Sunday, October 14, 2012

नागपूरात जमावानं गुंडाला ठेचून मारलं..

" नागपूरातील सीताबर्डी भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील कुख्यात गुंड अक्रम आणि इक्बाल यांच्या पापाचा घडा भरला होता. म्हणूनच या झोपडपट्टीतील महिलांनी इक्बालला भर रस्त्यात ठेचून मारला..या गुंडांच्या त्रासाला, गुंडगिरीला, दहशतीला कंटाळून महिलांनी त्या राक्षसाचा खात्मा केला..पण विषय एवढ्यावरच संपत नाही तर लोकांना कायदा हातात का घ्यावा लागला ? त्याला जबाबदार कोण ? पोलिस काय करत होते ? ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे..

नागपूरात ९ ऑक्टोबरच्या रात्री वसंतराव नाईक झोपटपट्टीतील महिलांनी आणि इतर लोकांनी इक्बाल नावाच्या गुंडाचा दगडानं ठेचून खून केला. जवळपास दोन तीनशेच्या जमावानं त्या गुंडाला ठेचून मारला. या घटनेनंतर राज्यात चर्चा सुरु झाली ती लोकांनी कायदा असा हातात घ्यावा का याची..खरचं या प्रकरणानंतर हा प्रश्न चर्चेला येणं स्वाभाविक आहे. कारण कोणत्याही कायद्याच्या राज्यात कोणीही कायदा हातात घेऊन अशा प्रकारे शिक्षा देणं चूकच आहे. उद्या कोणीही उठून असच रस्त्यावर न्याय देण्याची भाषा करेल. असा सूर अनेक स्तरातून उमटला.. हे सर्व बरोबर आहे...पण हा युक्तीवाद कायद्याचं जिथं पालन केलं जातं तिथं योग्य आहे. नागपूरातली घटना जर लोकांनी कायदा हातात घेतला अशी होत असेल तर तो कायदा त्या लोकांना हातात का घ्यावा लागला याचा अगोदर विचार करायला लागेल..मुळात कोणीच उठसुठ कुणाला मारहाण करणार नाही. अशीच घटना नागपूरातच आठ वर्षापूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट २००४ रोजी घडली होती. त्यावेळीही महिलांनी अशाच एका नराधमाला भरकोर्टात ठेचून मारला होता. तो गुंड होता अक्कू यादव..खून दरोडे, बलात्कार यासारखे असंख्य गुन्हे त्याच्यावर होते तरीही तो मोकाटच फिरत होता. पोलिस आपलं काहीच करु शकत नाहीत. किंबहुना पैसा फेकला की पोलीस आपलं काहीच वाकडं करु शकत नाहीत ही भावना या गुंडांमध्ये बळावलीय. त्याला खतपाणी घालण्याचं काम पोलिस दलातलेच काही लोक करत आहेत. त्यांना राजकीय पक्षांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. म्हणूनच हे गुंड अनेक गुन्हे करुनही मोकाट सुटतात आणि पुन्हा सामान्य लोकांवर अत्याचार करण्यास मोकळे असतात. अशा गुंडाना पोलिस किंवा आपली न्यायव्यवस्था शिक्षा ठोठावू शकत नाही म्हणून हे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या गुंडांना ठार मारलं... !!
इक्बाल काय किंवा अक्कू यादव काय त्यांना लोकांनी ठेचून का मारलं याचा विचार करण्यापूर्वी लोक या थराला का पोचले ह्याचा विचार करावा लागेल...वसंतराव नाईक झोपडपट्टीत इक्बाल, त्याचा भाऊ आणि इतर काही गुंडाचा अड्डा चालत होता. तिथं जुगार खेळले जायचे. हप्ता वसूली, वर्गणीच्या नावाखाली पैसा वसूल करणं हा नेहमीचा धंदा होता. त्यातच त्या झोपडपट्टीतल्या महिला आणि मुलींना त्यांचा मोठा त्रास होता. जाता येता हे लोक मुलींशी छेडछाड करत होते. काही मुलींवर बलात्कार करण्यात आले. चाकूचा धाक दाखवून अन्याय तर दररोजच केले जात होते. अनेक अवैध धंदे त्या गुंडांच्या अड्ड्यावर चालत होते. त्याचा त्रास तिथल्या लोकांना होत होता. त्यावर पोलिसांना अनेकदा सांगूनही पोलीस दुर्लक्ष करत होते. या झोपडपट्टीपासून जवळच सिताबर्डी पोलिस स्टेशन आहे..पण पोलिसांना यातील कोणत्याच प्रकारची माहिती नव्हती असं म्हणता येणार नाही. तर दुसरीकडं स्थानिक लोकांनी या गुंडांच्या विरोधात तक्रारी देऊन त्या दाखल करुन घेण्याचं सौजन्यही पोलिसांनी दाखवलं नाही. फोनवरुन तक्रार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. खोलात जाऊन माहिती घेतली असता असं समजलं की त्याच पोलिस स्टेशनमधले काही लोक म्हणजे पोलीस त्या गुंडांच्या अड्डयावर जायचे...! कारण काय आहे हे लोकांना न कळण्यासारखं नाही..! गुंडांच्या मुसक्या आवळण्याएवजी त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्या भानगडी झाकण्यातच हे पोलीस धन्यता मानत होते. त्यातूनच हा प्रकार घडला..गुंडांच्या त्रासातून पोलीस सुटका करत नाहीत, आपलं कोणी एकत नाही, हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या इक्बालचा विषयच संपवून टाकला...!! कारण दररोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो त्याचा निकाल लावू ही त्या लोकांची भावना होती. त्यात त्यांच काही चुकलेलं नाही..ज्या पोलिसांची म्हणजे कायद्याची भाषा करायची तेच जर गुंडांना सामिल असतील तर न्याय कोण देणार..?

नागपूरातील या गुंडाचा कहर म्हणजे दहा दिवसापूर्वीच या गुंडांनी एकाचा खून केला आणि त्याचा मृतदेह त्या झोपडपट्टीत पुरला. त्यासाठी झोपडपट्टीतल्याच लोकांना धमकावून खड्डा खणून घेतला. एवढी या गुंडांची दहशत त्या भागात होती. त्याचा पोलिसांना पत्ताच नव्हता..हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर आता निलंबनाची कारवाई सुरु झालीय..पोलिसांचं चुकलं हे आता पोलिस आयुक्त सांगतायत. मग एवढे दिवस हे सर्व चालत असल्याचा वरिष्ठांना थांगपत्ताच नाही असं कसं म्हणायचं...आता त्या पोलिसांवर कारावाई होईल नाही होईल हा भाग वेगळा. पण ज्यावेळी लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक कायदा हातात घेतात हे यापूर्वीच्याही अनेक प्रकरणात दिसून आलय...

नागपूरात जमावानं गुंडाची ठेचून हत्या केली असे प्रकार इतरही घडलेले आहेत आणि घडत आहेत. असं का होतं याचं उत्तर शोधण्यासाठी त्याच्या मुळात जावं लागेल. ज्या भागात गुंडांची दहशत असते त्या भागातल्या लोकांना जीव मुठीत ठेवूनच जगावं लागतं. सर्वसामान्य माणूस त्या गुंडाच्या सावलीलाही जात नाही. त्यातच पोलिसांकडे तक्रार केलीच तर त्या गुंडांवर काही कारवाई होईल याचा विश्वासच लोकांना राहिलेला नाही. समजा एखाद्या पोलिसांनी त्या गुंडावर कारवाई केलीच तर काय होतं...छेडछाड, धमकी देणं किंवा इतर गुन्ह्यात एकतर तो जामीनावर सुटतो किंवा खूनासारख्या प्रकरणात सबळ पुरावे नसल्यामुळे बाहेर येतो. म्हणजे गुन्हा करुनही पुन्हा उजळ माथ्यानं वावरायला आणि पुन्हा गुंडगिरी करण्यास मोकाटच..त्यातून पून्हा त्या लोकांना त्रास होणारच.. ! अशा व्यवस्थेमुळे लोक कायदा हातात घेतात. ज्या लोकांनी नागपूरात गुंडाला ठेचून मारलं ते झोपडटट्टीतले लोक आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी गुंडाला कायमची अद्दल घडवली..! पण असे अनेक इक्बाल, अक्कू यादव या समाजात उजळ माथ्यानं फिरत आहेत. त्यांचा बंदोबस्त कोण करणार.. ? कारण गुंडगिरी, दहशत, राजकीय आश्रय आणि पोलिसांचं पाठबळ यामुळे या गुंडांचं मनोधैर्य वाढत चाललय आणि ते समाजाला घातक आहे. पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावलं तर लोकांना कायदा हातात घेऊन इक्बाल किंवा अक्कू यादव करावा लागणारा नाही एवढचं...!!! 
 

Saturday, October 6, 2012

सोनिया गांधी म्हणतात.. जावई माझा भला

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या बेहिशोबी संपत्तीचा भांडाफोड करत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला खिंडीतच गाठलय..रॉबर्ट वढेरा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातले व्यवहार उघड करुन केजरीवाल यांनी काँग्रेसला प्रचंड मोठा दणका दिलाय..अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा बॉम्ब टाकल्याबरोबर काँग्रेसचे झाडून सगळे नेते, प्रवक्ते एवढेच काय सरकारमधले मंत्रीही चॅनेलवर येऊन सफाई देण्यासाठी धावपळ करत होते.. दस्तुरखुद्द सोनिया गांधीही लागलीच जावयाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आणि रॉबर्ट यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही असं एका वाक्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली.. देशात महागाईचा आगडोंब उसळला, भ्रष्टाचाराची अनेक मोठी मोठी प्रकरणं बाहेर आली पण सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया कधी दिली नाही..पण जावयाचं नाव येताच तातडीनं त्यावर त्यांनी एका ओळीची का होईना पण प्रतिक्रिया दिली.. सरकारचे कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी तर केजरीवाल यांना कायद्याचा धाक दाखवेन अशी धमकीची भाषासुद्धा वापरली.. हा सगळा आटापिटा कशासाठी..जर काँग्रेसचे नेते या सर्व प्रकरणात काहीही चुकीचं नाही असं म्हणत असतील तर केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी एवढं महत्व देण्याची गरजच काय..दररोज अनेक आरोप होतात. तेव्हा काँग्रेसची नेतेमंडळी एवढ्या मोठ्या संख्येनं बचावासाठी कधीही बाहेर आली नाही..पण सोनिया गांधींच्या जावयाचा प्रश्न उपस्थित झाला की सर्व सेना मैदानात का उतरली..याचाच अर्थ यात काहीतरी काळंबेरं आहे..सोनिया गांधी यांनाही तातडीनं प्रतिक्रिया द्यावी लागली यातच सर्वकाही आलं...

आता वळूयात केजरीवाल यांनी वढेरा यांच्याबद्दल उपस्थित केलेल्या काही प्रश्नांकडे.. केजरीवाल यांनी कागदपत्रं सादर करत असा थेट आरोप केला की डीएलफ या बांधकाम व्यवसायातील देशातील मोठ्या कंपनीनं वढेरा यांना मोठ्या किंमतीचे फ्लॅट खूपच कमी भावात दिले. अवघ्या ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून वढेरांना डिएलएफनं ३०० कोटीची प्रॉपर्टी दिली..त्यातही डिएलएफनं ६७ कोटी रुपयाचं बिनव्याजी कर्जही वढेरा यांना दिलं. त्याच कर्जाच्या रकमेतून वढेरा यांनी डीएलएफचीच संपत्ती खरेदी केली. तीही करोडो रुपयांची संपत्ती अवघ्या काही लाखात..वढेरा आणि डिएलएफ यांच्यात झालेल्या व्यवहारात असे शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे आहेत...
. मुळात वढेरा यांच्यावर ही कंपनी एवढी मेहरबान कशी काय झाली. ?
. तीच कंपनी वढेरा यांना बिनव्याजी कर्ज देते काय, त्याच पैशातून ते त्याच कंपनीचे फ्लॅट्स अगदी कवडीमोल किंमतीला विकत घेतात काय..?
. अवघ्या चार वर्षात वढेरा यांची संपत्ती ३०० कोटीनं वाढली कशी..?
हे सर्व संशयास्पद आहे...या दोघांचा व्यवहार हा कायदेशिर आहे असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. पण ज्या रॉबर्ट वढेरा यांच्या सहा कंपन्यांच्या व्यवहार दाखवला जातोय. तो प्रत्यक्षात झालेलाच नाही हेही त्या कागदपत्रावरुनच स्पष्ट होतय. त्यातच गुंतवणुकीपेक्षा फायदा कितीतरी पटीनं जास्त दाखवण्यात आलाय...हे सर्व पाहिलं तर पाणी माफ करा पैसा कुठतरी मुरतोय हे कळायला कोणत्याही कायदेतज्ञाची गरज नाही...


आता जे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केलेत तोच धागा पकडून काँग्रेसनं त्यात काहीच बेकायदेशिर नाही. सगळं कसं कायदेशिर आहे हे सांगितलय...मग जो व्यवहार वढेरा आणि डीएलएफ यांच्यात झाला तसाच अगदी तसाच व्यवहार द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची खासदार मुलगी कनिमोझी आणि मुंबईतील व्यावसायिक शाहिद बलवा यांच्यात झाला होता. त्या प्रकरणात मात्र कनिमोझी यांची सीबीआय चौकशी होऊन त्यांना जवळपास ११ महिने तिहार तुरुगांत काढावे लागले..आज त्या जामिनावर सुटलेल्या आहे..तर दुसरं प्रकरणही अशाच पद्धतीचं आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशातील..दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा वाय एस जगमनमोहन यांनाही सीबीआयच्या जाळ्यात अडकवून त्यांना जेलमध्ये टाकलय. त्यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप ठेवून सीबीआयनं जेलमध्ये बंद केलय. जगन यांचे वडील मुख्यमंत्री असताना काही जमिनीच्या व्यवहात जगन यांच्या कंपन्यांना मोठा फायदा झाला असाच आरोप त्यांच्यावर ठेऊन कारवाई करण्यात आलेली आहे..मग जगन आणि कनिमोझी यांच्यासाठी जो कायदा आहे तो वढेरा यांना लागू होत नाही का..? मग त्याच धर्तीवर वढेरा आरोपी ठरत नाहीत आणि इतर लोक आरोपी ठरतात, त्यांना जेलमध्ये डांबलं जातय हा अन्याय नाही का..?

आता पुन्हा त्या वढेरा आणि डिएलएफ यांच्यातल्या व्यवहाराकडे पहा..ज्या हरयाणा सरकारनं तिथल्या शेतकऱ्यांची ३५० एकर जमीन सार्वजनिक प्रकल्पासाठी म्हणून अधिगृहित केली आणि ती डीएलएफला दिली..डिएलएफनं कोणताही कारखाना काढलेला नाही, ती एक खाजगी कंपनी आहे. त्या कंपनीसाठी हरयाणातील काँग्रेसच्या सरकारनं प्रॉपर्टी दलालाचं काम करुन शेतकऱ्यांची जमीन डीएलएफच्या घशात घातली. त्याच जमिनीवर बांधलेल्या अलिशान गृहसंकुलातले सात फ्लॅट्स या वढेरा यांना या कंपनीनं अगदी कमी दरात दिले..अशाच प्रकारे दिल्ली, राजस्थान इथल्या काँग्रेस शासित राज्यांनी या कंपनीला मोठे भूखंड देऊ केलेत. त्याबदल्यातच वढेरा यांच्यावर ही कंपनी मेहरबान झाली असेल असं म्हणायला जागा आहे. नाहीतर डीएलएफसाठी काँग्रेसचं सरकार एवढी मर्जी का दाखवतय आणि वढेरा यांना हा मलिदा दिला जातोय का... हा सगळा व्यवहार संशयास्पदच आहे...

सोनिया गांधी यांचे जावई राबर्ड वढेरा यांच्यावरच घाव घालून केजरीवाल यांनी मोठे फासे टाकलेत. हे आरोप यापूर्वीही झालेत. पण त्याची दखल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतली नव्हती..ती आज घेण्यात आली..दुसरं असं की काँग्रेसचे हे नेते वढेरा हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत. हा व्यवहार हा त्यांची कंपनी आणि डीएलएफ यांच्यातला आहे त्याच्याशी काँग्रेसचा किंवा सरकारचा काहीही संबंध नाही असंही सांगत आहेत.. पण राबर्ट वढेरा हे जर इतरांप्रमाणेच आहेत तर मग त्यांना एसपीजी सारखी अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा कशी काय दिली जातेय.? त्यांना कोणत्याच विमानतळावनर चेकिंग का केलं जात नाही. ? ते जिथं जातात तिथली सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी का राबते ? ह्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसला द्यावीच लागतील. !!!! केवळ काँग्रेसच्या अध्यक्षा यांचा जावई म्हणून त्यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, राजकीय हेतूनं होत आहेत, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही अशी प्रमाणपत्रं वाटण्याची सरकारच्या मंत्र्यांना काहीच गरज नाही.. यात चौकशी वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही कारण पूर्ण यंत्रणा यांच्याच हातात आहे. ते काय चौकशी करणार आणि दोषी ठरवणार ? पण एक मात्र आहे. तुमच्या माझ्या सारख्या तमाम सामान्य जावयांना राबर्ट वढेरा यांचा हेवा वाटयला हवा.. ! कारण सासू असावी तर अशी ..! अशी म्हणजे सोनिया गांधींसारखी.. ! सगळं सरकार धावलं की नाही राव बचाव करण्यासाठी.....!!!

चला तर मग आरोप प्रत्यारोप सोडून देऊ, वढेरांना काहीही होणार नाही हेही तितकचं खरयं...पण आपण मात्र फक्त चार दिवस सासूचे तर चार दिवस जावयाचे असं म्हणूयात..बस्स एवढचं...!

रामराम..