामदास आठवलेंना हाक दिली आणि राजकीय अडगळीत पडलेल्या आठवलेंनाही दुसरं मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं. या निवडणुकीच्या निकालात रिपाइंचे दोनच उमेदवार निवडून आले असले तरी दलित समाजाची जी मतं आठवलेंच्या पाठिशी आहेत त्या मताचं दान यावेळी युतीच्या पारड्यात पडल्यामुळे युतीचा अवघड विजय सोपा झाला.. त्यामुळेच मनसेचा उधळलेला वारु जरी जोरात असला तरी त्याचा दगाफटका युतीनं आठवलेंच्या मदतीनं थोपवला असं म्हणता येईलं, किंबहुना मनसेमुळे होणारा धोका थोपवण्यासाठी आठवलेंच्या मतांचा त्यांना फायदा झाला.. सेनेची आकडेवारी खाली आली असली तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अडचण येणार नाही..तर दुसरीकडं दोन्ही काँग्रेसही युतीचा झेंडा खाली खेचण्यासाठी एकत्र मैदानात उतरले पण त्यांना ते जमलं नाही..उलट मागच्यावेळी स्वतंत्र लढून जेवढ्या जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या त्याही त्यांना राखता आल्या नाहीत...

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर त्याची अनेक कारणं देता येतील..मुंबईत नेहमीप्रमाणं यावेळीही मतदानानं ५० टक्क्यांचा आकडाही पार केला नाही..त्यामुळे ज्यांनी मतदान केलं ते अर्थातच युतीला फायद्याचं झालं..लोकांना बदल हवा असेल तर मतदानही तेवढ्याच जास्त प्रमाणात होणं अपेक्षीत होतं. त्यामुळेच की काय कमी मतदान हे युतीच्या पथ्यावरच पडलं..दुसरं असं की ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या निवडणुकीनंतर संपेल अशी भविष्यवाणी केली.राजकीयदृष्ट्या ही टीका शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबणं साहजित होतं..तोच धागा शिवसेनेनं पकडला आणि पुन्हा भावनिक मुद्दा पुढं आला..तर दुसरीकडं शिवसेनेवर ४० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तोही विरोधकांवर बुमरॅग होऊन उलटला..तसच काँग्रेसला अंतर्गत वादही यश मिळवण्यात अडथळा ठरला..प्रचाराचं नियोजन नाही की सर्व नेत्यांना एकत्र करता आलं नाही. याचा परिणाम झालाच..कृपाशंकरसिंग यांनी तर मुंबईची सत्ता खेचून आणतोच आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतोच अशा आविर्भात सगळी सुत्रं हाती घेतली..कदाचित ती नारायण राणे, विलासराव, गुरुदास कामत यासारख्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नसावं.

तर दुसरीकडं परप्रांतियांच्या आक्रमणाचा मुद्दा, भूमिपुत्रावरचा अन्याय या विषयावर स्थानिक मतं एकत्र होतात. तर काँग्रेससारखे सत्ताधारी पक्ष त्यांकडं दुर्लक्ष करतात..कृपाशंकरसिंग, संजय निरुपम, राजहंससिंह, यासारखे उत्तर भारतीय नेते मुजोर होत आहेत. त्याचा रागही स्थानिक लोकांच्या मनात राहतोच..उत्तर भारतातून पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी आता स्थानिकांना गुरकावतायत..!! तो संजय निरुपउद्योगी ( निरुपम ) मुंबई बंद करण्याची भाषा करतो..!! कुठून आला त्याला हा माज..? कोण तो उपटसुंभ.. ? कुणाच्या जोरावर मुंबई बंद करण्याची भाषा करतो तो..? तर दुसरीकडं म्हशीच्या गोठ्यात काम करणारा तो कृपाशंकर म्हशीवाला...!! कोकणात शंभर एकरापेक्षा जास्त जागा घेतो..उत्तर भारतीयांना एकत्र करुन स्थानिकांना डावलतो. हे मुंबईतल्या भूमिपुत्रांनी का सहन करायचं..? एकच उदाहरण देतो..मुंबई काँग्रेसचा अद्यक्ष असणा-या कृपाशंकरसिंगांची उमेदवार यादी पहा..१६९ जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातल्या फक्त ८९ जागा मराठी लोकांना आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना! हे कसं सहन करायचं..? याच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतला गटनेता राजहंससिंह पालिकेतला कारभार हिंदीत चालवा म्हणून आग्रह धरतो..! हे सर्व मराठी माणूस सहन कसं करेल...? शिवसेना भाजपा युतीचा महापालिकेतला कारभार फार काय चांगला आहे असा त्याचा भाग नाही..आणि त्यांनी काही "करुन दाखवलं" म्हणून त्यांची सत्ता आली असंही म्हणता येत नाही..पण " त्या उप-यांच्या" हाती सत्ता देण्यापेक्षा आपली माणसं का नको हे गणितही त्यामागं आहे..

कारणं काहीही असो..! देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्ष सत्तेसाठी डोळा ठेवून असतात.२१ हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे या मुंबई माहनगरपालिकेचं..! केंद्रातूनही मोठी आर्थिक मदत मिळत असते मुंबईला..!त्यामुळे ही सोन्याची कोंबडी आपल्या पक्षाकडे असावी यासाठी सर्व पक्ष अगदी आसुसलेले असतात...

मुंबईत आवाज कुणाचा म्हणून विचारण्याचं धाडसही नव्हतं तेव्हाही मुंबई शिवसेनेकडेच होती आणि आता मुंबईतला सेनेचा आवाज कमी झाली असली तरीही मुंबई शिवसेनेचीच आहे..आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंततरी ती शिवसेनेचीच राहिली हे सांगण्यासाठी आता कोणा ज्योतिष्याची गरज नाही...पण या निकालामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर मानानं डौलत राहतोय ह्यातूनच ह्या फालतू नेत्यांनी काय तो धडा घ्यावा हेच या निकालाच्यानिमित्तानं सांगणं आहे...!!!!

जय महाराष्ट्र..!!