Monday, April 23, 2012

विल्यम शेक्सपिअर-एक महान लेखक

विल्यम शेक्सपिअर

विल्यम शेक्सपिअर हा इंग्रजी वांड्मयातील महत्वाचा लेखक..महत्वाचा म्हणजे एवढा की..इंग्रजी वांड्मय म्हणजे दोन तृतीयांश बायबल आणि एक चतुर्थांश शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. यावरुनच शेक्सपियरचं इंग्रजी वांड्मयातलं महत्व अधोरेखित होतं. तर शेक्सपिअरला वगळून इंग्रजी वांड्मयावर लिहणं अश्यकच आहे. एवढं मोठं योगदान या लेखकानं इंग्रजीला दिलेलं आहे. आपल्या अवघ्या ५२ वर्षाच्या आयुष्यात शेक्सपिअरनं ३६ नाटकं लिहिली तर जवळपास १५० सुनितं लिहिली. असं म्हणतात की शेक्सपिअरनं त्याच्या लेखनातून एकही विषय सोडला नाही. त्याच्या लेखनानं सर्व विषयाला स्पर्श केलाय. राजकारण, प्रेम, कौटुंबिक, सामाजिक, यासह जीवनाच्या सर्व अंगाला त्याच्या लेखनीनं स्पर्श केलाय. त्याची नाटकं सर्वात जास्त गाजलेली तसच इंग्रजी वांड्मयाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. ट्रॅजेडी असो वा कॉमेडी, किंवा नाटकाचा इतर कोणताही प्रकार असो त्यात शेक्सपिअर नाही असं होत नाही..ट्रॅजेडीचाच विचार करायचा तर हॅम्लेट, किंग लिअर, ऑथेल्लो, मॅकबेथ, रोमिओ आणि ज्युलियट यांना कोण विसरु शकेल.

सोळाव्या शतकातल्या या लेखकाविषयी जगभरातून लेखन झालय. त्याच्या नाटकांची जगातल्या जवळपास सर्वच भाषेत भाषांतरं झालेली आहेत. तर त्याच्यावर लाखो समिक्षकांनी लेखन केलय. तरीही शेक्सपिअर हा विषय काही संपत नाही. त्याच्या लेखनीनं इंग्रजीच्या अभ्यासकांना तर झपाटूनच सोडलंय. १६ व्या शतकात त्यानं ज्या पद्धतीनं नाटकं बसवली आणि ती अजरामर झाली त्याला तोडच नाही. आजही तुमच्या आमच्यातल्या अनेकांच्या व्यवहारात बोलतानाही शेक्सपिअरच्या नाटकातल्या पात्रांचा विषय येतो तर कधी त्या नाटकातले संदर्भ येतात. हेच पहा ना. to be or not to be असं म्हटलं की हॅम्लेटच नावं ओठावर येतच. तुमची माझी अनेकांची हॅम्लेटसारखी अवस्था अनेकदा झालेली आहे. तर राजकारण किंवा मैत्रिच्या बाबतीत Brutus you too ! हा ज्युलियस सिझरमधला अजरामर डायलॉग येतोच. तर प्रेमाचा विषय निघाल्यावर रोमिओ ज्युलियट शिवाय तर तो पूर्ण होऊच शकत नाही. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. किंग लिअरबद्दल तर कीतीतरी वेळा चर्चा होईन गेलीय. म्हातारा किंग लिअर आणि त्याच्या तीन मुली संपत्तीसाठी काय- काय करतात हा १६ व्या शतकातला शेक्सपिअरनं मांडलेला विषय आजही आपल्या अवतीभोवती अनेकदा आपण पाहतोय.

शेक्सपिअरच्या नाटकांची जगातल्या सर्व भाषेत भाषांतरं झाली त्यात मराठीही मागं नाही. किंग लिअरवरचं नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांचं नाटक तर जगजाहीर आहे. शेक्सपिअरच्या एका-एका नाटकाचं पाच-सहा लेखकांनी त्यांच्या शैलित भाषांतर केलय. यावरुनच शेक्सपिअरच्या लेखनाची महती विषद होतेय. कारण त्या- त्या भाषेत लिहिण्यासाठी विषय नाहीत असं नाही पण शेक्सपिअरनं विषयच असे काही हाताळलेत ते आज पाचशे वर्षानंतरही अजरामर आहेत. त्याचा विषय काय किंवा आशय काय आजही जिवंत आहेत. ते कालबाह्य झालेले नाहीत. हीच त्याच्या लेखनाची ताकद म्हणावी लागेल.

इंग्रजी वांड्मयाला भरभरुन दिलेल्या या लेखकाच्या बाबतीत फारशी माहिती मात्र उपलब्ध नाही. अगदी त्याच्या जन्मतारखेचाही घोळ आहेच. एप्रिल महिन्यातील २३ किंवा २६ तारखेला त्याचा जन्म झाला असावा असं मानलं जातय. तर मृत्युच्या तारखेबद्लही असंच म्हटलं जातय. काही ठिकाणी तर शेक्सपिअरची जन्म तारिख आणि मृत्युची तारीखही एकाच दिवशी येते म्हणजे २३ एप्रिल असाही एका मतप्रवाह आहे. तर त्याच्या जीवनाबद्दलही अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शेक्सपिअरनं त्याच्यापेक्षा वयानं ८ वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं होतं. तो त्याच्या कौटुंबिक जीवनात सुखी नव्हता. यापासून त्याच्या संबंधांबद्दलही बरचं काही लिहलं गेलय. पण त्याच्या इतर बाबींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यानं इंग्रजी वांड्मयाला दिलेली अमुल्य देणगी ही लाख मोलाची आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रीत करुयात...विल्यम शेक्सपिअरचा जन्म इंग्लड मधल्या वारविकशायर परगण्यातील स्ट्रॅटफोर्ड-ऑन- अँव्हान या गावात १५६४ साली झाला. त्यानंतर तो इंग्लडला गेला. तिथच त्यानं आपलं बस्तान बसवलं आणि नाटकात मोठं नाव कमावलं. त्यानंतर तो आपल्या गावी परत आला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यानं आपलं गाव स्ट्रॅटफोर्ड या गावातच घालवले. १६१६ साली शेक्सपिअरचं निधन झालं. शेक्सपिअरच्या जन्मतारखेचा जसा वाद आहे तसाच त्याचा फोटो किंवा पोर्ट्रेटचाही आहे. त्याचा खरा फोटो कोणता हे आजही गुलदस्त्यातच आहे. त्याच्या केलेल्या वर्णावरुन काही पोर्ट्रेट बनवलीत त्यालाच मान्यता देण्यात आलीय. एप्रिलचा महिना आहे आणि शेक्सपिअरचा विषय आठवला म्हणून इंग्रजीचा एक विद्यार्थी या नात्याना त्याच्यावर काही लिहिता येईल का असा विचार मनात चमकून गेला आणि वाटलं शेक्सपिअरवर काहीही हलकं फुलकं लिहूयात म्हणून हा प्रपंच केला. बाकी शेक्सपिअवर लिहायचं म्हटलं तर दोन चार पानच काय अखंडपणे लिहित राहावं एवढा मोठा त्याच्या लेखनाचा पसारा आहे. त्यावर कितीही लिहिलं तर कमीच आहे. पण केवळ शेक्सपिअर कोण होता एवढं तर जाता जाता लक्षात यावं, त्याचं स्मरण व्हावा म्हणून अगदी थोडक्यात या चारोळ्या लिहिलेल्या आहेत..

No comments:

Post a Comment