Saturday, January 7, 2012

गोष्ट एका लकी नंबरची..

नशिबावर अनेकजण विश्वास ठेवतातच, काहीजण उघडपणे तर काहीजण लपून छपून पण नशिब, लकीनंबर, लकी दिवस यावर अनेकांचा विश्वास आहेच...म्हणूनतर आपण शुभ दिवस बघून नवीन बाईक किंवा कारही घरी आणली जाते..आता कार किंवा बाईकचाच विषय निघालाय तर त्याच्याशीच निगडीत असलेल्या नंबरप्लेटवरही थोडेसं बोलूया.

आपल्या गाडीचा नंबर काय असावा याबाबतही काहीलोक खूपच जागृत असतात. त्यामुळे गाडीपेक्षाही नंबरला महत्व दिलं जात असल्याची अनेक उदाहरणं आहेत... काहीजणांचा लकी नंबर ९ असतो. त्या लकी नंबरसाठी बक्कळ पैसाही मोजतात..बरं झालं मागच्या काही वर्षापासून आरटीओ ऑफीस अशा लकी कम फॅन्सी नंबरसाठी लिलावात बोली लावतं किंवा ठराविक नंबरला ठराविक रक्कम ठरवून घेतं...पूर्वी वशिल्याच्या जोरावर असे नंबर मिळवले जायचे..

हैदराबादमध्ये परवाच अशा लकी नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लागली..तो लकी नंबर होता ९..त्यामुळे एपी ०९ एसीबी ९९९९ आणि दुसऱ्या दोन सिरीजमध्येही एपी ९---९९९९ अशा तीन नंबरसाठी मोठी मागणी होती. त्यामुळे त्यासाठी लिलाव झाला.एका कार मालकाने तब्बल ८ लाख ५० हजार रुपये मोजून एक नंबर मिळवला तर दुसऱ्यानं पाच लाख आणि तिसऱ्या नंबरसाठी साडेचार लाख रुपये मोजले...आता नंबरसाठी लाखोंची रक्कम ज्या कारसासाठी दिली त्या कारही तेवढयाच किंमती असल्या पाहिजेत...हो साडे आठ लाख रुपये मोजलेली कार होती मर्सिडीज..तर दुसऱ्या दोन होत्या बीएमडब्ल्यू.... कारही महागड्या आणि त्यांचे नंबरही महागडे...पण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना काय फरक पडतो..एखाद्या नंबरसाठीही लाखो मोजायला...पण नंबरमुळे गाडीमध्ये काही फरक पडणार आहे का ? तर नाही, पण लकी नंबर म्हणून एवढा पैसा मोजला ना...

आपल्याकडेही नंबरची मोडतोड करुन दादा, अण्णा, भाऊ असा अर्थ होईलं असे नंबर मिळवण्यासाठी धडपड होतेच. तशा नंबरच्या गाड्याही आपण पाहिल्यात...हा एक नाद म्हणा किंवा लकी नंबर म्हणा पण गाडीपेक्षा नंबरही कधी कधी भाव खावून जातोच एवढच..

Thursday, January 5, 2012

हुरडा पार्टी आणि जुन्या आठवणी...






जानेवारी महिना आला की ज्या पार्टीचा सुगावा लागतो ती म्हणजे हुर्डा पार्टी....खरं तर ह्याचं हुर्डा पार्टी असं नामकरण शहरी लोकांनी केलय. रब्बी हंगामातली ज्वारी किंवा मका भरली की ती आगीवर भाजून खाण्याचा प्रकार म्हणेज हुर्डा...पण आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांनी नोकरी व्यवसाय किंवा इतर कारणामुळं शहराचा रस्ता धरला आणि याला हुर्डा पार्टी असं गोंडस नाव दिलं....असू द्या हुर्डा पार्टी म्हटलं तरी हुर्ड्याची चव काय बदलणार नाही....तर गावाकडे या मोसमात म्हणजे वेळ अमावस्या संपल्यानंतर ते संक्रातीचा दिवस या १५ ते २० दिवसाच्या काळापासून हुर्डा करण्यासारखी ज्वारीची कणसं भरलेली असतात.. म्हणजेच कोवळी ज्वारी... मक्याचा हुर्डाही असतो पण त्यात ज्वारीचा हुर्डा हा खायला उत्तम...तसं मक्याचं कणीस जसं शहरात चौका चौकात मिळतं तसं ज्वारीचा हुर्डा मिळत नाही..ज्या काही शहरात सध्या तो मिळतो तो फक्त पूर्ण भाजलेला असा तो हुर्डा असतो.. पण हुर्डा हा शेतात जाऊन तिथंच खाल्ला तरच त्याची खरी मजा मिळते...


शेतातली ज्वारीची उभी ताटं काढून आणायची, त्याची कणसं बाजूला काढायची... जमीनित एक छोटासा खड्डा करुन त्यात गोवऱ्या पेटवायच्या आणि त्या गोवऱ्याच्या विस्तवात ही कणसं भाजायची.. भाजल्यानंतर ती हातावर घेऊन कणसापासून त्यातले दाणे बाजूला केले की मिळतो तो हुरडा...आणि शेगांची चटणी, गुळ किंवा काही विशिष्ट बनवलेल्या चटण्याबरोबर तो खायचा...अहाहाहा...काय ती चव... पण तुम्ही हा प्रकार स्वतः करु नका, कारण हा सर्व खेळ ज्याला जमतो त्या शेतात राबनाऱ्या हातालाच जमतो...आपण करायला जायचो आणि नसता हात भाजायचा....असो पण वरचं वर्णन समोर आलं की मला लगेच जुने दिवस आठवात..अशाच एका हुरडा पार्टीची मला आज आठवण झाली..

साधारणपणे पाच वर्षापूर्वी आम्ही एक हुर्डा पार्टी केली होती... हैदाराबादमधल्या नेहमीच्या पार्टीपेक्षा ही वेगळी पार्टी...आमच्याकडे राजेंद्र हुंजे नावाचा सहकारी होता.. सध्या तो आयबीएन लोकमतमध्ये आहे...माझा चांगला मित्र..त्याचं गाव हैदराबाद पासून पाच तासावर आहे.. अशाच एका दिवशी हुर्डा पार्टीचा बेत ठरला..खरं तर हुंजे कुणाला काही देणार यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.. पण पठ्यानं हुर्डा पार्टीचा जो बेत केला होता त्याला तोड नाही..म्हणजे आम्ही जवळपास दहा बाराजण या हुर्डा पार्टीसाठी भल्या पहाटे पाच वाजताच तयार होऊन निघालो.. त्यावेळचे आमचे सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमचे बॉस गिरीश केमकर, मेघराज पाटील, मंदार लोहोकरे, दुर्गेश सोनार, सागर गोखले, अशोक सुरवसे, रवी गुळकरी, सचिन फुलपगारे, अभय जिन्सीवाले आणि मी अशी खासी मंडळी या हुर्डा पार्टीला होती...( एखादे नाव राहिले गेले असेल तर चुक भूल देणे घेणे असावे )


हैदराबाद ते उमरग्याजवळचं येणेगुर गाव हा पाच तासांचा रस्ता आम्ही मौज मस्तीत घालवला.. त्यानंतर हुंजेच्या घरचा पाहुणचार झाला..भरपेट जेवण झालं.. पण आमचा ओढा होता तो हुरड्याकडे...गावाच्या बाजूलाच राजाचं शेत होतं तरीही बैलगाडीतून आम्ही सारी मंडळी शेतात गेलो.. तिथं गरम गरम हुरड्यावर यथेच्च ताव मारला...ताव मारला काय राव आम्ही सगळी मंडळी तुटुनच पडलो की...हुरडा पार्टीबरोबरच शेतात मनसोक्त फिरलोही...शेवटी आम्ही "अन्नदाता सुखी भव" म्हणत परत फिरलो... राजानं ही हुर्डा पार्टी देऊन आम्हाला सर्वांना गावाकडची आठवण करुन दिली....या हुरडा पार्टीतले इतर किस्से पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये जरुर शेअर करेन आणि अर्थातच या पार्टीचे काही फोटीही लवकरच फेसबुकवर अपलोड करेन...पण आज या पाच वर्षापूर्वीच्या हुरडा पार्टीची आठवण झाली ती दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आलेल्या हुरडा पार्टीच्या बातमीमुळं.. या बातमीमुळे राजा हुंजेच्या शेतातल्या हुरडा पार्टीची आठवण ताजी झाली.. त्यामुळे राजाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढच्या हुर्डा पार्टीची वाट पाहतो....


( मित्रहो..माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत..पण तुम्ही comments as ... Anonymous हा पर्याय सिलेक्ट करुन तुमची काँमेंट आणि तुमचे नाव टाकून पाठवा. मला ती मिळेल..लवकरच हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न करत आहे..)

Monday, January 2, 2012

हैदराबादी बिर्याणी




हैदराबाद म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चारमिनार, सालारजंग म्युझीयम, बिर्ला मंदीर, गोवळकोंडा किल्ला आणि रामोजी फिल्म सीटी.. हैदराबादला आलेला प्रत्येकजण या सर्व ठिकाणांना किंवा यापैकी काही ठिकाणी भेट देतो...पण भेटीच्या कार्यक्रमात जेवणाचा बेत असतोच.. मग काय हैदराबादची खासीयत आहे ती बिर्याणी..हैदराबादी बिर्याणी म्हणून तिचा मोठा लौकिक आहे.. हैदराबादच्या लहान मोठ्या सर्व हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते.. तसं पाहिलं तर बिर्याणीचे २६ प्रकार आहेत असं म्हणतात. पण हैदराबादमध्ये चिकन बिर्यामी, मटन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी हे प्रकार सर्रास पहायला मिळतात..आता त्यातही अनेक प्रकार जोडले गेलेत तो भाग वेगळा. पण हैदराबादच्या बिर्याणीची चव खास हैदराबादी आहे. ती बनवण्याची पद्धत आणि त्याला असललेला एक विशेष हैदराबादी टच हीच त्या बिर्याणीची खासीयत.. अगदी ५० रुपयापासून ही बिर्याणी मिळते..म्हणजे चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये गेलात तर जवळपास १०० रुपयाच्या पुढे या बिर्याणीची किंमत आहे..काही हॉटलमध्ये तीची किंमत ३००-४०० रुपयेही आहे. पण लहान हॉटेलमध्ये तुम्हाला सिंगल बिर्याणी मिळते. त्यामुळे पन्नास-साठ रुपयातही काम भागते...


हैदराबादमध्ये बिर्याणी ही सगळीकडे मिळते..पण तुम्हाला जर जुन्या हैदराबादची सफर करायची असेल किंवा चारमिनारच्या भागात तुम्ही फेरफटका मारत असाल आणि जेवण्याचा बेत असेल तर त्याच भागात असलेल्या शादाब किंवा मदिना हॉटेलला जरुर भेट द्या.. या दोन्ही हॉटेलमध्ये बिर्याणी उत्तम प्रतिची मिळते.. पूर्वी मदिना हॉटेलचा बोलबाला असायचा पण सध्या त्याची रौनक काहीप्रमाणात कमी झालीय...पण बिर्याणीचा आस्वाद मात्र तोच आहे..त्याशिवाय बावर्ची, कॅफे बहार, अशा हॉटेलमधूनही तुम्हाला उत्तम दर्जाची चविष्ट बिर्याणी मिळते... आणि तुम्ही जर सिंकदराबाद भागात असाल तर पॅराडाईज हॉटेलला भेट देण्यास विसरू नका...तुम्हाला बिर्याणीचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येईलं.. ही काही बोटावर मोजण्याएवढी नावं आहेत..पण हैदराबादच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला बिर्याणी मिळतेच मिळते..तुम्ही जर चार-पाच जण किंवा जास्तजण असाल तर अगदी फॅमिली पॅकही मिळतो..


हैदराबादच्या बिर्याणीचा इतिहासही हैदराबाद शहराएवढाच जुना म्हणजे जवळपास ४०० वर्षाचा आहे.. निजामाच्या किचनमध्ये बिर्याणीला पहिलं आणि मानाचं स्थान होतं. त्यामुळेच त्या बिर्याणीचा थाट आजही नवाबी दिसतो.. ह्या बिर्याणीएवढाच तिचा इतिहास ही रंजक आहे. मोघल आक्रमणाबरोबर बिर्याणीही भारतात आली असं म्हणतात. तैमूर लंग यानं भारतावरच्या आक्रमणाबरोबच त्यांचं खाद्य असलेली बिर्याणी भारतात आणली असं म्हणतात.. त्यानंतर मोघलांच्या मोहिमांबरोबर ही बिर्याणीही भारताच्या अनेक भागात पोचली.. पण तिचं अस्तित्व आणि थाट जपला आणि जोपासला गेला तो हैदराबादमध्ये.. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीला निजामाच्या जेवणात पहिलं स्थान असायचं पण निजामाचे जे सावकार होते ते महाजन हिंदू होते. ते मांसाहार करत नसत त्यामुळे त्यांच्यासाठी खास शाकाहारी बिर्याणी बनवली जायची असं म्हणतात...असा हा रंजक इतिहास असलेली खास हैदराबादी बिर्याणी तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही...त्यामुळे हैदराबाद भेटीत एक डाव बिर्याणीचा....

Monday, December 26, 2011

दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकते तेंव्हा...




२०११ हे वर्ष खऱ्या अर्थानं गाजलं ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे.. अण्णा हे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांची आंदोलनं, त्यातून राज्य सरकारची झालेली नामुष्की आणि एकूणच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्याची अख्या महाराष्ट्राला माहिती आहे..पण २०११ या वर्षात अण्णांची महती देशभरात पोचली..देशभरातच काय जगानंही अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली..या वर्षात अण्णांनी लोकपालसाठी आंदोलनाची सुत्रं हाती घेतली आणि दिल्लीतली हवा तापली..दिल्लीनं अनेक भल्या भल्यांना पाणी पाजलय.. दिल्लीच्या सत्तेचा कैफही काही औरच असतो हे इतिहासापासून आजतागायत सर्वांनी पाहिलाय, ऐकलाय..पण याच दिल्लीला अण्णा हजारेंनी झुकवलं.. तसच महाराष्ट्राच्या एका खेड्यातून आलेला हा धोतरछाप माणूस एवढा महाग पडेल असं सरकारलाच काय पण इतर कोणालाही वाटलं नव्हतं..पण अण्णांनी ते घडवून आणलं..
लोकपालच्या लढाईसाठी अण्णा मैदानात उतरले तेच नेहमीच्या उपोषणाच्या ब्रम्हास्त्रांनं.. सुरवातीला जंतर मंतरवर झालेल्या उपोषणाला प्रतिसादही चांगला मिळाला पण त्यानंतर अण्णांनी रामलिला मैदानावरच्या आंदालनाची हाक दिली..पण त्याअगोदर याच रामलिला मैदानावरचं रामदेव बाबांचं उपोषण सरकारनं पोलिस बळाचा वापर करुन अर्ध्या रात्रीत मोडून काढलं होतं..अण्णांच्या उपोषणाची गतही तिच होईलं अशी भिती व्यक्त केली जात होती..सुरवातीला उपोषणाची परवानगी नाकारुन सरकारनं स्वताहूनच अपशकून घडवून आणला.. लोकशाहीत कोणालाही शांततेत आंदोलन करण्याचा हक्क आहे. पण सरकारनं अण्णांचं आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना परवानगीच नाकारली.. पण अण्णा काय चिज आहे हे दिल्ली सरकारला माहित नव्हतं...त्यामुळेच अण्णांना उपोषणाच्या दिवशीच पहाटे त्यांच्या दिल्लीच्या मुक्कामाच्या जागेवर पोलिसांनी गाठलं..पण अण्णांचा निर्धार पक्का...जेलमध्ये जाईन पण उपोषण करेनच ही भिष्मप्रतिज्ञा अण्णांनी केली..पण पोलीस बिचारे हुकामाचे गुलाम त्यांनी अण्णांना अटक केली....ही सरकारनं केलेली दुसरी चूक....
अण्णा हजारे नावाचा हा मराठी माणूस कीती हट्टाचा आहे ते दिल्लीला माहितच नव्हतं.. शेवटी अण्णांना तिहार तुरुंगात पाठवलं...गम्मत अशी की ज्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा लढा देत आहेत..त्याच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही नेते, माजी मंत्री आणि मोठ्या कार्पोरेटमधले उच्चपदस्थ अधिकारी त्याच तिहारमध्ये डांबलेले होते...सरकारची पुन्हा व्हायची तेवढी छी थू झाली...शेवटी अण्णांना तिहारमधून सो़डवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.. पुन्हा सरकार चुकलं..पण तोपर्यंच दिल्ली, संपर्ण देश आणि प्रसारमाध्यमांना अण्णा काय चिज आहे हे कळून चुकलं.. सरकारवर दबाव वाढला आणि त्यांना झक मारत अण्णांच्या उपोषणाला परवानगी द्यावी लागली...
रामलिला मैदानावर ठाण मांडताच अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला..आपल्या सर्व मागण्यांसह लोकपाल विधेयकाला हात घाला अन्यथा उपोषण सोडणार नाही...मरेन पण हटणार नाही या इशाऱ्यामुळे सरकारलाही धडकी भरली.. सरकारला वाटलं दोन तीन दिवसात अण्णा जमीनीवर येतील..तब्येत बिघडेल हॉस्पीटलमध्ये पाठवून देऊ..पण कुठे काय...अण्णा ठणठणीत...टीव्ही वाहिन्यांवर दिवसभर अण्णापुराण तर दुसरीकडं संसदेचं अधिवेशन सुरु, त्यामुळे सरकारला नमतं घेण्याशिवाय पर्याय नव्हता...संसदेत आणि संसदेबाहेर सरकारची होती नव्हती तेवढी सगळी पार धुळीला मिळाली..त्यामुळे संसदेनं एकमुखानं अण्णांच्या मागण्यावर विचार करायला सरकारला भाग पाडलं..शेवटी पंतप्रधांनांनी लेखी पत्र पाठवल्यानंतरच अण्णांनी रामलिलावरचं उपोषण सोडलं...तर दुसरीकडं दिल्लीच्या सरकारनही सुटलो बुवा आता असं म्हटलं...
या संपूर्ण आंदोलनाची दखल मिडीयानं घेतली..महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेडातल्या या गांधीवादी नेत्यानं उपोषणाच्या जोरावर दिल्लीच्या सरकारची झोप उडवली हेच त्यांच्यासाठी आश्चर्याचं होतं..त्यात मिडीयानं दखल दिल्यामुळे सर्वांनाच त्याची दखल घ्यावी लागली..म्हणूनच अण्णा घराघरात पोचले तसच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली...त्यामुळेच अण्णा खऱ्या अर्थानं २०११ या वर्षाचे हिरो ठरले...कारण त्यांना पाठिंबा देणारा वर्ग हा सर्व वयोगटातला होता...सर्व वर्गातला होता.. अण्णांच्या भूमिकेवर काही वाद असू शकतात.. त्यांच्या हट्टीपणावर काही आक्षेप असू शकतात...मी म्हणतो तेच बरोबर या प्रवृत्तीवर आक्षेप असू शकतो...पण अण्णांच्या पायासमोर दिल्लीचं तख्तही झुकलं यातच सर्वकाही आलं...
जय महाराष्ट्र...

Sunday, December 25, 2011

आरक्षणाचे गाजर




मुस्लीम समाजाला साडेचार टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीय. हे आरक्षण सध्या असलेल्या ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या कोट्यातूनच देण्यात येणाराय. ही घोषणा करण्यामागं मात्र मुस्लीम समाजाचा उद्धार करणं वगैरे नसून नेहमीप्रमाणं त्याचं कारण राजकीयच आहे.. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.. भारतातल्या या सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या राज्यात सत्ता आणण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद पणाला लावलीय. पण काँग्रेसची स्थिती सत्ता आणण्यासारखी नसली तरी कमीत कमी तिथली परिस्थीती सुधारण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. त्याचाच एक भाग म्हणजे हे मुस्लीम आरक्षण...
निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीमांनाच आरक्षण का ? तर ज्या उत्तर प्रदेशात ह्या निवडणुका होत आहेत. त्या राज्याची लोकसंख्या आहे २० कोटी आहे आणि त्यात तब्बल १८ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे.. त्यामुळेच या १८ टक्के मतावर डोळा ठेऊन केंद्र सरकारनं हे आरक्षण जाहीर केलय. मुळात २७ टक्के ओबीसींच्या कोट्यात मुस्लीमांना आरक्षण देऊन सरकारनं ओबीसींची पंचायत करुन ठेवलीय. पण तो झाला जनतेचा प्रश्न.. राजकर्त्यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी अशा घोषणा करणं हे काही नवीन नाही..
या आरक्षणामागं राजकीय कारण आहे असं मी म्हणाले त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला सांगतो..उत्तर प्रदेशत विधानसभेच्या ४०३ जागा आहेत..मायावती यांचा बसप, मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हे दोन मोठे पक्ष युपीत आहेत. त्यांची सत्ता मागच्या दहा पंधरा वर्षात येत असते.. त्यानंतर नंबर लागतो तो भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा...काँग्रेसचा विचार केला तर उत्तर भारतातून काँग्रेसची पुरती वाट लागलीय. त्यात सुधारणा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यातच राहुल गांधींचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठीही काँग्रेसचा आटापीटा सुरुय. पुढचा पंतप्रधान म्हणून जर राहुलबाबांचा राज्याभिषेक करायचा असेल तर उत्तरेत काँग्रेसला मोठी मजल मारली पाहिजे.. त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरुय.. उत्तर प्रदेशात मायावतींनी मागच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणली होती.. त्यानंतर मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाचा नंबर लागला.. जर उत्तर प्रदेशातली पक्षाची ताकद वाढली तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेला त्याचा फायदा होऊ शकतो त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.. दलित, मागासवर्ग आणि मुस्लीमांची मतं मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्या पक्षात विभागली गेलीत. त्या व्होट बँकेला फोडण्यासाठी काँग्रेसनं हा मुस्लीम आरक्षणाचा पत्ता टाकलाय.
तसं पाहिलं तर निवडणुका जिंकण्यासाठी असे पत्ते टाकावेच लागतात..महाराष्ट्रात नाही का आपण मोफत विजेचं गाजर दाखवलं होतं..महाराष्ट्रातही अधून मधून मराठा समाजाच्या आरक्षाचा आवाज उठत असतोच की...सध्या तो शांत आहे पण उद्याच्या निवडणुकीच्या तोंडावर तो पुन्हा उठणार नाही असं म्हणता येणार नाही..शेवटी काय आपले राजकर्ते हे आपल्याकडे फक्त एक मतदार म्हणूनच बघतात..त्यातच ज्या समाजाची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे त्यांच्यासाठी अशा घोषणा, आश्वासनं, योजना राबवल्या जातात. निवडणुका जिंकण्याचा हा एक शॉर्ट कट आहे हे आपल्या राज्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना चांगलच माहित आहे. त्यामुळे एकट्या काँग्रेसला दोष देऊन काही उपयोग नाही..कारण निवडणुका जिंकायच्या म्हणजे सर्वकाही करावं लागतं..त्यात आरक्षण हा एक पत्ता आहे...

Friday, December 23, 2011

महाराष्ट्रातील काका- पुतण्याचे राजकारण








महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याच्या नात्याला वेगळचं महत्व आहे.. जसं त्याला महत्व आहे तसच त्याला वादाची किनारही आहे..हा मुद्दा आता आठवण्याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एका पुतण्यानं काकाला खिंडित पकडलय.. हे काका पुतणे आहेत गोपीनाथ मुंडे आणि त्यांचा पुतण्या धनंजय...परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन पुतण्या धनंजयनं गोपीनाथरावांसमोर आव्हान उभं केलय..परळी हा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला..याच परळीतून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले..राज्यात मास लिडर असणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख आहे.. राज्याच्या राजकारणात मोठं स्थान असलेल्या मुंडेंना पुतण्यानं केलेल्या या बंडामुळं फारच मनस्ताप झाल्याचं दिसतय. परळीचा नगराध्यक्ष आपण सांगेल तोच व्हावा यासाठी पुतण्यानं भाजप , काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मिळून जवळपास २५ -२६ जणांना अज्ञातस्थळी ठेवलंय..आणि दोन उमेदवारांचे अर्जही भरलेत..गोपीनाथ मुंडेंच्या उमेदवाराला त्यांनी थेट आव्हान दिलय...त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले पण पुतण्या काही मागं हटायला तयार नाही..असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा करुनच बंडाचा झेंडा फडकावलाय...त्यामुळे पुतण्यानं काकाची पुरती नाच्चकी केलीय..दिल्लीचं नेतृत्व करायला गेलेल्या गोपीनाथरावांना घर सांभाळणं अवघड जातय.. झोपत धोंडा घातला अशी मोघम नाराजी गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीय..
आता या बंडाची थोडी पार्श्वभूमी पाहूया...गोपीनाथ मुंडेंचं परळीतलं राजकीय व्यवस्थापन हे धनंजय मुंडे पाहत होते..पण आजपर्यंत काकाच्या छायेत राहुन राजकारण करणाऱ्या पुतण्याच्या महत्वाकांक्षा मागच्या काही दिवसात वाढल्या..गोपीनाथ मुंडे हे जोपर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रीय होते तोपर्यंत धनंजय स्थानीक राजकारण पहात असे..जिल्हा परिषद, सहकारी बँक यावर लक्ष ठेवत मुंडेंची स्थानिक जबाबदारी ते पार पाडत होते.. पण मुंडेंनी दिल्लीचा रस्ता धरल्यानंतर मात्र पुतण्याला काकाची जागा घेण्याची स्वप्नं पडू लागली...पण विधानसभेच्या जागेसाठी गोपीनाथ मुंडेंनी धनंजयला उमेदवारी देण्याएवजी मुलगी पंकजाला उमेदवारी देऊन आमदार केलं आणि बंडाची पहिली ठिणगी इथं पडली... आपल्याला उमेदवारी नाकारली असं कळताच या पुतण्यानं बंडाचा पवित्रा घेतला होता. पण त्यावेळी त्याची नाराजी दूर करण्यात आली आणि नंतर विधानपरिषदेवर त्यांना पाठवण्यात आलं..पण महत्वकांक्षा वाढलेल्या पुतण्याच्या मनात डावलल्याची सल डाचत राहिली आणि योग्य संधीची वाट पाहत बसलेल्या धनंजय यांना नगरपालिका निवडणुकीची संधी चालून आली..सुरुवातीला उमेदवारीत बाजी मारल्यानंतर त्यांनी नगराध्यपदासाठी मुंडेंचा आदेश धुडकावला आणि स्वतःचे दोन उमेदवार उभे केले..हाच मुंडेंना मोठा धक्का ठरला..आता या पुतण्याचे पाय राष्ट्रवादीकडे वळलेत असं दिसतय..
राज्याच्या राजकारणात यापूर्वी ठाकरे काका-पुतण्याचा वाद चांगलाच गाजला... बाळासाहेबांनंतर शिवसेनेत कोण याचं उत्तर राज असचं दिलं जात होतं...पण उद्धव ठाकरे यांची राजकारणात अचानक एंट्री झाली आणि कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपवत आपला वारस कोण हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं...त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन स्वतःचा नवा पक्ष काढला..त्यानंतर त्यांनी सेनेला पुरतं जेरीस आणलय...तर दुसरे काका पुतणे आहेत शरद पवार आणि अजित पवार...सध्यातरी पवार काका पुतण्यात काही वाद दिसत नसला तरी सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही.... पवारसाहेबांचे आपणच वारसदार आहोत हे त्यांनी आत्तापासूनच दाखवून द्यायला सुरवात केलीय... वर्षभरापूर्वीच भुजबळांना हटवून उपमुख्यमंत्रीपद पटकावत अजित पवारांनी त्यांचे इरादेही स्पष्ट केलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही काका पुतण्याची लढाई पुढं कुठं जाणाराय हे लक्षात येईलंच..
पण याच महाराष्ट्रात पेशवाईतल्या काका-पुतण्याचे दाखले दिले जातात...काका मला वाचवा असा टाहो फोडणाऱ्या या प्रसिद्ध वाक्याची यापुढे काकालाच पुतण्याकडे पाहुन पुतण्या मला वाचव अशी म्हणण्याची वेळ आलीय असं दिसतय..

Monday, December 19, 2011

४० कोटीचा कारकुन





एक किलो सोनं, चार किलो चांदी, २५ एकरावर भव्य फार्म हाऊस, एक हॉटेल, चार लक्झरी कार, चार मोटारसायकल्स, चार प्लॉट्स, विमा पॉलिसिमध्ये मोठी गुंतवणूक आणि विविध बँकांमध्ये विविध खात्यांवर जमा केलेली रक्कम..या सर्वांची एकत्रित बेरीज जवळपास ४० कोटी रुपयांच्या घरात जाते...आता हा हिशोब कशाचा म्हटलं तर तुम्हाला सांगतो...ही संपत्ती आहे एका क्लार्कची...हो क्लार्कची...म्हणजे एका कारकूनाची...मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या आरटीओ ऑफीसमध्ये हा कारकून काम करत होता..१९९६ साली तो कामाला लागला..आत्ता त्याचा पगार महिना फक्त १६ हजार रुपये आहे.. म्हणजे तो ज्यादिवशी नोकरीत रुजु झाला त्यावेळी त्याचा पगार जेमतेम पाच सहा हजार रुपयेच असावा.. सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला ,त्यामुळे तो १६ हजार रुपये आहे.. पण २५ वर्षात एक कारकून एवढी माया गोळा करु शकतो तर त्याच्यावरचा अधिकारी किती माया गोळा करु शकतो याची गोळीबेरीज न केलेलीच बरी....


आपल्याला हे माहित आहे की चिरीमिरी दिल्याशिवाय सात बाराचा उताराही तलाठी देत नाही..तर मग नगरपालिका काय किंवा तहसिल कार्यालय काय.. सर्वच क्षेत्रात पैसे खाण्याचं या लोकांना एक व्यसनच लागलय..


होय पैसे खाण्याचं हेसुद्धा एक व्यसनच आहे.. तुम्हा आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलाय..पण सरकारी काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही. त्यामुळं वेळ आणि हेलफाटे घालण्यापेक्षा चिरीमिरी देऊन आपण काम करुन घेतो..त्याच चिरिमिरीतून कारकूनसुद्धा कुबेर बनतो याचं हे उदाहरण... एका कारकूनाची ४० कोटींची संपत्ती ही खरं तर थक्क करायला लावणारीच आहे.. भोपाळमध्ये सापडलेला हा कारकून काय एकटाच आहे असं नाही..याच भोपाळमधून मागच्या आठवड्यात एका कारकूनाच्या घरातून पाच कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली...ही दोन उदाहरणं मी फक्त वानगीदाखल देतोय...यावरुन आपल्या लक्षात येईलं कि सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचं थैमान किती माजलय ते...त्याची ही बोलकी उदाहरणं आहेत..सामान्य लोकांचा ज्या सरकारी कार्यालयात थेट संपर्क येतो त्या प्रत्येक कार्यालयात असे महाभाग असतात...ते कार्यालयात येतात ते शिकार करण्यासाठीच..त्यांना सरकार जो पगार देतो तो काम करण्यासाठी नाही तर टाईमपास करण्यासाठीच....जोपर्यंत तुम्ही पैशाचं बोलत नाही तोपर्यंत असे महाभाग तुमच्या कामाकडं डुंकुनही पहात नाहीत...वर सरकारी नियम सांगतील..साहेब नाहीत..उद्या या..अमुक अमुक कादगपत्रांची कमतरता आहे..अशी अनेक कारणं सांगतिल..आणि तेच जर तुम्ही हात ओला की लगेच पुढच्या तासात तुमचं काम फत्ते....याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना नसते असं नाही.. त्याची त्यांनाही पुरेपुर कल्पना असते.. कारण यातलाच प्रत्येकाचा शेअर म्हणजे हिस्सा ठरलेला असतो..त्यातही कधी कोणी सापडलाच तर निलंबित करण्यापलिकडे त्याचं कार्यालय जास्त काही करु शकत नाही आणि बाकीचा मॅटर काळाच्या ओघात सेटल केला जातोच... पुन्हा समाजात उजळ माथ्यानं फिरण्यास हे महाभाग तयार... या दुष्टचक्रात भरडला जातेय तो फक्त सामान्य माणूस...त्यामुळे कितीही कायदे करा कितीही लोकपाल आणा जोपर्यंत या पैसे खाणाऱ्यांना कठोर शिक्षेची भिती बसत नाही तोपर्यंत समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड संपणार नाही...