Friday, November 22, 2013

सचिनला भारतरत्न दिला म्हणून एवढी बोंब का ?


सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली..सचिनला भारतरत्न का दिला..तो काही फुकट खेळला आहे का यापासून आधी ध्यानचंद नंतर सचिनला भारतरत्न द्यायला हवा होता असा सुर निघाला...भारतरत्न हा सचिनला द्यावा अशी मागणी मागच्या दोन वर्षांपासून होत होती पण भारतरत्न हा खेळाडूंना देण्याची परंपराही नव्हती आणि तशी त्यात तरतूदही नव्हती..पण त्यानंतर भारतरत्न देण्याच्या व्याखेत बदल करण्यात आला.. जनता दल संयुक्तचे नेते शिवानंद तिवारी यांनी तर अकलेचे तारे तोडत सचिन क्रिकेट फुटक खेळलेला नाही त्याला भाररत्न का दिला असा तर्क लावला..
 

भारतरत्न हा सरकारनं जाहीर केला तो सचिननं क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल..24 वर्ष त्यानं भारताच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलय..क्रिकेट हा मुळात सभ्य माणसाचा खेळ म्हटला जातो..पण याच क्रिकेटमध्ये आज बजबजपुरी माजलीय..तरीही सचिननं त्याचा तोल कधीही ढळू दिला नाही. तो यशाच्या शिखरावर आहे. त्यानं सर्व विक्रम मोडीत काढलेत. त्यानं पैसाही अमाप कमावला पण क्रिकेटच्या सभ्यतेला धक्का न पोचवता..मग त्यात त्याचं काय चुकलं..

सचिनला भारतरत्न दिला म्हणून ओरडणा-यांनी इतर पुरस्कारांकडे पहावं. पद्म पुरस्कारही तेवढेच मानाचे आहेत. पण ते आजकाल कोणाला दिले जातात तेही पहावं..दोन तीन वर्षापूर्वी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला..आता या सैफचं काय योगदान आणि योग्यता आहे.. सिनेमात तरी त्यानं काय दिवे लावलेत. मग त्यालाही पुरस्कार दिलाच ना..सैफ सारखी अनेक नावं देता येतील त्यांना हा पुरस्कार का दिला असा सहज प्रश्न पडतो..

दुसरं असं की आजकाल कोणताही पुरस्कार दिला तरी त्यावर वाद हा होतोच..आता सचिनला भारतरत्न दिल्यानंतर वाजपेयीं का नाही दादासाहेब फाळकेंना का नाही अशी विचारणा केली जातेय..पुरस्कार एक आणि दावेदार अनेक अशी अवस्था झालीय..मग पुरस्कार कोणालाही जाहीर केला तरी वाद हा होतच राहणार..म्हणून काय असे सन्मान द्यायचेच नाहीत का..? त्यामुळं सचिनला भारतरत्न दिला म्हणून काय मोठं आभाळ कोसळलेलं नाही आणि दिला नसत तरी सचिनचं महत्व आणि त्यानं क्रिकेटला दिलेलं योगदान काही कमी झालंसतं. याहीपुढं जाऊन लता मंगेशकर यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे सचिन भारतरत्न नाही तर विश्वरत्नच्या लायकीचा आहे..

 

Sunday, November 3, 2013

गुजरातमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात का नाही ?

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य स्मारकाचा शिलान्यास झाला पण महाराष्ट्रात शिवरायांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केव्हा होणार.. शिवरायांच्या स्मारकाचा घोळ ९ वर्षांपासून सुरुय. तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १२.५ एकर जागा देण्याची घोषणा सरकारनं केली. पण या दोन्ही स्मारकाची वाटचाल घोषणेच्या पुढं झालेली नाही....



नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दिमाखात शिलान्यास केला पण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरुन गेली नऊ वर्षे फक्त चर्चाच होतेय..राज्यकर्त्यांमधील प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव आणि निष्क्रिय कारभारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील भव्य स्मारक आजही मूर्त स्वरुपात साकार झालेलं नाही..फक्त निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काढायचा आणि मराठा मतं मिळवण्याचा डाव मांडायचा हाच उद्योग मागच्या दोन निवडणुकांमध्ये झाला..आता सहा महिन्यात पुन्हा निवडणुकांचे दिवस आहेत मग पुन्हा शिवरायांचं भव्य स्मारक, मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून निवडणुका लढवायचा हा उद्योग काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष करणारच..पण शिवरायांचं स्मारक हे व्होटबँकेसाठी आहे का ? महाराज महाराष्ट्राचा गर्व आहे. त्यासाठी मुहूर्ताची गरज काय.. पण इच्छाशक्तीच नसेल तर कारणांचे ढिग दिसतातच..जी इच्छाशक्ती नरेंद्र मोदींमध्ये आहे ती इच्छाशक्ती महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाही का?..या स्मारकांना होत असलेला विलंब पाहता मला तर इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय..महाराष्ट्रात महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न 9 वर्षानंतरही पुढे सरकु शकला नाही ही मराठा समाज, महाराष्ट्रातील नेते आणि मराठा संघटना यांना विचार करायला लावणारा आहे...

जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं झालं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं झालं. मुंबईत इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर आंबेडकरांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आंबेडकरी जनतेनं तीव्र लढा दिला..शेवटी सरकारनं इंदू मिलची साडेबारा एकर जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा नागपूरच्या अधिवेशनात केली..त्यालाही दोन वर्ष उलटली..आंदोलनं शांत झाली...सरकार गप्प बसले..पुढे काय..सर्व शांत..पुन्हा निवडणुका येत आहेत..पुन्हा आंदोलनाची हाक दिली जाईल आणि पुन्हा आश्वासनाचं गाजर..हे किती दिवस चालायचं... ? आंबेडकरांचं स्मारक असो वा शिवरायांचं महाराष्ट्रातलं सरकार हे स्मारक उभारण्यासाठी आणखी किती दिवस लावणार याचा जाब लोकांनी विचारायला हवा..का या स्मारकांसाठी आमच्या महाराष्ट्रात प्रबळ इच्छाशक्ती असणारा नरेंद्र मोदीच नाही..

स्मारकं उभारून काय साधणार असा प्रश्न काही लोकांना पडेल. या स्मारकांवर काही हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा ते पैसे विकासकामांवर खर्च करावेत असाही काही लोकांचा मतप्रवाह असू शकतो..पण थोर पुरुषांची स्मारकं ही पुढच्या पिढींसाठी प्रेरणास्थान असतात. तो इतिहास आम्हाला प्रेरणादायी आहे. तो जतन करण्याचं काम केलच पाहिजे..राहिला प्रश्न विकास कामांचा तर आजपर्यंत हजारो कोटी रुपये विकासकामांच्या नावाखाली अनेकांच्या खिशात गेलेच ना..मग काही कोटी महापुरुषांच्या स्मारकांसाठी गेले तर बिघडलं कुठे..

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रचं दैवत तर डॉ. आंबेडकर यांचाही महाराष्ट्राला अभिमानच आहे..या दोन महापुरुषांची भव्य स्मारकं उभारुन महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं नवा इतिहास उभा करावा. भलेही त्यामागं मतपेटीचं राजकारण दडलेलं असो..पण ही स्मारकं झालीच पाहिजेत.. त्यासाठी नरेंद्र मोदींसारखी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आमच्या नेतृत्वाला लाभो हीच शिवराय आणि आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना...