Thursday, July 5, 2012

आंध्र प्रदेशातून काँग्रेस संपली..


आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका या २०१४ मध्ये होत आहेत पण त्या निवडणुकीचा निकाल हा आत्ताच लागलाय. राज्यात सध्या काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला सलग दोनवेळा सत्तेत आणलं पण त्यांच्या अपघाती निधानानंतर आंध्रातलं राजकारण पूर्णपणे बदललय. वायएसआर यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी वडलांच्या निधनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली होती पण ती काँग्रेसनं मान्य केली नाही शेवटी याच जगनमोहन रेड्डींनी स्वताचा वेगळा पक्ष स्थापन केलाय आणि हा पक्षच काँग्रेसची सत्ता घालवणार हे जवळजवळ पक्कं आहे. जगनममोहन यांच्या पक्षाचं उघड उघड समर्थन करणा-या आमदारांची संख्याही जास्त आहे. त्याचाच एक दणका जगनमोहन रेड्डींनी काँग्रेसला दिलाय. जगन यांचे समर्थन करणा-या १६ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं होतं. त्यामुळे आंध्रात पोटनिवडणुक झाली. विधानसभेच्या एकूण १८ जागा तर लोकसभेच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली. त्यात विधानसभेच्या १५ आणि लोकसभेची जागा जिंकून जगनमोहन यांनी काँग्रेसचा पत्ता साफ केला. ही काँग्रेससाठी मोठी चिंतेची बाब आहे. या पोटनिवडणुकीनं जगनमोहन यांनी काँग्रेसचं आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणाराय हे आत्ताच दाखवून दिलय. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमचंही काही खरं नाही..त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दक्षिणेतला बालेकिल्ला ढासळलाय हे नक्की..

खरं तर या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयनं अटक केली. अवैघ संपत्तीच्या प्रकरणात सीबीआय चौकशीचा ससेमिरा जगन यांच्यामागे लावून देण्यात आलाय. त्यात जगन यांच्या खास जवळच्या काही सहका-यांना तर काही सनदी अधिका-यांनाही सीबीआयनं अटक केलीय. पण जगन यांच्या अटकेचं टायमिंग मात्र सर्वांनाच खटकतय. पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगन यांना अटक करुन त्यांचा बिमोड करायचा हा काँग्रेसचा डाव होता. सीबीआयचा राजकीय वापर करण्यात काँग्रेसचे सत्ताधारी तरबेज आहेत हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. पण जगन मोहन रेड्डींना थोपवण्यासाठी काँग्रेसनं टाकलेला सीबीआयचा फास उलटा पडला आणि जगनच्या अनुपस्थीतीत त्यांची आई आणि बहिण यांनी झंझावाती प्रचार केला. जगन मोहन यांना राजकीय द्वेषातून फसवल्याचा आरोप त्यांनी प्रचार सभांतून केला. तसच दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर यांनी गरिब आणि आदिवासींसाठी सुरु केलेल्या योजना जगन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सुरु केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलाय..जगन तुमचा भावी मुख्यमंत्री आहे असा प्रचारही केला गेला त्याला लोकांनी जोरदार साथ दिली..

वाय एस राजशेखर रेड्डी यांची जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा होती. दलित, ख्रिश्चन आणि मागास जातींमध्ये त्यांचा जनाधार मोठा होता. त्याची सहानुभूती जगन यांना मिळाली. तसच आंध्रातला रेड्डी समाजही जगन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. हेच चित्र पुढही कायम राहणाराय. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात डांबलेल्या जगन यांना त्यांच्या अटकेचा फायदाही झालाय. आत्ता फक्त जगन यांना जामीन मिळण्याचा अवकाश..आंध्रात एखादा राजकीय भूंकप होण्याची शक्यताय. किरण रेड्डी यांचं सरकार काठावरचं बहुमत घेऊन सत्तेत आहे. त्यामुळे आणखी १५-२० आमदारांनी जगन कॅम्पमध्ये उडी मारल्यास काँग्रेसचं सरकार राहणार नाही..हे आजचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि तेलुगु देसम यांना आत्ता धडकी भरलीय.

आंध्र प्रदेशातून काँग्रेसची सत्ता गेल्यास लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आधीच चारी बाजूंनी घेरलेल्या काँग्रेसपुढं जगन मोहन रेड्डींनी मोठं आव्हान उभं केलय. हे आव्हान मोडून काढण्याची धमक आंध्रातल्या काँग्रेस नेतृत्वाकडे नाही..तर तेलंगणाच्या मुद्द्यावरची चालढकलही काँग्रेसला महागात पडणाराय. त्यामुळे आंध्र प्रदेशातून काँग्रेसचं उच्चाटन झालेलं आहे ही मी आत्ताच सांगतो...

No comments:

Post a Comment