Sunday, December 29, 2013

शिवसेनेचा बदलता चेहरा

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेची नव्यानं बांधणी करत आहेत. पण त्यांना नवे-जुने, शहरी-ग्रामीण या वादाला तोंड द्यावं लागत आहे. जुन्या नेत्यांना डावलून नवं नेतृत्व आणण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. मुंबईत ते शिवसेनेचा चेहरा बदलण्याचा करत आहेत. पण पक्षांतर्गत नाराजीबरोबरच उद्धव ठाकरे यांना मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेचा सामना करावा लागणार आहे. शिवसेनेत ग्रामिण शहरी नेत्यांमध्ये मोठी दरी आहे. तर कोकणात शिवसेनेला पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळं भाकरी फिरवताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आघाडी सरकारच्या कारभाराला लोक कंटाळले असले तरी युतीला भक्कम पर्याय म्हणून लोक स्विकारतील असं चित्र दिसत नाही.      

शिवसेनेतल्या नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय..कल्याणचे खासदार आनंद परांजपे हे नावालाच शिवसेनेचे खासदार आहेत. ते केंव्हाच राष्ट्रवादीत गेलेत, तर मोहन रावलेही आता शिवसेनेत नाहीत. मनोहर जोशी, रामदास कदम या शिलेदारांची नाराजी उघड आहे. जोशी सरांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं उभं केलं पण ते तग धरू शकलं नाही. जोशींनी मातोश्रीवर दंडवत घालत आपली तलवार मान्य केली..मनोहर जोशींसारख्या जुन्या जाणत्या नेत्यालाही खासदारकीच्या उमेदवारीसाठी लोंटागण घालावं लागत आहे. रावलेंनाही लोकसभेची उमेदवारी मिळत नाही असं दिसताच त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला. अखेर रावलेंची हकालपट्टी झाली..उद्धव ठाकरे सध्या जुन्या नेत्यांना म्हणजेच बाळासाहेबांच्या शिलेदारांना फारसं महत्व देत नाहीत. ते सध्या नवी टीम तयार करत आहेत. कोकणात नारायण राणेंनंतर शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही. त्यांना शह देण्यासाठी रामदास कदम यांना पुढं करण्यात आलं पण मागच्या निवडणुकीपासून त्यांचं शिवसेनेतलं स्थान डळमळीतच आहे. त्यांच्या खेडमध्येच मनसेनं झेंडा फडकवलाय. रामदास कदम यांना मतदारसंघच नसल्यामुळं त्यांची गोची झालीय. आता विधान परिषदही मिळेल का नाही याची चिंता रामदास भाईंना सतावतेय.   
मुंबई, कोकणातील नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय. परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींचा मेळावा उद्धव ठाकरेंनी घेतला. या मेळाव्याकडे दुधगावकर फिरकलेचं नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांना धूळ चारत, दुधगावकरांनी परभणीच्या बाल्लेकिल्यावर भगवा फडकवला. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार हमखास जिंकून येतो.1989 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे.1998 चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे..पण याच परभणीच्या खासदाराला दुस-या पक्षात जाण्याचा शापही लागलेला आहे. दुधगावकर यांच्याआधी तुकाराम रेंगे पाटील आणि सुरेश जाधव या सेनेच्या खासदारांनीही नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय..औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे मातोश्रीच्या खास मर्जीतले असल्यामुळे त्यांचं स्थान अजूनतरी भक्कम आहे. मराठवाड्यात कन्नडचे मनसेचे आमदार शिवसेनेत आलेत तर प्रदीप जैयस्वाल हे पुन्हा शिवसेनेत परतलेत ही त्यांच्यासाठी मराठवाड्यातील जमेची बाजू म्हणता येईलं..
पश्चिम महाराष्ट्रातही शिवसेनेचा विस्तार फारसा झालेला नाही. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे ते मतदारसंघ जरी शिवसेनेनं राखले तरी त्यांच्यासाठी खूप झालं. विदर्भाचा विचार करता तिथंही जागा वाढतील असं चित्र नाही. उद्दव ठाकरे, दिवाकर रावते यांनी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नावर रान उठवलं होतं, मोर्चाही काढला. पण त्याचाही शिवसेनेला फारसा फायदा होईलं असं वाटत नाही. मुंबई, नाशकातलं मनसेचं आव्हान, कोकणात झालेली घसरगुंडी, मराठवाड्यातली नाराजी आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं मोठं आव्हान त्यांच्यापुढं आहे. रामदास आठवलेंची युतीबरोबरची साथ आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा किती चालेल यावरच युतीचं भवितव्य आहे. नाहीतर आत्ताच्या जागा टिकवणंही त्यांना कठीण जाईलं..

 

 

 

 

Monday, December 16, 2013

'झाडू'वाल्या केजरीवालांचे यश



दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनं प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायला लावलाय. दोन वर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सक्रीय भाग घेतलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही सहका-यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला जे घवघवीत यश मिळालय. हे कोणत्याही राजकीय पक्षाला दहादा विचार करायला लावणारं आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी तब्बल 28 जागांवर केजरीवालांच्या पक्षानं विजय मिळवला..भाजपला जरी 32 जागा मिळाल्या आणि पंधरा वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस भुईसपाट झाला..खरं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आम आदमी पक्षाचे हे यश चिंतन करायला लावणार आहे. केजरीवालांच्या पक्षाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोणत्याही मोठ्या चळवळीचा ते भाग नाहीत. केवळ लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनातून हे लोक पुढे आले आणि केवळ दोन वर्षांत त्यांनी राजकीय चित्रच बदलून टाकलं..

केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याच्या मुद्द्यावरून अण्णांपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या मुलभूत प्रश्नांवर आंदोलनंही केली..वीजच्या भरमसाठ बिलाविरोधात त्यांनी आंदोलन केलं. महागाई कमी करावी यासाठी आवाज उठवला. याबरोबरच त्यांनी जनतेच्या मनातल्या प्रश्नांना आवाज उठवला. मध्यमवर्गीय लोकांच्या समस्यांना त्यांनी तोंड फोडलं. केजरीवाल यांच्या यशामागं जसं त्यांचा साधेपणा. थेट भिडण्याचा स्वभाव, राजकारणाचा चेहरा नसणारी सामान्य माणसं होती तसच त्यांनी सोशल मीडियाचाही भरपूर वापर करून घेतला.. निवडणुका म्हटलं की अफाट पैसा हे गणितही त्यांनी बदलून दाखवलं. लोकांकडून वर्गणी घेऊन त्यांनी निवडणूक फंड जमा केला आणि त्यावर त्यांनी निवडणूक लढवली...

केजरीवाल यांच्या पक्षानं प्रस्थापित राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले.. त्यामुळे देशातल्या सर्वच पक्षांना आता विचार करावा लागणाराय. तेच ते मुद्दे, तेच तेच आरोप प्रत्यारोप, तेच ते चहरे, राजकारणातली घराणेशाही, भावनिक मुद्दे, जातीय समिकरणं यांच्यात गुरफटलेल्या राजकारणाला केजरीवाल यांनी फाटा दिला. त्यामुळंही त्यांना मोठं यश मिळालं. लोकही त्याच त्याच राजकारणाला कंटाळले.पण त्यांच्याकडे पर्यायच नाही म्हणून. त्यातलाच जो बरा त्याला मतदान केलं जायचं. पण केजरीवाल यांच्या पक्षानं मतदारांना नवा पर्याय दिला, नवी आशा दाखवली. हे त्यांच्या पक्षाच्या यशामागचं गमक म्हणता येईलं.ज्या शहरी मध्यमवर्गाला त्यांनी हा नवा पर्याय दिलाय. त्या पर्यायाच्या शोधात लोक होते पण त्यांना तो आतापर्यंत मिळत नव्हता...केजरीवाल यांचं यश नक्कीच वाखण्यासारखं आहे. पण त्यांची खरी लढाई आता सुरु झालीय. बाहेरून जाब विचारणं सोप्पं असतं पण ते पार पाडण्याची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा खरा कस लागतो..आशा करूयात केजरीवाल यांना काँग्रेसनं देऊ केलेला पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता स्थापन करावी आणि त्यांनी जी आशा दाखवलीय, त्यांच्यावर ज्यांनी विश्वास टाकलाय. तो त्यांनी सार्थ करून दाखवावा..केजरीवाल यांनी हे शिवधनुष्य पेललं तर जनता विसरणार नाही पण ते ज्याप्रमाणं सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेसला अटी घालत आहेत. त्यावरून ते जबाबदारीपासून पळ तर काढत नाहीत ना असंच म्हणावं लागेल..

केजरीवाल सत्ता स्थापन करो अथवा नाही पण दिल्लीच्या या विजयानं सर्वच प्रस्थापित पक्षांना चिंतन करावं लागणाराय. मध्यमवर्गावर भिस्त असणा-या भाजपला तर विचार करावाच लागणाराय. पण वर्षोनवर्षे सत्तेत राहून आपण राज्य करण्यासाठीच जन्माला आलोय अशा आर्विभावात वावणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना या विजयाचा विचार करावा लागणाराय. नाहीतर त्यांनाही इतर राज्यातले केजरीवाल धडा शिकवतील..

   

 

Friday, November 22, 2013

सचिनला भारतरत्न दिला म्हणून एवढी बोंब का ?


सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली..सचिनला भारतरत्न का दिला..तो काही फुकट खेळला आहे का यापासून आधी ध्यानचंद नंतर सचिनला भारतरत्न द्यायला हवा होता असा सुर निघाला...भारतरत्न हा सचिनला द्यावा अशी मागणी मागच्या दोन वर्षांपासून होत होती पण भारतरत्न हा खेळाडूंना देण्याची परंपराही नव्हती आणि तशी त्यात तरतूदही नव्हती..पण त्यानंतर भारतरत्न देण्याच्या व्याखेत बदल करण्यात आला.. जनता दल संयुक्तचे नेते शिवानंद तिवारी यांनी तर अकलेचे तारे तोडत सचिन क्रिकेट फुटक खेळलेला नाही त्याला भाररत्न का दिला असा तर्क लावला..
 

भारतरत्न हा सरकारनं जाहीर केला तो सचिननं क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल..24 वर्ष त्यानं भारताच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलय..क्रिकेट हा मुळात सभ्य माणसाचा खेळ म्हटला जातो..पण याच क्रिकेटमध्ये आज बजबजपुरी माजलीय..तरीही सचिननं त्याचा तोल कधीही ढळू दिला नाही. तो यशाच्या शिखरावर आहे. त्यानं सर्व विक्रम मोडीत काढलेत. त्यानं पैसाही अमाप कमावला पण क्रिकेटच्या सभ्यतेला धक्का न पोचवता..मग त्यात त्याचं काय चुकलं..

सचिनला भारतरत्न दिला म्हणून ओरडणा-यांनी इतर पुरस्कारांकडे पहावं. पद्म पुरस्कारही तेवढेच मानाचे आहेत. पण ते आजकाल कोणाला दिले जातात तेही पहावं..दोन तीन वर्षापूर्वी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला..आता या सैफचं काय योगदान आणि योग्यता आहे.. सिनेमात तरी त्यानं काय दिवे लावलेत. मग त्यालाही पुरस्कार दिलाच ना..सैफ सारखी अनेक नावं देता येतील त्यांना हा पुरस्कार का दिला असा सहज प्रश्न पडतो..

दुसरं असं की आजकाल कोणताही पुरस्कार दिला तरी त्यावर वाद हा होतोच..आता सचिनला भारतरत्न दिल्यानंतर वाजपेयीं का नाही दादासाहेब फाळकेंना का नाही अशी विचारणा केली जातेय..पुरस्कार एक आणि दावेदार अनेक अशी अवस्था झालीय..मग पुरस्कार कोणालाही जाहीर केला तरी वाद हा होतच राहणार..म्हणून काय असे सन्मान द्यायचेच नाहीत का..? त्यामुळं सचिनला भारतरत्न दिला म्हणून काय मोठं आभाळ कोसळलेलं नाही आणि दिला नसत तरी सचिनचं महत्व आणि त्यानं क्रिकेटला दिलेलं योगदान काही कमी झालंसतं. याहीपुढं जाऊन लता मंगेशकर यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे सचिन भारतरत्न नाही तर विश्वरत्नच्या लायकीचा आहे..

 

Sunday, November 3, 2013

गुजरातमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात का नाही ?

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य स्मारकाचा शिलान्यास झाला पण महाराष्ट्रात शिवरायांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केव्हा होणार.. शिवरायांच्या स्मारकाचा घोळ ९ वर्षांपासून सुरुय. तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १२.५ एकर जागा देण्याची घोषणा सरकारनं केली. पण या दोन्ही स्मारकाची वाटचाल घोषणेच्या पुढं झालेली नाही....



नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दिमाखात शिलान्यास केला पण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरुन गेली नऊ वर्षे फक्त चर्चाच होतेय..राज्यकर्त्यांमधील प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव आणि निष्क्रिय कारभारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील भव्य स्मारक आजही मूर्त स्वरुपात साकार झालेलं नाही..फक्त निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काढायचा आणि मराठा मतं मिळवण्याचा डाव मांडायचा हाच उद्योग मागच्या दोन निवडणुकांमध्ये झाला..आता सहा महिन्यात पुन्हा निवडणुकांचे दिवस आहेत मग पुन्हा शिवरायांचं भव्य स्मारक, मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून निवडणुका लढवायचा हा उद्योग काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष करणारच..पण शिवरायांचं स्मारक हे व्होटबँकेसाठी आहे का ? महाराज महाराष्ट्राचा गर्व आहे. त्यासाठी मुहूर्ताची गरज काय.. पण इच्छाशक्तीच नसेल तर कारणांचे ढिग दिसतातच..जी इच्छाशक्ती नरेंद्र मोदींमध्ये आहे ती इच्छाशक्ती महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाही का?..या स्मारकांना होत असलेला विलंब पाहता मला तर इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय..महाराष्ट्रात महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न 9 वर्षानंतरही पुढे सरकु शकला नाही ही मराठा समाज, महाराष्ट्रातील नेते आणि मराठा संघटना यांना विचार करायला लावणारा आहे...

जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं झालं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं झालं. मुंबईत इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर आंबेडकरांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आंबेडकरी जनतेनं तीव्र लढा दिला..शेवटी सरकारनं इंदू मिलची साडेबारा एकर जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा नागपूरच्या अधिवेशनात केली..त्यालाही दोन वर्ष उलटली..आंदोलनं शांत झाली...सरकार गप्प बसले..पुढे काय..सर्व शांत..पुन्हा निवडणुका येत आहेत..पुन्हा आंदोलनाची हाक दिली जाईल आणि पुन्हा आश्वासनाचं गाजर..हे किती दिवस चालायचं... ? आंबेडकरांचं स्मारक असो वा शिवरायांचं महाराष्ट्रातलं सरकार हे स्मारक उभारण्यासाठी आणखी किती दिवस लावणार याचा जाब लोकांनी विचारायला हवा..का या स्मारकांसाठी आमच्या महाराष्ट्रात प्रबळ इच्छाशक्ती असणारा नरेंद्र मोदीच नाही..

स्मारकं उभारून काय साधणार असा प्रश्न काही लोकांना पडेल. या स्मारकांवर काही हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा ते पैसे विकासकामांवर खर्च करावेत असाही काही लोकांचा मतप्रवाह असू शकतो..पण थोर पुरुषांची स्मारकं ही पुढच्या पिढींसाठी प्रेरणास्थान असतात. तो इतिहास आम्हाला प्रेरणादायी आहे. तो जतन करण्याचं काम केलच पाहिजे..राहिला प्रश्न विकास कामांचा तर आजपर्यंत हजारो कोटी रुपये विकासकामांच्या नावाखाली अनेकांच्या खिशात गेलेच ना..मग काही कोटी महापुरुषांच्या स्मारकांसाठी गेले तर बिघडलं कुठे..

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रचं दैवत तर डॉ. आंबेडकर यांचाही महाराष्ट्राला अभिमानच आहे..या दोन महापुरुषांची भव्य स्मारकं उभारुन महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं नवा इतिहास उभा करावा. भलेही त्यामागं मतपेटीचं राजकारण दडलेलं असो..पण ही स्मारकं झालीच पाहिजेत.. त्यासाठी नरेंद्र मोदींसारखी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आमच्या नेतृत्वाला लाभो हीच शिवराय आणि आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना...
 


Thursday, June 13, 2013

अडवाणींसाठी ‘ जय श्रीराम’ म्हणण्याची योग्य वेळ !!!


भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन तो परत घेण्याचा मुद्दा या आठवड्यात चांगलाच गाजला..पण मुळात अडवाणींनी हे राजीनामानाट्य केलंच का ? हा प्रश्न आता चर्चेचा बनलाय. लालकृष्ण अडवाणींवर ही वेळच का यावी हा पहिला प्रश्न..? दुसरं त्यांनी राजीनामा दिलाच होता तर परत का घेतला..? आणि यातून त्यांनी काय साध्य केलं.. ? यासारखे अनेक प्रश्न आहेत. ज्या अडवाणींनी भाजपच्या जन्मापासून त्या तो पक्ष सत्तेत आणण्यापर्यंत महत्वाची मजल मारली..ज्यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जातो त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली हेच अडवाणीचा मोठा पराभव आहे..

 


भाजपमध्ये सध्या दुस-या फळीतील नेत्यांच्या महत्वकांक्षा फारच वाढलेल्या आहेत. राजनाथ, जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, आणि इतर समवयीन नेते यांचा गट आता अडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फारसा जुमानत नाही..या सर्वांवर कडी केलीय ती नरेंद्र मोदींनी..मोदींना आता दिल्लीचं तख्त खुनावतय..गुजरातमध्ये भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप आता समिकरण झालय. गुजरात हा फक्त माझ्याच नावानं चालतो ही हुकुमशाहीवृत्ती त्यांच्यात बळावलीय..गुजरातचा विकास झाला वगैरे ठीक आहे पण ज्या पद्धतीनं त्यांनी गुजरातमध्ये भाजप पक्ष दावणीला बांधलाय..तोच कित्ता ते आता दिल्लीत गिरवु पाहता आहेत..

भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनच त्यांची वाटचाल सुरु झालीय..तसे फासे टाकण्यास मोदींच्या समर्थकांनी सुरुवात केलीय. त्याचाच पहिला अंक म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुख पदाची धुरा मोदींनी आपल्या गळ्यात पाडून घेतीलय..अलिकडं मोदींचं पक्षातलं वाढलेलं प्रस्थ हे दिल्लीतल्या नेत्यांना पचणारं नाही.,आजपर्यंत मोदींना अभय देणा-या अडवाणींनाही ते पचनी पडत नाही कारण स्पष्ट आहे..सध्या मोदींची हवा जोरात आहे..आणि हीच अडवाणींना न पटणारी गोष्ट आहे..जोपर्यंत मोदींचा वावर गुजरातपुरता मर्यादीत होता तोपर्यंत त्यांना अडवाणीचं अभय होतं. पण त्याच मोदींचं नाव पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर घेतलं जाऊ लागलं इथचं माशी शिंकली....आणि अडवाणींचा मोदी विरोध वाढला...

नरेंद्र मोदींची निवड ही अडवाणींना नको होती तरीही त्यांचा विरोध डावलून राजनाथसिंहांनी मोदींची नियुक्ती केलीच हा अडवाणींना पहिला धक्का दुसरा धक्का पक्षातले निर्णय आता आपल्याला न विचारताच घेतले जात आहेत हा आहे. यातून त्यांनी राजीनामे दिले..पण त्यावरही ते ठाम राहीले नाहीत..24 तासातच त्यांनी ते मागेही घेतले..काही नेत्यांनी त्यांची मनधरणी केली असं म्हणतात..त्यातच संघानही अडवाणींना सुनावलं...नव्या पिढीला मार्गदर्शन करा असा संदेश नागपुरातून देण्यात आला..राजनाथसिंह यांनाही मोदींचा निर्णय मागे घेणार नाही असं स्पष्ट केलं..शेवटी मोदी आणि कंपू जिंकला आणि अडवाणी हरले...

अडवाणींची पंतप्रधानपदाची इच्छा काही लपून राहीलेली नाही..2009 मध्ये त्यांच्या नावावर भाजपनं फासे टाकून पाहिले पण तोंडघशी पडले..आता 2014 साठी मोदींचं नाव पुढं केलं जात आहे म्हणजे सत्ता स्थापन्याची वेळ आलीच तर आपला पत्ता लागेल का नाही याची चिंता अडवाणींना सतावतेय...ज्या पक्षात वाजपेयी सक्रीय होते तेव्हाही अडवणींचा शब्द प्रमाण मानला जायचा त्याच भाजपात अडवाणींच्या डोळ्यादेखत नवी पिढी त्यांना डावलतेय याचं शल्यही त्यांना डाचत असावं. त्यांची अवस्था आता महाभारतातल्या पितामह भिष्मासारखी झालीय..सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर घडतय आणि ते काहीच करु शकत नाहीत...

अडवाणींनी राजीनामे परत न घेता सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय कायम ठेवला असता तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती. पण त्यांनी तेही केलं नाही...राजीनामे परत घेतल्यानं त्यांची उरली सुरली पतही राहिली नाही.. ज्या पक्षात आपल्याला आता किंमत राहिलेली नाही म्हणून त्यांनी राजीनामे दिले ते त्यांनी परत घेतलेच का...? कारण ब्लॅकमेलिंग म्हणावं तर त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही उलट मोदी आणि इतरांना जे हवं तेतर झालं. मग ही तीन दिवसांची पोटदुखी आणि 24 तासांचं राजीनामा नाट्य हा फार्स अडवाणींनी का केला..?.या सर्व प्रकरणानानंतर अडवाणींनी राजकारणाला जय श्रीराम केला असता तर त्यांची पत काहीतरी राहिली असती...

Monday, April 15, 2013

अजित पवारांची टगेगिरी ते गांधीगिरी


आपल्या बेधडक आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले..अजित पवारांच्या या बेधडक बोलण्यानं ते यापूर्वीही अडचणीत आले होते..पण इंदापूरच्या सभेत त्यांनी जे शब्द वापरले ती भाषा मात्र त्यांना शोभणारी नव्हती... त्यामुळे अख्खा महाराष्ट्रानं त्यांची छी थू केली. दुष्काळामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. उजनीचं पाणी सोलापूरला मिळावं या मागणीसाठी सोलापूरचा एक सामान्य माणूस प्रभाकर देशमुख हा मुंबईत 55 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसला. त्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी अत्यंत खालच्या भाषेत त्यांचा पाणउतारा  केला..एकप्रकारे अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठच चोळलं. हे बोलताना त्यांच्या चेह-यावरचा नेहमीचा सत्तेचा माजही दिसला...अशाप्रकारचं वक्तव्य हे कोणत्याच व्यक्तीला शोभणारं नाही..त्यातच राज्याचा उपमुख्यमंत्री जर अशी कंबरेखालची भाषा जाहीरपणे वापरत असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे...


हे पवारांना शोभणारं नाही
कराडमध्ये आत्मक्लेश करणारे अजित पवार


अजित पवारांनी त्यानंतर जाहीर माफीही मागितली पण त्यांनी जे शब्द वापरले ते माफी मागून परत न येणारे होते...एखादी व्यक्ती जर सरकारकडे काही मागत असेल तर त्याची अशा शब्दात जाहीर टिंगल करणं हे राज्यकर्त्याला शोभणारं नाही. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांची पोळी भाजून घेतली तो भाग वेगळा..पण हा वाद एवढा वाढला की शेवटी मोठ्या साहेबांना त्यात हस्तक्षेप करावा लागला..मोठ्या पवारसाहेबांनीही अजित पवारांचे कान उपटले..नुसते कानच उपटले नाहीत तर कडक शब्दात पानउताराच केला..हे करत असताना त्यांनी पक्षावर आजही आपलीच पकड आहे हे दाखवून दिलं..राजीनामा देण्याचा निर्णय आमदार नाही तर पक्ष घेईल हे सुनावायलाही ते विसरले नाहीत...हे सगळं झाल्यानंतर हे प्रकरण थांबेल असं वाटलं होतं...पण काकांनी तंबी दिल्यानंतर पुतण्याला अचानक पश्चाताप झाला.. त्यांनी तडक कराड गाठून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर आत्मक्लेश उपोषण केलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणं त्यांनी कोणालाच याची कल्पना दिली नव्हती..तरिही रविवारचा दिवस असल्यानं टीव्हीवाल्यांना आयतीच संधी मिळाली आणि अजित पवार दिवसभर टीव्हीवर चमकले.यातून त्यांनी जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्यांना दिलाच...

टगेगिरी ते गांधीगिरी

कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेश करतोय असं अजित पवारांनी सांगितलं...पण ही वेळ अजित पवारांवर का यावी..? टगेगिरीचं जाहीर समर्थन करणा-या नेत्यावर गांधीगिरी करण्याची वेळ का यावी..? अजित पवार यांनी अचानक आत्मक्लेश का करावा..? या उपोषणातून त्यांना काय संदेश द्यायचाय आणि कोणाला ? हे प्रश्न शिल्लक राहतातच...शेवटी दिवस संपताना अजित दादांचा गोतावळा जमा झालाच...आर आर पाटील, विनायक मेटेंसह त्यांचे समर्थक आणि काही आमदारांनी दादांच्या आत्मक्लेश उपोषणात हजेरी लावलीच आणि समारोप करण्याचं काम आर आर पाटलांवर सोडून दादा निघून गेले....तुम्ही कधी चुकला नाहीत का असा सवाल आर आर पाटलांनी विरोधकांना केला आणि झालं ते पुरं झालं आता थांबा असंच त्यांनी आवाहन केलं...

घसरले सगळेच मग अजित पवारच टार्गेट का ?

अजित पवार चुकले हे शंभर टक्के मान्य..बोलताना त्यांचा तोल गेला..पण आज त्यांच्यावर टीका करणा-यांचाही अनेकदा तोल गेलाय हे महाराष्ट्राला माहित नाही का..? अनेकांनी पातळी सोडलेली अनेक उदाहरणं आहेत..विनोद तावडेंसह भाजपचे जे नेते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत..त्यांनी त्यांच्या नेत्यांचीही यापूर्वीची विधानं तपासून पहावीत..मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित ठाण्यातील एका मुलीबाबत काय बोलले होते ते त्यांनी आठावावं....नरेंद्र मोदींनी शशी थरुर यांच्या पत्नीबदद्ल काय उद्गार काढले होते हे आठवावं..उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भाषणं आठवावी...राज ठाकरे हेसुद्धा अनेकदा खालच्या पातळीवर येऊन बोलले आहेत....

खरं तर महाराष्ट्राची ही संस्कृती नाही...बाळासाहेब ठाकरेंची एक शिवराळ भाषा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे..त्यांचाही बोलताना अनेकदा तोल गेलाच पण केवळ ठाकरी भाषा या विशेषणाखाली ते खपवलं गेलच ना...पण एवढी अधोगती कधी झाली नाही...महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार हे नव्या दमाचे नेते राजकारणात सक्रीय झालेत..त्यांचा वेळोवेळी तोल गेलेला आहे.. पण अजित पवारांवर सगळेजण तुटुन पडले..कारण सध्या सगळ्यांचं टार्गेट अजित पवार हेच आहेत....2014 च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न सुरु केलाय...

अजित दादा विचार करुन बोला...

अजित पवार यांची महत्वाकांक्षी काही लपून राहिलेली नाही..त्यांच्या महत्वकांक्षेला पक्षातूनही मोठा विरोध आहेच...विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना विरोध आहे...तसच दादांना जेवढा लगाम घालता येईल तेवढा घालता यावा यासाठी सर्वच पक्षांचे नेते संधी साधत असतात..त्यातच मोठ्या पवार साहेबांनाही अजित पवारांना आवरताना नाकीनऊ येत आहे...पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यावेळी मोठ्या साहेबांना मध्यस्थी करावी लागली..त्यानंतर जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी अचानक राजीनामा देऊन पक्षातली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला..त्यावेळीही मोठ्या साहेबांना हस्तक्षेप करावा लागला..अजित पवारांसाठी राजीनामा देण्याची भाषा करणा-या आमदारांनाही मोठ्या साहेबांनी तंबी दिली...यावेळीही तशीच वेळ आली..मोठ्या साहेबांनी खडे बोल तर सुनावलेच पण पक्षातही आपलाच शब्द चालेल हे पुन्हा सांगितलं..आता हे प्रकरण संपेलही पण यातून अजित पवार काय बोध घेतील का..?का पुन्हा एकदा त्यांच्या बेताल बोलण्याचा उद्योग सुरुच राहणार यावरच त्यांची पुढची राजकीय वाटचाल ठरणाराय...

 

 

Friday, February 22, 2013

हैदराबादच्या स्फोटानं जागवल्या आठवणी...


हैदराबाद गुरुवारी संध्याकाळी दोन बॉम्बस्फोटानं हादरलं..दिलसुखनगर भागात हे दोन बॉम्बस्फोट झाले..याच दिलसुखनगरशी माझं खूप जवलचं नातं आहे..याच भागात मी 9 वर्षे राहिलोय..त्यामुळं स्फोटाची बातमी समजात अंगावर शहारे आले...कारण ज्या ठिकाणी हे स्फोट झाले त्याच्या प्रत्येक जागेवर..इंचा इंचावर मी फिरलोय..तिथच शॉपिंग केलय..तिथचं साईबाबा मंदिरात अनेकदा दर्शनाला गेलोय..त्याच आनंद टिफीन सेंटरमध्ये अनेकदा भरपेट ताव मारलाय...ज्या थिएटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले त्याच थिएटरमध्ये तेलुगु चित्रपट पाहिलेत..बॉम्बस्फोटाची बातमी एकल्यानंतर लगेच त्या सर्व जागांची आठवण आली...
 
असाच मोठा बॉम्बस्फोट 25 ऑगस्ट 2007 मध्ये हैदराबादमध्ये झाले होते..दोन बॉम्ब फुटले..तर तिसरा याच वेंकटाद्री थिएटरसमोर ठेवला होता..त्यावेळी तो निकामी करण्यात आला..पण यावेळी त्या हरामखोरांनी डाव साधला....इतर ज्या दोन ठिणी स्फोट झाले आणि तिथं रक्ताचा सडा सांडला होता...त्यातलच एक होतं कोटी भागतलं गोकुळ चाट भांडार...नेहमी खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते..तिथच स्फोट झाला होता..त्याची आठवण आली म्हणून मागच्या वर्षी लिहिलेला हा ब्लॉग पुन्हा देतोय.......

आठवण हैदराबादची

हैदराबादमध्ये चाट भांडार भरपूर आहेत. शहरात जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येतया सर्वांवर एक उपाय म्हणजे कोटी भागातालं गोकुळ चाट...इथं मिळणारे सर्वच पदार्थ चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे.. त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..

गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ठरलेलीच..त्यामुळे या गोकुळशी जिव्हाळ्याचं नातं जडलयपण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं...माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला... ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागलातेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो

गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतोत्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज येतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी ते इथं येतात..अशाच एका संध्याकाळी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं…. अनेकजण याच गर्दीत आपली प्लेट फस्त करण्यात मग्न होतेत्याचवेळी  गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला…..कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं..सगळीकडे एकच गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होतेगोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होताआणि अपेक्षीत वेळी त्यांनं त्याचा स्फोट घडवून आणला..जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला..काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटलेकाहीजण भाजून काळे ठीक्कर पडले.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला....गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागलेमी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो तिथला शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेलाइंजिनिअरिंगचा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. गोकुळमध्ये मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर…! भितीनंच मी गार पडलो...नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाची चव लागत नव्हती..त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका आली.... खातानासुद्धा मला त्या भयाण घटनेची आठवण होत होती...

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतलातिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय...का कोण जाणं पण आता त्या गोकुळमधल्या कोणत्याच पदार्थावर ताव मारण्याचं मनच होत नाही….

दिलसुखनगरच्या स्फोटाची बातमी एकल्यानंतरही माझं मन सुन्न झालं..पुन्हा दिलसुखरनग डोळ्यासमोर तरळलं....दिलसुखनगरच्या आठवणी लवकरच शेअर करेन....

 

Friday, February 15, 2013

बाळासाहेबांची शिवसेना- एक झंझावात..


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात 17 नोव्हेंबर 2012 ला संपला.. ज्या नावानं अख्या महाराष्ट्राला राजकारणाची नवी दिशा दिली, नवी ओळख दिली, राजकारण तळागाळात पोचवलं, एका वेगळ्या धाटणीचं राजकारण ज्यांनी केलं, ते बाळासाहेब गेले.. बाळासाहेबांच्या जाण्यानं शिवसेनेचं काय होणार याची चर्चा सुरु आहे. खरं तर बाळासाहेब, शिवसेना आणि शिवसैनिक हे वेगळं नातं या महाराष्ट्रानं पाहिलं. 40 वर्ष या माणसानं महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीनं वेड लावलं. वादग्रस्त व्यक्तिमत्व ही बाळासाहेबांची ओळख होती..त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या नेहमीच वादात सापडल्याय..मुस्लिम व्देषाचं राजकारण असो की राडा संस्कृती..मी लोकशाही मानत नाही म्हणणारा आणि तरीही निवडणुकीत लढवणारा हा माणूस एक अजब व्यक्तिमत्व होतं. ( बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही..)कोणाला पटो वा ना पटो पण या माणसानं मराठीला वेगळी ओळख दिली.. एक दरारा निर्माण केला..दिल्लीपासून गल्लीपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही चर्चा नेहमीच व्हायची..

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही..मला त्याच्याशी काही देणघेणंही नाही..पण कॉलेजमध्ये असताना 1990 च्या वेळी बाळासाहेबांबद्दल वर्तमानपत्रात बरच छापून यायचं.. त्यावेळी टिव्ही खूपच मर्यादीत होता..डीडी सोडलं तर फारसं काही नव्हतं.. त्यातच 24 तासाचं दळण दळणा-या वाहिन्या तर नव्हत्याच...जे काही समजलं जायचं ते वर्तमान पत्रातूनच...आणि असचं एकदा बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मला सोलापूरच्या होम मैदानावर ऐकायला मिळाली..आम्ही कॉलेजचे अनेकजण या सभेला होतो..ते भाषण मी जेव्ही ऐकलं तेव्हाच बाळासाहेबांबचा चाहता झालो.. तसं राजकारण हे गावात चालतच..आजपर्यंत आम्ही फक्त काँग्रेसवाल्यांची त्याच त्या धाडणीतली रटाळ भाषणं ऐकायचो. पण बाळासाहेब हे त्यापेक्षाही काहीतरी वेगळे आहेत हे त्या एका भाषणातूनच जाणवलं.. माझ्याबरोबर अनेक सहकारी जे काँग्रेसच्या राजकारणाशी जवळ होते. त्यांनाही बाळासाहेब आवडायचे..(त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता..) एक उदाहरण देतो..माझे काही मित्र अकलूज भागातले होते. त्यांचा विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या राजकारणाशी काही ना काही कारणानं संबंध यायचा..घरातले काही लोकही सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, डीसीसीबँक, सोसायटीचे सदस्य..अकलूज परिसरात तर मोहिते पाटील सोडून दुसरं नावही कोणी घ्यायचं धाडस करत नव्हतं..त्या भागातली जी मुलं माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होती तीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे चाहते झाले होते..एक तर कॉलेजची मुलं त्यात तरुणाईतला बंडखोरपणा..आणि त्याला साद घालणारे बाळासाहेब ठाकरे हे नातं घट्ट झालं होतं..तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आवडत्या व्यक्तिमत्वापैकी एक आहेत...आणि ते राहतील..

 

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची गुंडगिरी किंवा ठोकशाहीवर टीका करण्या-यांना हे माहित असेलच की राजकारणातले अनेक नेते आणि गुंडगिरी यांचा जवळचा संबंध असतो..हे आम्ही तरी गावापासूनच पहात आलोय मग तो छोठा मोठा नेता कोणत्याही पक्षाचा असो.. म्हणजे राजकारणातलं स्वच्छ व्यक्तिमत्व शंभरात एक दोनही सापडले तर खूपच होईलं. त्यामुळं शिवसेनेचा राडा वैगेरे टीका होत असली तरी ते राजकारणातल्या जवळपास सर्वांनाच लागू पडतं..पण तरुण रक्तात जी बंडखोरवृत्ती असते त्याला मात्र बाळासाहेबांनी वाट करुन दिली होती..म्हणूनच माझासारखी असंख्य मुलं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं भारुन केली होती..एवढाच माझा आणि त्या शिवसेनेचा संबंध..पण नंतर जेव्हा मी प्रसारमाध्यमात आलो तेव्हा माझ्या ज्ञानात वेगवेगळ्या मार्गानं शिवसेना, बाळासाहेब आणि त्यांचं राजकारण यांची भर पडली.. त्यामुळं बाळासाहेबांनी घेतलेले अनेक निर्णय , त्यांच्या भूमिका मला आवडल्या नाहीत किंवा त्याची बाजू घ्यावी असं कधीच मला वाटलं नाही..पण एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावरचं प्रेम हे तसभूरही कमी झालं नाही.. 40 लाख झोपडपट्टीवासींना मोफत घरं आणि 27 लाख नोक-या देण्याचं आश्वासन..नाही वचन देत बाळासाहेबांनी महाराष्ट्रात युतीचं सरकार आणलं ..खरं तर जो काही या 27 लाखांच्या बेरोजगारीचा आकडा होता त्यातलाच मी एक...मलाही नोकरीची आशा होतीच..पण युतीच सरकार आलं तेव्हा मी नुकताच एमए करुन बेकार झालो होतो. कॉलेज नावाच्या फॅक्टरीतून बाहेर पडलो होतो..पण त्यानंतर नोकरी काही मिळाली नाही..म्हणजे बाळासाहेबांनी दिलेलं आश्वासन पाळलचं नाही.. ना घर ना नोकरी..ते आणि त्यांची शिवसेना सुद्धा काँग्रेससारखीच झाली...पण अशी दिलेली आश्वासनं पाळली जात नसतात किंवा ते फक्त प्रचारातलं एक भाषण म्हणून पहायचं असतं हे तोपर्यंत मला समजलं होतं..

 

बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात एक नवा वर्ग आणला..ज्या लोकांच्या सात पिढ्यांचा राजकारणाशी फक्त मतदान करण्यापलिकडे संबंध आला नाही अशी माणसं नगरसेवक, सरपंच, नेते, आमदार, खासदार मंत्री झाले..हे बाळासाहेब ठाकरेंमुळचं झालं हे मान्य करावचं लागेल..मला माहित आहे माझ्या भागातली  अनेक टुकार माणसंही मोठ्या पदावर जाऊन बसली. एका विशिष्ठ वर्गापुरतं मर्यादीत असलं नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून उदयाला आलं..नंतर त्यांचं काय झालं..तेही काँग्रेसच्या वाटेनं कसे गेले हा चर्चेचा वेगळा विषय आहे..पण महाराष्ट्रात राजकारण हे तळागाळापर्यंत पोचवण्यात बाळासाहेब ठाकरेंचा सिंघाचा नव्हे तर वाघाचा वाटा आहे..

शिवसेनेचा जन्म मुंबईतला..आणि मुंबईत आवाज फक्त शिवसेनेचाच चालतो हे आम्ही तेव्हा पहात एकत होतो..त्यामुळं मुंबईच्या आकर्षणात शिवसेना या नावामुळं भर पडली.. त्यानंतर मी नोकरीनिमित्त अनेक वर्ष हैदराबादमध्ये होतो..वगवेगळ्या भाषेतली चॅनेल्स असलेल्या ईटीव्हीमध्ये असल्यामुळे तिथं भारताच्या वेगवेगळ्या भागातले सहकारी होते. त्यांची भाषा, संस्कृती, राजकारण यांच्यावर मोठ्या गप्पा व्हायच्या..माझे तर अनेक मित्र बिहार, उत्तर प्रदेश या भागातलेही होते..त्यांनाही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल प्रचंड आकर्षण असायचं..त्यातले अनेकजण माझ्याकडून बाळासाहेब आणि शिवसेनेबदद्ल विचारत असत..त्यातल्या अनेकजणांमध्येही या दोन्हींबद्दल मोठे गैरसमज होते..पण संधी मिळेल तेव्हा ते गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न केला..त्यातला अनेकांचा त्यामुळे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंबदद्लचा गैरसमज दूर झाल्याचं मला जाणवलं..एक ओरिसाचा सहकारी होता..त्या पठठ्याला तर बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर होता..अनेकवेळा बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिका मला पटल्या नाहीत पण हा पठठ्या मात्र बाळासाहेबांच्या कोणत्याच भूमिकेला विरोध करत नव्हता..त्याला सर्वकाही योग्यच वाटतं होते.. एवढा तो बाळासाहेब ठाकरेंचा चाहता होता..
 

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल हे सर्व सांगण्याचं कारण हेच की ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी शिवसेना नावाची एक संघटना स्थापन करुन एक वेगळं व्यासपीठ, एक वेगळी दिशा घालून दिली ती आता मागे पडत चाललीय. शिवसेनेतेही अनेक बदल झालेत..नेतृत्वाची नवी फळी निर्माण करण्यात आलीय.. खरं तर शिवसेनेत नेतृत्व घडवली जात होती आता ती निर्माण केली जातात.. आवाज कुणाचा असं म्हणण्याची आज गरज नाही कारण शिवसेनेचा तो खरा आवाज केंव्हाच बंद झालाय.. आंदोलन म्हणाल तर त्यातही काही दम दिसत नाही.. फक्त टीव्हीवर आक्रमक बाईट देण्यानं किंवा भाषण ठोकण्यानं शिवसेनेचा आवाज बुलंद राहत नाही.. आतातर बंडखोरी ही तर काँग्रेसला लाजवेल त्यापेक्षा जास्त झालीय..एक काळ होता बंडखोरी म्हटलं की त्या नेत्यांची पाचावर धारण बसायची... पण नेतृत्वच दमदार राहिलं नाही तर कार्यकर्ते तर कुठून दमदार राहणार.. सगळ्यांना आता पद, पैसा याची लालसा निर्माण झालीय..त्यामुळंच मुंबईतल्या संपर्कनेत्यांच्या समोर आवाज मोठा करण्याची हिंमत आता कोणीही करतो. मुंबईतून नेतृत्व लादण्याची परंपरा आता इतर भागातल्या नेत्यांनाही रुचत नाही..घाम गाळून, पोलीसांच्या लाठ्या खाऊन, तडीपारी, केसेस झेलून ज्या तळागाळातल्या शिवसैनिकांनी ही शिवसेना वाढवली ती काँग्रेसच्या वाटेनं जाताना अनेकांना पाहवत  नाही..पण बाळासाहेबांनी उभी केलेली ही संघटना फक्त सत्तेच्या आणि पदाच्या आलसेनं संपत असेल तर ते वाईटच आहे..सत्तेच्या राजकारणाची चटक लागलेल्या शिवसेनेला आता सत्तेची भूक भागवायची आहे..त्यासाठी शिवसेनाही आता इतर राजकीय पक्षांसारखीच झालीय..शिवसेना पक्ष म्हणून संपेल असं मला तरी वाटत नाही पण पूर्वीची शिवसेना आता होणे नाही हेही सत्य आहे..शिवसेना पक्ष म्हणून वाढेल, पुढे जाईल किंवा नाही हे वेगळा भाग...पण बाळासाहेंबाची शिवसेना पुन्हा होणे नाही म्हणजे नाही..म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आजही माझ्यासह अनेकांच्या मनात घर करुन आहे आणि ती राहिल..
 

Thursday, February 14, 2013

प्रेमाचा गावा जाऊ....म्हणजेच VALENTINE DAY


आज १४ फेब्रुवारी ..तरुणाईचा दिवस..प्रेम करणा-यांचा दिवस...पण आज प्रेमाच्या नावावर जे काही चाललय ते पहावत नाही..सगळेच काही तसे आहेत असं नाही पण जास्तीत जास्त प्रकरणात मात्र प्रेमाच्या नावाखाली काहीही चाललय असंच आहे..म्हटलं चला आज याच विषयावर काहीतरी लिहूयात..

१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला...? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी...! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको...


आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय...? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही...
 

प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय...त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार...हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते...


आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती...

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची...

तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा...आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर....

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..

बसं एवढचं...

प्रेमाच्या बदलेल्या या व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा केलेला आहे एक प्रयत्न आहे..तो काहींना आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे...बाकी सगळं सेमच आहे..

(मी हा ब्लॉग मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला लिहीला होता..आज पुन्हा त्याची आठवण झाली म्हणून पुन्हा हा ब्लॉग प्रपंच....)