Saturday, May 31, 2014

राज ठाकरेंचा करिश्मा संपलाय का ?

 
 
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची वाट लावायला निघालेल्या राज ठाकरेंना लोकांनी मोठा दणका देत त्यांची औकात दाखवून दिलीय....नरेंद्र मोदींच्या नावाचाही त्यांनी वापर केला पण त्याचाही काही परिणाम झाला नाही...गेल्या निवडणुकीत लाखालाखांची मतं घेऊन मुंबईतले महायुतीचे सर्व उमेदवार मनसेनं पाडले होते. पण यावेळी कल्याणच्या राजू पाटलांचा अपवाद वगळता मनसेच्या एकाही उमेदवाराला लाखाच्यावर मतं मिळालेली नाहीत. पण ते 1 लाख 22 हजार मतं घेऊनही तिस-याच क्रमांकावर राहिले. तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिही जप्त झालं. गंमत म्हणजे मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूकीपूर्वीच पाठिंबाही देऊन टाकला होता...पण लोकांनी थेट महायुतीच्या उमेदवारांन मतं देणं पसंत केलं...लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या २३ तर शिवसेनेच्या तब्बल 18 जागा निवडून आल्या....त्यामुळे शिवसेनेची वाट लावण्याच्या नादात राज ठाकरे स्वतःच तोंडावर पडले...
मनसेनं दहाच उमेदवार उभे केले पण त्यांना यावेळी लोकांना साफ नाकारलं..मतांचा विचार केला तर या निवडणुकीत मनसेला अवघी दीड टक्का मतं मिळालीत....राज ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी आपवर टीका करताना महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याची वल्गना केली होती...पण मतदानाच्या टक्केवारीतही आपनच मनसेला मागे टाकलंय...केजरीवालांच्या आपला महाराष्ट्रात 2.3 टक्के मतं मिळालीत. मनसेला सत्ता द्या, महाराष्ट्राताला सुतासारखा सरळ करून दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनाच मतदाराजांनी त्यांची जागा दाखवून दिलीय.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातही तरुणवर्गाला एक मोठं स्वप्न दाखवलं होतं..राज्यात एक नवा पर्याय त्यांनी उभा केला होता..राज ठाकरेंवर विश्वास दाखवत लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.. मीडियानंही राज ठाकरेंना भरपूर फुटेज दिलं..लाखा-लाखांच्या सभा झाल्या...यातूनच नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली...कल्याण डोंबिवलीत मनसेनं मोठी मुसंडी मारली...तर पुण्यातही २९ नगरसेवक निवडून दिले....पण त्यानंतर मनसेचा आलेख खाली आला..राज ठाकरे फक्त भाषणबाजीच करतात.. प्रत्यक्षात काहीही करत नाहीत असा लोकांना प्रत्यय आला..त्यातच मोदींची लाट आली आणि या लाटेत मनसेही साफ धुवून गेली..आता विधानसभा निवडणुकीत लोकांनी जर राज ठाकरेंना नाकारलं तर मात्र त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात जाईल...   

Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...
  
 
 
 
 
 

Tuesday, February 4, 2014

राष्ट्रवादीसाठी ‘करा किंवा मरा’ची लढाई


लोकसभेच्या 2014 च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठ्या आव्हानात्मक आहेत. 1999 साली स्थापन केलेल्या या पक्षाची ओळखच मुळात महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष अशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाची ताकद जास्त आहे. इतर भागात अजून पक्ष विस्तारलेला नाही..मागच्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि दिल्लीत सत्तेत आहे. या पक्षाकडे राज्यातील महत्वाची मंत्रिपदं आहेत. असं असतानाही या पक्षाचा महाराष्ट्रात फारसा विस्तार झालेला नाही.
2012-13 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाला एवढीच काय ती  कामगिरी..पण विधानसभा आणि लोकसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती वाढली याचा पक्षानं विचार करायला हवा.
साखर लॉबी आणि पश्चिम महाराष्ट्र
शरद पवार यांचं नेतृत्व, साखर लॉबी आणि मराठा समाजाचा पाठिंबा या जोरावर या पक्षाची वाटचाल सुरू आहे. पण त्यात त्यांना सत्ता असूनही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचण्यात यश आलेलं नाही. विधानसभेच्या 100 जागाही या पक्षाला आत्तापर्यंत जिंकता आलेल्या नाहीत, लोकसभेची गोष्टही तिच..राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 22 जागा लढवते पण 10 जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत.. त्यामानानं शिवसेनेची लोकसभेतली कामगिरी चांगली आहे..शरद पवार यांनी लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून बारगेनिंग पॉवर वाढवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. यावर्षीही 22 जागांपैकी 15-16 जागा जिंकण्याचा पवारसाहेबांचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा इरादा आहे.पण एवढं करुनही त्यांना अपेक्षित य मिळेल असं वाटत नाही.

भ्रष्टाचाराचा कलंक आणि सुमार कामगिरी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्यातच मागच्या तीन वर्षात मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणलय. जलसंपदा विभागातला घोटाळा असो की शिखर बँकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय..राष्ट्रवादीचा इंटरेस्ट असलेल्या अनेक प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावले..तर दुसरीकडे साखर सम्राटांना दणका देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलनं केली. या आंदोलनाच्या दणक्यानं अनेक साखर कारखानदारांची झोप उडवली. थेट बारामतीतच उपोषण करून राजू शेट्टी यांनी ते यशस्वी करुन दाखवलं. ऊसाला 3 हजारांचा भाव द्यावा म्हणून शेट्टींनी खूप जोर लावला..तो आता 2250 पर्यंत देण्याचं कारखान्यांनी मान्य केलय..पण साखर सम्राटांना शेट्टींनी मात्र एकप्रकारे सुरुंगच लावला.. 
नव्या नेतृत्वाचा काय उपयोग ?
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुस-या फळीचं नेतृत्व अजित पवार करत आहेत. पण त्यांची महत्वाकांक्षा पाहाता थोरलेसाहेब सगळी सुत्रं त्यांच्या हातात देण्यास अजूनही तयार नाहीत..राजीनामानाट्यावेळी सर्व आमदार आपल्या पाठीमागे आहेत असं दादांना वाटलं पण थोरल्यासाहेबांनी डोळे वटारताच सर्व आमदार शांत बसले. यातच मोठ्या साहेबांची पक्षावर आजही किती मजबूत पकड आहे हे स्पष्ट दिसतय. अजितदादांना पक्षातले ज्येष्ठ नेतेच विरोध करत आहेत. तर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पुढं करण्यासाठी युवती मेळावा, लेक वाचवा अभियान आखण्यात आलं पण नेतृत्व म्हणून काही त्या चमक दाखवू शकल्या नाहीत..

शरद पवारांचा कस लागणार
मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी, काँग्रेसमधलं राहुल गांधींचं वाढतं महत्व, महायुतीची एकजूट, राजू शेट्टींचं आंदोलन आणि आपल्याच पक्षातील भ्रष्ट मंत्री अशी प्रतिमा हे राष्ट्रवादीला मारक ठरणार आहेत. माढ्याची हक्काची जागाही यावेळी राखता येईलं का हा प्रश्नही आहेच..पवारांसारख्या अनुभवी नेत्याकडे वर्षानुवर्षांची सत्ता, नेत्यांची मोठी फळी असूनही त्यांचं गणित कुठं चुकतं हे पवासाहेबांना कळालं नसेल असं वाटत नाही.. तरिही यावर्षी पुन्हा जोर देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे.. पण मतदारराजा पवारसाहेबांच्या पारड्यात किती कौल देतो आजच स्पष्ट आहे..

Tuesday, January 21, 2014

मनसेची वाट बिकट




महाराष्ट्रात आम्ही आहोत बाप कशाला पाहिजे आप...असं राज ठाकरेंनी नाशिकमध्ये ठणकावलं.. पण राज ठाकरेंना महाराष्ट्रानं अजून तरी बाप म्हणून स्विकारालेलं नाही..मागच्या विधानसभा निवडणुकीत जरी 13 आमदार, नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी ते कोणत्याचं अर्थानं बाप ठरलेले नाहीत..मनसेनं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते दिवे लावले म्हणून त्यांना लोकांनी बाप म्हणून स्विकारावं याचं उत्तरही राज ठाकरे देऊ शकणार नाहीत. 2009 च्या निवडणुकीत ज्या आशेनं तरुणवर्ग राज ठाकरे यांच्यामागे गेला. त्यांचा आता भ्रमनिरास झाल्याचं दिसतय. पण दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या उदयानंतर देशातलं राजकारण बदलय. त्याचा विचार मनसेला करावा लागणाराय..

 

ब्ल्यू प्रिंट कुठे आहे?

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करुन वाटचाल करण्याची गर्जना शिवाजी पार्कवर केली होती. माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा सर्वांना कसं सरळ करतो. असं ते नेहमी म्हणतात. 13 आमदार आल्यानंतर विरोधी पक्ष काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असं ते म्हणत...पण नाशिक महापालिकेची सत्ता ,पुणे, कल्याण डोंबिवली महापालिका असो वा विधानसभा, मनसेनं लक्षात राहिलं असं काही केल्याचं दिसत नाही...

ना आंदोलन, ना कार्यकर्त्यांना कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या पक्षानं गेल्या पाच वर्षात लोकांच्या प्रश्नांसाठी कोणतं आंदोलन केले वा कोणता प्रश्न तडीस लावला हे त्यांनाही आठवत नसेल. फक्त उत्तर भारतीयांच्या नावावर कुठेतरी धिंगाणा घालणं यापलीकडे त्यांनी फारसं काही केलेलं नाही...त्यातच ज्या अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती त्याच बचच्न यांना मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..तर टोल नाक्याच्या प्रश्नावर केलेलं आंदोलनही दोन दिवसातच मागं पडलं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर वातावरण तापल्यानंतर एका मोर्चात दस्तुखुद्द राज ठाकरे अवतरले पण काही अंतर चालत जाऊन ते पुन्हा परत गेले. खरं तर टोलविरोधी आंदोलन जर त्यांनी तडीस नेलं असतं तर मनसेची लोकप्रियता आणखी वाढली असती. पण माशी कुठं शिंकली माहित नाही. पुन्हा त्यावर मनसेचा आवाज निघालाच नाही.

मुंबईत काय केले ?

मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न नेहमीच गाजतो पण एखाद्या कॉँट्रॅक्टरच्या थोबाडीत मारण्यापलिकडे  त्यांनी काही केलं नाही. फक्त खळ्ळ खट्ट्याक एवढेच आवाज काढण्याचं काम करायचं आणि तो विषय तिथंच सोडून द्यायचा हाच उद्योग मनसेनं केला. ज्या मुंबई, नाशिक, पुणे पट्ट्यात मनसेला चांगलं यश मिळालं तिथं तरी त्यांची कामगिरी काय..लक्षात राहिलं असं त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांनाही देता येणार नाही. पुणे महापालिकेत मनसेचे चांगले 26-27 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये मनसेचा महापौर आहे. खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे असं असनूही त्यांचे नगरसवेक कामात छाप पाडू शकले नाहीत. कल्याण डोंबिवलीतही मनसेला चांगल्या जागा आहेत. पण तिथंही प्रभावी विरोधीपक्ष म्हणून त्यांनी छाप पाडलेली नाही...

मनसेचा विस्तार कुठे झाला ?

महाराष्ट्राच्या इतर भागात मनसेची स्थिती फारसी चागंली नाही. मनसेचं संघटनही ग्रामिण भागात पोहचलेलं नाही. शेतक-यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आवाज उठवला नाही..विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचा विषय कधी लावून धरला नाही. दुष्काळावरही फारसं काही केलं नाही. अशा स्थितीत कधीतरी टीव्हीवर येऊन काही भूमिका मांडणं आणि जाहीर सभा घेऊन पक्ष कसा वाढणार..त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. त्यांना काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे. तो देण्यात मनसे कमी पडली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता देण्याची भाषा करण्याअगोदर राज ठाकरे यांनी स्वतःची कार्यपद्धती बदलली पाहिजे तरच त्यांना चांगलं यश येईलं अन्यथा एक होता मनसे असचं म्हणावं लागेल....

 

Sunday, December 29, 2013

शिवसेनेचा बदलता चेहरा

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेची नव्यानं बांधणी करत आहेत. पण त्यांना नवे-जुने, शहरी-ग्रामीण या वादाला तोंड द्यावं लागत आहे. जुन्या नेत्यांना डावलून नवं नेतृत्व आणण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. मुंबईत ते शिवसेनेचा चेहरा बदलण्याचा करत आहेत. पण पक्षांतर्गत नाराजीबरोबरच उद्धव ठाकरे यांना मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेचा सामना करावा लागणार आहे. शिवसेनेत ग्रामिण शहरी नेत्यांमध्ये मोठी दरी आहे. तर कोकणात शिवसेनेला पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळं भाकरी फिरवताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आघाडी सरकारच्या कारभाराला लोक कंटाळले असले तरी युतीला भक्कम पर्याय म्हणून लोक स्विकारतील असं चित्र दिसत नाही.      

शिवसेनेतल्या नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय..कल्याणचे खासदार आनंद परांजपे हे नावालाच शिवसेनेचे खासदार आहेत. ते केंव्हाच राष्ट्रवादीत गेलेत, तर मोहन रावलेही आता शिवसेनेत नाहीत. मनोहर जोशी, रामदास कदम या शिलेदारांची नाराजी उघड आहे. जोशी सरांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं उभं केलं पण ते तग धरू शकलं नाही. जोशींनी मातोश्रीवर दंडवत घालत आपली तलवार मान्य केली..मनोहर जोशींसारख्या जुन्या जाणत्या नेत्यालाही खासदारकीच्या उमेदवारीसाठी लोंटागण घालावं लागत आहे. रावलेंनाही लोकसभेची उमेदवारी मिळत नाही असं दिसताच त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला. अखेर रावलेंची हकालपट्टी झाली..उद्धव ठाकरे सध्या जुन्या नेत्यांना म्हणजेच बाळासाहेबांच्या शिलेदारांना फारसं महत्व देत नाहीत. ते सध्या नवी टीम तयार करत आहेत. कोकणात नारायण राणेंनंतर शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही. त्यांना शह देण्यासाठी रामदास कदम यांना पुढं करण्यात आलं पण मागच्या निवडणुकीपासून त्यांचं शिवसेनेतलं स्थान डळमळीतच आहे. त्यांच्या खेडमध्येच मनसेनं झेंडा फडकवलाय. रामदास कदम यांना मतदारसंघच नसल्यामुळं त्यांची गोची झालीय. आता विधान परिषदही मिळेल का नाही याची चिंता रामदास भाईंना सतावतेय.   
मुंबई, कोकणातील नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय. परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींचा मेळावा उद्धव ठाकरेंनी घेतला. या मेळाव्याकडे दुधगावकर फिरकलेचं नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांना धूळ चारत, दुधगावकरांनी परभणीच्या बाल्लेकिल्यावर भगवा फडकवला. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार हमखास जिंकून येतो.1989 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे.1998 चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे..पण याच परभणीच्या खासदाराला दुस-या पक्षात जाण्याचा शापही लागलेला आहे. दुधगावकर यांच्याआधी तुकाराम रेंगे पाटील आणि सुरेश जाधव या सेनेच्या खासदारांनीही नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय..औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे मातोश्रीच्या खास मर्जीतले असल्यामुळे त्यांचं स्थान अजूनतरी भक्कम आहे. मराठवाड्यात कन्नडचे मनसेचे आमदार शिवसेनेत आलेत तर प्रदीप जैयस्वाल हे पुन्हा शिवसेनेत परतलेत ही त्यांच्यासाठी मराठवाड्यातील जमेची बाजू म्हणता येईलं..
पश्चिम महाराष्ट्रातही शिवसेनेचा विस्तार फारसा झालेला नाही. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे ते मतदारसंघ जरी शिवसेनेनं राखले तरी त्यांच्यासाठी खूप झालं. विदर्भाचा विचार करता तिथंही जागा वाढतील असं चित्र नाही. उद्दव ठाकरे, दिवाकर रावते यांनी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नावर रान उठवलं होतं, मोर्चाही काढला. पण त्याचाही शिवसेनेला फारसा फायदा होईलं असं वाटत नाही. मुंबई, नाशकातलं मनसेचं आव्हान, कोकणात झालेली घसरगुंडी, मराठवाड्यातली नाराजी आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं मोठं आव्हान त्यांच्यापुढं आहे. रामदास आठवलेंची युतीबरोबरची साथ आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा किती चालेल यावरच युतीचं भवितव्य आहे. नाहीतर आत्ताच्या जागा टिकवणंही त्यांना कठीण जाईलं..

 

 

 

 

Monday, December 16, 2013

'झाडू'वाल्या केजरीवालांचे यश



दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनं प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायला लावलाय. दोन वर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सक्रीय भाग घेतलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही सहका-यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला जे घवघवीत यश मिळालय. हे कोणत्याही राजकीय पक्षाला दहादा विचार करायला लावणारं आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी तब्बल 28 जागांवर केजरीवालांच्या पक्षानं विजय मिळवला..भाजपला जरी 32 जागा मिळाल्या आणि पंधरा वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस भुईसपाट झाला..खरं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आम आदमी पक्षाचे हे यश चिंतन करायला लावणार आहे. केजरीवालांच्या पक्षाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोणत्याही मोठ्या चळवळीचा ते भाग नाहीत. केवळ लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनातून हे लोक पुढे आले आणि केवळ दोन वर्षांत त्यांनी राजकीय चित्रच बदलून टाकलं..

केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याच्या मुद्द्यावरून अण्णांपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या मुलभूत प्रश्नांवर आंदोलनंही केली..वीजच्या भरमसाठ बिलाविरोधात त्यांनी आंदोलन केलं. महागाई कमी करावी यासाठी आवाज उठवला. याबरोबरच त्यांनी जनतेच्या मनातल्या प्रश्नांना आवाज उठवला. मध्यमवर्गीय लोकांच्या समस्यांना त्यांनी तोंड फोडलं. केजरीवाल यांच्या यशामागं जसं त्यांचा साधेपणा. थेट भिडण्याचा स्वभाव, राजकारणाचा चेहरा नसणारी सामान्य माणसं होती तसच त्यांनी सोशल मीडियाचाही भरपूर वापर करून घेतला.. निवडणुका म्हटलं की अफाट पैसा हे गणितही त्यांनी बदलून दाखवलं. लोकांकडून वर्गणी घेऊन त्यांनी निवडणूक फंड जमा केला आणि त्यावर त्यांनी निवडणूक लढवली...

केजरीवाल यांच्या पक्षानं प्रस्थापित राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले.. त्यामुळे देशातल्या सर्वच पक्षांना आता विचार करावा लागणाराय. तेच ते मुद्दे, तेच तेच आरोप प्रत्यारोप, तेच ते चहरे, राजकारणातली घराणेशाही, भावनिक मुद्दे, जातीय समिकरणं यांच्यात गुरफटलेल्या राजकारणाला केजरीवाल यांनी फाटा दिला. त्यामुळंही त्यांना मोठं यश मिळालं. लोकही त्याच त्याच राजकारणाला कंटाळले.पण त्यांच्याकडे पर्यायच नाही म्हणून. त्यातलाच जो बरा त्याला मतदान केलं जायचं. पण केजरीवाल यांच्या पक्षानं मतदारांना नवा पर्याय दिला, नवी आशा दाखवली. हे त्यांच्या पक्षाच्या यशामागचं गमक म्हणता येईलं.ज्या शहरी मध्यमवर्गाला त्यांनी हा नवा पर्याय दिलाय. त्या पर्यायाच्या शोधात लोक होते पण त्यांना तो आतापर्यंत मिळत नव्हता...केजरीवाल यांचं यश नक्कीच वाखण्यासारखं आहे. पण त्यांची खरी लढाई आता सुरु झालीय. बाहेरून जाब विचारणं सोप्पं असतं पण ते पार पाडण्याची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा खरा कस लागतो..आशा करूयात केजरीवाल यांना काँग्रेसनं देऊ केलेला पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता स्थापन करावी आणि त्यांनी जी आशा दाखवलीय, त्यांच्यावर ज्यांनी विश्वास टाकलाय. तो त्यांनी सार्थ करून दाखवावा..केजरीवाल यांनी हे शिवधनुष्य पेललं तर जनता विसरणार नाही पण ते ज्याप्रमाणं सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेसला अटी घालत आहेत. त्यावरून ते जबाबदारीपासून पळ तर काढत नाहीत ना असंच म्हणावं लागेल..

केजरीवाल सत्ता स्थापन करो अथवा नाही पण दिल्लीच्या या विजयानं सर्वच प्रस्थापित पक्षांना चिंतन करावं लागणाराय. मध्यमवर्गावर भिस्त असणा-या भाजपला तर विचार करावाच लागणाराय. पण वर्षोनवर्षे सत्तेत राहून आपण राज्य करण्यासाठीच जन्माला आलोय अशा आर्विभावात वावणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना या विजयाचा विचार करावा लागणाराय. नाहीतर त्यांनाही इतर राज्यातले केजरीवाल धडा शिकवतील..

   

 

Friday, November 22, 2013

सचिनला भारतरत्न दिला म्हणून एवढी बोंब का ?


सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली..सचिनला भारतरत्न का दिला..तो काही फुकट खेळला आहे का यापासून आधी ध्यानचंद नंतर सचिनला भारतरत्न द्यायला हवा होता असा सुर निघाला...भारतरत्न हा सचिनला द्यावा अशी मागणी मागच्या दोन वर्षांपासून होत होती पण भारतरत्न हा खेळाडूंना देण्याची परंपराही नव्हती आणि तशी त्यात तरतूदही नव्हती..पण त्यानंतर भारतरत्न देण्याच्या व्याखेत बदल करण्यात आला.. जनता दल संयुक्तचे नेते शिवानंद तिवारी यांनी तर अकलेचे तारे तोडत सचिन क्रिकेट फुटक खेळलेला नाही त्याला भाररत्न का दिला असा तर्क लावला..
 

भारतरत्न हा सरकारनं जाहीर केला तो सचिननं क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल..24 वर्ष त्यानं भारताच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलय..क्रिकेट हा मुळात सभ्य माणसाचा खेळ म्हटला जातो..पण याच क्रिकेटमध्ये आज बजबजपुरी माजलीय..तरीही सचिननं त्याचा तोल कधीही ढळू दिला नाही. तो यशाच्या शिखरावर आहे. त्यानं सर्व विक्रम मोडीत काढलेत. त्यानं पैसाही अमाप कमावला पण क्रिकेटच्या सभ्यतेला धक्का न पोचवता..मग त्यात त्याचं काय चुकलं..

सचिनला भारतरत्न दिला म्हणून ओरडणा-यांनी इतर पुरस्कारांकडे पहावं. पद्म पुरस्कारही तेवढेच मानाचे आहेत. पण ते आजकाल कोणाला दिले जातात तेही पहावं..दोन तीन वर्षापूर्वी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला..आता या सैफचं काय योगदान आणि योग्यता आहे.. सिनेमात तरी त्यानं काय दिवे लावलेत. मग त्यालाही पुरस्कार दिलाच ना..सैफ सारखी अनेक नावं देता येतील त्यांना हा पुरस्कार का दिला असा सहज प्रश्न पडतो..

दुसरं असं की आजकाल कोणताही पुरस्कार दिला तरी त्यावर वाद हा होतोच..आता सचिनला भारतरत्न दिल्यानंतर वाजपेयीं का नाही दादासाहेब फाळकेंना का नाही अशी विचारणा केली जातेय..पुरस्कार एक आणि दावेदार अनेक अशी अवस्था झालीय..मग पुरस्कार कोणालाही जाहीर केला तरी वाद हा होतच राहणार..म्हणून काय असे सन्मान द्यायचेच नाहीत का..? त्यामुळं सचिनला भारतरत्न दिला म्हणून काय मोठं आभाळ कोसळलेलं नाही आणि दिला नसत तरी सचिनचं महत्व आणि त्यानं क्रिकेटला दिलेलं योगदान काही कमी झालंसतं. याहीपुढं जाऊन लता मंगेशकर यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे सचिन भारतरत्न नाही तर विश्वरत्नच्या लायकीचा आहे..