Sunday, February 19, 2012

हा बाळासाहेबांचाच करिश्मा..









मुंबई, ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला..मुंबईत तर १६ वर्ष युतीची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी युतीला संधी मिळालीय..यावेळीही शिवसेनेला निवडणूक सोपी नव्हती..खरच सोपी नव्हती..मनसेच्या इंजिनाचा वाढलेला वेग आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी यामुळे शिवसेनेला निवडणुकीत दगाफटका होण्याची भाकितं वर्तवली जात होती..कदाचित जास्त जागा मिळाल्या तरी राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी हात पसरावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ही सगळी भाकितं खोटी ठरवत शिवसेना भाजप रिपाइं युतीचा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर फडकलाच...

निवडणुकीपूर्वीचं वातावरण लक्षात घेवून शिवसेनेनं रामदास आठवलेंना हाक दिली आणि राजकीय अडगळीत पडलेल्या आठवलेंनाही दुसरं मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं. या निवडणुकीच्या निकालात रिपाइंचे दोनच उमेदवार निवडून आले असले तरी दलित समाजाची जी मतं आठवलेंच्या पाठिशी आहेत त्या मताचं दान यावेळी युतीच्या पारड्यात पडल्यामुळे युतीचा अवघड विजय सोपा झाला.. त्यामुळेच मनसेचा उधळलेला वारु जरी जोरात असला तरी त्याचा दगाफटका युतीनं आठवलेंच्या मदतीनं थोपवला असं म्हणता येईलं, किंबहुना मनसेमुळे होणारा धोका थोपवण्यासाठी आठवलेंच्या मतांचा त्यांना फायदा झाला.. सेनेची आकडेवारी खाली आली असली तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अडचण येणार नाही..तर दुसरीकडं दोन्ही काँग्रेसही युतीचा झेंडा खाली खेचण्यासाठी एकत्र मैदानात उतरले पण त्यांना ते जमलं नाही..उलट मागच्यावेळी स्वतंत्र लढून जेवढ्या जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या त्याही त्यांना राखता आल्या नाहीत...

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर त्याची अनेक कारणं देता येतील..मुंबईत नेहमीप्रमाणं यावेळीही मतदानानं ५० टक्क्यांचा आकडाही पार केला नाही..त्यामुळे ज्यांनी मतदान केलं ते अर्थातच युतीला फायद्याचं झालं..लोकांना बदल हवा असेल तर मतदानही तेवढ्याच जास्त प्रमाणात होणं अपेक्षीत होतं. त्यामुळेच की काय कमी मतदान हे युतीच्या पथ्यावरच पडलं..दुसरं असं की ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या निवडणुकीनंतर संपेल अशी भविष्यवाणी केली.राजकीयदृष्ट्या ही टीका शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबणं साहजित होतं..तोच धागा शिवसेनेनं पकडला आणि पुन्हा भावनिक मुद्दा पुढं आला..तर दुसरीकडं शिवसेनेवर ४० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तोही विरोधकांवर बुमरॅग होऊन उलटला..तसच काँग्रेसला अंतर्गत वादही यश मिळवण्यात अडथळा ठरला..प्रचाराचं नियोजन नाही की सर्व नेत्यांना एकत्र करता आलं नाही. याचा परिणाम झालाच..कृपाशंकरसिंग यांनी तर मुंबईची सत्ता खेचून आणतोच आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतोच अशा आविर्भात सगळी सुत्रं हाती घेतली..कदाचित ती नारायण राणे, विलासराव, गुरुदास कामत यासारख्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नसावं.

तर दुसरीकडं परप्रांतियांच्या आक्रमणाचा मुद्दा, भूमिपुत्रावरचा अन्याय या विषयावर स्थानिक मतं एकत्र होतात. तर काँग्रेससारखे सत्ताधारी पक्ष त्यांकडं दुर्लक्ष करतात..कृपाशंकरसिंग, संजय निरुपम, राजहंससिंह, यासारखे उत्तर भारतीय नेते मुजोर होत आहेत. त्याचा रागही स्थानिक लोकांच्या मनात राहतोच..उत्तर भारतातून पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी आता स्थानिकांना गुरकावतायत..!! तो संजय निरुपउद्योगी ( निरुपम ) मुंबई बंद करण्याची भाषा करतो..!! कुठून आला त्याला हा माज..? कोण तो उपटसुंभ.. ? कुणाच्या जोरावर मुंबई बंद करण्याची भाषा करतो तो..? तर दुसरीकडं म्हशीच्या गोठ्यात काम करणारा तो कृपाशंकर म्हशीवाला...!! कोकणात शंभर एकरापेक्षा जास्त जागा घेतो..उत्तर भारतीयांना एकत्र करुन स्थानिकांना डावलतो. हे मुंबईतल्या भूमिपुत्रांनी का सहन करायचं..? एकच उदाहरण देतो..मुंबई काँग्रेसचा अद्यक्ष असणा-या कृपाशंकरसिंगांची उमेदवार यादी पहा..१६९ जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातल्या फक्त ८९ जागा मराठी लोकांना आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना! हे कसं सहन करायचं..? याच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतला गटनेता राजहंससिंह पालिकेतला कारभार हिंदीत चालवा म्हणून आग्रह धरतो..! हे सर्व मराठी माणूस सहन कसं करेल...? शिवसेना भाजपा युतीचा महापालिकेतला कारभार फार काय चांगला आहे असा त्याचा भाग नाही..आणि त्यांनी काही "करुन दाखवलं" म्हणून त्यांची सत्ता आली असंही म्हणता येत नाही..पण " त्या उप-यांच्या" हाती सत्ता देण्यापेक्षा आपली माणसं का नको हे गणितही त्यामागं आहे..

कारणं काहीही असो..! देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्ष सत्तेसाठी डोळा ठेवून असतात.२१ हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे या मुंबई माहनगरपालिकेचं..! केंद्रातूनही मोठी आर्थिक मदत मिळत असते मुंबईला..!त्यामुळे ही सोन्याची कोंबडी आपल्या पक्षाकडे असावी यासाठी सर्व पक्ष अगदी आसुसलेले असतात...

मुंबईत आवाज कुणाचा म्हणून विचारण्याचं धाडसही नव्हतं तेव्हाही मुंबई शिवसेनेकडेच होती आणि आता मुंबईतला सेनेचा आवाज कमी झाली असली तरीही मुंबई शिवसेनेचीच आहे..आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंततरी ती शिवसेनेचीच राहिली हे सांगण्यासाठी आता कोणा ज्योतिष्याची गरज नाही...पण या निकालामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर मानानं डौलत राहतोय ह्यातूनच ह्या फालतू नेत्यांनी काय तो धडा घ्यावा हेच या निकालाच्यानिमित्तानं सांगणं आहे...!!!!

जय महाराष्ट्र..!!


Tuesday, February 14, 2012

लव्ह डे..तुमचा, आमचा आणि सर्वांचा

आज १४ फेब्रुवारी ..तरुणाईचा दिवस..प्रेम करणा-यांचा दिवस...पण आज प्रेमाच्या नावावर जे काही चाललय ते पहावत नाही..सगळेच काही तसे आहेत असं नाही पण जास्तीत जास्त प्रकरणात मात्र प्रेमाच्या नावाखाली काहीही चाललय असंच आहे..म्हटलं चला आज याच विषयावर काहीतरी लिहूयात..

१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला...? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी...! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको...

आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय...? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही...

प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय...त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार...हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते...

आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती...

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची...

तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा...आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर....

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..

बसं एवढचं...

प्रेमाच्या बदलेल्या या व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा केलेला आहे एक प्रयत्न आहे..तो काहींना आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे...बाकी सगळं सेमच आहे..

Sunday, February 12, 2012

बाळासाहेब ठाकरे-तोच जोश तोच उत्साह

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शनिवारी ठाण्यातल्या सेंट्रल मैदानावर भव्य जाहीर सभा झाली. या सभेतूनच त्यांनी महापालिकेच्या धुळवडीत ठाकरी तोफ डागली..बाळासाहेबांचं वय आत्ता ८५ वर्षावर गेलय. त्यातच त्यांची प्रकृती साथ देत नाही. त्यामुळे ते शक्यतो सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत.. पण शनिवारच्या सभेतला त्यांचा जोश पाहून बाळासाहेब अजून थकलेत असं त्यांच्या आवाजावरुनतरी वाटलं नाही. त्यांच्या आवाजात तोच ठाकरीपणा ठासून भरलेला दिसला.. बाळासाहेबांची सभा म्हणजे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी संजीवनीच असते..खरं तर त्यांनी या वयात प्रचार सभांत भाग घेणं योग्य नाही.. पण त्यांच्या एका जाहीर सभेनंही निवडणुकीतलं गणित बदलतं, म्हणूनच त्यांची सभा ठाणे आणि मुंबईसाठी फारच महत्वाची ठरते.. सभेला नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती हे सांगायलाच नको..बाळासाहेबांचं त्यांच्या शिवसैनिकांशी जे काही नातं जोडलं गेलेलं आहे त्याचाच प्रयत्न पुन्हा ठाण्याच्या सभेत आला..

बाळासाहेब ठाकरेंची सभा म्हणजे कुणा कुणावर त्यांची तोफ धडाडणार हे ऐकणं शिवसैनिकांसह विरोधीपक्ष तसच पत्रकारांसाठीही पर्वणीच असतं..यावेळेही त्यांची तोफ धडाडली..त्यांचं नेहमीचं गि-हाईक म्हणजे शरद पवार आणि नारायण राणे.. त्या दोघांवरही त्यांनी तोफ डागलीच..! तसच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही त्यांनी टोले लगावले. या भाषणात त्यांनी खास करुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृपाशंकरसिंग यांच्यावरही आसूड ओढले..राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली पण यावेळचा त्यांचा सुर फारसा कडवट नव्हता..त्यांच्या भाषणातून ते सहसा कोणाला सोडत नाहीत..त्यामुळे राज ठाकरे सुटणार नव्हतेच पण त्यांच्या टीकेची धार तेवढी तिखट नव्हती जेवढी अजित पवार, कृपाशंकरसिंग आणि नारायण राणेंच्या बाबतीत होती.. कदाचित मुंबई महानगरपालिकेत जर सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ आली तर मनसे त्यांना तारून नेऊ शकेल असाही त्यामागचा होरा असू शकतो..कारण यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानं ही निवडणूक शिवसेनेला जड जाण्याची शक्यताय..त्यामुळेच त्यांनी राज ठाकरेंवर फारसे आसूड मारले नसावेत असं वाटतं..

यावेळच्या सभेचं एक वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर रामदास आठवले होते पण गोपीनाथ मुंडे दिसले नाहीत..शिवशक्ती भिमशक्ती एकत्र आणण्यात मुंडेचा मोठा वाटा आहे..पण त्यांची गैरहजेरी अनेक शंका उपस्थित करुन गेली..बाकी बाळासाहेबांचं भाषण जरी त्यांच्य़ा ९० च्या दशकातली आठवण करुन देणारं नसलं तरी वयोमानानुसार त्यांच्या भाषणानं शिवसैनिकांमधे उत्साह संचारलेला असणारच..

मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचा प्राणवायू ( धनशक्ती ) असल्यानं ती हातून जाऊ देणं त्यांना परवडणारं नाही. म्हणूनच बाळासाहेबांच्या भिमटोल्यानं या दोन महापालिकांमध्ये भगवा फडकवण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच बाळासाहेबांना त्यांनी प्रचारात उतरवलं..मागच्या तीन वर्षापूर्वी त्यांची जेंव्हा ठाण्यात सभा झाली होती तेव्हा बाळासाहेबांची प्रकृती खूपच खालावलेली होती..पण शनिवारचे बाळासाहेब हे पूर्ण जोशात होते..त्यांचा हा जोशच शिवसेनेला या महापालिकेत लढण्यास ऊर्जा मिळवून देईलं यात शंकाच नाही..

Tuesday, February 7, 2012

झेडपीचं ईलेक्शन आणि गमती जमती..
















जिल्हा परिषदेसाठी सात तारखेला झालेलं मतदान नेहमीप्रमाणे किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडलं. काही ठिकाणी राजकीय कार्यकत्यांची बाचाबाची सोडली तर फारसा मोठा प्रकार घडला नाही. हेच या मतदानाच्या दिवसाचं वैशिष्ट..खरं तर गावाकडचं ईलेक्शन म्हटलं की हाणामाऱ्या या आल्याच..पण त्या फारशा दखल घ्याव्या एवढ्या मोठ्या प्रमाणात यावेळी काही दिसल्या नाहीत. बिहार आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीशी तुलना केली तर किरकोळ म्हणजे खरचं किरकोळ घटना घडल्या...याचा अर्थ सर्वप्रक्रिया शांततेत पार पडली असं नाही...गावाकडच्या या निवडणुकीतही सध्या पैशाचा पाऊस पडतोय हे सांगायलाच नको..! दारु वाटप, पैसे वाटप हे प्रकार नेहमीप्रमाणं झालेच..! त्यातच काही उमेदवारांना माघार घेण्यासाठी आमिष दाखवण्यात आलच...कोल्हापूरातील एका मंत्र्यांच्या मुलाला झेडपीवर निवडून जायचं म्हणून त्यांनी तन-मन-धन या सर्वांचा वापर केला..त्याच्या विरोधात उभा असलेल्या एका उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल वीस लाखांची ऑफर देण्यात आल्याची चर्चा कोल्हापूरातल्या गल्लीबोळात सुरुय. मग जर एका उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी वीस लाखांची ऑफर दिली जात असेल तर त्या निवडणुकीसाठी या मंत्रीपुत्रानं केवढा खर्च केला असेल याची आकडेमोड न केलेलीच बरी..! म्हणजे झेडपीच्या एका जागेसाठी एक-दोन कोटीचा तर चुराडा हे गब्बर उमेदवार करत असतील असं म्हणायला हवं..त्यावरुन अंदाज करायचा म्हटलं तर झेडपी आणि पंचायत समित्यांसाठी यावेळी २१ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते... प्रत्येक उमेदवारानं एक कोटी नाही तरी किमान २५ ते ३० लाख रुपये तरी खर्च केला असा सरासरी अंदाज केला तरी अंदाजे सहा-सातशे कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला असं म्हणता येईलं. सरकारी यंत्रणेचा झालेला खर्च वेगळाच..! या सर्वांची गोळाबेरीज केली तर एक हजार कोटींच्या घरात हा आकडा जाऊ शकतो.. तरी यात विजयी झाल्यानंतरच्या मिरवणुका आणि विजयी पार्ट्यांचा खर्च धरलेला नाही.. झेडपीची ही अवस्था तर मग विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांचा अंदाज करुनच आपल्या पोटात आकडा यायचा.. हा झाला निवडणुकीत केल्या जायच्या खर्चाचा विषय..

दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो ईव्हीएमच..मागच्या काही वर्षापासून आपल्याकडे मतदानासाठी ईव्हीएम चा वापर केला जातोय..पेपरच्या मतदारयाद्या जाऊन त्यांच्याजागी ह्या ईव्हीएम आल्यात. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर निवडणूक आयोगानं टाकलेलं हे महत्वाचं पाऊलं..पण या ईव्हीएमवर सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात येत आहेत. या मशिन्समध्ये छे़डछाड करता येते हेही काही तंत्रज्ञांनी दाखून दिलय. पण निवडणूक आयोग किंवा सरकार ते मानायला तयार नाही..हे ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडतातच तो भाग वेगळा... पण आज झालेल्या या झेडपीच्या मतदानात कोल्हापूरात वेगळाच घोटाळा झाला.. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या मतदारसंघात एका मशिनचं कोणतही बटन दाबा, मतदान थेट घड्याळ्यालाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच पडायचं..तीन चारशे मतदान झाल्यानंतर ही बाब लक्षात आली, त्यानंतर ते ईव्हीएम बदलण्यात आलं..यावरून तरी हे मतदानयंत्र टॅम्पर प्रुफ आहे असं म्हणता येणार नाही...पेपर मतदार याद्या असताना बुथ बळकावण्याचे प्रकार व्हायचे..चार सहा जणांच्या टोळक्यानं बुथ कॅप्चर करायचं आणि धडाधड शिक्के मारायचे म्हणजे झालं.. तो संबंधित उमेदवार निवडणून आलाच म्हणून समजा..त्यापेक्षाही ईव्हीएमचा हा प्रकार खूपच सोपा आहे..मशिनमध्ये आपल्याला हवं ते सेटींग केलं की सगळं काम तमाम..आणि कोणाला त्याचा पत्ताही लागणार नाही..पण यावेळी हे पितळ उघडं पडलं.... ह्याचं प्रमाण कमी असलं तरी ते होत नाहीत असं म्हणता येत नाही...

याच ईव्हीएम रद्द करुन पूर्वीच्याच बॅलट पेपर वापराव्यात यासाठी दिल्ली हाय कोर्टात मागच्या महिन्यात सुनावणी झाली..हे असले प्रकार थांबावेत यासाठीच सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती..अमेरिका आणि युरोपातसुद्धा अशाप्रकारच्या मशिन्स वापरणं बंद करुन पुन्हा बॅलट पेपरचा वापर केला जात आहे ही बाबही स्वामींनी निदर्शनाला आणून दिली पण ती याचिका फेटाळण्यात आली.. ईव्हीएम बंद करा असा आदेश निवडणूक आयोगाला देता येत नाही असं न्यायालयानं त्यावेळी सांगितलं..पण काही सुधारणा करण्यासाठी तज्ञांनी त्यात लक्ष घालावं असं त्यात सांगण्यात आलं होतं..

झेडपीच्या निवडणुकीत काही गावांनी बहिष्कारही टाकला..पुणे जिल्ह्यातल्या मोसे खोऱ्यातला शिरकोलीच्या गावकऱ्यांनी मतदान केलं नाही.. धरणामुळे विस्थापित झालेल्या या गावात अनेक समस्या आहेत..त्याकडेही मागच्या तीस चाळीस वर्षात कोणत्याही पुढाऱ्याचं लक्ष गेलेलं नाही.. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील पाथरे गावानं विकास कामं होत नाहीत म्हणून मतदान केलं नाही..तर नागपूर जिल्ह्यातलं पेट्टीचुवा गावाचं सरकार दफ्तरी अस्तित्वच नाही म्हणून त्यांनीही मतदानावर बहिष्कार टाकला.. हे गाव नागपूर शहरापासून अवघं ४० किलोमिटरवर आहे.. पण त्याची सरकार दफ्तरी अजून नोंदच नाही.. बीड जिल्ह्यातील कोंमलवाडी आणि नामेवाडी या गावातल्या लोकांनीही मतदानावर बहिष्कार टाकला.. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गापूरच्या गावकऱ्यांनीही मतदान केलं नाही. अशी आणखी काही गावं आहेत त्यांनी विकासापासून वंचित राहिल्यामुळे या मतदानावर बहिष्कार टाकला..त्यांच्याकडे लक्ष द्यायला आपल्या पुढाऱ्यांना वेळ नाही याला काय म्हणायचं..?

ईव्हीएम आणि पैशाचा मुद्दा तर झाला..त्या पुढचा मुद्दा असा आहे की झेडपीच्या या निवडणुकीत शिवसेना भाजप हे पक्ष दिसलेच नाहीत..त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते पण त्यासाठी हाय कमांडकडून फारसं गांभिर्य़ानं पाहिलं गेलं नाही..त्यांची सगळीशक्ती महानगरपालिका निवडणुकीतच एकवटलीय.. मुंबईत तर शिवसेनेचा अस्तित्वाचा प्रश्न आहे..यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलीय तर दुसरीकडं मनसेचं इंजिन तुफान सुटलय. त्यामुळे मुंबईची जहागिरी कायम ठेवण्यातच शिवसेनेची सर्व ताकद पणाला लागलीय..तर इतर महानगरपालिकांमध्ये भाजप सेनेनं थोडाफार जोर लावलाय...मात्र शहरांपुरतेच हे पक्ष मर्यादित आहेत ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालय...हेसुद्धा या झेडपीच्या निवडणुकीचं वैशिष्ट म्हणावं लागेल...अशा रितीनं गावाकडचा काराभारी निवडण्याची प्रक्रिया पार पडली. कोण जिंकतं कोण हारतं ते पुढच्या आठवड्यात कळणारच आहे.. पण गावाकडची ही रणधुमाळी आत्ता पुन्हा पाच वर्षांनंतरच तोपर्यंत रामराम...

Sunday, February 5, 2012

महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी

महाराष्ट्रात सध्या २७ जिल्हा परिषद आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा फड रंगलाय. जिल्हा परिषदांसाठी ७ तारखेला मतदान होतय तर १६ तारखेला महानगरपालिकांसाठी मतदान होतय. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यात निवडणुकीचा माहौल बनलाय. तसच या निवडणुका म्हणजे सर्वच राजकीय पक्षांसाठी २०१४ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल आहे. यातूनच या विधानसभा निवडणुकीचा पाया भक्कम केला जातोय. पण सध्याच्या या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर नजर टाकली तर ह्या निवडणुका म्हणजे खरचं लोकशाहीतल्या आहेत, का तो एक फार्स ठरतोय असं चित्र सर्वत्र दिसतय. .तिकिट वाटपा पासूनच सुरुवात करायची तर सामान्य कार्यकर्त्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असणा-या या निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळलेली दिसत नाही.. सगळ्याच पक्षांनी आपले नातेवाईक आणि पोराबाळांची सोय लावून ठेवलीय. एकाच घरात आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकांची सत्ता एकवटलेली दिसतेय. सर्वच ठिकाणी आपल्याच बगलबच्च्यांना उमेदवारी देण्यात या नेत्यांनी सगळी ऊर्जा खर्ची घातलीय..तर ज्या जागा शिल्लक राहतील त्यावर मग पैसेवाल्यांची वर्णी लागलीय..अपवादानच सामान्य कार्यकर्त्याला लॉटरी लागलीय. त्यातच ५० टक्के महिला आरक्षण लागू झालय. त्या माध्यमातून तरी सामान्य कुटुंबात सत्तेची गंगा पोचेल असं वाटलं होतं. पण तिथंही याच नेत्यांच्या घरच्या बायकांना उमेदवारी देण्यात आलीय. म्हणून उमेदवारीसाठी हाणामारीचे प्रसंग घडले. तर अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता शेवटच्याक्षणी कट करण्यात आला..अशारितीनं आपल्याच घरात उमेदवारी मिळवण्यात हे नेते आघाडीवर राहिले.. मग लोकशाही म्हणजे काय..फक्त मतदानातून निवडुण आलेले हे सरंजामदारच ना..!

उमेदवारीत घराणेशाहीचा विषय झाल्यानंतर जरा प्रचारावर एक नजर टाकून पहा.. कोणत्याही नेत्याच्या भाषणात विकासाचा मुद्दा अगदीच अभावानं आलेला दिसतोय. सत्तेत भागिदार असलेले मित्रपक्षच एकमेकावर चिखलफेक करण्यात एवढे व्यस्त राहिले की, आपण एकाच मंत्रिमंडळात काम करतोय ह्याचं भानही त्यांना राहिलं नाही..नारायण राणे, अजित पवार, आर आर पाटील ह्या नेत्यांनी एकमेकांची जेवढ्या शेलक्या शब्दात उतरवता येईलं तेवढी उतरवली..त्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही भाग घेतला..या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या धुळवडीत विकासाचा प्रश्न मागे पडला. जे काम विरोधीपक्ष करायची आजपर्यतची परंपरा होती ती सत्ताधारी पक्षांनीच पार पाडली..तुमचे उमेदवार जास्त निवडूण येतील का आमचे ही गोळाबेरिज करण्यातच हे दोन्ही काँग्रेसवाले आघाडीवर राहिले..मग कोणत्या मंत्र्यावर खुनाचे गुन्हे आहेत इथंपासून वेंगुर्ल्याचा राडा कोणी केला अशी आव्हानाची भाषा झाली..मग जर एखादा मंत्री खुनासारख्या गुन्ह्यात आहे ह्याची माहिती गृहमंत्र्यांना आहे. तर तसे आरोप करणारे गृहमंत्री कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्यांच्या मांडीला माडी लावून बसतातच कसे ?.. याचं साधं भानही या मंत्रीमहोदयांना नसावं याला काय म्हणावं.?. महाराष्ट्र हा राजकीयदृष्या परिपक्व मानलो जातो. विरोधक सत्ताधा-यांवर टीका करताना कमेरखालची भाषा वापरत नव्हते किंवा टीकेची पातळी एवढ्याखाली घसरलेली नव्हती..एवढचं काय शरद पवार-गोपानीथ मुंडे यांनीही यापूर्वी एकमेकांवर टीका केल्या पण त्यांची भाषा सौम्य होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अपवाद वगळता इतरांनी भाषा वापरताना ती जबाबदारीनं वापरली. पण सत्तेत असलेल्या आर. आर. पाटील आणि अजित पवार यांची भाषा मात्र आजच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही..

राज्यात आजही विजेचं भारनियमन, पाण्याची समस्य़ा, रस्त्यांचे प्रश्न, शाळा, आरोग्य व्यवस्था यांच्यावर आणखी खूप काम करण्यासारखं आहे. मात्र हजारो कोटी रुपयांचा निधी आमच्या मंत्र्यांनी दिला, एवढे मोठे आकडे सांगण्यातच हे मंत्रिमहोदय धन्यता मानताना दिसतायत..पण हा पैसा नेमका गेला कुठे ? यावर त्यांच्याकडेही उत्तर नाही..प्रचारात विकासाच्या मुद्द्यांना बगल देण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न झालेला दिसतोय...प्रत्येक निवडणुकीच्या तोडावर कोणतातरी भावनात्मक मुद्दा उकरुन काढायचा आणि त्यावरुन रान उठवायचं हा राजकीय पक्षांचा नवा फंडा बनलाय..भावनेचा मुद्दा प्रचारात आला की इतर मुद्दे आपोआपच मागे पडतात..जिजाऊंचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा, आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न असो किंवा इतर कोणतातरी मुद्दा चर्चेत आणायचा आणि त्याचीच रि ओढत बसायची हा राजकीय नेत्यांचा अलिकडचा डाव झालाय. मग त्यात विरोधक असो की सत्ताधारी कोणताच पक्ष यापासून अलिप्त राहिलेला नाही.. देश स्वतंत्र होऊन ६०-६५ वर्ष झाली तरीही विज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मुलभूत प्रश्नांचीच आपण अजून तड लावू शकलो नाही..तर पुढच्या विकासाच्या गप्पा कोसो दूर आहेत.. या निवडणुकांत तर हे मुद्ददेही आले नाहीत.. त्यालाही आत्ता बगल देऊन वैयक्तीक पातळीवर येऊन टीका करण्यात आली..त्यांना ना जनतेच्या प्रश्नाशी देणंघेणं आहे ना विकासाशी....त्यांना फक्त सत्ता हवीय.. तीही आपल्या घरात, आपल्या नातेवाईकांकडे आणि बगलबच्च्यांकडे..मग त्यात कोणाचा मुडदा पडो वा पैशाचा पाऊस पडो त्यांना त्याच्याशीही काहीच देणंघेणं नाही. फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच गणित जुळवण्याचा या राजकीय नेत्यांचा एककलमी कार्यक्रम आहे...आणि सत्तेच्या धुंदीत नवे सरंजामदार, जमीनदार, आणि घराणेशाही नव्या रुपानं येऊ पहात आहे..तर सामान्य जनता मात्र उरलीय फक्त मतदानासाठी आणि कार्यकर्ते घोषणा देण्यासाठी..ही या लोकशाहीची शोकांतिका नाही काय.?..

Wednesday, February 1, 2012

गणित-आयुष्यभर न सुटलेलं..

गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणा-यांचा मला हेवा वाटतो. यांना १०० मार्काचा पेपर असो किंवा १५० मार्कांचा पैकीच्या पैकी मार्क पाडतातच. अशा विद्यार्थांची संख्या कमी असली तरी त्यांना एवढे मार्क कसे काय पडतात याचं मला आश्चर्य वाटत राहिलय. बरं त्यातल्या एखाद्याला एक दोन मार्कजरी कमी पडली तरी त्यांच्या चेह-यावरचे भाव जणू काही आभाळ कोसळलय की काय असेच असतात. १०० पैकी ९९ किंवा १५० पैकी १४९ मार्क मिळाले याचा आनंद होण्यापेक्षा एक मार्क कसा काय कमी पडला याचचं त्यांना मोठं टेन्शन.. मला नाही बाबा कोणत्याच विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाली..आपली पोच फक्त फर्स्ट क्लास पर्यंतचीच..गणित म्हणावं तर दहावीला कसंबसं पास झालो आणि इतर विषयांची मार्कस बरी असतानाही फक्त या गणितानं सगळा खेळ खाली आणला..बरं या गणिताचं कोडं कधी मला सुटलच नाही..ती आकडेमोड, लसावी-मसावी, द.सा.द.शे. पर्यंत ठीक होतं. पण ते कंस सोडवा वगैरे प्रकार काय, मला आयुष्यात जमला नाही..काय तर ते कंसात काही आकडे वजाबाकी, भागाकार, गुणिले करा, कंसाच्याबाहेर डोक्यावर एखादा अंक किंवा अक्षर आहेच ! मग ते सोडवा...मला कळत नाही कंस सोडवायचाच तर मग त्यांना कंसात टाकलच का ?..बरं त्या आकड्यांनी किंवा अक्षरांनी काय गुन्हा केलाय म्हणून त्यांना पोलीस कोठडीत टाकावं तसं कंसात बंद केलय ?..आणि त्याचा व्यवहारात तर काय उपयोग झाल्याचं मला आठवत नाही.गणिताबद्दलचं माझं मत हे पहिल्यापासूनचं म्हणजे जेव्हा गणितानं एकमागून एक वर्षात दगा दिला तेव्हापासूनचं..

दहावी झाली आणि या गणिताचा ताप संपला..सुटलो बुव्वा आता, असं म्हणत कला शाखेला गेलो..पण आजही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ते हे की, हे विद्यार्थी एवढे तरबेज कसे ? बरं पेपर हा तीन तास आणि १०० किंवा १५० मार्काच्या मर्यादेत असतो म्हणून बरं. त्यांना अख्खं पुस्तक विचारलं तरी ते सांगणारच..असो मला आता गणित आठवण्याचं कारण असं की जगण्यासाठी धडपड करणा-या माझ्यासारख्या असंख्य मित्रांनी या गणिताचा तिरस्कार केलाय. त्याच्यापासून दहावीनंतर सुटका करुन घेतलीय पण कोणाच्याही आयुष्यातून गणित त्यांना सोडून गेलेलं नाही. आयुष्यातली ही गणितं सोडवताना जीव अनेकदा मेटाकुटीला येतो. पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालताना आकडेमोड करावी लागते. तिथं गणितातलं कुठलचं सुत्र कामाला येत नाही. शाळेतल्या गणिताला कसं त्या विशिष्ट सुत्रात बांधलेलं असतं. ज्याची ती सुत्रं पक्की तो पायरी पायरीनं गणित सोडवतो. एखादी पायरी चुकली तर उत्तर चुकतं, एक दोन मार्क कमी होतात..पण आयुष्यातली गणितं सोडवताना कुठं असतात अशी सुत्रं. एखादी पायरी चुकली की सगळं मुसळ केरात...

जगण्यासाठी सुरु असलेल्या या धडपडीत कोणाची किती गणितं सुटली आणि किती राहिली हे वेगळचं. बरं समस्या थोड्याफार फरकानं सारख्याच असल्या तरी प्रत्येकाची गणित सोडवण्याची पद्धत वेगळी, सुत्र वेगळं आणि अर्थातच उत्तरही वेगळंच...मग ज्यांनी गणितात पैकीच्या पैकी उत्तरं मिळवली होती त्यांच्याही आयुष्यातल्या गणिताची बाकी कधी बेरजेत, शिल्लकी राहत असेल काय. का त्यांच्याही आयुष्यातली गणितं सोडवताना दमछाक होतेच ना.? कितीही आकडेमोड करा सर्वसाधारणपणे सर्वांचीच शिल्लक एकतर शून्य येते किंवा वजा येते, शिलकी गणित कधी बेरजेत राहतच नाही, जसं आपल्या राज्याचं अंदाजपत्रक नेहमी वजाबाकीचचं असतं आणि कर्जाचा डोंगर वाढलेला असतो. जगण्याच्या या धडपडण्यात गणित सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक गणित सुटलं तर दोन तीन पुन्हा उभी राहतातच की..पगाराच्या दिवसाची आतुरतेनं वाट पहायची आणि पगार जमा होतात हिशोबाची वजाबाकी सुरु..पेपरवाला, टीव्हीवाला, दूधवाला. भांडीवाली, कपडेवाली, लाईटचं बिल, घराच्या कर्जाचा हप्ता, मुलांची शाळेची फी, एलआयसीचा हप्ता, महिन्याचा किराणा ह्या सर्व पायऱ्या सोडवता सोडवता शिल्लक काही रहातच नाही.. सगळं कसं जेमतेम, तेवढचं किंवा वजाबाकीतच जातं..मग आयुष्याच्या संध्याकाळचा विचार करुनच सगळं गणित बिघडतं..पगाराचा सर्व पैसा तर महिन्याची आकडेमोड करण्यातच गेला तर मग बाकी काय राहणार ?..आमचा कंस त्यामुळेच कधी सुटला नाही, तो शाळेतल्या गणिताचा असो किंवा आयुष्यातल्या गणिताचा ! आमचे आकडे आणि अक्षर कंसातच राहिली, वर कंसाच्या बाहेर असलेल्या आकड्याप्रमाणं भविष्याची चिंता मुलाची आणि आपलीही कायमच राहते ! नाही सुटत हे गणित. माझचं काय अनेकांचंही असचं होतच.. अगदी कंस न सोडवल्यासारखं...

बरं, आयुष्यातली ही बेरीज वजाबाकी करताना पगार हाच आम्हाला मिळणारा एकमेव आकडा..त्यामुळे वजाबाकीसारखं एक उसणा आकडा घेण्याचंही धाडस होत नाही..कारण घेतलेला तो आकडा पुन्हा परतच करायचाय ना !..त्या लोकांचं आपलं बरं असतं बुआ.. टेबलावरुन खालून आणि कुठुन कुठुन येतात त्यांच्याकडे हे मोठाले आकडे. ते आकडे एकले तरी आपल्या पोटात आकडा येतो..त्यांना नसेल का चिंता त्यांच्या आयुष्याची गणितं सोडवण्याची ? आपण म्हणतो कशी असेल ? सर्व बाजूंनी तर जमाचं होतेय त्यांच्या गणिताच्या या खेळात. त्यांना कुठली आलीय गणित सोडवण्याची समस्या ? पण त्यांच्याही आयुष्यात न सुटलेली गणितं असतातच !...आपली आकडेमोड, गणिताच्या पाय-या कमी असतली म्हणून, त्यांच्या पाय-याही मोठ्या असतील. म्हणूनच तर त्यांचे आकडेही मोठे आणि शिल्लकीचं गणितही मोठं ! ..मग कोणालाच सुटत नाही का या आयुष्याचं गणित ?..अनेकजण मोठ्या फुरशाकीनं सांगत असतात..आपलं बुवा काही गणित अडतच नाही कुणामुळं आणि कशामुळही !...खरचं त्यांची गणितं सुटलेली असतात का ? त्या १०० किंवा १५० पैकी तेवढेचं मार्क घेणा-या विद्यार्थांसारखी ! का एक दोन मार्क पडले म्हणून चिंता करणा-या त्या विद्यार्थासारखी आणि माझ्यासारख्या नेहमीच गणिताचा कंस न सोडवलेल्या माणसासारखी..