Friday, September 21, 2012

टीम अण्णा अखेर फुटली..


 " जनलोकपालच्या मुद्यावर एकत्र आलेले अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात फुट पडलीय. यापुढे केजरीवाल आणि अण्णांचे रस्ते वेगळे असणार आहेत. ही टीम का फुटली, त्याला कारण काय, कोण जबाबदार आहे टीम फुटण्याला, याचा अन्वयार्थ लावणारा हा लेख...



 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यापासून फारकत घेतली. मागच्या दीड दोन वर्षापासून सुरु झालेल्या टीम अण्णांचे दोन तुकडे पडलेत. एका तुकड्यात केजरीवाल आणि प्रशांत भूषण आहेत तर दुसरीकडे अण्णा, किरण बेदी वगैरे मंडळी आहेत. लोकपलाच्या मुदद्यावर एकत्र आलेल्या या टीमला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावरुन या टीममध्ये फूट पडली. केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढून ताकद दाखवण्याची खुमखुमी आली होती, त्याला अण्णांचा अर्थातच विरोध होता. पण जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून केजरीवाल यांनी त्यांचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा वापर करुन आपला फायदा करुन घेण्याचा केजरीवाल यांचा उद्देश होता. पण अण्णांनी त्याला छेद देत आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दाखवून दिलं...

अण्णा हजारे यांनी स्वतःच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर टीम अण्णा फुटल्याचं जाहीर केलं. तसं करताना त्यांनी केजरीवाल आणि कंपनीला निवडणुकीत आपला फोटो किंवा नाव न वापरण्याचा इशाराही दिला. पण हा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच टीम फुटणार हे जाणवत होतं. राजकीय पर्यायाला किरण बेदी, संतोष हेगडे यांचाही विरोध होताच पण उपोषण सोडताना अण्णांना तसा पर्याय देण्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्याचवेळी अण्णांचा त्याला विरोध आहे अशीही माहिती मिळाली होती. शेवटी अण्णांनी केजरीवाल यांना त्यांची जागा दाखवली. त्यामुळे केजरीवाल यांच्या आशेवर पाणी पडलंय
 

दीड वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालचा झेंडा हाती घेऊन दिल्ली हादरवून सोडली होती. दिल्लीतल्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रसिद्धी माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी पाहून सरकारलाही सुरुवातीला चार पावलं मागं हटावं लागलं होतं. पण उपोषणाचं हत्यार मागच्या दीड वर्षात वारंवार वापरून अण्णांनी त्याची धार बोधट केली. शिवाय उठसुठ राजकीय नेत्यांना शिव्या देण्याचा सपाटाही त्यांच्या सहाकाऱ्यांनी लावला. कोणत्याही मुद्द्यावर हेकेखोर आणि हटवादी भूमिका घेण्यामुळेही लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला. दिल्लीत मिळालेला सुरुवातीचा प्रतिसादही नंतर मिळत नव्हता. त्यामुळे गर्दी नाही तर दर्दी लोकांची गरज असल्याचा आवही त्यांना आणावा लागला. तर दुसरीकडं सरकारनंही त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अण्णांना त्यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला..केजरीवाल यांच्या बेछुट आरोप करण्याच्या वृत्तीमुळेही लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यातच टीममध्येच अनेकदा मतभेद असल्याचं समोर येत होते. शेवटी राजकीय पर्यायाच्या मुद्दयावर ही टीम फुटली..

अण्णा हजारेंचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आजपर्यंत अनेक नामांकित लोकांनी त्यांनी साथ दिली पण ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. बाबा आढाव, गो. रा. खैरनार, मेधा पाटकर, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी अण्णांना भ्रष्टाचार विरोधी लढ्यात साथ दिली पण काही काळानंतर त्यांनीही अण्णापासून दूर राहण पसंत केलं. याला अण्णांचा हट्टी स्वभावही कारणीभूत असल्याचं बाबा आढाव सारख्या जाणत्या व्यक्तीनं म्हटलय. तर अण्णा हे फक्त ढोंगी आहेत असं खैरनार यांनी म्हटलय. तर अण्णांच्या कोणत्याच भूमिकेवर ठाम न राहण्याच्या सवयीमुळेही अनेक सहका-यांनी त्यांची साथ सोडली. अण्णांच्या सहकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. पण त्याबाबत अण्णा फारसं बोललेलं दिसत नाहीत. तर दुसरीकडं अण्णा हे भाजप आणि संघ परिवाराचे समर्थक आहेत, त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही होत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईलं. कारण काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आगपाखड करताना भाजपच्या भ्रष्टाचारावर गप्प बसण्यातूनही या आरोपांना पुष्टीचं मिळते. तर दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही अण्णांच्या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असं म्हटलय. त्यामुळे कुठेतरी अण्णा आणि संघ यांच्यात जवळीक असल्याची शंका येतेच.

अण्णांनी आता केजरीवाल यांना दूर करुन रामदेव बाबा यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यामुळे अण्णांचे यापुढेचे साथीदार रामदेव बाबा असतील. त्यांच्याबरोबर अण्णा किती दिवस साथ देणार हे लवकरच कळेल..

Saturday, September 1, 2012

राज ठाकरेंचा वाद बिहारी

" राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बिहारींचा मुद्दा उचलून धरलाय. बिहारच्या मुख्य सचिवांच्या एका पत्रावरुन हा वाद सुरु झालाय.. त्यातून सगळे बिहारी नेते उंच आवाजात राज ठाकरेंना देशद्रोही ठरवा असं म्हणत आहेत. त्यात तेल ओतन्याचं काम उत्तर भारतातील मिडीयानं केलय..

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण हलवून टाकलय. मुद्दा होता बिहारींचा..बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्राचा मुद्दा करत राज ठाकरेंनी बिहारींना राज्यातून हाकलून लावू असा इशारा दिला..राज ठाकरेंनी बिहारविषयी काही बोलताच बिहारी नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल...शिवानंद तिवारी, लालू प्रसाद यादव, शरद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, यांनी तर राज ठाकरेंवर तोफ डागलीच, पण काँग्रेसचे वाचाळ सरचिटणीस दिग्वीजयसिंगही त्यात पडले..ठाकरेंचं मुळ बिहारमध्ये होतं. ते मध्यप्रदेश मार्गे मुंबईत गेले असा जावई शोध त्यांनी लावला..त्यातच त्यांनी राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलय असं म्हटलं. तर केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी केलीय..दिल्लीतल्या बिहारच्या झाडून सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. राज्य घटनेचा हवाला देऊन कोणीही कुठही जाऊ येवू शकतो याची आठवण करुन दिली..पण हे सगळेच नेते राज ठाकरेंवर तुडुन पडत असताना त्यांच्या एवढंही लक्षात आलं नाही की याचा थेट फायदा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेलाच होणाराय. राज ठाकरेंनी मुंबईतून एकच इशारा दिला आणि या इशा-यानं पाटणा मार्गे दिल्ली हलवली...

दिल्ली आणि पाटण्यात हे राजकारण तापलं असताना मुंबईतही राजकीय नेते कामाला लागलेच..म्हणजे राज ठाकरेंनी एकाच इशाऱ्यात अनेकांना कामाला लावलं..राज ठाकरे काही बोलले आणि त्यावर अबु आझमी आणि संजय निरुपम बोलणार नाहीत असं कसं होईलं..त्यांनीही मग कॅमेऱ्यासमोर येऊन आव्हान प्रतिआव्हानाची भाषा केली..फरक एवढाच होता की यावेळी संजय निरुपम यांची भाषा बऱ्यापैकी सौम्य होती..कारण त्यांनी यापूर्वी राज ठाकरेंवर आगपाखड केली होती त्यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठीकडून तंबी देण्यात आली होती. ते लक्षात ठेऊनच निरुपम यांनी प्रतिक्रीया दिली..पण अबु आझमी मात्र आपल्या स्टाईलमध्ये मैदानात उतरलेच...जाता जाता आर. आर. पाटीलही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई करु असं सांगून गेले...यात उत्तर भारतातील प्रसारमाध्यमांनीही तेल ओतन्याचं काम केलय हेही नाकारुन चालणार नाही..राज ठाकरे मराठीचा मुद्दा जेव्हा उचलतात किंवा बिहारीचा मुद्दा उचलतात तेव्हा उत्तर भारतातील प्रसार माध्यमं राज ठाकरेंना व्हिलन ठरवतात..

राज ठाकरेंच्या या सर्व प्रकरणात काँग्रेस त्यांना छुपी साथ देत आहे असं म्हटलं जातय..कारण वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मोकळं रान दिलं होतं असं म्हटलं जातय. मुंबईत त्यावेळी डाव्यांचा जोर होता. त्यांना मोडीत काढण्यासाठी नाईकांनी बाळासाहेबांना मोकळीक दिली होती असं म्हटलं जातय..तोच पत्ता काँग्रेस आज राज ठाकरेंच्या रुपानं वापरत असल्याचं बोललं जातय. शिवसेना जशी काँग्रेसच्या शिडीवरुन वाढत गेली. तसच मनसेलाही काँग्रेसकडून मिळणाऱ्या या मोकळीकचा फायदा होणारच आहे..तर दुसरीकडं २०१४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही तयारी सुरु झालीय असंही म्हणायला हरकत नाही..तर अबु आझमी आणि राज ठाकरे यांनाही त्याचं राजकीय मायलेज मिळणारच आहे..राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देशद्रोही ठरवा असा आवाज या बिहारी नेत्यांनी उठवलाय तसच त्यांच्यावर भाषण बंदी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

राज ठाकरे यांना टायमिंगही चांगलंच जमतय..त्यांनी एखादा मुद्दा उचलून धरावा आणि त्याचा त्यांना फायदा झाला नाही असं घडलेलं नाही..तसच एखादा विषय किती ताणावा हेही त्यांना चांगलच कळतं. म्हणूनच तर त्यांचा पक्ष राज्यात जोरात वाढतोय..मुंबई, नवी मंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेचा जोर धडाक्यात वाढलाय. याच पट्ट्यात विधानसभेच्या १०० च्या वर जागा आहेत. मनसेच्या या राजकीय वाढीची सर्वच पक्षांनी दखल घेतलीय. शिवसेना भाजप युतीत आठवले जाऊन बसले असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही..म्हणूनच राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा विचार सुरु झालाय. भाजपाकडून तरी त्यावर हालचाली सुरु असल्याचं दिसतय..तर दुसरीकडं शरद पवार यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची घौडदौड वेगानं होत असल्याचं मान्य केलय..२०१४ च्या निवडणुकीत जर मनसेचा हा विजयपथ असाच कायम राहिला तर ते किंगमेकर होणार हे नक्की.. त्यासाठीच तर हा सगळा वाद सुरुय असंच आतातरी म्हणावं लागेल..
 

Saturday, August 25, 2012

राज ठाकरेंचा झंझावात


महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी 21 तारखेला जो मोर्चा काढला त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र ढवळून निघालाय. 11 ऑक्टोबरला आझाद मैदानावर ज्या काही मुस्लीम संघटनांनी नंगानाच केला. पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, गाड्या जाळल्या, प्रसार माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. एवढ्यावरच्या हे आंदोलक थांबले नाहीत तर तिथं असणाऱ्या अमर जवान ज्योतीला लाथेनं उडवून लावलं.. हा सगळा धुडगुस घातला तेव्हा मुंबई पोलीस तो उघड्या डोळ्यांनी पहात होते. खरं तर हा मोर्चा ज्या रझा अकादमीनं आयोजित केला होता त्यांची पार्श्वभूमी सरकारला माहित होती. हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग आहे हे पोलिसांना माहित होतं. त्यांच्या मोर्चाला मुळातच परवानगी द्यावयास नको होती, पण ती दिली. त्यावरही कहर म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल होता की आंदोलक मंडळी हिंसक कारवाया करणार आहे, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावरुन राज्यात असंतोष माजला. लोकांच्या मनात चिड निर्माण झाली. कारण एवढा सगळा नंगानाच घातल्यानंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र सरकार शांत राहिलं. बघु करु अशी भूमिका घेतली गेली, त्यावरुन लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. राजकीय पक्षांनीही कारवाईची मागणी केली..पण सरकार आणि गृहमंत्री आर आर पाटील मात्र कारवाईच्या बाबतीत थंडच राहिले..या सर्व प्रकारावर आर आर पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची भूमिका संशयास्पद राहिलीय..

रझा अकादमीनं घातलेला हिंसक गोंधळ, त्यात पोलिसांवर हल्ला, अमर जवान ज्योतीचा अपमान हे अवढं सगळं होऊनही आर आर पाटील कारवाई करण्याएवजी विरोधकांनाच दोष देत राहिले.. राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन आर आर पाटील आणि पटनायक यांच्यावर थेट हल्लाबोल केला..राजीनामा द्या ह्या मागणीसाठी त्यांनी 21 तारखेला मोर्चा काढला...ह्या मोर्चाला मात्र पोलिसांनी कायद्याचा किस पाडत परवानगी नाकारली. पुन्हा अल्पसंख्याक समाजाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं.फक्त आझाद मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी जवळपास 15 हजार पोलिस बंदोबस्ताला ठेवले..म्हणजे 11 तारखेला जी खबरदारी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही मात्र मनसेच्या मोर्चात अडथळे आणण्यासाठी एकही संधी सोडली नाही. यावरुनही लोकांच्या रागाचा पारा चढला होता. पोलीसांच्या परवानगीची वाट न पाहता राज ठाकरेंनी मोर्चा काढला. त्यांनी सरकारला शिंगावरच घेतलं..तो मोर्चा आणि सभेची गर्दी पाहून राजकीय पक्ष अचंबितच झाले. एक लाख लोकांचा मोर्चा आणि सभा घेऊन राज ठाकरेंनी मोर्चा कसा काढावा हेच दाखवून दिलं. या सभेतून आणि मोर्चातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आझाद मैदानावरच्या सभेत अवघ्या 15 मिनीटाच्या भाषणात त्यांनी आर आर पाटील, अरुप पटनायक ह्यांच्यावर हल्ला तर चढवलाच पण त्यांचं लाडकं पेटंट अबु आझमीलाही त्यांनी शिव्या घातल्या. रामदास आठवलेंसह सर्वच दलित नेत्यांनाही त्यांनी झोडपून काढलं..तर दुसरीकडं पोलिसांची बाजू पूर्णपणे उचलून धरली, प्रसारमाध्यमांची बाजू घेतली, सर्व विरोधी पक्षांवर कडी केली आणि सरकारला जो विरोध केला पाहिजे तो कसा करावा हे दाखवून दिलं..मुस्लीम समाजकंटांवर हल्ला चढवत आपला मोर्चाही हळूहळ हिंदुत्ववादी नेता अशी करुन दिली..आपला धर्म हा महाराष्ट्र धर्म म्हणत त्यांनी जरी हिंदुत्वाची वाट धरल्याचं सरळ सरळ मान्य नाही केलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा पट मांडला तो हिंदुत्ववाद्यांना तर नक्कीच भावलाय..

राज ठाकरेंनी ह्या मोर्चातून अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांनाच टार्गेट केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली..त्यांना महासंचालकपदी बढती दिली असली तरी मुंबईचं आयुक्तपद गेलंच..आता लक्ष्य फक्त आर आर पाटील..कदाचित येत्या काही दिवसात हे प्रकरण थोडं शांत झाल्यानंतर आर आर पाटलांचाही राजीनामा किंवा खातेबदल झाल्यास नवल वाटायला नको..एक मात्र खरं राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली..मीच सरकारला अंगावर घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. लाखाचा मोर्चा काढून इतर विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, भाजपलाही त्यांनी त्यांची ताकद किती आहे हे दाखवून दिलं.. 2014 च्या निवडणुकींची ही सुरुवात आहे. आपला रस्ता काय आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलय. पोलीसांमध्ये सहानुभूती निर्माण करुन, प्रसार माध्यमांनाही त्यांनी आपण तुमचे तारणहार आहोत हे जसं त्यांनी दाखवून दिलं. तसच अबु आझामी, दलित नेत्यांना टार्गेट करत अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे या अन्यथा तुमची गरज नाही हेही दाखवून दिलं. मुस्लीम आणि अबु आझमींना दणका देत हिंदुत्ववाद्यांनाही त्यांनी चुचकारलंय अर्थात त्यामुळे संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या मनात राज ठाकरेंनी घर केलंय. ह्या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत मनसेला होणार हे नक्की..फक्त हा राजकीय सारीपाट राज ठाकरे पुढच्या काही महिन्यात कसा रंगवतात त्यावर त्यांची राजकीय भिस्त असणाराय. पण त्यांनी आता टाकलेले फासे जर असेच पडले तर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र आत्ताच पक्कं झालय.

Sunday, August 19, 2012

विलासराव देशमुख- एक उमदं नेतृत्व हरपलं..

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं १४ ऑगस्टला चेन्नईत ग्लोबल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना ह्रदय विकाराचा झटका येऊन निधन झालं..विलासरावांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याअगोदर विलासराव देशमुख यांच्यावर पंधरा दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्यांना तातडीनं चेन्नईला हलवण्यात आलं.. विलासराव देशमुख यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. तसच त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब झाल्या होत्या. विलासराव देशमुख यांना व्हँटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण झालं होतं. त्यांच्यावर यकृतरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण शेवटी १४ तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली... 
विलासराव देशमुखांचे निधन

विलासराव देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरु होती. पण त्यांचा आजार एवढा गंभीर असेल असं वाटलं नव्हतं..त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात खरचं पोकळी निर्माण झालीय. विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईकांनंतर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवलय. दोन टर्ममध्ये त्यांनी राज्याचं नेतृत्व केलय. नेहमी हसतमुख चेहरा, मिश्किल स्वभाव, फरडा वक्ता आणि कार्यकर्त्यांशी जोडलेला नेता अशी त्यांची ख्याती होती...
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री हा सर्वच प्रवास विलासराव दगडोजी देशमुख यांनी एका देशमुखी ऐटीत आणि दिमाखात केला. ही कारकीर्द सरळ एका रेषेत कधीच नव्हती. पण विलासराव मात्र सदैवच दिलखुलास राहिले.
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. नंतर युवक काँग्रेसच्या राजकारणातून त्यांची खूप झपाट्याने प्रगती झाली. तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पंचायत समितीचा उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली होती. तेव्हा ते कधी सायकलवर तर कधी एसटीनंही प्रवास करुन कार्यकर्त्यांची कामं करत.. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

देशमुख यांची दोस्तीही खूपच गाजली..सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना तर राजकारणात दो हंसो का जोडा असं म्हटलं जायचं..विलासराव देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती लोकसभेत देताना सुशीलकुमार शिंदे यांनाही गहिरवरुन आलं होतं. स्वतः शिंदेसाहेबांनी एक हंस सोडून गेला अशी प्रतिक्रीया दिल.. तर गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते असूनही त्यांच्याशी विलासराव देशमुख यांची खास दोस्ती होती. गोपीनाथ मुंडे यांची आणि त्यांची दोस्ती पुण्यापासूनची. त्यांची कारकीर्दही समांतरच. मुंडेंनी विलासरावांच्या लगतच्या मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली ती १९८० साली.. दोघेही एकदा एकदा पराभूत झालेत. त्यानंतर दोघेही दिल्लीच्या राजकारणात गेले.. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
मराहाष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे विलासराव देशमुख हे आवडते शिष्य होते. दोघेही मराठवाड्याचे तर होतेच पण शरद पवार यांना असलेला विरोध हेही त्यांचं समान सूत्र होतं. ते शेवटपर्यंत कायम राहिलं. शरद पवार यांना रोखू शकणारा आणि महाराष्ट्रव्यापी प्रभाव असलेला सध्याचा एकमेव नेता म्हणजे विलासरावच होते. त्यामुळेच स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन होऊन पहिलं आघाडीचं सरकार चालवण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विलासरावांकडेच नेतृत्व दिलं. १३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.
विलासराव देशमुख हे निव्वळ राजकारणी नव्हते. वडिल दगडोजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या उत्तम जाणकारीचा वारसा त्यांना लाभला होता. मराठी पुस्तकं असोत की नाटकं त्यांचे ते उत्तम भोक्ते रसिक होते. त्यांचं लावणीचं प्रेमही असंच रसिक होतं. त्यामुळे सर्वच कलाकाऱांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुरंगी आणि बहुश्रुत व्यक्तिमत्वामुळे त्यांचं वक्तृत्व हेही प्रसन्न आणि उमदं होतं. त्यामुळेच ते मुख्यमंत्री असताना काही नाराज आमदार त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत असल्याबद्दल त्यांना कधी विचारलं तर ते सहजपणे सांगत की, पूर्वी मी नुसता मंत्री असताना हेच करायचो. त्यामुळे आता नवीन लोक ते करीत असतील तर त्यात काही विशेष नाही.
१९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या गेल्या दहा वर्षांतल्या कारकीर्दीचा आलेखही असाच वरखाली होत राहिला. गेल्या पाच वर्षात मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप, दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानं ठोठावलेला दंड, आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय, सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयानं ओढलेले कडक ताशेरे यामुळे त्यांची कारकीर्द झाकोळली गेली. पण तरीही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी काँग्रेसला मुंबईतून जी भक्कम राजकीय आणि आर्थिक रसद मिळवून दिली त्याची पोचपावती म्हणून ते पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर केले नाही.
विलासराव आजारी असल्याचं राजकीय वर्तुळात सर्वांना ठाऊक होतं. पण हे आजारपण इतकं गंभीर होईल आणि ६७ व्या वर्षी एका चतुरस्त्र नेत्याचा अंत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं...विलासराव देशमुख एवढे मोठे नेते होते की त्यांच्या अंत्ययात्रेला बाभळगाव या गावात दहा लाखांचा जनसागर लोटला होता. पंतप्रधान, सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह व्हीव्हीआयपींचीच संख्या शेकडयांच्याही वर होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तर दोन किलोमिटर चालत जावं लागलं तर इतर व्ही आयपींनाही मोटारी सोडून पायी चालतच जावं लागलं..लातूरला १५ तारखेला ५४ विमानं आली होती. यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.. त्यांच्या जाण्यानं सामान्य कार्यकत्यालाही आपला नेता गेला असच वाटत होतं..
लातूर पोरके झाले

Friday, July 27, 2012

शरद पवारांच्या नाराजीचे कारण..



राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आठवड्यात राजकारण तापवलं..पहिल्यांदा त्यांनी कॅबिनेटला दांडी मारुन आपली नाराजी व्यक्त केली..कारण काय तर म्हणे प्रणव मुखर्जी यांच्या नंतर मंत्रिमंडळात ज्येष्ठ आपणनच असताना ए. के अँटोनी यांना दोन नंबरची जागा कशी काय दिली..त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा पवारसाहेब युपीएच्या बैठकीला गेले नाहीत..त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेलही गेले नाहीत..त्यावेळी हे सर्वजन पवारांच्या दिल्लीतल्या घरीच होते आणि माध्यमातून त्यांनी युपीए  सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली..त्याच दिवशी पटेलांनी पत्रकारांना सांगितले की पवारसाहेब नंबरगेमवरुन नाराज नाहीत तर युपीए सरकार असताना काँग्रेस मात्र घटक पक्षांना विचारात न घेताच सर्व निर्णय घेतं, ते आपल्याला मान्य नाही..वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू..पण आमचा पाठिंबा सरकारला राहिलच...हे सांगताना पटेलसाहेबांनी महाराष्ट्रातील आघाडीचा उल्लेखही आवर्जून केला..आणि दिल्लीतला नाराजीचा सूर मग मुंबईत निघाला..राष्ट्रपती पदाची मतमोजणी सुरु असताना पवारांनी काँग्रेसवर हा दबावाचा डाव टाकला..त्यानंतर  राष्ट्रवादीची मुंबईत बैठक घेऊन राज्यातलंही सरकार काही व्यवस्थित चालत नाही असा सूर पवारांच्या साक्षीनंच लावला गेला...वेळ पडली तर राज्य मंत्रिमंडळातूनही बाहेर पडू अशी इशारा वजा धमकी देऊन टाकली...पवारांनी एकाच वेळी दिल्ली आणि मुंबईतून इशारा देऊन काँग्रेसला बुधवारची डेडलाईनही दिली...
गाठ माझ्याशी आहे

पवारांच्या या नव्या गुगलीमुळे काँग्रेस आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पवारांचं महत्व मोठं आहे हे सांगितलं..त्यावेळी पवार सोनिया गांधी आणि पंतप्रधान ह्यांना भेटलेही..पण नाराजी काय दूर झाली नाही.. हे सर्व झाल्यानंतर शेवटी बुधवारी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याबरोबर पवारसाहेबांची बंद दरवाज्याआड खलबतं झाली..अर्थात समन्वय समिती स्थापन करुन दर महिन्याला त्याची बैठक घेतली जाईलं हे जाहीर करुन आम्ही आता समाधानी आहोत, तिढा सुटलेला आहे हे दोन्ही बाजूनी सांगण्यात आलं..हे एवढं रामायण पवारसाहेबांनी फक्त एका समन्वय समितीसाठी केलं असेल असं वाटत नाही..अगदी पवारांना जवळून ओळणाऱ्यांनाही हे काही पटलं नाही.. याचाच अर्थ पवार मांगे समथिंग मोअर..असाच आहे..कारण पवारसाहेबांसारखा जाणता राजा एखाद्या फुटकळ समितीसाठी असा नाराज होऊन बसणारा नेता नाही...त्यामुळे पवारांच्या नाराजीमागं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु झालाय....
शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली त्यामागं एक कारण होतं...तारिक अन्वर यांना राज्यसभेचा उपसभापती करण्याची मागणी..पण काँग्रेसनंही त्यांची दखल घेतली नाही..तर पवारांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात..राज्यपाल नियुक्त्या, विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना काँग्रेसनं घटक पक्षांना विचारात घ्यावं अशी मागणी केल्याचं कळतय..हे सगळं ठिक आहे.. पण त्यासाठी अचानक नाराजी आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देण्याची गरज नव्हती...नाहीतर पवारसाहेब म्हणजे काही ममता बॅनर्जी नाहीत उठसुठं काहीही मागणी करायची आणि धमक्या इशारे द्यायचे..त्यातच पवारांचे फक्त 9 खासदार आहेत..एवढ्या छोट्या ताकदीवर पवारसाहेब मोठं धाडस करत नाहीत...मग पवारसाहेबांची नाराजी कशात आहे...
मॅडम, काय हे ?
पवारसाहेबांची नाराजी ज्यावेळी बाहेर आली.. त्याच्या दोन दिवस अगोदरच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आपण महत्वाची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं.. याचाच अर्थ 2014 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युवराजांना पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार.. प्रवण मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर सेवाज्येष्ठता डावलल्याचा पवारांना राग येऊ शकतो..त्यातच राज्यातले नेते सुशिलकुमार शिंदे यांना गृहमंत्री किंवा लोकसभेचा सभागृह नेता करण्याचा काँग्रेसचा विचार आहे..शिंदे हे पवारांना ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणंही पवारांना रुचणार नाही..तर दुसरीकडं युवराज सक्रिय झाल्यानंतर पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात विचारविनिमय वाढणार मगं आपली ज्येष्ठता धोक्यात येऊ शकते असाही एक विचार आहे...तर लवासासारख्या प्रकल्पाला केंद्रातील काँग्रेसचे मंत्रिच खोडा घालत आहेत हेही पवारांना रुचलेलं नाही..हे झालं दिल्लीतलं....
राज्यातही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीची गोची झालीय..महत्वाची सर्व खाती राष्ट्रवादी कडे आहेत तरीही निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री खूपच वेळ घेतात हा त्यांचा आक्षेप आहे..काँग्रेस पक्षातले अनेक आमदारही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णय न घेण्याच्या भूमिकेवर नाराज आहेत..तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जलसंपदा विभागाच्या मागे मुख्यमंत्री हात धूवून  लागलेत.. जलसंपदा विभागावर 70 हजार कोटी खर्च झाले पण सिंचन फक्त 1 टक्काही नाही यावरुन हा पैसा कुठं मुरला यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा मुख्यमंत्र्यांनी चंगच बांधलाय..तर मंत्रालयासह त्या परिसरात असलेले मंत्र्यांचे बंगले यांचा मेकओव्हर करण्याचा भुजबळांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे..त्यालाही मुख्यमंत्र्यांनी विरोध केलाय..हे सर्व होत असताना  पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केलीय..त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नको, त्यांना हाकला असाच सुर राष्ट्रवादीतून निघत आहे तर दुसरीकडं काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री चव्हाणांबदद्ल मोठी नाराजी आहे..तीसुद्धी बाहेर आलीच आहे.त्यातच आदर्श प्रकरणी काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणणित आहेत..या सर्व पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री हटाव हाच विचार असण्याची एक शक्यता आहे..तर राहुल गांधींच्या सक्रिय होण्याचाही दुसरा मुद्दा असू शकतो.. त्यामुळे पवारांनी वेळीच फासे टाकलेलं आहेत..बंद दरवाज्याआड काय चर्चा झाली हे समजणं सध्यातरी शक्य नसलं तरी पवारांनी टाकलेले फासे त्यांना फायद्याचे ठरतात, का काँग्रेस हेच फासे पवारांवर उलटवतात ह्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी तरी जाऊ द्यावा लागेल.त्यानंतर पवारसाहेबांच्या नाराजीमागं काय दडलंय हे होणाऱ्या राजकीय फेरबदलानंतर कळू शकेल..  

Monday, July 23, 2012

ये रे ये रे पावसा...


पाऊस म्हटलं की सर्वांच्या मनात कल्पनांचं मोहोळ उभं राहतं..विशेषतः एप्रिल - मे महिन्यात जेव्हा पारा 40 च्या वर जातो तेव्हा सर्वांनाच कधी एकदाचा हा ऊन्हाळा जातो आणि जून महिना उजाडतो असं वाटतं...जून महिना आला की मान्सून बरसेल आणि अंगाची लाही लाही करणारा ऊन्हाळा एकदाचा जाईलं म्हणून सर्व जण त्या पावसाकडे डोळे लावून बसतात.पाऊस सर्वांनाच हवा वाटतो..शहरी असो वा निमशहरी कडक उन्हापासून सुटका हवी असते सर्वांनाच... पाण्याची समस्या तर हल्ली सगळीकडेच आहेत. ती सुटावी म्हणून पावसाची वाट पाहिली जाते..तर शेतकरी शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी त्याची आतुरतेनं वाट पहात असतो..ज्या पावसाची सर्वच जण आतुरतेने वाट पहात असतात त्याच्या पाठीमागची सर्वाची कारणं आणि कल्पना वेगवेगळ्या असतात. पण पाऊस सर्वाना हवा असतो हे मात्र नक्की.. सर्वांना हवा हवासा वाटतो तो पाऊस हलक्या मध्यम रिमझीम सरींचा पाऊस.. सर्वांच्याच मनाला स्पर्श करुन जाणारा तो पाऊस....तर धो धो कोसळणारा पाऊस वेगळाच..हा पाऊस कधी रोमँटीक असतो तर कधी विध्वंसक ठरतो...ज्या पावसाची आपण आतुरतेनं वाट पहात असतो तो जर कोसळायला लागला तर सर्वांची पुरती वाट लावते..मग वाटते पुरे झालं आता....हल्ली तर शहरांची पुरती वाटच लावतो हा पाऊस...शहरातले रस्ते पण थोडासा पाऊस झाला तरी सापडत नाहीत..अनेक भागात पाणीच पाणी..रस्ताच सापडत नाही...तर घरं कोसळून जीवित हानी करतो तो वेगळच...त्यातून त्या पावसाची तीव्रता लक्षात येते आणि वाटतं..नको हा जीवघेणा पाऊस आता....आठवून पहा 26 जुलैची मुंबई...कीती भयानक असू शकतो पाऊस, त्याची शहरातल्या लोकांना आलेली ती मोठी प्रचिती असावी... हे झालं रौद्र रुपातल्या पावसाबद्दल...
..पण जो सर्वांना हवा हवा वाटतो तो हलका पाऊस पडायला लागला की सर्वाना आठवते गरमा गरम भज्जी आणि वाफाळलेला चहाचा कप....पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना.. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत बसून गरम भज्जी आणि वाफाळलेल्या चहाची लज्जत काही औरच....! त्याची मजा शहरातल्या आपल्या सर्वांनाचा हवी हवीशी वाटणारी आहे..आणि हा पाऊस जर रात्रीच्या वेळचा असेल तर...? हातात एक व्हिस्कीचा किंवा रमचा पेग, मंद हवा आणि हलका हलका पेग....व्वा क्या बात है.. ! साधनेला यापेक्षा आणखी कोणता माहौल चांगला असेल...! नुसती कल्पना जरी केली तरी अनेकांची विमानं  लगेच आकाशात झेपवतात.. असो, कल्पना छान आहे...!!! तर मुंबईच्या नरीमन पॉईंट किंवा तशाच काही स्पॉटवर रिमझीम पावसात भिजण्याची मजाही काही औरच नाही का...? आणि समजा कोणत्याही शहरातल्या काही विशिष्ट स्पॉटवर असा पाऊस पडताना एखादी मैत्रीण बरोबर असेल तर....! आठवा आठवा..!!! एका पावसात दोघांनी भिजण्याचा अनुभव काही धम्मालच नाही का... ? एकाच छोट्या छत्रीत न मावणारे दोघेजण...! आतून बाहेरुन ओलंचिंब झाल्याचा अनुभव येतो ना... ? मग छत्रीही नको वाटते...नकळत हातात हात घेऊन जुळलेल्या त्या रेशिमगाठी ...! अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे...

पावसातील मस्तीच्या मुड
आज कदाचित तसाच पाऊस पडत असताना त्या आठवणी जाग्या होतीलही...! असा हा रोमँटीक पाऊस कोणाला नको आहे...! काहींच्या मनाला भरती येऊन छान छान कविताही याच पावसात सुचतात...! पावसाची चाहूल जरी लागली तरी मोर जसा पिसारा फुलवून नाचायला लागतो... तशी सगळ्यांची मनं डोलायला लागतात....भूतकाळातल्या त्या आठवणी आठवल्या तर घरात किंवा ऑफीसात असतानाही नुसत्या आठवणींनीच ओलेचिंब भिजल्या सारखं होतं ना...!! आणि ज्यांची मनं आणि ह्रदय ह्याच पावसानं तोडली असतील... ते "बघ माझी आठवणं येते का..?"  म्हणत बसतील....कारण काहीही असो..पाऊस सर्वानाच हवा हवासा वाटतो...
रोमँटीक पाऊस...
..मनाला स्पर्शून जाणाऱ्या या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच...बच्चे कंपनींची मजा तर वेगळीच..! लहानपणी पावसात भिजताना किती धम्माल यायची..! पावसाच्या साचलेल्या पाण्यातून समोरच्याच्या अंगावर फुटबॉलची किक मारावी तशी त्या पाण्य़ात मारुन कसं भिजवलं..त्याची गम्मत काही न्यारीच ..!! पावसाच्या पाण्यात कागदीची नाव करुन सोडण्याचा मोह कोणाला झाला नसेल...? पावसात भिजणं , राडा करणं ( हा राडा शिवसेनेचा नाही बरं का..हा आपला लहानपणीचा राडा.. ) ही लहान मुलांची नैसर्गिक खोडकर वृत्ती.. त्यावेळी आई बाबा ओरडायचे.. पावसात भिजू नको..सर्दी होईलं...? तेव्हा कोणाचीच मम्मी "दाग अच्छे होते हैं "...असं म्हणत नव्हती....मात्र आई बाबाचं नाही ऐकलं तर मोठा धपाटा मात्र बसायचा.. ! किती आठवणी त्या पावसाच्या..!!! आमचं घर गावात होतं...थोडा मोठा पाऊस झाला की.. घराला गळती लागायची..रात्रीच्यावेळी तर खूपच राग यायचा त्या पावसाचा..घर सगळीकडूनच टप टप गळतय...झोपायलाही जागा नसायची..कुठं कुठं म्हणून भांडी ठेवून  गळतीचं पाणी थोपवायचं....त्यावेळी पावसाचा राग यायचा आणि आपल्या गळक्या घराचाही... पण पत्र्याच्या घरात जर पाऊस पडताना झोपलात तर त्याचा जो काही आवाज होतो ना तो मात्र वेगळीच धम्माल बरकं...अर्थात...घरात एकटेच असताना..लाईट गेलेली असेल तर मात्र कधी कधी त्याच पावसाच्या आवजाची भितीही वाटायची..असा हा पाऊस किती किती आठवाव्या त्याच्या आठवणी.....
पावसात मस्ती करणारी मुलं..
...पण यापेक्षा पावसाची सर्वात जास्त गरज ज्याला असते..जो पावसाच्या आशेनं आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो तो आमचा शेतकरी, हाच खऱा त्या पावसाचा हक्कदार आहे.. जमीन तापलेली आहे...प्यायला पाणी नाही..जनावराला चारा नाही...पेरणीचे दिवस आलेत..पण पावसाचा काही पत्ता नाही..बिच्चारा शेत नांगरुन पावसाची वाट पहात बसतो...पण कधी वेळेवर येईल तर तो पाऊस कसला..? जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरगाचा पाऊस पडल म्हणून तो आभाळाकडे डोळं लावून बसतो पण तो कसला येतोय..मृग गेला..दुसर नक्षत्र गेलं तरी पाऊस काही येत नाही..त्याची चिंता वाढतच जाते...आता तर पेरणी करा पावसाची वाट बघा..नाहीच आला तर दुबार पेरणीचं संकट आ वासून बसलेलंच..! जनावरं सांभाळणंही अवघड होऊन बसलय...वेळेवर पाऊस येत नाही म्हणून हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्याला चिंता असते आणि जेव्हा येतो तेव्हा ऊभ्या पिकाची वाट लावून जातो..शेतीचा बांध फोडून सगळं नुकसान करुन जातो..तरीही आमचा शेतकरी कधी त्यावर रागावत नाही..कारण पाणी हवय...मग ते कसंही येवो..मोठा पाऊस झाला...बांध फुटून पिक वाया गेलं..एखादा हंगाम वाया गेला तरी पाणी तर मिळेल ना या आशेवर तो जगतो...पाऊस हवाच आहे मग तो कोणत्याही रुपात येवो...रोमँटीक भासनारा असो वा सरीवर सरी कोसळणारा असो..पूर येऊन नुकसान करणारा असो ..पाऊस हवाच आहे..मोठा पाऊस होऊ दे...अगदी ओला दुष्काळ पडला तरी चालेल..आमच्या भूमातेची तहान भागवेल एवढा मोठा पाऊस पडू दे...जमीनीची तहान भागली तरच शेती फुलेलं..धरणात पाणी साचेल...पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल..शेतीची, जनावरांची चिंता मिटेल...शेतातली पिकंही डौलानं ऊभी राहतील..कृषी उत्पन्न वाढेल...अन्नधान्याची चिंता राहणार नाही...पण त्यासाठी हवा आहे तो पाऊस..मग तो कसाही येवो धो धो अथवा रिमझीम...जमिनीची तहान भागेपर्यंत पावसाची गरज आहे..तो भरपूर यावा आणि शेतकऱ्याची चिंता मिटावी..त्यातच त्याचं आणि आपलं भलं आहे...म्हणून तर म्हणतात ....ये रे ये रे पावसा....   








Friday, July 20, 2012

राजेश खन्ना- पहिला सुपरस्टार


राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार , पहिला रोमँटिक हिरो, ज्यानं सलग 15 सोलो हिट दिले , तो महान अभिनेता बुधवारी हे जग सोडून गेला. वयाच्या 69 वर्षीच त्यानं या जगातून एक्झीट घेतली. राजेश खन्नानं 1970 चं दशक गाजवलं. तो खऱ्या अर्थानं सुपरस्टार होता. त्यानं पहिला चित्रपट केला तो आखिरी खत पण तो खरा स्टार झाला तो आराधना चित्रपटापासून..शर्मिला टागोर बरोबरच्या आराधनामधली गाणी खूपच गाजली. मेरे सपनो रानी की कब आयेगी तू...या गाण्यानं त्यावेळच्या तरुण पिढीला भुरळ घातली होती.. तर तरुणींच्याही सपनों का सौदागर झाला...आराधना नंतर राजेश खन्नानं 15 सलग हिट दिले. त्यातूनच तो सुपरस्टार जन्माला आला...आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, हाथी मेरे साथी, नमक हराम, हम दोनो, आनंद ..एक ना दोन अनेक चित्रपटांनी इतिहास रचला...

राजेश खन्नाचा उल्लेख येताच सर्वात आधी नावं येतं ते आनंद या चित्रपटाचं, या चित्रपटात त्यावेळी नवखा असलेला अमिताभ बच्चन राजेश खन्नाच्या समोर होता..खूप गाजला तो चित्रपट. खऱं तर याच चित्रपटानं अमिताभलाही एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं..आनंद चिॆत्रपटाची कथा, त्यातला राजेशचा मृत्यु आणि सदाबहार गाण्यानं चित्रपट त्यावेळी गाजला तसाच तो आजही पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे. त्यातला बाशू मोशाय आजही लोकांना आठवतो..
राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या यशात गाण्यांचाही मोठा हात आहे..राजेश खन्ना किशोरकुमार आणि आर डी बर्मन या त्रिकुटानं एकसे बढकर एक हिट गाणी दिलीत..मेरे सपनोंकी रानी, रुप तेरा मस्ताना, कुछ तो लोग कहेंगे, ये शाम मस्तानी, ये क्या हुआ, चिंगारी कोई भडकी, जय जय शिवशंकर, ओ मेरे दिल के चैन, ये जो मोहब्बत है, ही आणि यासारखी अनेक गाणी या चित्रकुटानं दिलीत जी ऑल टाईम हिट आहेत..आजही यातली अनेक गाणी गुणगुणावी वाटतात... राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचा आवाज हे जणू समिकरणच बनलं होतं...ही गाणी जशी हिट झालीत तशीच आन मिलो सजना या चित्रपटातील गाण्यांनीही धुमाकुळ घातला होता. अच्छा तो हम चलते है हे गाणही त्यापैकीच एक..निर्माते ओमप्रकाश यांनी गितकार आनंद बक्षी आणि संगितकार लक्ष्मिकांत यांना आणखी एक रोमँटीक गाणं तयार  करण्यास सांगितलं..पण आनंद बक्षी यांनी 20-25 गितांचे बोल लिहिले पण ओमप्रकाश यांना हवं असलेलं रोमँटीक गाणं काही तयार होतं नव्हतं...10 तास मेहनत करुनही गाण्याचे बोल काही  पसंत पडत नव्हते . त्यावेळी आनंद बक्षी जायला निघाले आणि म्हणाले अच्छा तो हम चलते हैं...त्यावर लक्ष्मिकांत यांनी म्हटलं फिर कब मिलोगे...आणि यातून आनंद बक्षी यांना गितांचे बोल मिळाले आणि पुढच्या 25 मिनीटात ते गाणं तयार झालं...ज्या गाण्यानं सुद्धा इतिहास रचला..अशी एक ना दोन अनेक गाणी होती राजेश खन्ना यांच्या चित्रपटात ज्यांनी त्यांना सुपरस्टार पदापर्यंत पोचण्यास मोलाचा हात दिला...

राजेश खन्ना रोमँटिक हिरोच, पण त्याच्या भूमिका तशा इमोशनल होत्या..राजेश खन्ना सुद्धा आपली इमेज ही इमोशनल हिरोची आहे अॅक्शन हिरोची नाही असंच म्हणत होता. राजेश खन्ना हा सर्वार्थानं सुपरस्टार सारखंच जगला..पण त्याची जादू ओसरली तेव्हांही तो त्याच तोऱ्यात वावरत होता. राजेश खन्नाची जागा अमिताभ बच्चननं घेतली, दोघांच्या अभिनयाचा बाज वेगवेगळा आहे..तरिही नमक हराक नंतर अमिताभ राजेश खन्नाला भारी पडतोय हे स्पष्ट झालं. ते राजेश खन्नानं खाजगीत मान्यही केल्याचं चित्रपटसृष्टीतले राजेशच्या जवळचे पत्रकारही सांगतात..पण मी परत येत आहे असा तो नेहमी म्हणायचा..आणि त्यानंतर अवतार, सौतन सारखे हिट त्यानं दिलेही..पण तो काळ अँग्री यंग मॅन अमिताभचा होता..त्यामुळे पुढे राजेश खन्नाची जादू फारशी चालली नाही..त्यानंतर राजेश खन्ना राजकारणात आला..त्यानं दिल्लीतून लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात  निवडणूक लढवली होती...या निवडणुकीत अडवाणी जिंकले पण त्यांना हा विजय मिळवणं कठीण झालं होतं..अडवाणी फक्त दिड हजार मतांनी जिंकले होते...जर ते हरले असते तर राजेश खन्नाही जायंट किलरच्या पंक्तित बसला असता..तसा त्यानं हा पराभवही स्विकारला नाही..त्यानंतर तो खासदार म्हणून 1991 ते 1996 पर्यंत राजकारण होता..त्यानंतर तो निवडणुक प्रचारात सक्रीय भाग घेत होता..

राजेश खन्नासाठी त्याचे चाहते जीव ओतायचे, त्याला खूप मोठे चाहते लाभले होते. तरुण मुली तर त्याच्यासाठी वेड्या व्हायच्या..राजेश खन्ना सतत चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला अभिनेता होता...तो आपल्या चाहत्यांनाच सर्व काही मानत असं..व्ययक्तित आयुष्यातही तो ऐटीत आणि रुबाबातच राहिला..पण डिंपलबरोबरचं त्याचं लग्न फार वर्ष टीकलं नाही..आठ वर्षानंतर दोघे वेगेळे झाले पण शेवटपर्यंत त्यांनी घटस्फोट घेतला नाही....आयुष्याच्या संध्याकाळी त्याला एकटेपणा जाणवत होता..पण शेवटचे काही दिवस डिंपल, दोन्ही मुली आणि जावई अभिनेता अक्षयकुमार त्याच्याबरोबर असायचे...त्यानं शेवटी एका जाहिरातीसाठी काम केलं. मरण्यापूर्वी शूट करण्यात आलेली त्याची एका पंख्याची जाहिरातही खूपच वास्तविक झाली होती...मेरे फॅन हमेशा मेरेही रहेंगे म्हणतच राजेश खन्नानं या जगाचा निरोप घेतला..