Friday, September 21, 2012

टीम अण्णा अखेर फुटली..


 " जनलोकपालच्या मुद्यावर एकत्र आलेले अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात फुट पडलीय. यापुढे केजरीवाल आणि अण्णांचे रस्ते वेगळे असणार आहेत. ही टीम का फुटली, त्याला कारण काय, कोण जबाबदार आहे टीम फुटण्याला, याचा अन्वयार्थ लावणारा हा लेख...



 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यापासून फारकत घेतली. मागच्या दीड दोन वर्षापासून सुरु झालेल्या टीम अण्णांचे दोन तुकडे पडलेत. एका तुकड्यात केजरीवाल आणि प्रशांत भूषण आहेत तर दुसरीकडे अण्णा, किरण बेदी वगैरे मंडळी आहेत. लोकपलाच्या मुदद्यावर एकत्र आलेल्या या टीमला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावरुन या टीममध्ये फूट पडली. केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढून ताकद दाखवण्याची खुमखुमी आली होती, त्याला अण्णांचा अर्थातच विरोध होता. पण जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून केजरीवाल यांनी त्यांचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा वापर करुन आपला फायदा करुन घेण्याचा केजरीवाल यांचा उद्देश होता. पण अण्णांनी त्याला छेद देत आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दाखवून दिलं...

अण्णा हजारे यांनी स्वतःच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर टीम अण्णा फुटल्याचं जाहीर केलं. तसं करताना त्यांनी केजरीवाल आणि कंपनीला निवडणुकीत आपला फोटो किंवा नाव न वापरण्याचा इशाराही दिला. पण हा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच टीम फुटणार हे जाणवत होतं. राजकीय पर्यायाला किरण बेदी, संतोष हेगडे यांचाही विरोध होताच पण उपोषण सोडताना अण्णांना तसा पर्याय देण्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्याचवेळी अण्णांचा त्याला विरोध आहे अशीही माहिती मिळाली होती. शेवटी अण्णांनी केजरीवाल यांना त्यांची जागा दाखवली. त्यामुळे केजरीवाल यांच्या आशेवर पाणी पडलंय
 

दीड वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालचा झेंडा हाती घेऊन दिल्ली हादरवून सोडली होती. दिल्लीतल्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रसिद्धी माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी पाहून सरकारलाही सुरुवातीला चार पावलं मागं हटावं लागलं होतं. पण उपोषणाचं हत्यार मागच्या दीड वर्षात वारंवार वापरून अण्णांनी त्याची धार बोधट केली. शिवाय उठसुठ राजकीय नेत्यांना शिव्या देण्याचा सपाटाही त्यांच्या सहाकाऱ्यांनी लावला. कोणत्याही मुद्द्यावर हेकेखोर आणि हटवादी भूमिका घेण्यामुळेही लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला. दिल्लीत मिळालेला सुरुवातीचा प्रतिसादही नंतर मिळत नव्हता. त्यामुळे गर्दी नाही तर दर्दी लोकांची गरज असल्याचा आवही त्यांना आणावा लागला. तर दुसरीकडं सरकारनंही त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अण्णांना त्यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला..केजरीवाल यांच्या बेछुट आरोप करण्याच्या वृत्तीमुळेही लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यातच टीममध्येच अनेकदा मतभेद असल्याचं समोर येत होते. शेवटी राजकीय पर्यायाच्या मुद्दयावर ही टीम फुटली..

अण्णा हजारेंचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आजपर्यंत अनेक नामांकित लोकांनी त्यांनी साथ दिली पण ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. बाबा आढाव, गो. रा. खैरनार, मेधा पाटकर, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी अण्णांना भ्रष्टाचार विरोधी लढ्यात साथ दिली पण काही काळानंतर त्यांनीही अण्णापासून दूर राहण पसंत केलं. याला अण्णांचा हट्टी स्वभावही कारणीभूत असल्याचं बाबा आढाव सारख्या जाणत्या व्यक्तीनं म्हटलय. तर अण्णा हे फक्त ढोंगी आहेत असं खैरनार यांनी म्हटलय. तर अण्णांच्या कोणत्याच भूमिकेवर ठाम न राहण्याच्या सवयीमुळेही अनेक सहका-यांनी त्यांची साथ सोडली. अण्णांच्या सहकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. पण त्याबाबत अण्णा फारसं बोललेलं दिसत नाहीत. तर दुसरीकडं अण्णा हे भाजप आणि संघ परिवाराचे समर्थक आहेत, त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही होत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईलं. कारण काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आगपाखड करताना भाजपच्या भ्रष्टाचारावर गप्प बसण्यातूनही या आरोपांना पुष्टीचं मिळते. तर दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही अण्णांच्या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असं म्हटलय. त्यामुळे कुठेतरी अण्णा आणि संघ यांच्यात जवळीक असल्याची शंका येतेच.

अण्णांनी आता केजरीवाल यांना दूर करुन रामदेव बाबा यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यामुळे अण्णांचे यापुढेचे साथीदार रामदेव बाबा असतील. त्यांच्याबरोबर अण्णा किती दिवस साथ देणार हे लवकरच कळेल..

Saturday, September 1, 2012

राज ठाकरेंचा वाद बिहारी

" राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बिहारींचा मुद्दा उचलून धरलाय. बिहारच्या मुख्य सचिवांच्या एका पत्रावरुन हा वाद सुरु झालाय.. त्यातून सगळे बिहारी नेते उंच आवाजात राज ठाकरेंना देशद्रोही ठरवा असं म्हणत आहेत. त्यात तेल ओतन्याचं काम उत्तर भारतातील मिडीयानं केलय..

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण हलवून टाकलय. मुद्दा होता बिहारींचा..बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्राचा मुद्दा करत राज ठाकरेंनी बिहारींना राज्यातून हाकलून लावू असा इशारा दिला..राज ठाकरेंनी बिहारविषयी काही बोलताच बिहारी नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल...शिवानंद तिवारी, लालू प्रसाद यादव, शरद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, यांनी तर राज ठाकरेंवर तोफ डागलीच, पण काँग्रेसचे वाचाळ सरचिटणीस दिग्वीजयसिंगही त्यात पडले..ठाकरेंचं मुळ बिहारमध्ये होतं. ते मध्यप्रदेश मार्गे मुंबईत गेले असा जावई शोध त्यांनी लावला..त्यातच त्यांनी राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलय असं म्हटलं. तर केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी केलीय..दिल्लीतल्या बिहारच्या झाडून सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. राज्य घटनेचा हवाला देऊन कोणीही कुठही जाऊ येवू शकतो याची आठवण करुन दिली..पण हे सगळेच नेते राज ठाकरेंवर तुडुन पडत असताना त्यांच्या एवढंही लक्षात आलं नाही की याचा थेट फायदा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेलाच होणाराय. राज ठाकरेंनी मुंबईतून एकच इशारा दिला आणि या इशा-यानं पाटणा मार्गे दिल्ली हलवली...

दिल्ली आणि पाटण्यात हे राजकारण तापलं असताना मुंबईतही राजकीय नेते कामाला लागलेच..म्हणजे राज ठाकरेंनी एकाच इशाऱ्यात अनेकांना कामाला लावलं..राज ठाकरे काही बोलले आणि त्यावर अबु आझमी आणि संजय निरुपम बोलणार नाहीत असं कसं होईलं..त्यांनीही मग कॅमेऱ्यासमोर येऊन आव्हान प्रतिआव्हानाची भाषा केली..फरक एवढाच होता की यावेळी संजय निरुपम यांची भाषा बऱ्यापैकी सौम्य होती..कारण त्यांनी यापूर्वी राज ठाकरेंवर आगपाखड केली होती त्यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठीकडून तंबी देण्यात आली होती. ते लक्षात ठेऊनच निरुपम यांनी प्रतिक्रीया दिली..पण अबु आझमी मात्र आपल्या स्टाईलमध्ये मैदानात उतरलेच...जाता जाता आर. आर. पाटीलही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई करु असं सांगून गेले...यात उत्तर भारतातील प्रसारमाध्यमांनीही तेल ओतन्याचं काम केलय हेही नाकारुन चालणार नाही..राज ठाकरे मराठीचा मुद्दा जेव्हा उचलतात किंवा बिहारीचा मुद्दा उचलतात तेव्हा उत्तर भारतातील प्रसार माध्यमं राज ठाकरेंना व्हिलन ठरवतात..

राज ठाकरेंच्या या सर्व प्रकरणात काँग्रेस त्यांना छुपी साथ देत आहे असं म्हटलं जातय..कारण वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मोकळं रान दिलं होतं असं म्हटलं जातय. मुंबईत त्यावेळी डाव्यांचा जोर होता. त्यांना मोडीत काढण्यासाठी नाईकांनी बाळासाहेबांना मोकळीक दिली होती असं म्हटलं जातय..तोच पत्ता काँग्रेस आज राज ठाकरेंच्या रुपानं वापरत असल्याचं बोललं जातय. शिवसेना जशी काँग्रेसच्या शिडीवरुन वाढत गेली. तसच मनसेलाही काँग्रेसकडून मिळणाऱ्या या मोकळीकचा फायदा होणारच आहे..तर दुसरीकडं २०१४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही तयारी सुरु झालीय असंही म्हणायला हरकत नाही..तर अबु आझमी आणि राज ठाकरे यांनाही त्याचं राजकीय मायलेज मिळणारच आहे..राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देशद्रोही ठरवा असा आवाज या बिहारी नेत्यांनी उठवलाय तसच त्यांच्यावर भाषण बंदी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

राज ठाकरे यांना टायमिंगही चांगलंच जमतय..त्यांनी एखादा मुद्दा उचलून धरावा आणि त्याचा त्यांना फायदा झाला नाही असं घडलेलं नाही..तसच एखादा विषय किती ताणावा हेही त्यांना चांगलच कळतं. म्हणूनच तर त्यांचा पक्ष राज्यात जोरात वाढतोय..मुंबई, नवी मंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेचा जोर धडाक्यात वाढलाय. याच पट्ट्यात विधानसभेच्या १०० च्या वर जागा आहेत. मनसेच्या या राजकीय वाढीची सर्वच पक्षांनी दखल घेतलीय. शिवसेना भाजप युतीत आठवले जाऊन बसले असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही..म्हणूनच राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा विचार सुरु झालाय. भाजपाकडून तरी त्यावर हालचाली सुरु असल्याचं दिसतय..तर दुसरीकडं शरद पवार यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची घौडदौड वेगानं होत असल्याचं मान्य केलय..२०१४ च्या निवडणुकीत जर मनसेचा हा विजयपथ असाच कायम राहिला तर ते किंगमेकर होणार हे नक्की.. त्यासाठीच तर हा सगळा वाद सुरुय असंच आतातरी म्हणावं लागेल..