Showing posts with label केजरीवाल. Show all posts
Showing posts with label केजरीवाल. Show all posts

Thursday, February 12, 2015

तेरा 'झाडू' चल गया

भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना शह देतअरविंद केजरीवाल यांनीराजधानीतून देशाच्या राजकारणात नवा इतिहास लिहिलाय.सरकारमधील उच्चपदाची नोकरी सोडून सामाजिक प्रश्नावर लढण्यासाठी  अण्णा हजारेंचाय आंदोलनात उडी घेतली. नंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून थेट राजकारणात उडी घेतली आणि दोन वर्षात दुस-यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत थक्क करणारी मजल मारलीय.. लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडगोळीचा उधळलेला विजयाचा रथ अखेर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी अडवला. हा विजयरथ नुसता अडवलाच नाही तर 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकून त्यांनी भाजप आणि काँग्रेसला एवढी मोठी धोबीपछाड दिली की त्यांना या पराभवाचं आणि केजरीवाल यांच्या विजयाचं हजारदा चिंतन करावं लागणाराय. विशेषतः भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत मोदी-शहांनी जो विजयाचा धडाका लावला होता. त्यामुळे काँग्रेससह छोट्या प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले होते. पण अरविंद केजरीवालांचा ‘झाडू’दिल्लीत असा काही चालला की भाजप फक्त तीन जागांवर येऊन थांबाला. काँग्रेसचा तर विचार न केलेलाच बरा. त्यांच्या 61 उमेदवारांना अनामतही वाचवता आली नाही.. दोन वर्षांआधी म्हणजे 2013 ला आम आदमी पक्षानं राजकारणातली पहिली परीक्षा दिली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि भाजपला मागं टाकलं. बहुमतासाठी काही जागा त्यांना कमी पडल्या होत्या, तरिही त्यांनी सत्ता स्थापन केली. पण अवघ्या 49 दिवसांतच केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदासह सत्ताही सोडली. तेंव्हापासून केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत होती, पळपुटा माणूस, अराजक निर्माण करणारा नेता, नेहमी नेहमी धरणं धरणारा माणुस म्हणून केजरीवालांची थट्टा केली जात होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानीपत झालं आणि मोदींच्यारुपानं नवी शक्ती दिल्लीच्या राजकारणात उदयाला आली.काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांनाही मोदींच्या भाजपनं धोबी पछाड दिली. यशाचा हा वारू उधळतच होता. त्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मोदींचा वारू असाच उधळेल असा अंदाज होता. पण केजरीवाल यांनी झाल्या चुका जाहीरपणे मान्य करून लोकांना पुन्हा एकदा सत्ता देण्याचं आवाहन केलं. केजरीवाल यांचा हाच प्रामाणिकपणा त्यांच्या कामी आला आणि दिल्लीकरांनी प्रचंड, प्रचंड अतिप्रचंड असा कौल दिला.. भाजपनं दिल्लीच्या निवडणुकीसाठी मोठा फौजफाटा उतरवला. छोट्याशा दिल्लीसाठी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्ते प्रचारात उतरवले. किरण बेदींना आयत्यावेळी भाजपात घेऊन थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनच मैदानात उतरवलं.बाहेरून आणलेली कमुक, बाहेरून आणलेले उमेदवार आणि मोदी, शहांच्या हुकुमशाही नेतृत्वाला दिल्लीकरांनी अजिबात थारा दिला नाही.पंतप्रधान मोदींच्या विकासाचा बुरखाही दिल्लीकरांनी टराटरा फाडला. हा निकाल भाजपसाठी बरचंकाही सांगणारा आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका, घरवापसी, चार-पाच मुलांना जन्म देण्याचा अनाहुत सल्ला देणारे हिंदू परिवारातले नेते यामुळं जनतेत नाराजी वाढलीच होती. त्यातच मोदींचा सारखा-सारखा वाजणारा विकासाचा पोकळ ढोलही लोकांना आवडला नाही असचं दिसतय. त्याविरोधात केजरीवालांचा प्रामाणिकपणा लोकांना आवडला. केजरीवालांच्या या यशात अनेक राजकीय पक्षांना आशेचा किरणही दिसू लागलाय. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना असो वा मोदींशी थेट दोन हात करणा-या ममता बॅनर्जी, नितीशकुमार, डावे पक्ष यांना दिल्लीतला विजय हा आपलाच विजय असल्याचं वाटू लागलय. कारण मोदींचा विजयरथ थोपवण्याचं धाडस कोणीही करु शकलं नव्हतं. उधळलेला हा घोडा केजरीवालांनी अडवल्यानं आपणही या मोदी लाटेचा वारू थोपवू शकतो असं या पक्षांना आता वाटू लागलय. त्यामुळचं केजरीवालांवर या पक्षांनी लगेच शुभेच्छांचा वर्षाव केला.दिल्लीच्या विजयानं पुन्हा एकदा नवी राजकीय समिकरणं उदयाला येतील हे मात्र नक्की.    

Monday, December 16, 2013

'झाडू'वाल्या केजरीवालांचे यश



दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनं प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायला लावलाय. दोन वर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सक्रीय भाग घेतलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही सहका-यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला जे घवघवीत यश मिळालय. हे कोणत्याही राजकीय पक्षाला दहादा विचार करायला लावणारं आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी तब्बल 28 जागांवर केजरीवालांच्या पक्षानं विजय मिळवला..भाजपला जरी 32 जागा मिळाल्या आणि पंधरा वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस भुईसपाट झाला..खरं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आम आदमी पक्षाचे हे यश चिंतन करायला लावणार आहे. केजरीवालांच्या पक्षाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोणत्याही मोठ्या चळवळीचा ते भाग नाहीत. केवळ लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनातून हे लोक पुढे आले आणि केवळ दोन वर्षांत त्यांनी राजकीय चित्रच बदलून टाकलं..

केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याच्या मुद्द्यावरून अण्णांपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या मुलभूत प्रश्नांवर आंदोलनंही केली..वीजच्या भरमसाठ बिलाविरोधात त्यांनी आंदोलन केलं. महागाई कमी करावी यासाठी आवाज उठवला. याबरोबरच त्यांनी जनतेच्या मनातल्या प्रश्नांना आवाज उठवला. मध्यमवर्गीय लोकांच्या समस्यांना त्यांनी तोंड फोडलं. केजरीवाल यांच्या यशामागं जसं त्यांचा साधेपणा. थेट भिडण्याचा स्वभाव, राजकारणाचा चेहरा नसणारी सामान्य माणसं होती तसच त्यांनी सोशल मीडियाचाही भरपूर वापर करून घेतला.. निवडणुका म्हटलं की अफाट पैसा हे गणितही त्यांनी बदलून दाखवलं. लोकांकडून वर्गणी घेऊन त्यांनी निवडणूक फंड जमा केला आणि त्यावर त्यांनी निवडणूक लढवली...

केजरीवाल यांच्या पक्षानं प्रस्थापित राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले.. त्यामुळे देशातल्या सर्वच पक्षांना आता विचार करावा लागणाराय. तेच ते मुद्दे, तेच तेच आरोप प्रत्यारोप, तेच ते चहरे, राजकारणातली घराणेशाही, भावनिक मुद्दे, जातीय समिकरणं यांच्यात गुरफटलेल्या राजकारणाला केजरीवाल यांनी फाटा दिला. त्यामुळंही त्यांना मोठं यश मिळालं. लोकही त्याच त्याच राजकारणाला कंटाळले.पण त्यांच्याकडे पर्यायच नाही म्हणून. त्यातलाच जो बरा त्याला मतदान केलं जायचं. पण केजरीवाल यांच्या पक्षानं मतदारांना नवा पर्याय दिला, नवी आशा दाखवली. हे त्यांच्या पक्षाच्या यशामागचं गमक म्हणता येईलं.ज्या शहरी मध्यमवर्गाला त्यांनी हा नवा पर्याय दिलाय. त्या पर्यायाच्या शोधात लोक होते पण त्यांना तो आतापर्यंत मिळत नव्हता...केजरीवाल यांचं यश नक्कीच वाखण्यासारखं आहे. पण त्यांची खरी लढाई आता सुरु झालीय. बाहेरून जाब विचारणं सोप्पं असतं पण ते पार पाडण्याची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा खरा कस लागतो..आशा करूयात केजरीवाल यांना काँग्रेसनं देऊ केलेला पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता स्थापन करावी आणि त्यांनी जी आशा दाखवलीय, त्यांच्यावर ज्यांनी विश्वास टाकलाय. तो त्यांनी सार्थ करून दाखवावा..केजरीवाल यांनी हे शिवधनुष्य पेललं तर जनता विसरणार नाही पण ते ज्याप्रमाणं सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेसला अटी घालत आहेत. त्यावरून ते जबाबदारीपासून पळ तर काढत नाहीत ना असंच म्हणावं लागेल..

केजरीवाल सत्ता स्थापन करो अथवा नाही पण दिल्लीच्या या विजयानं सर्वच प्रस्थापित पक्षांना चिंतन करावं लागणाराय. मध्यमवर्गावर भिस्त असणा-या भाजपला तर विचार करावाच लागणाराय. पण वर्षोनवर्षे सत्तेत राहून आपण राज्य करण्यासाठीच जन्माला आलोय अशा आर्विभावात वावणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना या विजयाचा विचार करावा लागणाराय. नाहीतर त्यांनाही इतर राज्यातले केजरीवाल धडा शिकवतील..

   

 

Friday, September 21, 2012

टीम अण्णा अखेर फुटली..


 " जनलोकपालच्या मुद्यावर एकत्र आलेले अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात फुट पडलीय. यापुढे केजरीवाल आणि अण्णांचे रस्ते वेगळे असणार आहेत. ही टीम का फुटली, त्याला कारण काय, कोण जबाबदार आहे टीम फुटण्याला, याचा अन्वयार्थ लावणारा हा लेख...



 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यापासून फारकत घेतली. मागच्या दीड दोन वर्षापासून सुरु झालेल्या टीम अण्णांचे दोन तुकडे पडलेत. एका तुकड्यात केजरीवाल आणि प्रशांत भूषण आहेत तर दुसरीकडे अण्णा, किरण बेदी वगैरे मंडळी आहेत. लोकपलाच्या मुदद्यावर एकत्र आलेल्या या टीमला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावरुन या टीममध्ये फूट पडली. केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढून ताकद दाखवण्याची खुमखुमी आली होती, त्याला अण्णांचा अर्थातच विरोध होता. पण जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून केजरीवाल यांनी त्यांचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा वापर करुन आपला फायदा करुन घेण्याचा केजरीवाल यांचा उद्देश होता. पण अण्णांनी त्याला छेद देत आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दाखवून दिलं...

अण्णा हजारे यांनी स्वतःच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर टीम अण्णा फुटल्याचं जाहीर केलं. तसं करताना त्यांनी केजरीवाल आणि कंपनीला निवडणुकीत आपला फोटो किंवा नाव न वापरण्याचा इशाराही दिला. पण हा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच टीम फुटणार हे जाणवत होतं. राजकीय पर्यायाला किरण बेदी, संतोष हेगडे यांचाही विरोध होताच पण उपोषण सोडताना अण्णांना तसा पर्याय देण्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्याचवेळी अण्णांचा त्याला विरोध आहे अशीही माहिती मिळाली होती. शेवटी अण्णांनी केजरीवाल यांना त्यांची जागा दाखवली. त्यामुळे केजरीवाल यांच्या आशेवर पाणी पडलंय
 

दीड वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालचा झेंडा हाती घेऊन दिल्ली हादरवून सोडली होती. दिल्लीतल्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रसिद्धी माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी पाहून सरकारलाही सुरुवातीला चार पावलं मागं हटावं लागलं होतं. पण उपोषणाचं हत्यार मागच्या दीड वर्षात वारंवार वापरून अण्णांनी त्याची धार बोधट केली. शिवाय उठसुठ राजकीय नेत्यांना शिव्या देण्याचा सपाटाही त्यांच्या सहाकाऱ्यांनी लावला. कोणत्याही मुद्द्यावर हेकेखोर आणि हटवादी भूमिका घेण्यामुळेही लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला. दिल्लीत मिळालेला सुरुवातीचा प्रतिसादही नंतर मिळत नव्हता. त्यामुळे गर्दी नाही तर दर्दी लोकांची गरज असल्याचा आवही त्यांना आणावा लागला. तर दुसरीकडं सरकारनंही त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अण्णांना त्यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला..केजरीवाल यांच्या बेछुट आरोप करण्याच्या वृत्तीमुळेही लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यातच टीममध्येच अनेकदा मतभेद असल्याचं समोर येत होते. शेवटी राजकीय पर्यायाच्या मुद्दयावर ही टीम फुटली..

अण्णा हजारेंचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आजपर्यंत अनेक नामांकित लोकांनी त्यांनी साथ दिली पण ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. बाबा आढाव, गो. रा. खैरनार, मेधा पाटकर, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी अण्णांना भ्रष्टाचार विरोधी लढ्यात साथ दिली पण काही काळानंतर त्यांनीही अण्णापासून दूर राहण पसंत केलं. याला अण्णांचा हट्टी स्वभावही कारणीभूत असल्याचं बाबा आढाव सारख्या जाणत्या व्यक्तीनं म्हटलय. तर अण्णा हे फक्त ढोंगी आहेत असं खैरनार यांनी म्हटलय. तर अण्णांच्या कोणत्याच भूमिकेवर ठाम न राहण्याच्या सवयीमुळेही अनेक सहका-यांनी त्यांची साथ सोडली. अण्णांच्या सहकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. पण त्याबाबत अण्णा फारसं बोललेलं दिसत नाहीत. तर दुसरीकडं अण्णा हे भाजप आणि संघ परिवाराचे समर्थक आहेत, त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही होत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईलं. कारण काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आगपाखड करताना भाजपच्या भ्रष्टाचारावर गप्प बसण्यातूनही या आरोपांना पुष्टीचं मिळते. तर दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही अण्णांच्या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असं म्हटलय. त्यामुळे कुठेतरी अण्णा आणि संघ यांच्यात जवळीक असल्याची शंका येतेच.

अण्णांनी आता केजरीवाल यांना दूर करुन रामदेव बाबा यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यामुळे अण्णांचे यापुढेचे साथीदार रामदेव बाबा असतील. त्यांच्याबरोबर अण्णा किती दिवस साथ देणार हे लवकरच कळेल..

Monday, February 27, 2012

केजरीवाल..! जरा सांभाळून बोला..!!!

संसदेत लुटारु, बलात्कारी आणि दरोडेखोर बसलेले आहेत, त्यांच्याकडून जनलोकपाल विधेयक पास होईल याची तुम्ही अपेक्षा कशी काय करु शकता ? हे शब्द आहेत याच देशातले महनीय,आदरनिय श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे..आता हे केजरीवाल कोण ? हे आपल्याला सांगण्याची गरज नसावी…. ओळखलं ना..! अगदी बरोबर, आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्याला खांदा लावून लोकपालच्या लढाईत जी कोणी दोन-चार टाळकी सतत टीव्हीसमोर बडबड करत असतात त्यातलेच हे एक विद्वान महाशय..! दुस-या शब्दात आणि अगदीच स्वच्छ मराठीतच सांगायचं झालं तर अण्णांच्या टोळीतले हे एक दिडशहाणे...मी त्यांच्याबाबत एवढी विशेषणं का वापरलीत हेही सांगून टाकतो..जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जो लढा उभा केलाय त्यात किरण बेदी, प्रशांत भूषण ही मंडळी आहेत..हे विधेयक पास व्हावं ही आमचीही इच्छा आहे..त्यासाठी लढा देणं, आंदोलन करणं ही लोकशाहीतली हक्काची हत्यारं आहेत. पण त्याचा वापर करताना इतारांचा आदरही राखलाच गेला पाहिजे...ज्या संसदेत आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांच्याबद्दल ही कसली भाषा..? तेसुद्धा याच समाजातलेच आहेत.आपणच त्यांना निवडूण देतोय..त्यांच्याबदद्लची भाषा वापरताना संयम हवा..! त्यांच्याबद्दल काय कोणाही दुस-या व्यक्तीबदद्ल जाहीरपणे अशा प्रकारची व्यक्तव्य करण्याचा अधिकार ह्या केजरीवालला कोणी दिला..? तो कोण दिडशहाणा लागून गेलाय काय ? अशा व्यक्तव्याची आणि त्या व्यक्तीची जेवढी निंदा करावी तेवढं कमीच आहे...त्यामुळे अरविंद केजरीवाल, बोलताना थोडा लगाम घाला आपल्या जिभेला, नाहीतर तीच जीभ हासडून कोणी भटक्या कुत्र्यासमोर टाकून देतील हे लक्षात घ्या...

लोकपाल विधेयकाच्या लढ्याला लोकांचा पाठिंबा आहे तो अण्णा हजारे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळे हे तुम्ही विसरु नका..पण अण्णांनीही अशा लोकांना तंबी द्यायला हवी.. कारण तुम्ही गांधीवादी म्हणवता आणि अशा शब्दांचा वापर करणा-यांना पाठीशी घालता हे ना तुम्हाला शोभते ना आपल्या संस्कृतीला...यापूर्वीही किरण बेदी यांनी खासदारांबदद्ल अपमानास्पद शब्द काढले होते..अण्णांनीही शरद पवारांना एका माथेफिरुनं दिल्लीत चापट मारली तेव्हा दिलेली प्रतिक्रिया लोकांना आवडली नाही...त्यामुळं इतरांबद्दल आपण आदराची भाषा वापरावी यातच तुमचं भलं आहे...

खरं तर जनलोकपाल विधेयक पास झालं म्हणजे या देशातला भ्रष्टाचार संपेल या स्वप्नात तुम्ही जे वावरत आहात तेच मुळी चुकीचं आहे. या देशात आजही अनेक कडक कायदे आहेत. त्याचा वापर करुनही शिक्षा देता येते...फक्त कायदे करुन त्या समस्येवर मात करता येत नाही हे आपण दहशतवादीविरोधी जो पोटा कायदा केला होता किंवा हुंडा विरोधी कायदा केला होता यावरुन आपण पाहिलेले आहे..उलट त्या कायद्यांचा दुरुपयोगच जास्त झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे कायदा कडक करुन चालत नाही तर त्याची अंमलबजावणी योग्यरितीनं व्हायला हवी...हे झालं त्या लोकपालबाबत...

दुसरं असं की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणे हिरीरीनं प्रचारात भाग घेणार होता..! पण कुठं दिसले नाहीत तुम्ही लोक..? कुठल्या बिळात जाऊन बसला होता तुम्ही हे लोकांना सांगा ना...! अण्णांची तब्बेत ठिक नव्हती म्हणून ते उपचार घेत होते..मग तुमचे ते बाकीचे अतिशहाणे सदस्य काय तुमचे पाय आणि डोकं चेपत होते काय...? महाराष्ट्रातही जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका झाला पण तुमच्यापैकी कोणीही प्रचाराला फिरकले नाहीत...कुठे आफ्रिकेच्या सफरीवर गेली होती की काय तुमची टोळी. ? त्यावेळी तुमचा आवाज गप्प का होता आणि आता निवडणुकीचा माहौल संपला की तुमची वटवट सुरु झाली याला काय म्हणायचे....

राजकीय लोकांना शिव्या घालताना तुम्ही तुमच्याकडे का नाही पहात...? त्यांना भ्रष्टाचारी, लुटेरे म्हणताना आपण काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात काय...? सांगा ना जनतेला त्या किरण बेदीनं विमानप्रवासाच्या नावानं पैसे लुटले ते...आणि ते प्रशांत भूषण आणि त्यांचे पिताश्री शांतीभूषण यांनी कमावलेल्या संपत्तीचे काय...? कुठन आली त्यांची एवढी संपत्ती..? लोकांना काय तुम्ही दुधखुळे समजता काय...? दुस-याला दुषणं देण्यापूर्वी आपण आपल्याकडे पहावं, आपण किती स्वच्छ आहोत आणि नंतरच इतरांना दोष द्यावा..! मग तुमच्या संपत्तीवर तुम्ही सारवासरव करुन आपण बुवा नाही त्यातले हे सांगण्याचा आटापीटा करता हे कशासाठी...? त्यामुळे तुम्हालाही दुस-यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही..

लोकपाल विधेयकासाठी तुम्हाला जे काही तुणतुणं वाजवायचं ते तुम्ही खुशाल वाजवा पण ते वाजवत असताना तुमच्या भाषेला थोडा लगाम असू द्या नाहीतर आज जे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत तेच लोक तुमच्या तोंडात शेण घालायलाही मागंपुढं पहाणार नाहीत हे विसरु नका.. खासदारांना नावं ठेवताना, त्यांच्यावर आरोप करताना पातळी आणि मर्यादा सोडू नका.. कारण त्यांना निवडून देणारीसुद्धा तीच जनता आहे जी तुम्हाला पाठिंबा देत आहे. त्यांचा अनादर करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही..म्हणून यापुढेही तरी आपण लक्ष्मणरेषा ओलांडू नका हीच तमाम लोकांची इच्छा आहे एवढचं आता सांगणं आहे...

धन्यवाद..