Friday, July 25, 2014

नारायण राणेंचं बंड- हार की प्रहार ?


"नारायण राणेंची जडणघडणच बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत झालेली...त्यामुळं आक्रमकपण त्यांच्या अंगात ठायीठायी भरलेला आहे..ते शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये एक घाव दोन तुकडे असा त्यांचा स्वभाव. एकच अंगार बाकी सगळे भंगार म्हणजे राणे...पण आता राणेंमध्ये तो जोश राहलेला नाही का?...का कमी झाला राणेंचा आक्रमकपणा,? त्यांच्या बंडात आव्हानाऐवजी तडजोडीचाच प्रयत्न दिसतोय का?..राणेंच्या बंडाचा अर्थ लावणारा हा लेख....
 



 
 
नारायण राणे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं हत्यार उपसलं असलं तरी काँग्रेसवर त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. नारायण राणे यांनी बंड केलं खरं पण समर्थक आमदार त्यांच्याबरोबर नाहीत..याच नारायण राणेंनी याआधी केलेल्या बंडानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावताना त्यांनी 12 आमदारांची फौज बरोबर घेतली होती..उद्धव ठाकरेंचा उद्धार करत त्यांनी शिवसेनेतही खळबळ माजवून दिली होती..त्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांनी बंड केले तेंव्हा थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली होती..पण यावेळी यातलं काहीच दिसत नाही...राणेंच्या बंडात त्यांना साथ देणारा एकही खंदा समर्थक दिसत नाही..आमदार विनायक निम्हण गेल्या काही महिन्यांपासून राणेंपासून दूर गेलेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेही राणेंकडे फिरकले नाहीत, कालिदास कोळमकर आहेत पण ते समोर येताना दिसत नाहीत..तर ठाण्याचे रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन नारायण राणेंना 9 वर्ष झाली. या 9 वर्षांत राणेंना महत्वाची पदं मिळाली..काही समर्थकांना विधान परिषद, विधानसभेची उमेदवारीही मिळाली..पण मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा काही काँग्रेस हायकमांड पूर्ण करू शकलं नाही हि सल त्यांचा मनात आहे..पण आता विधानसभेला जेमतेम दोन महिने राहिले असताना औट घटकेचा मुख्यमंत्री काँग्रेस करणार नाही आणि राणेंनाही ते नको आहे मग राणेंचा हा थयथयाट कशासाठी आहे... 

लोकसभेच्या निवडणुकीत राणेंच्या मुलाचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी मोठ्या फरकानं पराभव केला. हा पराभव राणे यांच्या खूपच जिव्हारी लागलाय..कोकणातलं त्यांचं साम्राज्याही आता राहीलेलं नाही..दीपक केसरकर या राष्ट्रवादीच्या आमदारानं तर राणेंना थेट आव्हान देत दोन हात करण्याची भाषा केलीय.. याच केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात काम केलं..राणेंचा मुलगा नितेश राणेही आक्रमक पण त्यांच्या गाडीवर सिंधुदुर्गात दगडफेक झाली. राणेंची फोस्टर्स फाडली यावरून राणेंचा कोकणातला दबदबा संपल्याचं दिसतय.. 

एकीकडं कोकणतल्या साम्राज्याला लागलेला सुरुंग आणि दुसरीकडे काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही याची राणेंना खात्री आहे..आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्याविरोधात कारवाईचा ससेमिरा लावतील अशी भितीही त्यांनी सतावतेय..काँग्रेससोडून जावं तर पर्यायही कमी आहेत..शिवसेनेत त्यांना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंचाच तीव्र विरोध आहे...राष्ट्रवादीत जाणं शक्य नाही..मनसेत जावं तर मनसेचीच अवस्था बिकट आहे..आणि भाजपमध्ये जायचं तर उद्धव ठाकरे यांनी त्याला कडाडून विरोध केलाय..त्यामुळं राणेंची मोठी पंचायत झालीय..सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या राणेंनी राजीनाम्याचं हत्यार उपसून दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय..यासाठी राणे 10 जनपथकडे डोळे लावून बसलेत...यातून त्यांच्या पदरात काही पडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे...

 

 

 

 

 

Thursday, July 17, 2014

पृथ्वीराज चव्हाण सर्वांना पडले 'लय भारी'

 

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जून महिना गाजला..आज मुख्यमंत्री बदलणार, उद्या बदलणार, तीन दिवसात नवा मुख्यमंत्री येणार या चर्चांनी रकानेच्या रकाने भरले..नारायण राणे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे एवढच काय नितीन राऊतांचं नावंही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन गेलं..पण ही शर्यत झालीच नाही..मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि सर्व वातावरण शांत झालं....मुख्यमंत्र्यांना हायकमांडनं अभय तर दिलच पण विधानसभा निवडणूकही पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात लढण्याचा आदेशही दिला..त्यामुळे सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले..

पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तर गप्प बसवलच पण राष्ट्रवादी काँग्रेसला ताळावर आणलं...अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणातून हटवल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीतून आलेल्या या पृथ्वीराज चव्हाण यांना सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री विरोधकांनी फारसं गांभिर्यानं घेतलं नाही..अजित पवार यांना तर आता काँग्रेसवर कुरघोडी करणं सहज सोपं जाईल असचं वाटलं होतं. पण सर्वांची गणितं चुकली आणि या बाबांनी सर्वांची जिरवली...तीन वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी ब्र शब्दही काढला नाही यावरून त्यांची दिल्लीतली पत किती मोठी आहे याचा अंदाज येतो....

पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणी...ते कराडमधले असले तरी त्यांचं राजकारण बहरलं ते दिल्लीतच..गांधी कुटुंबाशी त्यांची असलेली जवळीक सर्वांना माहित आहे..पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण काँग्रेसच्या नेहमीच्या राजकारणाप्रमणे केवळ गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल करण्यात आली..ते मास लिडर प्रकारात मोडत नाहीत, त्यांचा राज्यात कोणता गटही नाही...पण हायकमांडनं त्यांना महाराष्ट्रात पाठवलं आणि राज्यातल्या राजकारणाला वेगळचं वळण लागलं..
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची वर्णी लागली. त्यावेळी सर्वांनीच अजितदादा हे बाबांना खावून टाकणार असचं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित पवारही त्याच आविर्भावात होते...पण बाबांनी पहिला दणका दिला तो राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या शिखर बँकेला..त्यांनी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं...त्यानंतर अजितदादांच्या मर्जितल्या जलसंपदा विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणायला लावला...त्यातून अजित पवारांचा तिळपापड झाला..बाबांनी एक एक करून राष्ट्रवादीला जेरीस आणलं. बाबांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीची अशी कोंडी केली की त्यातून अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला..पण बाबांनी माघार घेतली नाही, गप्प बसून त्यांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली...शरद पवार यांनाही मग मुख्यमंत्री कसे काम करत नाही अशी जाहीर टीका करावी लागली...मुख्यमंत्री फाईलींवर सहीच करत नाही यावरून किती वाद झाला...मुख्यमंत्र्यांच्या हाताला लखवा मारतो काय एवढ्या पर्यंत शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली पण बाबा बधले नाहीत..त्यांनी राष्ट्रवादीला पुरतं जेरीस आणलं...
राष्ट्रवादी काँग्रेसला जसं बाबांनी जागा दाखवली तशीच त्यांनी पक्षातल्या विरोधकांनाही जागा दाखवून दिली..एक तर उठसूठ मुख्यमंत्र्यांविरोधात दिल्लीत जाऊन तक्रारी करण्याचा प्रकार पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर बंद झाला..दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिम्मतही झाली नाही..मुख्यमंत्री आपल्याच पक्षातल्या आमदारांची कामं करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या पण करणार काय...नारायण राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरेंसह अनेकांना मुख्यमंत्र्यांनी वावच दिला नाही...या सर्वांना लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवानंतर मात्र बळ आलं..काँग्रेसच्या पराभवाला मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धतच कारणीभूत असल्याचा आरोप करत विधानसभा जिंकायची असेल तर मुख्यंमत्री बदला म्हणून काँग्रेससह राष्ट्रवादीनंही तगादा लावला..काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री बदलाचं वातावरणही तयार केलं पण झालं काही नाही.. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची कुंडलीच हायकमांडसमोर मांडली...मुख्यमंत्री बदला म्हणून आघाडीवर असलेल्या नारायण राणे हे तर मुलाच्या विजयासाठी मतदारसंघ सोडून प्रचाराला बाहेरही पडले नाहीत..आणि बाकीचे नेते स्वतःच्या मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी देऊ शकले नाहीत ते राज्याचं नेतृत्व काय करणार असा प्रश्नही उपस्थित केला...त्यामुळं सर्वांची बोलती बंद झाली...
पृथ्वीराज चव्हाण यांना कोणताही गट सांभाळायचा नाही..फक्त हायकमांडचा आशिर्वाद पाहिजे आणि तो त्यांच्यावर आहेच...त्यामुळं राष्ट्रवादीसह काँग्रेसमधल्या विरोधकांना ते भारी पडले....आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही....शेवटी एवढचं की राजकारणात स्वतःला फार मोठा नेता म्हणन मिरवणा-यांना बाबांनी चांगलच वठणीवर आणलय..स्वच्छ प्रतिमा तर त्यांनी जपलीच पण कोणतीही आगपाखड न करता शांतपणे त्यांनी सर्वांना गप्प केलं.... 

 

 

 

 

 

 

Sunday, July 6, 2014

मुंबईत फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण !!!!



 

सत्तेचा माज कसा चढतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्य...मुंबई शहरात पाच रुपयां पोटभर जेवायला मिळतं असं भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्टयलय..हे शेलारसाहेब मुंबईचेच...यांचं आयुष्य या शहरातच गेलं...सध्या ते मुंबईचे भाजप अध्यक्ष आणि आमदार आहेत...मुंबईमध्ये सामान्य माणसाचं खाणं म्हणजे वडापाव. ..हा वडापावही 5 रुपयांना मिळत नाही याची शेलारांना माहिती नाही.. कारण हा वडापाव 10 रुपयांच्या खाली कुठंही मिळत नाही..मग मुंबईत पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं कुठं हे त्यांनी सांगायला हवं...या शेलारांनी मागच्या काही वर्षांत पाच रुपये तरी बघितलेत आहेत का. कालपर्यंत विरोधीपक्षात असताना उठसुठ काँग्रेसवर तोफ डागणा-या भाजपची दिल्लीत पूर्ण बहुमतानं सत्ता आल्यापासून त्यांची भाषा बदललीय...एका महिन्यात सत्तेचा माज या भाजपवाल्यांना आल्याचं त्यांच्या चालण्याबोलण्यातून दिसतोय..

 

मागच्या पाच सहा महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या काही महाशयांनी अशीच गरिबांची थट्टा उडवली होती...त्यात याच महानगरात वावरलेलं बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं असा मुर्ख दावा केला होता...त्यावेळी हेच भाजप नेते राज बब्बर यांच्यावर तुटून पडले होते.. आता दिवस बदललेत, सत्तेत भाजप आहे आणि विरोधात काँग्रेस पण गरिबांची थट्टा करायचं काही थांबलेलं नाही...50 रुपये कमावणारा गरिब नाही असा दावाही करणारे सरकारच...आणि पाच 10 रुपयात पोटभर जेवण मिळतं सांगणारेही आमच्याच देशातले नेते...या नेत्यांनी कधी आपल्या आलिशान गाडीतून खाली उतरून स्वतःच्या पैशानं कमी पैशांत जेवण केलय का....हा प्रकार जसा सत्तेचा माज दाखवतो तसच या नेत्यांना वस्तूस्थितीचं किती अज्ञान आहे हेही यातून दिसतंय..    

 

आशिष शेलार काय राज बब्बर काय..पक्ष कोणताही असो गरिबी आणि गरिबांचा कळवळा यांना किती आहे हे सांगण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न असतो...ज्या भाजपच्या आशिष शेलार यांनी पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं असं म्हटलय..त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी गरिब चहावाला देशाचा पंतप्रधान झाला म्हणून केवढी स्तुती झाली...पण त्यांना गरिबांचा किती कळवळा आहे हे सत्तेत आल्यानंतर एका महिन्यातच वाढलेल्या महागाईच्या आलेखानं दिसलय...महागाई का वाढली याचं लंगडं समर्थन आता हे भाजपचे नेते करत आहेत...सत्ता मिळवण्यासाठी फक्त थापा मारण्याचा धंदा या नेत्यांनी सुरू केलाय..

 

पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणून भाजपचे हेच नेते टीका करण्यात आघाडीवर होते..आशिष शेलार, विनोद तावडे यांनी मागच्या काही वर्षात अजित पवार, आर आर पाटील यांच्यावर कशी टीका केलीय ते आठवून पाहा...राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणणा-या भाजपची केंद्रात सत्ता येऊन अवघा महिना झालाय, अजून महाराष्ट्रात सत्ता आलेली नाही तर यांचं विमान हवेत उडायला लागलय..पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यावर तर माज येणारच पण यांना तर एका महिन्यात माज आलाय हे शेलारांच्या बोलण्यातून दिसतय...

शेलारसाहेब, तुम्ही मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहात ..सार्वजनिक जीवनात बोलताना काही तारतम्य बाळागयचं असतं हे तुम्हाला माहिती नाही असं कसं म्हणता येईलं...बोलताना कधी कधी नेत्यांचा तोल सुटतो..पण एवढा तोल सोडू नका की त्यातून गरिबांची आणि गरिबीची थट्टा करावी...हे तुम्हाला शोभत नाही एवढचं ...



  

 

Saturday, May 31, 2014

राज ठाकरेंचा करिश्मा संपलाय का ?

 
 
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची वाट लावायला निघालेल्या राज ठाकरेंना लोकांनी मोठा दणका देत त्यांची औकात दाखवून दिलीय....नरेंद्र मोदींच्या नावाचाही त्यांनी वापर केला पण त्याचाही काही परिणाम झाला नाही...गेल्या निवडणुकीत लाखालाखांची मतं घेऊन मुंबईतले महायुतीचे सर्व उमेदवार मनसेनं पाडले होते. पण यावेळी कल्याणच्या राजू पाटलांचा अपवाद वगळता मनसेच्या एकाही उमेदवाराला लाखाच्यावर मतं मिळालेली नाहीत. पण ते 1 लाख 22 हजार मतं घेऊनही तिस-याच क्रमांकावर राहिले. तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिही जप्त झालं. गंमत म्हणजे मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूकीपूर्वीच पाठिंबाही देऊन टाकला होता...पण लोकांनी थेट महायुतीच्या उमेदवारांन मतं देणं पसंत केलं...लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या २३ तर शिवसेनेच्या तब्बल 18 जागा निवडून आल्या....त्यामुळे शिवसेनेची वाट लावण्याच्या नादात राज ठाकरे स्वतःच तोंडावर पडले...
मनसेनं दहाच उमेदवार उभे केले पण त्यांना यावेळी लोकांना साफ नाकारलं..मतांचा विचार केला तर या निवडणुकीत मनसेला अवघी दीड टक्का मतं मिळालीत....राज ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी आपवर टीका करताना महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याची वल्गना केली होती...पण मतदानाच्या टक्केवारीतही आपनच मनसेला मागे टाकलंय...केजरीवालांच्या आपला महाराष्ट्रात 2.3 टक्के मतं मिळालीत. मनसेला सत्ता द्या, महाराष्ट्राताला सुतासारखा सरळ करून दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनाच मतदाराजांनी त्यांची जागा दाखवून दिलीय.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातही तरुणवर्गाला एक मोठं स्वप्न दाखवलं होतं..राज्यात एक नवा पर्याय त्यांनी उभा केला होता..राज ठाकरेंवर विश्वास दाखवत लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.. मीडियानंही राज ठाकरेंना भरपूर फुटेज दिलं..लाखा-लाखांच्या सभा झाल्या...यातूनच नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली...कल्याण डोंबिवलीत मनसेनं मोठी मुसंडी मारली...तर पुण्यातही २९ नगरसेवक निवडून दिले....पण त्यानंतर मनसेचा आलेख खाली आला..राज ठाकरे फक्त भाषणबाजीच करतात.. प्रत्यक्षात काहीही करत नाहीत असा लोकांना प्रत्यय आला..त्यातच मोदींची लाट आली आणि या लाटेत मनसेही साफ धुवून गेली..आता विधानसभा निवडणुकीत लोकांनी जर राज ठाकरेंना नाकारलं तर मात्र त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात जाईल...   

Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...
  
 
 
 
 
 

Tuesday, February 4, 2014

राष्ट्रवादीसाठी ‘करा किंवा मरा’ची लढाई


लोकसभेच्या 2014 च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठ्या आव्हानात्मक आहेत. 1999 साली स्थापन केलेल्या या पक्षाची ओळखच मुळात महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष अशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाची ताकद जास्त आहे. इतर भागात अजून पक्ष विस्तारलेला नाही..मागच्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि दिल्लीत सत्तेत आहे. या पक्षाकडे राज्यातील महत्वाची मंत्रिपदं आहेत. असं असतानाही या पक्षाचा महाराष्ट्रात फारसा विस्तार झालेला नाही.
2012-13 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाला एवढीच काय ती  कामगिरी..पण विधानसभा आणि लोकसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती वाढली याचा पक्षानं विचार करायला हवा.
साखर लॉबी आणि पश्चिम महाराष्ट्र
शरद पवार यांचं नेतृत्व, साखर लॉबी आणि मराठा समाजाचा पाठिंबा या जोरावर या पक्षाची वाटचाल सुरू आहे. पण त्यात त्यांना सत्ता असूनही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचण्यात यश आलेलं नाही. विधानसभेच्या 100 जागाही या पक्षाला आत्तापर्यंत जिंकता आलेल्या नाहीत, लोकसभेची गोष्टही तिच..राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 22 जागा लढवते पण 10 जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत.. त्यामानानं शिवसेनेची लोकसभेतली कामगिरी चांगली आहे..शरद पवार यांनी लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून बारगेनिंग पॉवर वाढवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. यावर्षीही 22 जागांपैकी 15-16 जागा जिंकण्याचा पवारसाहेबांचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा इरादा आहे.पण एवढं करुनही त्यांना अपेक्षित य मिळेल असं वाटत नाही.

भ्रष्टाचाराचा कलंक आणि सुमार कामगिरी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्यातच मागच्या तीन वर्षात मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणलय. जलसंपदा विभागातला घोटाळा असो की शिखर बँकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय..राष्ट्रवादीचा इंटरेस्ट असलेल्या अनेक प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावले..तर दुसरीकडे साखर सम्राटांना दणका देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलनं केली. या आंदोलनाच्या दणक्यानं अनेक साखर कारखानदारांची झोप उडवली. थेट बारामतीतच उपोषण करून राजू शेट्टी यांनी ते यशस्वी करुन दाखवलं. ऊसाला 3 हजारांचा भाव द्यावा म्हणून शेट्टींनी खूप जोर लावला..तो आता 2250 पर्यंत देण्याचं कारखान्यांनी मान्य केलय..पण साखर सम्राटांना शेट्टींनी मात्र एकप्रकारे सुरुंगच लावला.. 
नव्या नेतृत्वाचा काय उपयोग ?
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुस-या फळीचं नेतृत्व अजित पवार करत आहेत. पण त्यांची महत्वाकांक्षा पाहाता थोरलेसाहेब सगळी सुत्रं त्यांच्या हातात देण्यास अजूनही तयार नाहीत..राजीनामानाट्यावेळी सर्व आमदार आपल्या पाठीमागे आहेत असं दादांना वाटलं पण थोरल्यासाहेबांनी डोळे वटारताच सर्व आमदार शांत बसले. यातच मोठ्या साहेबांची पक्षावर आजही किती मजबूत पकड आहे हे स्पष्ट दिसतय. अजितदादांना पक्षातले ज्येष्ठ नेतेच विरोध करत आहेत. तर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पुढं करण्यासाठी युवती मेळावा, लेक वाचवा अभियान आखण्यात आलं पण नेतृत्व म्हणून काही त्या चमक दाखवू शकल्या नाहीत..

शरद पवारांचा कस लागणार
मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी, काँग्रेसमधलं राहुल गांधींचं वाढतं महत्व, महायुतीची एकजूट, राजू शेट्टींचं आंदोलन आणि आपल्याच पक्षातील भ्रष्ट मंत्री अशी प्रतिमा हे राष्ट्रवादीला मारक ठरणार आहेत. माढ्याची हक्काची जागाही यावेळी राखता येईलं का हा प्रश्नही आहेच..पवारांसारख्या अनुभवी नेत्याकडे वर्षानुवर्षांची सत्ता, नेत्यांची मोठी फळी असूनही त्यांचं गणित कुठं चुकतं हे पवासाहेबांना कळालं नसेल असं वाटत नाही.. तरिही यावर्षी पुन्हा जोर देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे.. पण मतदारराजा पवारसाहेबांच्या पारड्यात किती कौल देतो आजच स्पष्ट आहे..

Tuesday, January 21, 2014

मनसेची वाट बिकट




महाराष्ट्रात आम्ही आहोत बाप कशाला पाहिजे आप...असं राज ठाकरेंनी नाशिकमध्ये ठणकावलं.. पण राज ठाकरेंना महाराष्ट्रानं अजून तरी बाप म्हणून स्विकारालेलं नाही..मागच्या विधानसभा निवडणुकीत जरी 13 आमदार, नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी ते कोणत्याचं अर्थानं बाप ठरलेले नाहीत..मनसेनं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते दिवे लावले म्हणून त्यांना लोकांनी बाप म्हणून स्विकारावं याचं उत्तरही राज ठाकरे देऊ शकणार नाहीत. 2009 च्या निवडणुकीत ज्या आशेनं तरुणवर्ग राज ठाकरे यांच्यामागे गेला. त्यांचा आता भ्रमनिरास झाल्याचं दिसतय. पण दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या उदयानंतर देशातलं राजकारण बदलय. त्याचा विचार मनसेला करावा लागणाराय..

 

ब्ल्यू प्रिंट कुठे आहे?

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करुन वाटचाल करण्याची गर्जना शिवाजी पार्कवर केली होती. माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा सर्वांना कसं सरळ करतो. असं ते नेहमी म्हणतात. 13 आमदार आल्यानंतर विरोधी पक्ष काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असं ते म्हणत...पण नाशिक महापालिकेची सत्ता ,पुणे, कल्याण डोंबिवली महापालिका असो वा विधानसभा, मनसेनं लक्षात राहिलं असं काही केल्याचं दिसत नाही...

ना आंदोलन, ना कार्यकर्त्यांना कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या पक्षानं गेल्या पाच वर्षात लोकांच्या प्रश्नांसाठी कोणतं आंदोलन केले वा कोणता प्रश्न तडीस लावला हे त्यांनाही आठवत नसेल. फक्त उत्तर भारतीयांच्या नावावर कुठेतरी धिंगाणा घालणं यापलीकडे त्यांनी फारसं काही केलेलं नाही...त्यातच ज्या अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती त्याच बचच्न यांना मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..तर टोल नाक्याच्या प्रश्नावर केलेलं आंदोलनही दोन दिवसातच मागं पडलं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर वातावरण तापल्यानंतर एका मोर्चात दस्तुखुद्द राज ठाकरे अवतरले पण काही अंतर चालत जाऊन ते पुन्हा परत गेले. खरं तर टोलविरोधी आंदोलन जर त्यांनी तडीस नेलं असतं तर मनसेची लोकप्रियता आणखी वाढली असती. पण माशी कुठं शिंकली माहित नाही. पुन्हा त्यावर मनसेचा आवाज निघालाच नाही.

मुंबईत काय केले ?

मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न नेहमीच गाजतो पण एखाद्या कॉँट्रॅक्टरच्या थोबाडीत मारण्यापलिकडे  त्यांनी काही केलं नाही. फक्त खळ्ळ खट्ट्याक एवढेच आवाज काढण्याचं काम करायचं आणि तो विषय तिथंच सोडून द्यायचा हाच उद्योग मनसेनं केला. ज्या मुंबई, नाशिक, पुणे पट्ट्यात मनसेला चांगलं यश मिळालं तिथं तरी त्यांची कामगिरी काय..लक्षात राहिलं असं त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांनाही देता येणार नाही. पुणे महापालिकेत मनसेचे चांगले 26-27 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये मनसेचा महापौर आहे. खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे असं असनूही त्यांचे नगरसवेक कामात छाप पाडू शकले नाहीत. कल्याण डोंबिवलीतही मनसेला चांगल्या जागा आहेत. पण तिथंही प्रभावी विरोधीपक्ष म्हणून त्यांनी छाप पाडलेली नाही...

मनसेचा विस्तार कुठे झाला ?

महाराष्ट्राच्या इतर भागात मनसेची स्थिती फारसी चागंली नाही. मनसेचं संघटनही ग्रामिण भागात पोहचलेलं नाही. शेतक-यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आवाज उठवला नाही..विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचा विषय कधी लावून धरला नाही. दुष्काळावरही फारसं काही केलं नाही. अशा स्थितीत कधीतरी टीव्हीवर येऊन काही भूमिका मांडणं आणि जाहीर सभा घेऊन पक्ष कसा वाढणार..त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. त्यांना काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे. तो देण्यात मनसे कमी पडली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता देण्याची भाषा करण्याअगोदर राज ठाकरे यांनी स्वतःची कार्यपद्धती बदलली पाहिजे तरच त्यांना चांगलं यश येईलं अन्यथा एक होता मनसे असचं म्हणावं लागेल....