Thursday, May 31, 2012

पाणी पुरवठा मंत्री ढोबळे सरांचा दुष्काळ


महाराष्ट्रातील काही भागात यावर्षी भिषण दुष्काळ पडलाय..पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकूनही पाणी मिळत नाही. तर जनावरांना चारा नाही. जमीनी ओस पडल्यात. अशी गंभीर परिस्थीती असताना या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मात्र हा दुष्काळ दिसत नाही. जो काही दुष्काळ हा तो तेवढा तिव्र नाही. तो मिडीयानं उभा केलाय. हा पितपत्रकारितेचा प्रकार असून टीव्हीवाल्यांनी त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी दुष्काळ अतिरंजीत करुन दाखवलाय अशी मुक्ताफळं ह्या मंत्रीमहोदयांनी उधळलीत. आता राज्यात दुष्काळ आहे की नाही हे जर या राज्याच्या मंत्र्याला माहितच नाही तर त्यांना कोण सांगणार. बरं या दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यावर तोच मंत्री दुष्काळ तेवढा काही भीषण नाही असं जर म्हणत असेल तर हे या राज्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. ढोबळेसाहेब ज्या मंतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मोहोळ-मंगळवेढा तालुक्यात पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यांच्याच मतदारसंघाला लागून सांगोला तालुका आहे. तसच सोलापूर जिल्ह्याची सीमा असलेल्या सांगली आणि सातारा भागातही मोठा दुष्काळ आहे. याच भागात काँग्रेसचे युवराज येऊन दुष्काळाची पाहणी करुन गेले. पण ढोबळेसाहेबांना मात्र हा सर्व मिडीयाचा अतिरंजीतपणा वाटतो..जर हा दुष्काळ मिडीयानं उभा केला असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची, जनावरांना चारा डेपोची व्यवस्था कशासाठी केली आहे. पन्नास पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या पण दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागालाही चारा डेपो देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कशासाठी दिलेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत त्यांच्याच मंत्रीमंडळात ढोबळेसाहेब पाणी पुरवठा मंत्री आहेत ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय...

राज्यात दुष्काळाची जर गंभीर परिस्थीती नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे २७०० कोटींची मदत कशासाठी मागितली हे ढोबळेंनी सांगावं. त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि जाणते राजे शरद पवार यांनी दुष्काळ प्रश्नावर राज्यापालांना का लक्ष्य केलं होतं. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला पाहिजे असं पवारसाहेब का म्हणाले.. हे ढोबळेसरांनी लक्षात घ्यावं. याउपर जर राज्यात दुष्काळ नाही असं जर आपणास म्हणाचय तर मग केंद्र सरकार मदत तर कशाला करेल हेसुद्धा या ढोबळेंना कळू नये का.. खरं तर एखाद्या विषयावरुन लक्ष दुसरीकडं वळवण्याचा किंवा जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. ढोबळेसाहेब पाणी पुरवठामंत्री आहेत. त्यांनी जरा या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला असता तर त्यांना या दुष्काळाच्या झळा आणि दुष्काळग्रस्तांच्या व्यथाही कळल्या असत्या. पण केवळ सरकारी आकडेवारी नाचवून दुष्काळाची तीव्रता कमी आहे हे सांगण्यातच ज्या मंत्र्याला धन्यता वाटते त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा नाद सोडावा. कारण आपण जर जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसू तर त्या खूर्चीवर बसण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही...

ढोबळेसाहेब आपण म्हणता तसं अतिरंजीत चित्र मिडीयानं रंगवलं असेल तर या भागातली जनता पाण्याच्या टँकरसाठी दिवसभर वाट का पहातेय. एवढी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण सरकारी कागदांवर विसंबून न रहता प्रत्यक्ष परिस्थीती पाहून या. तुम्हाला त्याची तीव्रता कळेलच. दुसरं असं की दुष्काळ काय आणि दुष्काळ सदृष्य परिस्थीती काय किंवा टंचाई सदृस्य परिस्थीती काय हे झालं सरकारी नियमानुसार दुष्काळाचं केलंल वर्णन..पण दुष्काळ हा दुष्काळच असतो हे तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनीधीला कळू नये यापेक्षा तुमचं अज्ञान ते काय..

दुष्काळ किती आहे. तो मिडीयानं उभा केलाय की निसर्गाचा मार आहे. यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या दुष्काळग्रस्तांना वेळेवर मदत मिळणं गरजेच आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्या गावात दिवसाला चार पाच टँकर पाणी पुरवले जातात असं सांगितलं जातं त्याठिकाणी दिवसातून एकदाच टँकर येतो. ज्या भागात टँकरच्या १०-१५ खेपा व्हायला हव्यात तिथं जेमतेम दोन तीन खेपा होतायत. तर काही गावाला दोन दोन दिवस टँकर येतच नाही ही वस्तुस्थीती आहे. फक्त कागदावर १५०० टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे किंवा १००-१५० चाराडेपो उभा केलेत हे सांगून लोकांची थट्टा करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कीती होतेय यावर भर दिला तर दुष्काळावर काही प्रमाणात तरी मात करण्यास सरकारला यश येईलं. नाहीतर नेहमीप्रमाणे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी एवढे कोटी रुपये खर्च झाले. तर चारा डेपोवर एवढे कोटी खर्च झाले असे सरकारी आकडे फक्त दाखवले जातील..

दुष्काळग्रस्त माणूस निसर्गाच्या ह्या मा-यानं अगोदरच हैराण झालाय. पिण्यासाठी पाणी, जनावराला चारा, पिण्याचं पाणी आणि हाताला काम एवढच्या त्याच्या माफक अपेक्षा आहेत. त्या जर हे सरकार देणार नसेल तर सरकार म्हणून तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही. आपण मायबाप सरकार आहात, लोक तुमच्याकडे आशेनं पहात आहेत. त्यांना मदत करुन त्यांच्या जगण्याला हातभार लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ते सोडून त्याचं खापर दुस-यावर फोडून समस्या संपणार नाही.. ढोबळेसर आपण हुशार आहेत. प्राध्यापक आहेत, ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्याचकडे पाणी पुरवठा विभाग आहे. लोकांना त्याचा फायदा होईल एवढं काम करण्यात आपण आपली ऊर्जा खर्च केली तर ते तुम्हाला शोभून दिसेल. नसते मिडियावर खापर फोडून काही समस्या सुटणार नाहीत हे समजण्याएवढे आपण सुज्ञ आहेत एवढचं या निमित्तानं आपणास सांगणं आहे...

Tuesday, May 29, 2012

स्त्री भ्रुण हत्या - एक सामाजिक समस्या


स्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व..खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं...! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. पण आमीर खानच्या कार्यक्रमामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तसच या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रुण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.

स्त्री भ्रुण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. परळीतलं डॉ. सुदाम मुंडे यांचे हॉस्पीटल तर ह्या गोरख धंद्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. ह्या हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉ. मुंडेवर कारवाईसाठी हात उचलला गेला. तो डॉक्टर सध्या फरार आहे. पण हा गोरखधंदा त्या हॉस्पीटलमध्ये होत होता हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का गेली नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रुण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. यावरुन महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..

मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी जिल्हातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा आदेश दिला होता. त्यातून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून एक अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याचा आदेशही काढलाय. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. पण मुंबई हाय कोर्टांनं तो अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूरात मुलींचं प्रमाण हे दरहजारी ८३९ पर्यंत खाली घसरलंय. थोड्या फार फरकानं मुलींचं हे प्रमाण इतर जिल्ह्यातही असंच घसरत चाललय. त्यामुळे मुलगी वाचवणं ही काळाची गरज बनलय.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तसच प्रसुतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदाही आहे. पण कायद्याच्या पळवाटा तसच घरातूनच वंशाचा दिवा हवा म्हणून होणारा हट्ट यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रुण हत्या केली जाते. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही. फक्त डॉक्टरांनाही दोष देऊन काही उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा प्रकार थांबणं अवघड आहे. कारण सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे..मग मुलगी का नको...? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेक वाचवा असं म्हणण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीय..

Monday, April 23, 2012

विल्यम शेक्सपिअर-एक महान लेखक

विल्यम शेक्सपिअर

विल्यम शेक्सपिअर हा इंग्रजी वांड्मयातील महत्वाचा लेखक..महत्वाचा म्हणजे एवढा की..इंग्रजी वांड्मय म्हणजे दोन तृतीयांश बायबल आणि एक चतुर्थांश शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. यावरुनच शेक्सपियरचं इंग्रजी वांड्मयातलं महत्व अधोरेखित होतं. तर शेक्सपिअरला वगळून इंग्रजी वांड्मयावर लिहणं अश्यकच आहे. एवढं मोठं योगदान या लेखकानं इंग्रजीला दिलेलं आहे. आपल्या अवघ्या ५२ वर्षाच्या आयुष्यात शेक्सपिअरनं ३६ नाटकं लिहिली तर जवळपास १५० सुनितं लिहिली. असं म्हणतात की शेक्सपिअरनं त्याच्या लेखनातून एकही विषय सोडला नाही. त्याच्या लेखनानं सर्व विषयाला स्पर्श केलाय. राजकारण, प्रेम, कौटुंबिक, सामाजिक, यासह जीवनाच्या सर्व अंगाला त्याच्या लेखनीनं स्पर्श केलाय. त्याची नाटकं सर्वात जास्त गाजलेली तसच इंग्रजी वांड्मयाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. ट्रॅजेडी असो वा कॉमेडी, किंवा नाटकाचा इतर कोणताही प्रकार असो त्यात शेक्सपिअर नाही असं होत नाही..ट्रॅजेडीचाच विचार करायचा तर हॅम्लेट, किंग लिअर, ऑथेल्लो, मॅकबेथ, रोमिओ आणि ज्युलियट यांना कोण विसरु शकेल.

सोळाव्या शतकातल्या या लेखकाविषयी जगभरातून लेखन झालय. त्याच्या नाटकांची जगातल्या जवळपास सर्वच भाषेत भाषांतरं झालेली आहेत. तर त्याच्यावर लाखो समिक्षकांनी लेखन केलय. तरीही शेक्सपिअर हा विषय काही संपत नाही. त्याच्या लेखनीनं इंग्रजीच्या अभ्यासकांना तर झपाटूनच सोडलंय. १६ व्या शतकात त्यानं ज्या पद्धतीनं नाटकं बसवली आणि ती अजरामर झाली त्याला तोडच नाही. आजही तुमच्या आमच्यातल्या अनेकांच्या व्यवहारात बोलतानाही शेक्सपिअरच्या नाटकातल्या पात्रांचा विषय येतो तर कधी त्या नाटकातले संदर्भ येतात. हेच पहा ना. to be or not to be असं म्हटलं की हॅम्लेटच नावं ओठावर येतच. तुमची माझी अनेकांची हॅम्लेटसारखी अवस्था अनेकदा झालेली आहे. तर राजकारण किंवा मैत्रिच्या बाबतीत Brutus you too ! हा ज्युलियस सिझरमधला अजरामर डायलॉग येतोच. तर प्रेमाचा विषय निघाल्यावर रोमिओ ज्युलियट शिवाय तर तो पूर्ण होऊच शकत नाही. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. किंग लिअरबद्दल तर कीतीतरी वेळा चर्चा होईन गेलीय. म्हातारा किंग लिअर आणि त्याच्या तीन मुली संपत्तीसाठी काय- काय करतात हा १६ व्या शतकातला शेक्सपिअरनं मांडलेला विषय आजही आपल्या अवतीभोवती अनेकदा आपण पाहतोय.

शेक्सपिअरच्या नाटकांची जगातल्या सर्व भाषेत भाषांतरं झाली त्यात मराठीही मागं नाही. किंग लिअरवरचं नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांचं नाटक तर जगजाहीर आहे. शेक्सपिअरच्या एका-एका नाटकाचं पाच-सहा लेखकांनी त्यांच्या शैलित भाषांतर केलय. यावरुनच शेक्सपिअरच्या लेखनाची महती विषद होतेय. कारण त्या- त्या भाषेत लिहिण्यासाठी विषय नाहीत असं नाही पण शेक्सपिअरनं विषयच असे काही हाताळलेत ते आज पाचशे वर्षानंतरही अजरामर आहेत. त्याचा विषय काय किंवा आशय काय आजही जिवंत आहेत. ते कालबाह्य झालेले नाहीत. हीच त्याच्या लेखनाची ताकद म्हणावी लागेल.

इंग्रजी वांड्मयाला भरभरुन दिलेल्या या लेखकाच्या बाबतीत फारशी माहिती मात्र उपलब्ध नाही. अगदी त्याच्या जन्मतारखेचाही घोळ आहेच. एप्रिल महिन्यातील २३ किंवा २६ तारखेला त्याचा जन्म झाला असावा असं मानलं जातय. तर मृत्युच्या तारखेबद्लही असंच म्हटलं जातय. काही ठिकाणी तर शेक्सपिअरची जन्म तारिख आणि मृत्युची तारीखही एकाच दिवशी येते म्हणजे २३ एप्रिल असाही एका मतप्रवाह आहे. तर त्याच्या जीवनाबद्दलही अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शेक्सपिअरनं त्याच्यापेक्षा वयानं ८ वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं होतं. तो त्याच्या कौटुंबिक जीवनात सुखी नव्हता. यापासून त्याच्या संबंधांबद्दलही बरचं काही लिहलं गेलय. पण त्याच्या इतर बाबींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यानं इंग्रजी वांड्मयाला दिलेली अमुल्य देणगी ही लाख मोलाची आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रीत करुयात...विल्यम शेक्सपिअरचा जन्म इंग्लड मधल्या वारविकशायर परगण्यातील स्ट्रॅटफोर्ड-ऑन- अँव्हान या गावात १५६४ साली झाला. त्यानंतर तो इंग्लडला गेला. तिथच त्यानं आपलं बस्तान बसवलं आणि नाटकात मोठं नाव कमावलं. त्यानंतर तो आपल्या गावी परत आला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यानं आपलं गाव स्ट्रॅटफोर्ड या गावातच घालवले. १६१६ साली शेक्सपिअरचं निधन झालं. शेक्सपिअरच्या जन्मतारखेचा जसा वाद आहे तसाच त्याचा फोटो किंवा पोर्ट्रेटचाही आहे. त्याचा खरा फोटो कोणता हे आजही गुलदस्त्यातच आहे. त्याच्या केलेल्या वर्णावरुन काही पोर्ट्रेट बनवलीत त्यालाच मान्यता देण्यात आलीय. एप्रिलचा महिना आहे आणि शेक्सपिअरचा विषय आठवला म्हणून इंग्रजीचा एक विद्यार्थी या नात्याना त्याच्यावर काही लिहिता येईल का असा विचार मनात चमकून गेला आणि वाटलं शेक्सपिअरवर काहीही हलकं फुलकं लिहूयात म्हणून हा प्रपंच केला. बाकी शेक्सपिअवर लिहायचं म्हटलं तर दोन चार पानच काय अखंडपणे लिहित राहावं एवढा मोठा त्याच्या लेखनाचा पसारा आहे. त्यावर कितीही लिहिलं तर कमीच आहे. पण केवळ शेक्सपिअर कोण होता एवढं तर जाता जाता लक्षात यावं, त्याचं स्मरण व्हावा म्हणून अगदी थोडक्यात या चारोळ्या लिहिलेल्या आहेत..

Friday, April 20, 2012

शिक्षण संस्थातील सावळा गोंधळ

शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून राज्य सरकारच्या करोडो रुपयांवर डल्ला मारणा-या शिक्षण संस्थावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसच अशा संस्थांमधल्या शिक्षकांनाही नोकरीवरुन कमी करणार आहे. हा मात्र त्या शिक्षकांवर अन्याय आहे. कारण शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून सरकारचे पैसे लाटणारे संस्थाचालक आहेत. तर अशा शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारच्या शिक्षण खात्याचीच आहे. त्यांनी आत्तापर्यंत ह्या प्रकाराकडे लक्ष का दिलं नाही आणि त्यांना त्याची माहिती होती तर खरे गुन्हेगार ते अधिकारी आणि संस्थाचालक आहेत. त्यांच्यात बिचा-या शिक्षकांवर अन्याय का..? संबंधित अधिका-याला निलंबित केलं जाणाराय असं सरकार म्हणत आहे. पण त्यांनीच ह्या प्रकाराला रोखलं नाही तर त्याची शिक्षा त्या शिक्षकांना का..त्यामुळे सरकारचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा ईलाज भयंकर असाच म्हणावं लागणाराय..

आता मुळ विषयाकडे वळुयात...राज्यात ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. अशा हजारो संस्था राज्य़ात आहेत. अशा संस्थामध्ये मागच्या सहा महिन्यांपूर्वी पटपडताळणी घेण्यात आली. म्हणजे विद्यार्थांची संख्या मोजण्यात आली, तेंव्हा असं लक्षात आलं की कागदोपत्री जेवढी विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे त्यापेक्षा कितीतरी कमी संख्या वर्गात दिसून आली. हा प्रकार राज्यात अनेक भागातल्या संस्थामध्ये आढळून आला. त्याची सुरुवात नांदेड जिल्ह्यातून करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. तीच पटपडताळणी राज्याच्या सर्व शाळांमध्ये राबवण्यात आली आणि संस्थाचालकांचं पितळ उघड पडलं. लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यी बोगस निघाले. त्यामुळे अर्थातच या शिक्षण संस्थामध्ये चालत असलेला सावळा गोंधळ लक्षात आला. लिद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवून सरकारचं अनुदान लाटण्याचा धंदा या शाळांमधून होत होता. म्हणून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बोगस विद्यार्थी दाखवणा-या अशा जवळपास १५०० शाळा सापडल्यात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणाराय. पण ती केल्यास त्या शाळेतल्या जवळपास ८ हजार शिक्षकांची नोकरीही जाणाराय. विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणाराय. पण ह्या कारवाईत शिक्षक मात्र विनाकारण भरडला जातोय..ज्या शाळा चालवल्या जातायत त्या सर्रास राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याच आहेत. त्यामुळे तिथं होत असलेल्या ह्या धंद्याला कोणीही आजपर्यंत हात लावला नाही. बोगस विद्यार्थी दाखवून हे संस्थाचालक वर्षाकाठी सरकारला जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा चुना लावत होते असं म्हणतात. आकडे थोड्याफार फरक्यानं कमी अधिक असतील. पण यासर्व प्रकरणात बिचा-या शिक्षकांचा काय दोष ? शाळेत विद्यार्थी जास्त दाखवून तुकड्या वाढवायच्या.. त्याच्या जोरावर शिक्षक भरती करायची आणि सरकारच्या पैशाला चुना लावायचा धंदा संस्था चालकांनी केला. तर त्याची शिक्षा त्या संस्था चालकाला तसच ह्यासर्व प्रकाराकडं दुर्लक्ष करणा-या शिक्षण विभागातल्या अधिकारी कर्मचा-यांना व्हायला हवी. पण त्यापेक्षा शिक्षकांना नोकरीवरुन कमी करणे ही त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आहे. तसच संस्था चालक हे शिक्षक भरती करताना त्यांच्याकडूनही लाखो रुपये घेतात. म्हणजे दोन्ही बाजूनी मालामाल झाला तो संस्थाचालक आणि भरडला जातोय तो शिक्षक.. !! त्यामुळे सरकारनं कारवाई जरुर करावी पण ती संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिका-यांवर शिक्षकांवर नाही...!

Thursday, April 19, 2012

चमत्कारी बाबा लोकांची चलती..

निर्मल बाबा

बाबांची संख्या आणि त्यांचे कारनामे हा काही आपल्याला नवीन विषय नाही..तो बाबा कोणताही असो अगदी गंडेदोरे देऊन गंडवणारा बंगाली बाबा, गल्ली बोळातला बाबा किंवा सत्यसाई बाबा सारखे बाबा..बाबा कोणताही असो त्याच्या लिला हा मात्र चर्चेचा आणि संशोधनाचा विषय होऊन बसलाय. आपल्या देशात अशिक्षित लोकच या अशा बाबांच्या आश्रयाला जातात असं नाही तर फार मोठे लोकही त्यांच्या नादाला लागलेत हे सांगायलाच नको...आता बाबांचा हा विषय निघाला त्याचं कारण मागच्या आठ दहा दिवसात असेच एक बाबा सगळीकडे चर्चेत आलेत. मी ज्या बाबाबद्दल बोलतोय ते आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा नाही बरं का..हे अगोदरच स्पष्ट करतो...ज्या बाबाबद्दल आज मी लिहतोय तो बाबा म्हणजे निर्मल बाबा..आता हा नवीन कोण असा तुम्हाला प्रश्न पडला नसलेच. कारण मागच्या दहा दिवसात सर्वच वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ह्या बाबांबदद्ल बरचं काही ऐकायला-वाचायला मिळत आहे.

हे निर्मल बाबा इतर बाबांप्रमाणे लोकांच्या समस्यांचं निराकरण करतात. त्यांचा भला मोठा भक्त परिवारही आहे आणि अर्थातच परदेशातसुद्धा या निर्मल बाबांच्या लिला पोचलेल्या आहेत. सध्या टीव्हीवर याच बाबांच्या जाहीरातींचा एक मोठा प्रोग्रामही दाखवला जातोय. त्यात काही भक्त बाबांना त्यांच्या समस्यांबद्दल विचारतात तसच त्यांच्या समस्यांचं कसं निराकरण झालं असं सांगणारे भक्तही दाखवले जातायत. साहजिकच त्यांच्या या भुलभलैयांला फसून लाखो लोक त्यांचे भक्त झालेत. पण त्यातून बाबांचं बिग फुटलं..हे बाबा त्यांच्या दरबारात दररोज कोटींची कमाई करतात हेही बाहेर आलंय. त्यांच्या बँक खात्यात दररोज कोटींची माया जमा होत होती. त्यातून बाबांनी जवळपास ३००- ४०० कोटींची माया जमा केल्याचंही समोर आलं. आता त्यांची चौकशी वगैरे करण्याचं घाटत आहे...तो भाग वेगळा..

निर्मलबाबा हे प्रस्थ काय आहे हेही प्रकाशात आलं. तर ते महाशय पूर्वी विटभट्टी चालवायचे. त्यात त्यांना फारसं काही करता आलं नाही. त्यानंतर त्यांनी कापड विक्रीचं दुकानही थाटलं पण त्यातही त्यांना काही जमलं नाही..त्यानंतर असेच काही उद्योग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना काही यश आलं नाही..त्यानंतर ते काही वर्षे गायबच होते. त्यानंतर अवतरले ते थेट निर्मलबाबा म्हणूनच...याच निर्मल बाबांनी भक्तांकडून जमा झालेल्या पैशातून स्वतासाठी मोठंमोठी घरं बांधून घेतली. मोठा दरबार बांधला एवढी मोठी माया त्यांनी गोळा केलीय..

निर्मलबाबा सारखे असे अनेक बाबा आपण पाहतो. त्यांच्या चमत्काराच्या कथाही ऐकतो..आणि त्यांनी लोकांनी कसं फसवलं हेही यथावकाश आपल्यासमोर आलेलं आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थीचे सत्यसाई बाबा हेही असंच मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या भक्तांच्या यादीत तर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक व्हीआयपींचा भरणा होता. ते हयात होते तेव्हांही वादाच्या भोव-यात सापडले होतेच पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या महालात सापडलेल्या किंमती वस्तू, रोकड हे ऐकूनच थक्क झालो..एवढी माया बाबालोकांना त्यांचे भक्त कशी काय देतात हाच मुळ प्रश्न आहे. त्यातच स्वतःला शिक्षीत, समजदार म्हणवली जाणारी मंडळीही त्यांचे भक्त होतात हे कशाचं द्योतक आहे. ह्याचा विचार व्हायला हवा.. पण आजही या बांबाचं प्रस्थ समाजात दिसतं त्यावरुन आपण अजूनही काही शिकलेलो नाही असचं वाटतं..

Friday, April 6, 2012

सकाळचा नाष्टा- सांबर इडली

मागच्या अनेक दिवासापासून खाद्यपदार्थांवर काहीतरी लिहावं असं वाटत होतं. माझ्या मित्रांनीही मला काही विशेष भागातल्या मेनूबद्दल लिहण्याची विनंती केली होती. पण कोणत्या पदार्थावर लिहावं याचा विचार करत होतो. अनेक पदार्थ डोळ्यासमोरुन जात होते. आणि त्या पदार्थांची जशी आठवण होत होती तशी जिभ गप्प बसत नव्हती. काही पदार्थांचं नाव घेतलं तरी लाळ टपकायला सुरुवात होते..त्या सर्व पदार्थांबद्दल लिहण्याचा माझा प्रयत्न आहे..पण आज नेहमीच्याच एका पदार्थावर लिहण्याचा विचार केला..काल सकाळीच एका हॉटेलमध्ये इडली सांबरवर ताव मारला. मस्त मजा आली..मग म्हटलं इटली सांबर किंवा वडा सांबरवरच लिहूयात की..
इडली सांबर

हैदराबादमध्ये असल्यामुळे सकाळच्या नाष्ट्यात काय खायचं हा प्रश्न फारसा सतावत नाही..हॉटेलमधे नाष्टा करायचा तर कुठंही जा..इडली, वडा, उथ्थपा, दोसा आपली वाटच बघत असतात. त्यामुळे निवडीला तसा फारसा वावच नसतो..अगदी छोट्याशा टपरीपासून मोठ्या स्टार रेस्टॉरंटमध्ये जा हेच पदार्थ आपली वाट पहात असतात.. बाकी आपल्याकडे नाष्टा म्हटलं तरी काय खाऊ एवढे पदार्थ निवडीसाठी समोर येतात..पण हैदराबाद काय आणि एकूणच दक्षिण भारत काय..आपल्याला याच पदार्थांतून निवड करावी लागते..मागच्या अनेक वर्षांपासून हैदराबादमध्ये असल्यामुळे मलाही आता त्याची सवय झालीय. पण मी दोसा किंवा उथ्थपा यापेक्षा इडली सांबर, सांबर इडली किंवा वडा सांबर आणि सांबर इडली यालाच पहिली पसंती देतो..मला ते आवडतात. डोसा आवडत नाही असं नाही पण एकूण मसालेदार पदार्थ किंवा इतर चव चाखण्यापेक्षा इडली किंवा वडा फारच उत्तम..! शिवाय त्यासाठी वाट पहात बसावी लागत नाही. नाहीतर डोसा उथ्थपा खायचा म्हटलं तर गर्दीच्या हॉटेलमध्ये तर वेंटीग करावचं लागतं..! भले ती सकाळची वेळ असली तरीही...आणि ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा लवकर नाही आला तर नाष्ट्याचा मूडही कमी होत जातो. त्यापेक्षा इडलीच बरी..! त्याशिवाय मला इडली ही सोलापूरला असल्यापासूनच आवडते..त्याबरोबर मिळणारी चटणी आणि सांबर तर विचारूच नका..

सांबर इडली

सोलापूरात असतानाही नाष्ट्याला इडलीची ऑर्डर आवर्जून द्यायचो..आमच्या सोलापूरातही काही हॉटेल्समध्ये इडलीबरोबरची चटणी आणि सांबर मस्तच मिळतं...! मी तर इडली म्हटलं की त्याबरोबर दोन वाट्या गरम सांबर तर ओरपायचोच..मस्त वाटायचं.. आहाहाहाहा...!!! खरं तर इटलीबरोबरच सांबर आणि चटणी जर झकास असेल तर मग काय विचारायलाच नको..! त्यामुळे पहिली पसंती इडली सांबरच...! सांबर इडली हा प्रकारही त्यातलाच.. मोठ्या कटो-यात दोन तीन इडल्या आणि त्यावर गरमा गरम सांबर..! अगदी त्या सांबरमध्ये इडली मनसोक्त डुबलेली असते.. सांबरमध्ये डुबलेल्या इडलीचा एक गरम बाईट घेत त्याबरोबर चटणीची चव चाखली की आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात..व्वा ! मस्त रे...!!!

इडलीबरोबरच वडा किंवा वडा-सांबर हा दुसरा पदार्थ नाष्ट्याला घ्यायला काहीच हरकत नाही..मला स्वतःला वडा फारसा आवडत नाही..पण सांबर- वडा मिळाला तर मात्र नाही म्हणायला होतच नाही..वाटतं एक प्लेट ट्राय करुयातच.. मग काय, दे रे एक प्लेट सांबर वडा, म्हणून ऑर्डर दिलीच म्हणून समजा...सांबरमध्ये डुंबलेला तो वडा आणि मस्त लालसर रंग आलेलं सांबर पाहताच तोंडाला पाणी सुटतं..मग तीन चार मिनटातच झाली की प्लेट फस्त...! खरं तर इडली काय आणि वडा काय माझा यातला विक पाँईट आहे तो म्हणजे सांबर...आणि त्याबरोबर मिळणारी चटणी..! ज्या हॉटेलमध्ये सांबर आणि चटणी उत्तम तिथल्या सांबर इडलीवर हात साफ केलाच म्हणून समजा...
सांबर वडा

इडली आणि वडा हे दोन्ही पदार्थ पचायला फारसे अवघड नाहीत..त्यातच ते मिळतातही सगळीकडे..आता हैदराबादच कशाला आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरातून चौका चौकात इडली सांबर, वडा सांबर, उथ्थपा, दोसा मिळतोच की..आणि त्यात जर हे हॉटेल साऊथ इंडियन मालकाचं असेल तर खुशाल जा आणि सकाळी सकाळी गरम सांबरबरोबर वडा किंवा इडलीवर हात साफ करून बघा..! मस्त मज्जा येईलं..! मग होऊन जाऊयात सांबर इडली...

Thursday, April 5, 2012

शूभम शिर्के अपहरण आणि हत्येनंतर....


पिंपरी चिंचवडमधल्या शूभम शिर्के या शाळकरी मुलाचं अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची बातमी दोन दिवसापूर्वी आली. त्यातच हा सगळा प्रकार त्याच्या वर्गातल्या सहकारी मित्रांनी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याचं समजल्यावर खूपच वाईट वाटलं. ज्याचं अवघं आयुष्य शिल्लक आहे. अजून खेळण्याचं त्याचं वय, उमलण्याच्या अगोदरच फुल चिरडून टाकावं अशी ही घटना तर दुसरीकडं हे कृत्य करणारेही त्याच्याच वयाचे त्याच्याच वर्गातली मुलं असल्याचं समजल्यावर तर डोक्यात ना ना विचार आले. शुभमचं अपहरण हे त्यांनी ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी केलं. त्यातले १५ हजार रुपये त्याच्या वडीलांनी त्या मुलांना दिलं. पण ते देताना त्यांनी ज्या मोटारसायकलचा वापर केला त्याची संपूर्ण माहिती शूभमच्या वडलांनी पोलिसांना सांगितली. त्यामुळे हे गुन्हेगार लगेच हाताला लागले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. हा सगळा प्रकार उजेडात आला तेंव्हा आणखी एक गोष्ट समजली ती म्हणजे त्या मुलांनी हा सगळा प्रकार टीव्हीवरची सीआयडी मालिका पाहून केल्याचं त्या मुलांनी पोलिसांना सांगितलं.

हा सगळा प्रकार डोकं सुन्न करणारा आहे. दहावीच्या वर्गातली ही मुलं ५० हजार रुपयांसाठी आपल्याच एका मित्राचं अपहरण करतात काय आणि त्याचा खून करतात काय हे सगळच विचार करण्याच्या पलीकडे गेलय ! ज्या मुलांनी हा सगळा प्रताप केलाय़ त्यांचं वयही काही एवढा मोठा गुन्हा करण्याचं नक्कीच नाही. पण ही मुलं या थराला का गेली असावीत याचा गांभिर्यानं विचार करावा लागणाराय. त्या मुलांना अपहरणासारखी कल्पना सुचावी त्यातून खून करण्यापर्यंत त्यांची मजल जावी हे सगळंच चित्रपटातल्या कथेसारखं आहे. आता शुभम तर या जगात नाही, त्याच्या आई वडीलांवर दुखःचा डोंगर कोसळलाय. तर दुसरीकडं ज्या मुलांनी हा प्रकार केलाय त्यांच्या आई वडीलांची स्थितीही अशीच आहे.  आपली मुलं अपहरण आणि खूनाच्या गुन्ह्यात अडकलेली आहेत हे कोणत्याही पालकांना  शरमेनं मान खाली घालायला लावणाराच आहे. त्या पालकांना समाजात जगताना गुन्हा न करताही अपराध्यासारखं वाटत राहणाराय. कारण त्यांनाही एकप्रकारे न केलेल्या गुन्ह्याची ही शिक्षाच नाही काय..

ज्या मुलांनी हे अघोरी प्रताप केलाय त्यांचं वय पाहता त्यांना कायद्याच्या चौकटीत कदाचित मोठी शिक्षा होणार नाही. कारण अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या पळवाटातून कदाचित त्यांची सुटका होईलही ! पण त्यातून हा प्रश्न सुटणारा नाही..! या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण झालेत..??? ही मुलं खेळण्या-बागडण्याच्या या वयात एवढ्या मोठ्या गुन्ह्याकडे वळलीच कशी अशा प्रश्न उरतोच. त्यामुळे एकट्या शुभम किंवा हा गुन्हा करणा-या त्या दोन मुलांपुरता हा विषय न राहता सगळ्या पालकांना विचार करायला लावणाराय. तर शूभमच्या विषयालाच धरुन आणखी एक प्रकार मला आठवला तो म्हणजे दोन महिन्यापूर्वीच चेन्नईत एका नववीच्या मुलानं त्याच्या वर्ग शिक्षिकेचा वर्गातच चाकूनं भोसकून खून केला.त्या शिक्षिकेचा गुन्हा एवढाच होता की तो मुलगा अभ्यासात ढ होता. त्यावरुन त्या नेहमी त्याला रागावत आणि घटनेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी त्या मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रारही केली होती. त्याचाच राग मनात धरुन त्या मुलानं आपल्याच वर्गशिक्षिकेचा वर्गातच खून केला..!
पिंपरी चिंचवड मधली घटना आणि चेन्नईतली घटना यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे ह्या दोन्ही प्रकरणात खून करणारी मुलं ही शाळकरी आहेत. म्हणूनच डोक्यात पुन्हा पुन्हा प्रश्न उभा राहतोय तो हा की, ही लहान, सुंदर मुलं आयुष्याचा पाया बांधतानाच खूनासारख्या अत्यंत घृणास्पद प्रकाराकडं झुकतातच कशी. ? एवढा मोठा आणि एखाद्याचं जीवनच संपवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात का घोळत असावा ? ही गुन्हेगारी प्रवृतीची बिजं त्यांच्या मनात या वयात कशी काय रुजली..? त्यांना त्याची भीती का वाटली नसावी ? आणि खून केल्यानंतर होणारी शिक्षा हे आपलं आयुष्य संपवणारी असते ह्यापैकी त्यांना कशाचीच भिती कशी काय वाटली नसावी..? असे अनेक प्रश्न मनात येतात. तर दुसरीकडं ही मुलं या थराला गेली त्याचा दोष कुणाचा असाही प्रश्न निर्माण होतोच..?

लहान मुलं घडत असताना त्यांच्यावर आजूबाजूच्या परिसराचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कारच व्हायला हवेत. पण समाज बदलत चाललाय, शहरीकरण वाढलय. नोकरीच्या निमित्तानं आई वडील दोघेही घराबाहेर पडतात. तर दुसरीकडं विभक्त कुटुंब पद्धतीमुळं घरं लहान झालीत. घरात या मुलांवर संस्कार करायलाच कोणी नाही. त्यामुळं अशी मुलं टीव्ही, इंटरनेट यासारख्या माध्यमाकडं जास्त आकर्षित होताना दिसतायत. त्यातूनच या मुलांमध्ये एकलकोंडेपणाही घर करु पहातोय. त्यांच्यावर घरातले चांगले संस्कार होण्याऐवजी टीव्हीचे संस्कार होऊ लागलेत. काय चूक आणि काय बरोबर, काय करावं आणि काय करु नये, हे सांगणारी माणसचं आज घरात नाहीत. त्याचा दोष ना त्या मुलांचा ना त्या पालकांचा.. त्यातून मुलं काही अनुकरण करण्याच्या फंदात फसतात आणि त्यातून अपहरण आणि खूनासारखे गंभीर प्रकार या मुलांच्या हातून होत आहेत.त्यातून मार्ग काढणं सोप्प नाही. अशा या बदलत्या सामाजिक परिस्थीतीत पालकांची अवस्थाही बिकट झालीय आणि आपण सर्वजण खूपच अवघड वळणावर येऊन ठेपलोय.  

हा सगळा प्रकार झाल्यानंतर पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे असा एक मतप्रवाह बाहेर आला. कारण या लहान मुलांना घडवण्याची पहिली जबाबदारी ही आई वडीलांचीच आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ही मोठी समस्या ऊभी ठाकलीय. एकीकडे महागाईतून जगणं मुश्किल होत आहे. दररोजच्या समस्यांतून मार्ग काढत काढत जगण्यासाठी धडपडणा-या  पालकांची परिस्थीती असे प्रकार पाहून आणखीनच दयनिय होतेय. ही एक मोठी कौटुंबिक आणि सामाजिक समस्या आपल्या समाजासमोर आ वासून ऊभी आहे. त्यातून मार्ग काढताना अर्थातच आपल्या सर्वांची दमछाक होतेय आणि आपल्यासमोर काय वाढून ठेवलय याचा विचार सारखा मनात घोळत राहतोय.
शूभम अपहरण आणि खून प्रकरणानंतर पालकांच्या समस्येत वाढ झालीय. ती म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष देण्याची ! आपली मुलं काय करतात ? कोणाबरोबर फिरतात ? शाळेत ते काय करतात ? त्याची मित्रमंडळी कोण कोण आहेत ? तो शाळेनंतर काय करतो ? यासह सर्वच बाबींकडे लक्ष द्यावं लागणाराय. कामाचा कितीही व्याप असला तरी मुलाच्या आणि आपल्याही भवितव्यासाठी आपल्याला मुलं आणि कुटुंबासाठी वेळ द्यावाच लागणाराय…! मुलांबरोबर दररोज थोडातरी वेळ देऊन त्याच्याशी बोलावं लागणाराय. फक्त मुलांच्या सर्व भौतिक गरजा भागवून चालणार नाही तर त्यांच्या मानसिक गरजाही विचारात घ्यावा लागणारायत. थोडासा वेळ मुलांना देऊन त्यांचा पालक नव्हे तर मित्र बनण्याचा आपण प्रयत्न करावा. काय सांगावं यातूनच कदाचित उद्याचा एखादा धोका टाळता आला तर... !!!