Thursday, February 14, 2013

प्रेमाचा गावा जाऊ....म्हणजेच VALENTINE DAY


आज १४ फेब्रुवारी ..तरुणाईचा दिवस..प्रेम करणा-यांचा दिवस...पण आज प्रेमाच्या नावावर जे काही चाललय ते पहावत नाही..सगळेच काही तसे आहेत असं नाही पण जास्तीत जास्त प्रकरणात मात्र प्रेमाच्या नावाखाली काहीही चाललय असंच आहे..म्हटलं चला आज याच विषयावर काहीतरी लिहूयात..

१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला...? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी...! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको...


आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय...? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही...
 

प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय...त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार...हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते...


आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती...

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची...

तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा...आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर....

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..

बसं एवढचं...

प्रेमाच्या बदलेल्या या व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा केलेला आहे एक प्रयत्न आहे..तो काहींना आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे...बाकी सगळं सेमच आहे..

(मी हा ब्लॉग मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला लिहीला होता..आज पुन्हा त्याची आठवण झाली म्हणून पुन्हा हा ब्लॉग प्रपंच....)

Sunday, October 14, 2012

नागपूरात जमावानं गुंडाला ठेचून मारलं..

" नागपूरातील सीताबर्डी भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील कुख्यात गुंड अक्रम आणि इक्बाल यांच्या पापाचा घडा भरला होता. म्हणूनच या झोपडपट्टीतील महिलांनी इक्बालला भर रस्त्यात ठेचून मारला..या गुंडांच्या त्रासाला, गुंडगिरीला, दहशतीला कंटाळून महिलांनी त्या राक्षसाचा खात्मा केला..पण विषय एवढ्यावरच संपत नाही तर लोकांना कायदा हातात का घ्यावा लागला ? त्याला जबाबदार कोण ? पोलिस काय करत होते ? ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे..

नागपूरात ९ ऑक्टोबरच्या रात्री वसंतराव नाईक झोपटपट्टीतील महिलांनी आणि इतर लोकांनी इक्बाल नावाच्या गुंडाचा दगडानं ठेचून खून केला. जवळपास दोन तीनशेच्या जमावानं त्या गुंडाला ठेचून मारला. या घटनेनंतर राज्यात चर्चा सुरु झाली ती लोकांनी कायदा असा हातात घ्यावा का याची..खरचं या प्रकरणानंतर हा प्रश्न चर्चेला येणं स्वाभाविक आहे. कारण कोणत्याही कायद्याच्या राज्यात कोणीही कायदा हातात घेऊन अशा प्रकारे शिक्षा देणं चूकच आहे. उद्या कोणीही उठून असच रस्त्यावर न्याय देण्याची भाषा करेल. असा सूर अनेक स्तरातून उमटला.. हे सर्व बरोबर आहे...पण हा युक्तीवाद कायद्याचं जिथं पालन केलं जातं तिथं योग्य आहे. नागपूरातली घटना जर लोकांनी कायदा हातात घेतला अशी होत असेल तर तो कायदा त्या लोकांना हातात का घ्यावा लागला याचा अगोदर विचार करायला लागेल..मुळात कोणीच उठसुठ कुणाला मारहाण करणार नाही. अशीच घटना नागपूरातच आठ वर्षापूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट २००४ रोजी घडली होती. त्यावेळीही महिलांनी अशाच एका नराधमाला भरकोर्टात ठेचून मारला होता. तो गुंड होता अक्कू यादव..खून दरोडे, बलात्कार यासारखे असंख्य गुन्हे त्याच्यावर होते तरीही तो मोकाटच फिरत होता. पोलिस आपलं काहीच करु शकत नाहीत. किंबहुना पैसा फेकला की पोलीस आपलं काहीच वाकडं करु शकत नाहीत ही भावना या गुंडांमध्ये बळावलीय. त्याला खतपाणी घालण्याचं काम पोलिस दलातलेच काही लोक करत आहेत. त्यांना राजकीय पक्षांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. म्हणूनच हे गुंड अनेक गुन्हे करुनही मोकाट सुटतात आणि पुन्हा सामान्य लोकांवर अत्याचार करण्यास मोकळे असतात. अशा गुंडाना पोलिस किंवा आपली न्यायव्यवस्था शिक्षा ठोठावू शकत नाही म्हणून हे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या गुंडांना ठार मारलं... !!
इक्बाल काय किंवा अक्कू यादव काय त्यांना लोकांनी ठेचून का मारलं याचा विचार करण्यापूर्वी लोक या थराला का पोचले ह्याचा विचार करावा लागेल...वसंतराव नाईक झोपडपट्टीत इक्बाल, त्याचा भाऊ आणि इतर काही गुंडाचा अड्डा चालत होता. तिथं जुगार खेळले जायचे. हप्ता वसूली, वर्गणीच्या नावाखाली पैसा वसूल करणं हा नेहमीचा धंदा होता. त्यातच त्या झोपडपट्टीतल्या महिला आणि मुलींना त्यांचा मोठा त्रास होता. जाता येता हे लोक मुलींशी छेडछाड करत होते. काही मुलींवर बलात्कार करण्यात आले. चाकूचा धाक दाखवून अन्याय तर दररोजच केले जात होते. अनेक अवैध धंदे त्या गुंडांच्या अड्ड्यावर चालत होते. त्याचा त्रास तिथल्या लोकांना होत होता. त्यावर पोलिसांना अनेकदा सांगूनही पोलीस दुर्लक्ष करत होते. या झोपडपट्टीपासून जवळच सिताबर्डी पोलिस स्टेशन आहे..पण पोलिसांना यातील कोणत्याच प्रकारची माहिती नव्हती असं म्हणता येणार नाही. तर दुसरीकडं स्थानिक लोकांनी या गुंडांच्या विरोधात तक्रारी देऊन त्या दाखल करुन घेण्याचं सौजन्यही पोलिसांनी दाखवलं नाही. फोनवरुन तक्रार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. खोलात जाऊन माहिती घेतली असता असं समजलं की त्याच पोलिस स्टेशनमधले काही लोक म्हणजे पोलीस त्या गुंडांच्या अड्डयावर जायचे...! कारण काय आहे हे लोकांना न कळण्यासारखं नाही..! गुंडांच्या मुसक्या आवळण्याएवजी त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्या भानगडी झाकण्यातच हे पोलीस धन्यता मानत होते. त्यातूनच हा प्रकार घडला..गुंडांच्या त्रासातून पोलीस सुटका करत नाहीत, आपलं कोणी एकत नाही, हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या इक्बालचा विषयच संपवून टाकला...!! कारण दररोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो त्याचा निकाल लावू ही त्या लोकांची भावना होती. त्यात त्यांच काही चुकलेलं नाही..ज्या पोलिसांची म्हणजे कायद्याची भाषा करायची तेच जर गुंडांना सामिल असतील तर न्याय कोण देणार..?

नागपूरातील या गुंडाचा कहर म्हणजे दहा दिवसापूर्वीच या गुंडांनी एकाचा खून केला आणि त्याचा मृतदेह त्या झोपडपट्टीत पुरला. त्यासाठी झोपडपट्टीतल्याच लोकांना धमकावून खड्डा खणून घेतला. एवढी या गुंडांची दहशत त्या भागात होती. त्याचा पोलिसांना पत्ताच नव्हता..हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर आता निलंबनाची कारवाई सुरु झालीय..पोलिसांचं चुकलं हे आता पोलिस आयुक्त सांगतायत. मग एवढे दिवस हे सर्व चालत असल्याचा वरिष्ठांना थांगपत्ताच नाही असं कसं म्हणायचं...आता त्या पोलिसांवर कारावाई होईल नाही होईल हा भाग वेगळा. पण ज्यावेळी लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक कायदा हातात घेतात हे यापूर्वीच्याही अनेक प्रकरणात दिसून आलय...

नागपूरात जमावानं गुंडाची ठेचून हत्या केली असे प्रकार इतरही घडलेले आहेत आणि घडत आहेत. असं का होतं याचं उत्तर शोधण्यासाठी त्याच्या मुळात जावं लागेल. ज्या भागात गुंडांची दहशत असते त्या भागातल्या लोकांना जीव मुठीत ठेवूनच जगावं लागतं. सर्वसामान्य माणूस त्या गुंडाच्या सावलीलाही जात नाही. त्यातच पोलिसांकडे तक्रार केलीच तर त्या गुंडांवर काही कारवाई होईल याचा विश्वासच लोकांना राहिलेला नाही. समजा एखाद्या पोलिसांनी त्या गुंडावर कारवाई केलीच तर काय होतं...छेडछाड, धमकी देणं किंवा इतर गुन्ह्यात एकतर तो जामीनावर सुटतो किंवा खूनासारख्या प्रकरणात सबळ पुरावे नसल्यामुळे बाहेर येतो. म्हणजे गुन्हा करुनही पुन्हा उजळ माथ्यानं वावरायला आणि पुन्हा गुंडगिरी करण्यास मोकाटच..त्यातून पून्हा त्या लोकांना त्रास होणारच.. ! अशा व्यवस्थेमुळे लोक कायदा हातात घेतात. ज्या लोकांनी नागपूरात गुंडाला ठेचून मारलं ते झोपडटट्टीतले लोक आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी गुंडाला कायमची अद्दल घडवली..! पण असे अनेक इक्बाल, अक्कू यादव या समाजात उजळ माथ्यानं फिरत आहेत. त्यांचा बंदोबस्त कोण करणार.. ? कारण गुंडगिरी, दहशत, राजकीय आश्रय आणि पोलिसांचं पाठबळ यामुळे या गुंडांचं मनोधैर्य वाढत चाललय आणि ते समाजाला घातक आहे. पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावलं तर लोकांना कायदा हातात घेऊन इक्बाल किंवा अक्कू यादव करावा लागणारा नाही एवढचं...!!! 
 

Saturday, October 6, 2012

सोनिया गांधी म्हणतात.. जावई माझा भला

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या बेहिशोबी संपत्तीचा भांडाफोड करत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला खिंडीतच गाठलय..रॉबर्ट वढेरा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातले व्यवहार उघड करुन केजरीवाल यांनी काँग्रेसला प्रचंड मोठा दणका दिलाय..अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा बॉम्ब टाकल्याबरोबर काँग्रेसचे झाडून सगळे नेते, प्रवक्ते एवढेच काय सरकारमधले मंत्रीही चॅनेलवर येऊन सफाई देण्यासाठी धावपळ करत होते.. दस्तुरखुद्द सोनिया गांधीही लागलीच जावयाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आणि रॉबर्ट यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही असं एका वाक्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली.. देशात महागाईचा आगडोंब उसळला, भ्रष्टाचाराची अनेक मोठी मोठी प्रकरणं बाहेर आली पण सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया कधी दिली नाही..पण जावयाचं नाव येताच तातडीनं त्यावर त्यांनी एका ओळीची का होईना पण प्रतिक्रिया दिली.. सरकारचे कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी तर केजरीवाल यांना कायद्याचा धाक दाखवेन अशी धमकीची भाषासुद्धा वापरली.. हा सगळा आटापिटा कशासाठी..जर काँग्रेसचे नेते या सर्व प्रकरणात काहीही चुकीचं नाही असं म्हणत असतील तर केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी एवढं महत्व देण्याची गरजच काय..दररोज अनेक आरोप होतात. तेव्हा काँग्रेसची नेतेमंडळी एवढ्या मोठ्या संख्येनं बचावासाठी कधीही बाहेर आली नाही..पण सोनिया गांधींच्या जावयाचा प्रश्न उपस्थित झाला की सर्व सेना मैदानात का उतरली..याचाच अर्थ यात काहीतरी काळंबेरं आहे..सोनिया गांधी यांनाही तातडीनं प्रतिक्रिया द्यावी लागली यातच सर्वकाही आलं...

आता वळूयात केजरीवाल यांनी वढेरा यांच्याबद्दल उपस्थित केलेल्या काही प्रश्नांकडे.. केजरीवाल यांनी कागदपत्रं सादर करत असा थेट आरोप केला की डीएलफ या बांधकाम व्यवसायातील देशातील मोठ्या कंपनीनं वढेरा यांना मोठ्या किंमतीचे फ्लॅट खूपच कमी भावात दिले. अवघ्या ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून वढेरांना डिएलएफनं ३०० कोटीची प्रॉपर्टी दिली..त्यातही डिएलएफनं ६७ कोटी रुपयाचं बिनव्याजी कर्जही वढेरा यांना दिलं. त्याच कर्जाच्या रकमेतून वढेरा यांनी डीएलएफचीच संपत्ती खरेदी केली. तीही करोडो रुपयांची संपत्ती अवघ्या काही लाखात..वढेरा आणि डिएलएफ यांच्यात झालेल्या व्यवहारात असे शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे आहेत...
. मुळात वढेरा यांच्यावर ही कंपनी एवढी मेहरबान कशी काय झाली. ?
. तीच कंपनी वढेरा यांना बिनव्याजी कर्ज देते काय, त्याच पैशातून ते त्याच कंपनीचे फ्लॅट्स अगदी कवडीमोल किंमतीला विकत घेतात काय..?
. अवघ्या चार वर्षात वढेरा यांची संपत्ती ३०० कोटीनं वाढली कशी..?
हे सर्व संशयास्पद आहे...या दोघांचा व्यवहार हा कायदेशिर आहे असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. पण ज्या रॉबर्ट वढेरा यांच्या सहा कंपन्यांच्या व्यवहार दाखवला जातोय. तो प्रत्यक्षात झालेलाच नाही हेही त्या कागदपत्रावरुनच स्पष्ट होतय. त्यातच गुंतवणुकीपेक्षा फायदा कितीतरी पटीनं जास्त दाखवण्यात आलाय...हे सर्व पाहिलं तर पाणी माफ करा पैसा कुठतरी मुरतोय हे कळायला कोणत्याही कायदेतज्ञाची गरज नाही...


आता जे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केलेत तोच धागा पकडून काँग्रेसनं त्यात काहीच बेकायदेशिर नाही. सगळं कसं कायदेशिर आहे हे सांगितलय...मग जो व्यवहार वढेरा आणि डीएलएफ यांच्यात झाला तसाच अगदी तसाच व्यवहार द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची खासदार मुलगी कनिमोझी आणि मुंबईतील व्यावसायिक शाहिद बलवा यांच्यात झाला होता. त्या प्रकरणात मात्र कनिमोझी यांची सीबीआय चौकशी होऊन त्यांना जवळपास ११ महिने तिहार तुरुगांत काढावे लागले..आज त्या जामिनावर सुटलेल्या आहे..तर दुसरं प्रकरणही अशाच पद्धतीचं आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशातील..दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा वाय एस जगमनमोहन यांनाही सीबीआयच्या जाळ्यात अडकवून त्यांना जेलमध्ये टाकलय. त्यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप ठेवून सीबीआयनं जेलमध्ये बंद केलय. जगन यांचे वडील मुख्यमंत्री असताना काही जमिनीच्या व्यवहात जगन यांच्या कंपन्यांना मोठा फायदा झाला असाच आरोप त्यांच्यावर ठेऊन कारवाई करण्यात आलेली आहे..मग जगन आणि कनिमोझी यांच्यासाठी जो कायदा आहे तो वढेरा यांना लागू होत नाही का..? मग त्याच धर्तीवर वढेरा आरोपी ठरत नाहीत आणि इतर लोक आरोपी ठरतात, त्यांना जेलमध्ये डांबलं जातय हा अन्याय नाही का..?

आता पुन्हा त्या वढेरा आणि डिएलएफ यांच्यातल्या व्यवहाराकडे पहा..ज्या हरयाणा सरकारनं तिथल्या शेतकऱ्यांची ३५० एकर जमीन सार्वजनिक प्रकल्पासाठी म्हणून अधिगृहित केली आणि ती डीएलएफला दिली..डिएलएफनं कोणताही कारखाना काढलेला नाही, ती एक खाजगी कंपनी आहे. त्या कंपनीसाठी हरयाणातील काँग्रेसच्या सरकारनं प्रॉपर्टी दलालाचं काम करुन शेतकऱ्यांची जमीन डीएलएफच्या घशात घातली. त्याच जमिनीवर बांधलेल्या अलिशान गृहसंकुलातले सात फ्लॅट्स या वढेरा यांना या कंपनीनं अगदी कमी दरात दिले..अशाच प्रकारे दिल्ली, राजस्थान इथल्या काँग्रेस शासित राज्यांनी या कंपनीला मोठे भूखंड देऊ केलेत. त्याबदल्यातच वढेरा यांच्यावर ही कंपनी मेहरबान झाली असेल असं म्हणायला जागा आहे. नाहीतर डीएलएफसाठी काँग्रेसचं सरकार एवढी मर्जी का दाखवतय आणि वढेरा यांना हा मलिदा दिला जातोय का... हा सगळा व्यवहार संशयास्पदच आहे...

सोनिया गांधी यांचे जावई राबर्ड वढेरा यांच्यावरच घाव घालून केजरीवाल यांनी मोठे फासे टाकलेत. हे आरोप यापूर्वीही झालेत. पण त्याची दखल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतली नव्हती..ती आज घेण्यात आली..दुसरं असं की काँग्रेसचे हे नेते वढेरा हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत. हा व्यवहार हा त्यांची कंपनी आणि डीएलएफ यांच्यातला आहे त्याच्याशी काँग्रेसचा किंवा सरकारचा काहीही संबंध नाही असंही सांगत आहेत.. पण राबर्ट वढेरा हे जर इतरांप्रमाणेच आहेत तर मग त्यांना एसपीजी सारखी अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा कशी काय दिली जातेय.? त्यांना कोणत्याच विमानतळावनर चेकिंग का केलं जात नाही. ? ते जिथं जातात तिथली सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी का राबते ? ह्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसला द्यावीच लागतील. !!!! केवळ काँग्रेसच्या अध्यक्षा यांचा जावई म्हणून त्यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, राजकीय हेतूनं होत आहेत, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही अशी प्रमाणपत्रं वाटण्याची सरकारच्या मंत्र्यांना काहीच गरज नाही.. यात चौकशी वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही कारण पूर्ण यंत्रणा यांच्याच हातात आहे. ते काय चौकशी करणार आणि दोषी ठरवणार ? पण एक मात्र आहे. तुमच्या माझ्या सारख्या तमाम सामान्य जावयांना राबर्ट वढेरा यांचा हेवा वाटयला हवा.. ! कारण सासू असावी तर अशी ..! अशी म्हणजे सोनिया गांधींसारखी.. ! सगळं सरकार धावलं की नाही राव बचाव करण्यासाठी.....!!!

चला तर मग आरोप प्रत्यारोप सोडून देऊ, वढेरांना काहीही होणार नाही हेही तितकचं खरयं...पण आपण मात्र फक्त चार दिवस सासूचे तर चार दिवस जावयाचे असं म्हणूयात..बस्स एवढचं...!

रामराम..

Friday, September 21, 2012

टीम अण्णा अखेर फुटली..


 " जनलोकपालच्या मुद्यावर एकत्र आलेले अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात फुट पडलीय. यापुढे केजरीवाल आणि अण्णांचे रस्ते वेगळे असणार आहेत. ही टीम का फुटली, त्याला कारण काय, कोण जबाबदार आहे टीम फुटण्याला, याचा अन्वयार्थ लावणारा हा लेख...



 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यापासून फारकत घेतली. मागच्या दीड दोन वर्षापासून सुरु झालेल्या टीम अण्णांचे दोन तुकडे पडलेत. एका तुकड्यात केजरीवाल आणि प्रशांत भूषण आहेत तर दुसरीकडे अण्णा, किरण बेदी वगैरे मंडळी आहेत. लोकपलाच्या मुदद्यावर एकत्र आलेल्या या टीमला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावरुन या टीममध्ये फूट पडली. केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढून ताकद दाखवण्याची खुमखुमी आली होती, त्याला अण्णांचा अर्थातच विरोध होता. पण जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून केजरीवाल यांनी त्यांचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा वापर करुन आपला फायदा करुन घेण्याचा केजरीवाल यांचा उद्देश होता. पण अण्णांनी त्याला छेद देत आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दाखवून दिलं...

अण्णा हजारे यांनी स्वतःच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर टीम अण्णा फुटल्याचं जाहीर केलं. तसं करताना त्यांनी केजरीवाल आणि कंपनीला निवडणुकीत आपला फोटो किंवा नाव न वापरण्याचा इशाराही दिला. पण हा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच टीम फुटणार हे जाणवत होतं. राजकीय पर्यायाला किरण बेदी, संतोष हेगडे यांचाही विरोध होताच पण उपोषण सोडताना अण्णांना तसा पर्याय देण्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्याचवेळी अण्णांचा त्याला विरोध आहे अशीही माहिती मिळाली होती. शेवटी अण्णांनी केजरीवाल यांना त्यांची जागा दाखवली. त्यामुळे केजरीवाल यांच्या आशेवर पाणी पडलंय
 

दीड वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालचा झेंडा हाती घेऊन दिल्ली हादरवून सोडली होती. दिल्लीतल्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रसिद्धी माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी पाहून सरकारलाही सुरुवातीला चार पावलं मागं हटावं लागलं होतं. पण उपोषणाचं हत्यार मागच्या दीड वर्षात वारंवार वापरून अण्णांनी त्याची धार बोधट केली. शिवाय उठसुठ राजकीय नेत्यांना शिव्या देण्याचा सपाटाही त्यांच्या सहाकाऱ्यांनी लावला. कोणत्याही मुद्द्यावर हेकेखोर आणि हटवादी भूमिका घेण्यामुळेही लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला. दिल्लीत मिळालेला सुरुवातीचा प्रतिसादही नंतर मिळत नव्हता. त्यामुळे गर्दी नाही तर दर्दी लोकांची गरज असल्याचा आवही त्यांना आणावा लागला. तर दुसरीकडं सरकारनंही त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अण्णांना त्यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला..केजरीवाल यांच्या बेछुट आरोप करण्याच्या वृत्तीमुळेही लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यातच टीममध्येच अनेकदा मतभेद असल्याचं समोर येत होते. शेवटी राजकीय पर्यायाच्या मुद्दयावर ही टीम फुटली..

अण्णा हजारेंचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आजपर्यंत अनेक नामांकित लोकांनी त्यांनी साथ दिली पण ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. बाबा आढाव, गो. रा. खैरनार, मेधा पाटकर, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी अण्णांना भ्रष्टाचार विरोधी लढ्यात साथ दिली पण काही काळानंतर त्यांनीही अण्णापासून दूर राहण पसंत केलं. याला अण्णांचा हट्टी स्वभावही कारणीभूत असल्याचं बाबा आढाव सारख्या जाणत्या व्यक्तीनं म्हटलय. तर अण्णा हे फक्त ढोंगी आहेत असं खैरनार यांनी म्हटलय. तर अण्णांच्या कोणत्याच भूमिकेवर ठाम न राहण्याच्या सवयीमुळेही अनेक सहका-यांनी त्यांची साथ सोडली. अण्णांच्या सहकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. पण त्याबाबत अण्णा फारसं बोललेलं दिसत नाहीत. तर दुसरीकडं अण्णा हे भाजप आणि संघ परिवाराचे समर्थक आहेत, त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही होत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईलं. कारण काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आगपाखड करताना भाजपच्या भ्रष्टाचारावर गप्प बसण्यातूनही या आरोपांना पुष्टीचं मिळते. तर दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही अण्णांच्या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असं म्हटलय. त्यामुळे कुठेतरी अण्णा आणि संघ यांच्यात जवळीक असल्याची शंका येतेच.

अण्णांनी आता केजरीवाल यांना दूर करुन रामदेव बाबा यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यामुळे अण्णांचे यापुढेचे साथीदार रामदेव बाबा असतील. त्यांच्याबरोबर अण्णा किती दिवस साथ देणार हे लवकरच कळेल..

Saturday, September 1, 2012

राज ठाकरेंचा वाद बिहारी

" राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बिहारींचा मुद्दा उचलून धरलाय. बिहारच्या मुख्य सचिवांच्या एका पत्रावरुन हा वाद सुरु झालाय.. त्यातून सगळे बिहारी नेते उंच आवाजात राज ठाकरेंना देशद्रोही ठरवा असं म्हणत आहेत. त्यात तेल ओतन्याचं काम उत्तर भारतातील मिडीयानं केलय..

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण हलवून टाकलय. मुद्दा होता बिहारींचा..बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्राचा मुद्दा करत राज ठाकरेंनी बिहारींना राज्यातून हाकलून लावू असा इशारा दिला..राज ठाकरेंनी बिहारविषयी काही बोलताच बिहारी नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल...शिवानंद तिवारी, लालू प्रसाद यादव, शरद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, यांनी तर राज ठाकरेंवर तोफ डागलीच, पण काँग्रेसचे वाचाळ सरचिटणीस दिग्वीजयसिंगही त्यात पडले..ठाकरेंचं मुळ बिहारमध्ये होतं. ते मध्यप्रदेश मार्गे मुंबईत गेले असा जावई शोध त्यांनी लावला..त्यातच त्यांनी राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलय असं म्हटलं. तर केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी केलीय..दिल्लीतल्या बिहारच्या झाडून सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. राज्य घटनेचा हवाला देऊन कोणीही कुठही जाऊ येवू शकतो याची आठवण करुन दिली..पण हे सगळेच नेते राज ठाकरेंवर तुडुन पडत असताना त्यांच्या एवढंही लक्षात आलं नाही की याचा थेट फायदा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेलाच होणाराय. राज ठाकरेंनी मुंबईतून एकच इशारा दिला आणि या इशा-यानं पाटणा मार्गे दिल्ली हलवली...

दिल्ली आणि पाटण्यात हे राजकारण तापलं असताना मुंबईतही राजकीय नेते कामाला लागलेच..म्हणजे राज ठाकरेंनी एकाच इशाऱ्यात अनेकांना कामाला लावलं..राज ठाकरे काही बोलले आणि त्यावर अबु आझमी आणि संजय निरुपम बोलणार नाहीत असं कसं होईलं..त्यांनीही मग कॅमेऱ्यासमोर येऊन आव्हान प्रतिआव्हानाची भाषा केली..फरक एवढाच होता की यावेळी संजय निरुपम यांची भाषा बऱ्यापैकी सौम्य होती..कारण त्यांनी यापूर्वी राज ठाकरेंवर आगपाखड केली होती त्यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठीकडून तंबी देण्यात आली होती. ते लक्षात ठेऊनच निरुपम यांनी प्रतिक्रीया दिली..पण अबु आझमी मात्र आपल्या स्टाईलमध्ये मैदानात उतरलेच...जाता जाता आर. आर. पाटीलही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई करु असं सांगून गेले...यात उत्तर भारतातील प्रसारमाध्यमांनीही तेल ओतन्याचं काम केलय हेही नाकारुन चालणार नाही..राज ठाकरे मराठीचा मुद्दा जेव्हा उचलतात किंवा बिहारीचा मुद्दा उचलतात तेव्हा उत्तर भारतातील प्रसार माध्यमं राज ठाकरेंना व्हिलन ठरवतात..

राज ठाकरेंच्या या सर्व प्रकरणात काँग्रेस त्यांना छुपी साथ देत आहे असं म्हटलं जातय..कारण वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मोकळं रान दिलं होतं असं म्हटलं जातय. मुंबईत त्यावेळी डाव्यांचा जोर होता. त्यांना मोडीत काढण्यासाठी नाईकांनी बाळासाहेबांना मोकळीक दिली होती असं म्हटलं जातय..तोच पत्ता काँग्रेस आज राज ठाकरेंच्या रुपानं वापरत असल्याचं बोललं जातय. शिवसेना जशी काँग्रेसच्या शिडीवरुन वाढत गेली. तसच मनसेलाही काँग्रेसकडून मिळणाऱ्या या मोकळीकचा फायदा होणारच आहे..तर दुसरीकडं २०१४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही तयारी सुरु झालीय असंही म्हणायला हरकत नाही..तर अबु आझमी आणि राज ठाकरे यांनाही त्याचं राजकीय मायलेज मिळणारच आहे..राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देशद्रोही ठरवा असा आवाज या बिहारी नेत्यांनी उठवलाय तसच त्यांच्यावर भाषण बंदी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

राज ठाकरे यांना टायमिंगही चांगलंच जमतय..त्यांनी एखादा मुद्दा उचलून धरावा आणि त्याचा त्यांना फायदा झाला नाही असं घडलेलं नाही..तसच एखादा विषय किती ताणावा हेही त्यांना चांगलच कळतं. म्हणूनच तर त्यांचा पक्ष राज्यात जोरात वाढतोय..मुंबई, नवी मंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेचा जोर धडाक्यात वाढलाय. याच पट्ट्यात विधानसभेच्या १०० च्या वर जागा आहेत. मनसेच्या या राजकीय वाढीची सर्वच पक्षांनी दखल घेतलीय. शिवसेना भाजप युतीत आठवले जाऊन बसले असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही..म्हणूनच राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा विचार सुरु झालाय. भाजपाकडून तरी त्यावर हालचाली सुरु असल्याचं दिसतय..तर दुसरीकडं शरद पवार यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची घौडदौड वेगानं होत असल्याचं मान्य केलय..२०१४ च्या निवडणुकीत जर मनसेचा हा विजयपथ असाच कायम राहिला तर ते किंगमेकर होणार हे नक्की.. त्यासाठीच तर हा सगळा वाद सुरुय असंच आतातरी म्हणावं लागेल..
 

Saturday, August 25, 2012

राज ठाकरेंचा झंझावात


महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी 21 तारखेला जो मोर्चा काढला त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र ढवळून निघालाय. 11 ऑक्टोबरला आझाद मैदानावर ज्या काही मुस्लीम संघटनांनी नंगानाच केला. पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, गाड्या जाळल्या, प्रसार माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. एवढ्यावरच्या हे आंदोलक थांबले नाहीत तर तिथं असणाऱ्या अमर जवान ज्योतीला लाथेनं उडवून लावलं.. हा सगळा धुडगुस घातला तेव्हा मुंबई पोलीस तो उघड्या डोळ्यांनी पहात होते. खरं तर हा मोर्चा ज्या रझा अकादमीनं आयोजित केला होता त्यांची पार्श्वभूमी सरकारला माहित होती. हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग आहे हे पोलिसांना माहित होतं. त्यांच्या मोर्चाला मुळातच परवानगी द्यावयास नको होती, पण ती दिली. त्यावरही कहर म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल होता की आंदोलक मंडळी हिंसक कारवाया करणार आहे, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावरुन राज्यात असंतोष माजला. लोकांच्या मनात चिड निर्माण झाली. कारण एवढा सगळा नंगानाच घातल्यानंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र सरकार शांत राहिलं. बघु करु अशी भूमिका घेतली गेली, त्यावरुन लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. राजकीय पक्षांनीही कारवाईची मागणी केली..पण सरकार आणि गृहमंत्री आर आर पाटील मात्र कारवाईच्या बाबतीत थंडच राहिले..या सर्व प्रकारावर आर आर पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची भूमिका संशयास्पद राहिलीय..

रझा अकादमीनं घातलेला हिंसक गोंधळ, त्यात पोलिसांवर हल्ला, अमर जवान ज्योतीचा अपमान हे अवढं सगळं होऊनही आर आर पाटील कारवाई करण्याएवजी विरोधकांनाच दोष देत राहिले.. राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन आर आर पाटील आणि पटनायक यांच्यावर थेट हल्लाबोल केला..राजीनामा द्या ह्या मागणीसाठी त्यांनी 21 तारखेला मोर्चा काढला...ह्या मोर्चाला मात्र पोलिसांनी कायद्याचा किस पाडत परवानगी नाकारली. पुन्हा अल्पसंख्याक समाजाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं.फक्त आझाद मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी जवळपास 15 हजार पोलिस बंदोबस्ताला ठेवले..म्हणजे 11 तारखेला जी खबरदारी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही मात्र मनसेच्या मोर्चात अडथळे आणण्यासाठी एकही संधी सोडली नाही. यावरुनही लोकांच्या रागाचा पारा चढला होता. पोलीसांच्या परवानगीची वाट न पाहता राज ठाकरेंनी मोर्चा काढला. त्यांनी सरकारला शिंगावरच घेतलं..तो मोर्चा आणि सभेची गर्दी पाहून राजकीय पक्ष अचंबितच झाले. एक लाख लोकांचा मोर्चा आणि सभा घेऊन राज ठाकरेंनी मोर्चा कसा काढावा हेच दाखवून दिलं. या सभेतून आणि मोर्चातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आझाद मैदानावरच्या सभेत अवघ्या 15 मिनीटाच्या भाषणात त्यांनी आर आर पाटील, अरुप पटनायक ह्यांच्यावर हल्ला तर चढवलाच पण त्यांचं लाडकं पेटंट अबु आझमीलाही त्यांनी शिव्या घातल्या. रामदास आठवलेंसह सर्वच दलित नेत्यांनाही त्यांनी झोडपून काढलं..तर दुसरीकडं पोलिसांची बाजू पूर्णपणे उचलून धरली, प्रसारमाध्यमांची बाजू घेतली, सर्व विरोधी पक्षांवर कडी केली आणि सरकारला जो विरोध केला पाहिजे तो कसा करावा हे दाखवून दिलं..मुस्लीम समाजकंटांवर हल्ला चढवत आपला मोर्चाही हळूहळ हिंदुत्ववादी नेता अशी करुन दिली..आपला धर्म हा महाराष्ट्र धर्म म्हणत त्यांनी जरी हिंदुत्वाची वाट धरल्याचं सरळ सरळ मान्य नाही केलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा पट मांडला तो हिंदुत्ववाद्यांना तर नक्कीच भावलाय..

राज ठाकरेंनी ह्या मोर्चातून अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांनाच टार्गेट केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली..त्यांना महासंचालकपदी बढती दिली असली तरी मुंबईचं आयुक्तपद गेलंच..आता लक्ष्य फक्त आर आर पाटील..कदाचित येत्या काही दिवसात हे प्रकरण थोडं शांत झाल्यानंतर आर आर पाटलांचाही राजीनामा किंवा खातेबदल झाल्यास नवल वाटायला नको..एक मात्र खरं राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली..मीच सरकारला अंगावर घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. लाखाचा मोर्चा काढून इतर विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, भाजपलाही त्यांनी त्यांची ताकद किती आहे हे दाखवून दिलं.. 2014 च्या निवडणुकींची ही सुरुवात आहे. आपला रस्ता काय आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलय. पोलीसांमध्ये सहानुभूती निर्माण करुन, प्रसार माध्यमांनाही त्यांनी आपण तुमचे तारणहार आहोत हे जसं त्यांनी दाखवून दिलं. तसच अबु आझामी, दलित नेत्यांना टार्गेट करत अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे या अन्यथा तुमची गरज नाही हेही दाखवून दिलं. मुस्लीम आणि अबु आझमींना दणका देत हिंदुत्ववाद्यांनाही त्यांनी चुचकारलंय अर्थात त्यामुळे संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या मनात राज ठाकरेंनी घर केलंय. ह्या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत मनसेला होणार हे नक्की..फक्त हा राजकीय सारीपाट राज ठाकरे पुढच्या काही महिन्यात कसा रंगवतात त्यावर त्यांची राजकीय भिस्त असणाराय. पण त्यांनी आता टाकलेले फासे जर असेच पडले तर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र आत्ताच पक्कं झालय.

Sunday, August 19, 2012

विलासराव देशमुख- एक उमदं नेतृत्व हरपलं..

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं १४ ऑगस्टला चेन्नईत ग्लोबल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना ह्रदय विकाराचा झटका येऊन निधन झालं..विलासरावांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याअगोदर विलासराव देशमुख यांच्यावर पंधरा दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्यांना तातडीनं चेन्नईला हलवण्यात आलं.. विलासराव देशमुख यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. तसच त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब झाल्या होत्या. विलासराव देशमुख यांना व्हँटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण झालं होतं. त्यांच्यावर यकृतरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण शेवटी १४ तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली... 
विलासराव देशमुखांचे निधन

विलासराव देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरु होती. पण त्यांचा आजार एवढा गंभीर असेल असं वाटलं नव्हतं..त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात खरचं पोकळी निर्माण झालीय. विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईकांनंतर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवलय. दोन टर्ममध्ये त्यांनी राज्याचं नेतृत्व केलय. नेहमी हसतमुख चेहरा, मिश्किल स्वभाव, फरडा वक्ता आणि कार्यकर्त्यांशी जोडलेला नेता अशी त्यांची ख्याती होती...
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री हा सर्वच प्रवास विलासराव दगडोजी देशमुख यांनी एका देशमुखी ऐटीत आणि दिमाखात केला. ही कारकीर्द सरळ एका रेषेत कधीच नव्हती. पण विलासराव मात्र सदैवच दिलखुलास राहिले.
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. नंतर युवक काँग्रेसच्या राजकारणातून त्यांची खूप झपाट्याने प्रगती झाली. तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पंचायत समितीचा उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली होती. तेव्हा ते कधी सायकलवर तर कधी एसटीनंही प्रवास करुन कार्यकर्त्यांची कामं करत.. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

देशमुख यांची दोस्तीही खूपच गाजली..सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना तर राजकारणात दो हंसो का जोडा असं म्हटलं जायचं..विलासराव देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती लोकसभेत देताना सुशीलकुमार शिंदे यांनाही गहिरवरुन आलं होतं. स्वतः शिंदेसाहेबांनी एक हंस सोडून गेला अशी प्रतिक्रीया दिल.. तर गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते असूनही त्यांच्याशी विलासराव देशमुख यांची खास दोस्ती होती. गोपीनाथ मुंडे यांची आणि त्यांची दोस्ती पुण्यापासूनची. त्यांची कारकीर्दही समांतरच. मुंडेंनी विलासरावांच्या लगतच्या मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली ती १९८० साली.. दोघेही एकदा एकदा पराभूत झालेत. त्यानंतर दोघेही दिल्लीच्या राजकारणात गेले.. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
मराहाष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे विलासराव देशमुख हे आवडते शिष्य होते. दोघेही मराठवाड्याचे तर होतेच पण शरद पवार यांना असलेला विरोध हेही त्यांचं समान सूत्र होतं. ते शेवटपर्यंत कायम राहिलं. शरद पवार यांना रोखू शकणारा आणि महाराष्ट्रव्यापी प्रभाव असलेला सध्याचा एकमेव नेता म्हणजे विलासरावच होते. त्यामुळेच स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन होऊन पहिलं आघाडीचं सरकार चालवण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विलासरावांकडेच नेतृत्व दिलं. १३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.
विलासराव देशमुख हे निव्वळ राजकारणी नव्हते. वडिल दगडोजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या उत्तम जाणकारीचा वारसा त्यांना लाभला होता. मराठी पुस्तकं असोत की नाटकं त्यांचे ते उत्तम भोक्ते रसिक होते. त्यांचं लावणीचं प्रेमही असंच रसिक होतं. त्यामुळे सर्वच कलाकाऱांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुरंगी आणि बहुश्रुत व्यक्तिमत्वामुळे त्यांचं वक्तृत्व हेही प्रसन्न आणि उमदं होतं. त्यामुळेच ते मुख्यमंत्री असताना काही नाराज आमदार त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत असल्याबद्दल त्यांना कधी विचारलं तर ते सहजपणे सांगत की, पूर्वी मी नुसता मंत्री असताना हेच करायचो. त्यामुळे आता नवीन लोक ते करीत असतील तर त्यात काही विशेष नाही.
१९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या गेल्या दहा वर्षांतल्या कारकीर्दीचा आलेखही असाच वरखाली होत राहिला. गेल्या पाच वर्षात मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप, दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानं ठोठावलेला दंड, आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय, सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयानं ओढलेले कडक ताशेरे यामुळे त्यांची कारकीर्द झाकोळली गेली. पण तरीही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी काँग्रेसला मुंबईतून जी भक्कम राजकीय आणि आर्थिक रसद मिळवून दिली त्याची पोचपावती म्हणून ते पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर केले नाही.
विलासराव आजारी असल्याचं राजकीय वर्तुळात सर्वांना ठाऊक होतं. पण हे आजारपण इतकं गंभीर होईल आणि ६७ व्या वर्षी एका चतुरस्त्र नेत्याचा अंत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं...विलासराव देशमुख एवढे मोठे नेते होते की त्यांच्या अंत्ययात्रेला बाभळगाव या गावात दहा लाखांचा जनसागर लोटला होता. पंतप्रधान, सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह व्हीव्हीआयपींचीच संख्या शेकडयांच्याही वर होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तर दोन किलोमिटर चालत जावं लागलं तर इतर व्ही आयपींनाही मोटारी सोडून पायी चालतच जावं लागलं..लातूरला १५ तारखेला ५४ विमानं आली होती. यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.. त्यांच्या जाण्यानं सामान्य कार्यकत्यालाही आपला नेता गेला असच वाटत होतं..
लातूर पोरके झाले