Sunday, January 29, 2012

आसावे आपुले घरटे छान

घराबद्दल प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या तरी सध्याच्या जगात निवाऱ्याचा प्रश्न फक्त चार भिंती आणि छत म्हणजे निवारा किंवा घर एवढ्या पुरताच तो मर्यादीत राहिलेला नाही. अर्थात इतर दोन गरजांची व्याख्याही बदलेली आहेच..मी ज्या घराबद्दल बोलतोय ते सामान्य माणसाच्या घराबद्दल बोलतोय. त्यातच घराबद्दल ज्यांच्या काही कल्पना असतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय. तसच मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याच घराबद्दल बोलत नाही तर सर्वसमावेशकपणे घराच्या संपकल्पनेबबद्ल बोलतोय...त्यातच घर घेताना कोणती काळजी घ्यावी या आर्थिक किंवा वास्तूशास्त्राबद्दलही मला इथं फारसं काही बोलायचं नाही..

प्रत्येकजण आपल्या घराबदद्ल आपली एक कल्पना मनात बाळगून असतो..ते घर मग आपल्या आई-वडलांचं असो किंवा आपण नुकतचं खरेदी करणारं असो..घर ही प्रत्येकाची नितांत गरज आहे. त्याचं घरपण हे ते किती मोठं आहे, त्याच्या अंतर्गत सजावटीवर किती खर्च केलाय. यावर ठरत नाही..या भव्य सजावटीतून त्या घराची शोभा वाढेलही पण ज्या घरात घरपण नसतं तिथला हा सर्व डामडौलही भकास वाटतो..घरी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीला क्षणभर त्या वास्तूचा दिमाख भूरळ घालेल पण त्या घरात जर शांतता नांदत नसेल तर तो डामडौल, रुबाब कितीही मोठा असला तरी तो फिकाच वाटतो...आणि असं घरही तिथं राहणाऱ्या लोकांना खायला उठतं. मग घर म्हणजे काय ?..तर त्याची साधी व्याख्या मी तर अशी करेन की..ज्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आपलेपणाचा भाव असतो त्याला घर म्हणतात..किंवा घरातल्या लोकांच्या समाधानावरच त्याचं घरपण टिकलेलं असतं. अन्यथा ती फक्त चार भिंती आणि छत असलेली एक वास्तू राहते...

मी अनेकांना जवळून पाहिलय. ज्यांनी त्यांच्या घरासाठी मोठी मेहनत घेतलीय. त्यावर प्रचंड पैसा खर्च केलाय. पण घरी जायचं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनेक समस्या बोलून जातात..घराबद्दलची आसक्ती त्यांच्या नजरेत दिसत नाही. दिवसभर आपण नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतो तर काहींना दौरेही करावे लागतात. पण घऱी जायची ओढ लागणाऱ्यांची संख्या कमी दिसतेय. घरी परत तर जावचं लागतय. कारण तोच तर एक निवारा आहे. पण निवारा म्हणजे घर आहे का ?..ऑफीस सुटल्यानंतर कधी एकदाचा घर गाठतोय अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या घरात समाधान नांदत असतं. घराकडे जायची ओढचं ही त्या घरातल्या माणसांच्या विश्वास, प्रेम आणि आपलेपणाची लक्षणं आहेत...

घरात आपली कोणीतरी वाट पाहत आहे ही कल्पनाच मनालाच सुखावून जाते. त्यातच घर आणि त्याचं घरपण आलं. पण ज्यांना घरी गेल्यानंतर घरात नाहीतर एखाद्या कोंडवाड्यात आल्यासारखं वाटतं, घरी असणं एक शिक्षा वाटते. असं का होतं ? तर त्यांच्यात काही समस्या असतात त्यामुळं त्यांची घराबदद्लची आसक्ती नाहीशी झालेली असते..घराबदद्लची ओढ राहिलेली नसते. या समस्या असाव्यात असं काही त्यांना वाटत नसतं. पण काही कारणानं अनेकांच्या घरात बेबनाव झालेला असतो. नवरा-बायको असो किंवा आई वडील आणि आपण असो किंवा मुलं असोत...त्यांच्यात सुसंवाद नसेल तर त्या घरात शांतता नांदत नाही..समस्या सर्वांनाच असतात पण त्यातून योग्य मार्ग निघाला नाही तर त्या समस्या उग्र स्वरुप धारण करतात. त्यातूनच घरात राहणाऱ्या लोकांमधे आपलेपणा राहत नाही. ही दरी जर वाढत गेली तर आपल्याच माणसाबद्दल आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतात. त्यांच्याबदद्ल गैरसमज वाढतात. त्यातूनच नात्यातलं हे अंतर वाढत जातं आणि शेवटी रेल्वेच्या दोन रुळासारखे संबंध राहतात, जे दोन रुळ बरोबर तर असतात पण ते एकमेकांना कधीच मिळत नाहीत. त्यांच्यात ठरावीक अंतर राहतच..त्यामुळे समस्या सुटून सुसंवाद झाला तर त्यातून हे ऋणानुबंध घट्ट होतील, आपलेपणा वाढेल आणि घरालाही घरपण येईल.. म्हणूनच मी म्हणतो की घराचं मोठंपण त्यावर केलेल्या खर्चावर किंवा किंमती फर्निचरवर ठरत नाही.. तर घराचं घरपण हे तिथं राहणाऱ्या घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे, समाधानामुळं त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यानं दिसतं...असं प्रेम वासल्य, ममता आपलेपणा, समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटावं अशीच अपेक्षा आहे. आणि मग आपणही त्या छोट्याशा घरालाही आपला चॉकलेटचा बंगला काय, महाल काय, काहीही म्हणू शकतो. कारण घर आणि त्यांचं घरपण हीच आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जाते..हो अगदी यशाच्या चढत्या आलेखावर आरुढ होतानाही हे घरपण मोठी शक्ती देऊन जातं...एवढचं..

Friday, January 27, 2012

नाईट शिफ्ट- एक शापीत रात्र

नाईट शिफ्ट हा एक वाईट प्रकार आहे. खरं तर निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे सकाळी उठणं, दिवसभर आपली दिनचर्या करुन रात्री झोपणं हा निसर्गाचा नियम. लहानपणापासून आपल्या शरिरालाही याचीच सवय झालेली असते. पण काही नोकऱ्या अशा असतात की त्यांना नाईट शिफ्ट असते..आपल्याकडे पोलिस, रात्रीचा प्रवास करणाऱ्या सरकारी, खाजगी बसचे चालक यांनाही नाईट शिफ्टच असते. औद्योगिक वसाहतींमध्येही दिवसरात्र काम चालतं. त्यामुळे रात्रीचा दिवस करणाऱ्या या लोकांचं दुखही तेवढच आहे. खरतर मीसुद्धा त्याच नाईट शिफ्टला सरावलेला प्राणी..जवळपास पंधरा वर्षापासून मलाही या नाईट शिफ्टची सवय झालीय. नाईट शिफ्टला काम करणाऱ्या माणसांचं सर्व जगच बदलून जातं. सगळं जग झोपलेलं असतं तेंव्हा या लोकांचा दिवस सुरु होतो आणि इतरांचा दिवस सुरु झाला की यांची रात्र सुरु होते..खरं तर रात्रीपाळीत काम करायला कोणालाच आवडत नाही.. कोणीही आनंदानं हे काम करत नाही. पण पर्याय नसतो. त्यातही ज्यांना रात्रभर जागून काम करावं लागतं त्यांचे तर खूपच हाल..

तुम्ही म्हणाल त्यात काय, तुम्ही काही एकटेच आहात रात्रपाळीत काम करणारे ? पण तसं नाही, अनेकजण रात्रपाळीत काम करतात त्या सर्वांची दुखः सारखीच. सगळेच समदुखी. त्यांच्या दुखःला मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न कतरतोय एवढचं..! काय आहे की मुळातच रात्रपाळी लागली म्हटलं की पोटात गोळा येतो.. काहीजण तसं दाखवत नाहीत कारण त्यांना त्याची सवय झालेली असते. नवख्या लोकांना सुरवातीला त्याचा त्रास होता. हळूहळू त्याची सवय होत जाते. पण मी असेही काही महाभाग बघितलेत की नाईटशिफ्ट लागली म्हटलं की त्यांची तब्येत बिघडते.( खरी नव्हे रात्रपाळी टाळण्याचा तो एक बहाणा असतो ) आणि दुसरं म्हणजे नाईट शिफ्ट लागली की हमखास एक दोन दांड्या तर मारणारच.. मला या दांड्या मारणाऱ्यांचा ना हेवा वाटतो. बिनधास्त दांडी मारण्यालाही धाडस लागतं तो भाग वेगळा..पण मला नाही अशी दांडी मारायला मिळाली..

खरं तर रात्रीपाळीमुळे शारिरीक त्रास होतो. ऍसीडीटीचा त्रास सुरु होतो. तर काहीजणांना पोटाचे विकार, डोळ्यांचा त्रास. पाठ दुखण्याचा आजार. एक ना दोन अनेक व्याधीच मागे लागतात. आता त्याकाही फक्त रात्रापाळीमुळेच होतात असं नाही तर रात्रीपाळीमुळे त्या त्रासात वाढ होते हे मात्र नक्की. एकदा असंच पोट दुखणं आणि चक्कर येण्यासारख्या तक्रारीमुळे मी एका डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधाबरोबर जी पथ्यं मला सांगितली त्यानंतर मी त्या डॉक्टरकडे पुन्हा गेलो नाही..सकाळी पाच सहा वाजता उठून व्यायाम करणे, सात वाजता कॉफी, नऊ वाजता ब्रेकफास्ट, दुपारी १ वाजता जेवण, चार वाजता कॉफी, सहा वाजता पुन्हा फलाहार आणि रात्री नऊ वाजता जेवून अकरा वाजण्याच्या सुमारास झोपणं ही पथ्यं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होती. त्यातच पाणी घरचंच पिणे. ऑफीसला जाताना सोबत पाण्याची बाटली आणि फळं घेऊन जाण्यासही सांगितलं. मी म्हटलं डॉक्टर माझा दिनक्रम जर एवढा शिस्तशिर असता तर मी तुमच्याकडं ह्या तक्रारी घेऊन आलो असतो का..? पण त्यांनी सांगितलेला दिनक्रर्म काही नाईट शिफ्टवाल्यांना मिळत नाही त्यामुळे दुसरा डॉक्टर शोधणं हाच त्यावरचा पर्याय होता..खरचं सुखी असतात ती माणसं ज्यांचा दिनक्रम असा आखीव असतो..

बरं ज्या-ज्या संस्थेत हे रात्रपाळीचं झेंगट असतं तिथला शिफ्ट लावणारा शिव्या खाल्ला नाही असं कधीच होणार नाही..त्यानं शिफ्ट लावताना कितीही शास्त्रीय पद्धतीचा वापर करो शिव्या त्याच्या पाचविला पुजलेल्याच म्हणून समजा..आम्हालाच नाईट शिफ्ट लागली का..? नेहमी आम्हीच दिसतो का त्यांना..? काहीजण तर रात्रीपाळी लागली की मागच्या रात्रपाळीचा हिशोबच काढतात..! हे झालं कर्मचाऱ्यांचं पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या बायकोकडूनही शिफ्ट शेड्युल लावणारा शिव्या खातोच. बिच्चारा आता त्याचा त्यात काय दोष.? पण शिव्याशाप त्याला मिळणारच..! दुसरं असं की काही कार्यालयात नाईट शिफ्टचा एक हत्यार म्हणूनही वापर केला जातो..जो वरिष्ठांच्या डोक्यात गेला त्याला नाईट शिफ्ट लागलीच म्हणून समजा..ती किती दिवस ह्याचा मग हिशोब नाहीच..काही ठिकाणी रात्रीचं काम संपवून विश्रांती घेण्यास मुभा असते पण ती फारच कमी कार्यालयात असते. अनेक कार्यालयात तर झोपण्यास सक्त मनाई असते. रात्रपाळीत काम करणाऱ्यांवर लक्ष ठेण्यासाठी एखादं भरारी पथकंही असतं..आत्ता तर अनेक कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही दहशत आहे. त्यामुळे रात्री जागून काढण्याशिवाय पर्यायच नाही..

या रात्रपाळीत गमती जमतीही खूप होतात. अनेकांना झोप आवरत नाही..दिवसभर झोप काढली तरिही रात्रीची झोप ही रात्रीचीच झोप..पण काहींना नाही झेपत हे जागरण..त्यात जर रात्रीपाळीचा तुमचा प्रमुख जर खडूस असेल तर तुमची वाट लागलीच म्हणा..! एकतर रात्रीचं जागरण, वरुन त्याची बोलणी खायची म्हणजे नको नको होतं..आमच्याकडे काहीजण संगणकावर काम करत करतच झोपा काढतात..तर काहीजणांना काम करता करता डोळा केंव्हा लागला हेही कळत नाही..त्याचे किस्सेही मजेशिर असतात. ते किस्से काही या ठीकाणी सांगत नाही..पण अशाच रात्रपाळीचा अनेकांनी सदुपयोगही करुन घेतलाय बरं का.! अनेकांनी या रात्रपाळीतच आपली "जुळवाजुळव" करुन घेतलीय. रात्रीच्या ब्रेकमध्ये चहाचा एकच पेला रिचवताना उद्याच्या दिवसाचं "सेटींगही" काहींनी पक्कं करुन ठेवलेलं..तर काहीजण "नको त्या अवस्थेत" सापडल्याची उदाहरणंही आहेत. त्याच्या चर्चाही सर्वांच्या तोंडी असतात..त्यामुळे नाईट शिफ्ट ही एक शाप असली तरी काहींना मात्र ती वरदान ठरली..याच रात्रीतून त्यांच्या जीवनाची पहाट झालीय..हेही नसे थोडके..

Thursday, January 26, 2012

सिनेमा-हिंदी मराठी आणि दाक्षिणात्य..















हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवे प्रयोग होत आहेत. रजनीकांतच्या रोबोटनं धुमाकुळ घातल्यानंतर शाहरुखचाही सुपर हिरोछाप रा-वन आला. पण प्रेक्षकांना काही तो आवडला नाही. पण आज मला मुद्दामहून लिहायचय ते दाक्षिणात्य चित्रपटावर. हिंदीचा आवाका मोठा आहे. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. शिवाय ओव्हसिजचा धंदा आहेच. त्यामुळेच साठ सत्तर कोटीचं बजेट काही हिंदी चित्रपटांचं सध्या होत आहे. रा-वन चं शंभर कोटीपर्यंत गेलं होतं असं म्हणतात..पण हिंदीचा आवाका पाहता तेवढा पैसा वसूल होऊ शकतो. पण एवढा मोठा खर्च करुन चित्रपट बनवले जातात त्यांची संख्या फार जास्त नाही.. तर मग प्रादेशिक चित्रपटांची अवस्था काय असेल असा प्रश्न पडतो..या सर्वात एक समाधानाची बाब म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटांसमोर ठेवलंलं एक आव्हान..दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की तेलुगु आणि तमिळ ह्यांचा उल्लेख करावा लागतो..तमिळमध्ये रजनीकांत तर सर्वांचा बापच झालाय. त्यानं साठ वर्षाच्या वयातही हिंदीच काय हॉलिवूडलाही लाजवेल असा रोबोट केला आणि सर्वांना वेड लावलं..बरं त्यासाठी त्यानं मानधनही घेतलं तब्बल वीस कोटी रुपये..म्हणजे हिंदीतला शाहरुख, सलमान, आमिरपेक्षाही दुप्पट..आणि चित्रपटाचं बजेटही १०० कोटीच्यावर होतं असं म्हणतात. पण या चित्रपटानं निर्मात्याला त्याचा पैसा मिळवून दिला...हे रजनिकांतचं मोठं यश आहे. आजही त्याच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी उड्या पडतात..


हा झाला रजनिकांतचा करिश्मा, पण तेलुगु चित्रपटही काही कमी नाहीत. त्यांची लोकप्रियताही दांडगी आहे. सोलापूरसारख्या तेलुगु लोंकांचं वास्तव्य असणाऱ्या शहरात पूर्वीपासून तेलुगु सिनेमे लागतात. त्यांच्यासाठी सोलापूरात दोन स्वतंत्र थिएटर आहेत. तिथं फक्त तेलुगु चित्रपटच लागतात. पण मागच्या काही वर्षात हे प्रस्थं एवढं वाढलय की अहमदनगर, पुणे- मुंबईतही तेलुगु सिनेमांना मागणी वाढलीय. परवाच मी इंदापूरात तेलुगु चित्रपचटाची पोस्टर्स पाहिली...आणि गाणी म्हणाल तर आपल्याकडच्या काही रियालिटी शो मध्ये सुद्धा तेलुगु सिनेमातली अनेक गाणी ,त्यावरचे डान्स बसवले जातायत. हे त्या तेलुगु चित्रपटाचं यशच आहे. आ आंटे अमलापूरम या गाण्यानं महाराष्ट्रातही धुमाकुळ घातला होता. अशी गाणी महाराष्ट्रातही चालली. अनेकांच्या मोबाईलमध्येही तेलुगु गाण्यांचा भरणा असतो..ह्या प्रादेशिक सिनेमांना एवढं महत्व आलंय. तर मग आपला मराठी सिनेमा मागं का ?...मराठीतही बदल होत आहेत, महेश मांजरेकरसारखे दिग्ददर्शक आता पाच सात कोटींचा मराठी चित्रपट काढतात. पण त्यांची संख्या कमी आहे. एखादी कोंबडी किंवा वाजले की बारा हिट होतं. पण पुढे काय.?.तेलुगुत मात्र तसं नाही.. त्यांच्या सिनेमांची संख्या, त्यावर होणारा खर्चही मोठा आहे. हे सिनेमे निर्मात्याला त्यांचा पैसा वसूलही करुन देतात..


तेलुगु लोकांची एक मानसिकता आहे. खाओ, पिओ, मजा करो..म्हणूनच आजही मुंबई पुण्यात सिंगल स्क्रिनची जागा मल्टिप्लेक्स घेत असताना हैदराबादसारख्या शहरात सिंगल स्क्रिनही जोरात चालू आहेत. मी स्वतः मागच्या पाच सहा वर्षात कमीत कमी आठ ते दहा नवी सिंगल स्क्रिन थिएटर झाल्याची पाहिलीत. बरं आजही तेलुगु सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी इथं झुंबड उडते. पहाटेपासूनच तिकीटासाठी रांगा लावल्या जातात. इथल्या प्रेक्षकाला हवा असलेला सगळा मसला या चित्रपटांत असतो.. भरपूर मारधाड. दे दणादण, हॉट गाणी आणि अनाकलीय असा हिरो उभा केला जातो..व्हिलनही चांगलाच भाव खातो. असा सगळा मसला याच चित्रपटांत ठासून भरलेला असतो. मग काय पैसा वसूल..! त्यामुळेच तेलुगु सिनेमांचा आवाका आपल्यातल्या हिंदींच्या तोडीचा किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ ठरतोय.. सध्याच्या टीव्हीच्या जमान्यातही हे तेलुगु सिनेमे भाव खातात. तेलुगुचे डब सिनेमेही अनेक वाहिन्यांवर दररोज गर्दीकरुन दिसतायत...तेलुगु किंवा तमिळ सिनेमा पाहताना भाषा सोडली तर कधीच तो प्रादेशिक वाटत नाही..ही उंची मराठी सिनेमा केंव्हा गाठणार ?.त्यातच आपल्या मराठीवर सध्या थोडा पैसा लावला जात असला तर आपले हिरो कोण ?.. हे चित्र बदलणार केंव्हा..? त्याचा विचार व्हायला हवा.. आजचा तरुण वर्ग डोळ्यापुढं ठेवून चित्रपटांची निर्मिती करावी लागतेय. त्यात मराठी खूपच मागं पडताना दिसतेय. थोडेफार प्रयोग होतायत म्हणून समाधान मानून घेण्यापेक्षा तेलुगु, तमिळ सिनेमासारखी निर्मीतीची उंची आपला मराठी सिनेमा केंव्हा गाठणार याचा विचार झाला पाहिजे.. हे चित्र बदललं पाहिजे आणि तेलुगु आणि तमिळ चित्रपटासारखी निर्मितीची, यशाची शिखरं मराठी सिनेमानंही गाठावी हीच एक मराठी म्हणून अपेक्षा..त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीला भरपूर शुभेच्छा..

Wednesday, January 25, 2012

राजकारणात घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरुय. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गावाकडचं वातावरण निवडणूकमय झालय. तर महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे मोठ्या शहरातही निवडणुकांचा माहौल तयार झालाय. राज्यात सगळीकडे निवडणूकीच्या चर्चा, कार्यकर्त्यांचा घोळका आणि गल्लीपासून मुंबईपर्यंतच्या पुढाऱ्यांची एकच लगबग सुरुय. जो तो आपल्या मुलाला-बायकोला-किंवा सुनेला तिकीट मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. लोकशाहीत घराणेशाहीनं शिरकाव केल्याचं हे चित्र आहे. आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभेसाठी आपल्याच घरात तिकीट आणण्याचा पुढाऱ्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना आमदार-खासदार नाहीतर झेडपी- पंचायत समिती किंवा महानगरपालिकेत तरी संधी मिळत होती पण अलिकडे ती संधीही मिळणं कठीण झालय. एकीकडं जातीचं आरक्षण त्यात महिला आरक्षणामुळे मतदारसंघ राखीव झालेत. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची गोची झालीय. तर दुसरीकडं महिला आरक्षणामुळे सामान्य घरातल्या महिलांना संधी मिळण्याची वाट मोकळी झाली होती. पण प्रस्थापीत पुढाऱ्यांनी त्या जागेवरही आपल्याच घरच्या महिलांची वर्णी कशी लागेल यासाठी सर्वशक्ती पणाला लावलीय.

झेडपीचा अध्यक्ष काय किंवा पंचायत समितीचं सभापतीपद काय, लाल दिवा आपल्याच घरात आला पाहिजे यासाठी पुढाऱ्यांनी मैदानात उडी घेतलीय. ज्या पुढाऱ्यांकडे आमदारकी किंवा पक्षात पद आहे. ते आपल्या बोराबाळांची वर्णी लावण्यासाठी धडपडत आहेत. शरद पवारांपासून सर्वच पक्षातले मोठे नेते नातेवाईकांना तिकीट मागू नका असं जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात ते शक्य नाही हे त्यांनाही माहित आहे. शरद पवार स्वतः केंद्रीय मंत्री, मुलगी सुप्रिया सुळे या खासदार तर पुतण्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहे. तर भुजबळ स्वतः मंत्री पुतण्या खासदार तर मुलगा आमदार आहे. गणेश नाईकांचेही तेच आहे. काँग्रेसचे विलासराव देशमुख केंद्रीयमंत्री तर मुलगा आमदार. तेच चित्र सुशिलकुमार शिंदेच्या बाबतीत आहे. त्यांची मुलगीही आमदारही आहे. तर मुरली देवरा खासदार, मुलगा मिलिंद मंत्री आहे. इतर अनेक नेत्यांचे सपुत्र किंवा कन्या यांना मोठी पदं आहेत. तर भाजपच्या गोपीनाथ मुंडेंबरोबर त्यांची मुलगी पंकजा आमदार आहे. हे चित्र जवळपास सर्वच पक्षात आहे. त्यामुळे घराणेशाही राजकारणात रुजत आहे, त्याचा पाया भक्कम करत आहे हे यावरुन स्पष्ट दिसतय.

झेडपी आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेच्या रिंगणातही आपल्या नातेवाईकांनाच तिकीट मिळावं यासाठी हे नेते फिल्डींग लावून बसलेत. मला नाहीतर माझा मुलगा, नाहीतर बायको किंवा सुन कोणालाही तिकीट द्या पण सत्ता मात्र आमच्याच घरात राहिली पाहिजे यावर या पुढाऱ्यांचा जोर आहे. तसं निवडणूक ही काय सोपी राहिली नाही. साधी पंचायत समिती म्हटलं तर पाच-सहा लाखांच्यावर चुराडा होतो असं म्हणतात. त्यातच सभापतीपदावर डोळा असेल तर हा आकडा त्याहून मोठा होतो. तर मग महानगरपालिका किंवा झेडपीच्या लालदिव्यासाठीचा आकडा सहजच २०-२५ लाखांवर जातोय. एवढी मोठी रक्कम सामान्य कार्यकर्त्या कोठून आणणार ? त्यातच निवडूण येण्याची क्षमता हाच एकमेव निकष सर्वच पक्षांत आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात राजकीय पद आहे. त्यांच्याचकडे पैसा आणि शक्ती दोन्ही एकवटलेलं आहे. त्यामुळे तिकीटही अशाच लोकांना दिलं जातय. त्यामुळे आरक्षण असो कि नसो सत्ता ही आपल्याच घराच्या ताब्यात ठेवण्यासाठी हे नेते धडपडत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला आता झेडपी किंवा पंचायत समितीही मिळणं अवघड झालय.

लोकशाहीच्या नावाखाली नव्या रुपानं पुन्हा एकदा घराणेशाही अवतरत आहे. पूर्वी ती जातीवर आधारीत होती. आत्ता ती पैशाच्या ताकदीवर रुढ होऊ पहात आहे. त्यामुळे लोकशाही खरचं आपल्यात रुजलीय का ? याचा विचार करावा लागतोय. राजकीय पक्षही काही घरांमध्येच एकवटलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, तेलुगु देसम, द्रमुक, अकाली दल काय किंवा काँग्रेस काय अशा पक्षावर सध्या एकाच घराची सत्ता राहिलीय. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मात्र या नेत्यांच्यामागून "आगे बढो" एवढाच नारा देण्यापुरता शिल्लक राहिलाय...

Sunday, January 22, 2012

शिवसेना बाळासाहेबांची आणि आत्ताची...



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्माला घातले ती शिवसेना आज आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्यात तथ्यही आहे. कारण शिवसेनेची आजची अवस्था पाहता या संघटनेची वाताहत झाल्याचंच दिसतय. सेनेचे नेते जरी त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ते फारसं खरं नाही..मुळात बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावर त्यांचा एकहाती अंमल होता. एक दरारा होता. त्यांची संघटनेवर, शिवसैनिकांवर जबरदस्त पकड होती. तसच त्यांनी माणसं जोडली होती. त्यांचा सामान्य शिवसैनिकांशी थेट संवाद असायचा. तसच पक्षात फक्त आणि फक्त त्यांचाच शब्द असायचा आणि तो आदेश म्हणून पाळला जात होता. शिवसेना किंवा शिवसेनेबद्दल ब्र काढण्याचीही कोणाची हिम्मत नव्हती. संघटनेतच काय बाहेरचा माणूसही सेनेबद्दल बोलताना दहादा विचार करत असे. त्यांना अनेक स्तरातून विरोध होता पण थेट अंगावर घेण्यास सहसा कोणी पुढं येत नसे. बाळासाहेबांनी सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन एक मोठा संघर्ष केला. त्यातूनच त्यांच्या संघटनेचं पक्षात रुपांतर झालं आणि बघता बघता शिवसेना सत्तेत आली. सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवून त्यांनी मोठं यश संपादन केलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यात मुसंडी मारली. पण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्यात सेना वाढली, मोठी झाली. मुंबई आणि मुंबई महानगरपालिका हेच शिवसेनेच्या आर्थिक ताकदीचा स्रोत होता आणि आजही राहिलाय. कारण मागच्या ४७-४८ वर्षात सेना फक्त एकदाच राज्याच्या सत्तेवर साडेचार वर्षे होती. त्यानंतर ती सतत विरोधातच राहिलीय. त्यामुळे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिकांचा जो आर्थिक प्रश्न असतो तो मुंबईतच मिळत होता. त्यामुळेच सेनेला सर्व प्रकारचं पाठबळ मिळालं ते मुंबईतूनच..


मुंबईत शिवसेनेशिवाय कुणाचा आवाज हि कल्पनाही केली जात नव्हती. पण ती ताकदही आता सेनेत राहिली नाही. त्यांची अलिकडची आंदोलनही फुसकी ठरलीत. मुंबई बंद पाडण्याची धमक फक्त शिवसेनेत होती. ( बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत...उद्धव ठाकरेंच्या नाही..) तर सेनेतून बाहेर पडणे ही कल्पनाही कोणी करत नव्हतं. ठाण्यातलं खोपकर प्रकरण आठवून बघा.. त्यामुळेच सेनेतून बाहेर पडणं म्हणजे आपला खोपकरच होणार ही भिती होती. म्हणून छगन भुजबळ यांनी १९९१ ला सेना सोडली तेंव्हा तेसुद्धा जीव मुठीत घेऊन अनेक महिने परागंदा होते. भुजबळांसारखा जबरदस्त ताकदीचा माणूस...मुंबईच्याबाहेर मराठवाड्यात सेनेला पोचवण्यात भुजबळांचा सिंहाचा ( वाघाचा ) वाटा आहे. पण ते शरद पवारांच्या हाती लागले..१२ आमदारांना घेऊन भुजबळांनी शिवसेनेच्या अभेद्य गडाला तडा देण्याचं धाडस दाखवलं..पण त्यांनाही पळता भूई थोडी झाली होती..पण त्यानंतर किती गेले याचा पत्ता सेनेच्या आजच्या नेतृत्वालाही नाही.. शिवसेनेत तोंड वर करण्याची हिंमत होत नव्हती पण आज तो उठतो आणि सेनेच्या नेतृत्वावर टीका करतो..अर्थात त्यांचा थेटरोख उद्धव ठाकरेंवर असतो. अनेकजण सेना सोडताना थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात. पण बाळासाहेबांवर विश्वास आणि श्रद्धा प्रकट करतच.. हे असं का व्हावं ? शिवसेनेची ही अवस्था का झाली ? याची उत्तरही सर्वांना माहित आहेत. मुळात बाळासाहेबांची शिवसेना एक आक्रमक संघटना होती. त्याचं नेतृत्व बाळासाहेबांच्या वज्रमुठीत होतं. त्यांचा शब्द आदेश होता. बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारी माणसं त्यांनी जोडली होती. म्हणूनच बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेत मानाचं स्थान आहे. इतर पक्षातल्या लोकांमध्येही बाळासाहेबांबदद्ल आदर आहे. त्यांची मैत्रिही मोठीही दिलदार आहे. शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आजची चर्चिले जातात.. वाघाची संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जायचं. पण तो आब.. तो रुबाब आता राहिला नाही...

बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा सोपवली तेव्हापासूनच शिवसेनेच्या अधोगतीला सुरवात झाली. मुळात शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला गरज आहे ती तेवढ्याच आक्रमक नेतृत्वाची आणि उद्धव यांच्य़ात ती नाही. उध्दव हे सौम्य स्वभावाचे आणि कलाकाराच्या मनाचे. त्यांना सेनेची धुरा तर दिली पण ती पेलवता आली नाही. त्यातच त्यांचं सल्लागार मंडळ हेच कुचकामी आहे. त्यांच्या अवतीभवतीच्या नेतेमंडळीची नावं घेतली तर ती शिवसेनेच्या स्वभावाला कुठचं मिळत नाहीत. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून त्यांचा शब्द चालतो आणि इतरांना डावललं जातं ही भावना शिवसेनेत झालेली आहे. शिवसेनेच्या खासदार आमदारांनाही जर सेनेचं नेतृत्व वेळ देत नाही असा आरोप होत असेल तर ती गंभीर बाब आहे. जी शिवसेना व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकारांना आपल्या तोडफोडवृतीनं विरोध करायची तीच सेना आता तरुण व्होट बँक आणि नातवाच्या नेतृत्वामुळे मवाळ भूमिका घेतं ही कुठली शिवसेना ? तर जे बाळासाहेब ठाकरे घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार करत त्यांनीच सुरवातीला उद्धव यांच्याकडे संघटनेची-पक्षाची जबाबदारी सोपवली...त्याचा कहर म्हणून की काय पुतण्या राज ठाकरेंच्या मनसेला तोंड देण्यासाठी नातू आदित्यला मैदानात उतरवलं. याला घराणेशाही नाही तर काय म्हणायचं.. ?मुळात आदित्यला अजून मिसरुडही फुटलेलं नाही तर युवा सेना नावाची सुभेदारी बहाल केली...मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही उद्धवबरोबर आदित्यला मान द्यावा लागतो हे कशाचं द्योतक आहे. सेनेच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळत नाही मात्र आदित्यला मात्र पहिल्या रांगेत जागा. हे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न नाही तर काय..?

शिवसेनेच्या मागच्या ४७-४८ वर्षातल्या इतिहासावर बरचं काही लिहण्यासारखं आहे. पण बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातलं अंतर आणि फरक पडताळण्याचा हा प्रयत्न आहे..बाळासाहेबांची शिवसेना ते आदित्य ठाकरेंची युवासेना व्हाया उद्दव ठाकरेंची सेना हा प्रवास शिवसैनिकांनी पाहिलाय..पण तो शिवसैनिकांनाच पचणी पडत नाही. शेवटी काय ? ज्या संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं त्यांना काहीच किंमत नाही. शिवसेना वाढवण्यास, त्याला पाठबळ देण्यात वाघाचा वाटा ज्यांचा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि आदेश बांदेकरसारख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी असा प्रकार शिवसैनिकांनाही आता सहन होण्याच्या पलीकडे गेलाय. त्यांच्याही मनात जय महाराष्ट्र..करा कष्ट आणि व्हा नष्ट अशीच भावना वाढीस लागलीय...म्हणूनच सेनेचा गड आता गड राहीला नाही तर तोसुद्धा मुंबईतल्या फ्लॅट संस्कृतीसारखा आकसलाय. तोसुद्धा वन बिएचके किंवा वन रुम किचनसारखा छोटा झालाय. त्यामुळं त्याला आता गड म्हणनंही आतिशयोक्ती वाटतंय. याच बदलत्या नेतृत्वामुळं सेनेतून नारायण राणे, राज ठाकरे, सुरेश प्रभुंसारखे असंख्य मोहरे त्यांना सोडून गेले...आणि उरलेत ते फक्त कारकून आणि बारभाई..त्यांच्या जीवावर सेनेचा हा गाडा ओढला जातोय..बाळासाहेबांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना त्यांनीच उभी केलेली जीवापाड प्रिय असलेली शिवसेना फुटताना त्याला तडे जाताना पाहण्याचं दुखः पचवावं लागतय...याला काय म्हणावं ? पण हा शिवसेनेचा डोलारा पुन्हा उभा रहावा अशीच तमाम मराठी मनाची आणि असंख्य शिवसैनिकांची आजही इच्छा आहे. ती पुन्हा मानानं उभी रहावी आणि मुंबईतही आवाज कुणाचा ? असा आवाज घुमला पाहिजे एवढीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा...

जय महाराष्ट्र..

Sunday, January 15, 2012

ऑस्ट्रेलियात भारताचे पानिपत



भारत पर्थमधली तिसरी कसोटीही हरला..आणि कांगारुंनी मालिका जिंकत आपणच श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करुन दाखवलं..क्रिकेटमध्ये हार जित होतच असते..पण ज्या पद्धतीनं टीम इंडिया हरली त्याला क्रिकेट म्हणायचे का असा प्रश्न लहान मुलंही विचारतील..सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्याकडे बघितलं जातं तो महेंद्रसिंग धोनी.. हे सर्वच महान फलंदाज आहेत. असं असतानाही पहिल्या तिनही कसोटीत या महारथींची कामगिरी काहीच झाली नाही. यापैकी एकाही महारथीची बॅट ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर तळपली नाही.. द्रविड आणि लक्ष्मण तर कसोटीतले भारताचे हुकमी एक्के पण त्यांचीही बॅट तळपली नाही याला काय म्हणावे..तेंडूलकरची कामगिरीही शून्यच झाली. ज्याकडे अख्खं जग क्रिकेटचा महाराजा म्हणून पाहतं, त्याच्या महाशतकाची चातकासारखी वाट पहातं तो सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर अपय़शी ठरला..या महत्वाच्या फलंदाजांनीच जर नांगी टाकली तर नवखे फलंदाज तरी काय दिवा लावणार.. पण नवख्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीनं थोडीफार कामगिरी केली. पण ती पराभव वाचवण्यासाठी कामी येण्यासारखी नव्हती..तसच गोलंदाजीत यादवनही चांगली कामगिरी केली...पण कसोटीत पराभव झाला तो फलंदाजांमुळे..

तीन कसोटीपैंकी दोन कसोटीत भारत डावानं मार खातो याला काय म्हणायचं. ज्या संघाच्या यादीवर एक नजर टाकली तर मोठ मोठं विक्रम असलेले हे महारथी. विश्वकप जिंकणारा संघ अशी ख्याती असलेले महान खेळाडू अचानक ढेपाळले कसे..तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं १८० धावांची खेळी केली..तर भारतानं पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात १७१ धावा काढल्या... म्हणजे एकट्या वार्नरच्या धावाही अख्खा भारतीय संघ काढू शकला नाही हे कशाचं द्योतकं आहे.. ज्या खेळपट्टीवर कांगारुंचे खेळाडू तीनशे धावा काढतात, शतकामागून शतकं ठोकतात त्याच खेळपट्टीवर भारताचे हे महारथी अपयशी ठरतात यावर कोणचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे, हे पचवण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही..

कागदावर सर्वात बलवान असलेला आपला संघ असा एकदम नांगी का टाकतो याची उत्तरं शोधण्याची आवश्यकताय..जो पराभव झाला त्याला कर्णधार म्हणून आपण दोषी आहोत असं महेंद्रसिंग धोनी आता म्हणत आहे..अर्थात यश किंवा अपयश हे काही एकट्या कर्णधाराची जबाबदारी नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्याच्या यशाची काय आणि अपयशाची काय जबाबदारी ही सर्वांचीच असते. पण मागच्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत. त्यातून धोनीच्या कर्णधारपदावरुन संघात वाद तर नाही ना अशी शंका येत आहे. कारण धोनीच्या कर्णधारपदावर वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या बातम्या मागच्याच आठवड्यात झळकल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघात ऑल इज वेल आहे असं म्हणता येत नाही..भारताच्या सध्याच्या सुमार कामगिरीवरही सर्व स्तरातून टीका होऊ लागलीय. वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी पाहून आत्ता बस्स झालं त्यांना घरी बसवलं पाहिजे असं सुनिल गावस्कर यांनीही म्हटलय. त्यामुळे संघात सुधारणा होणं गरजेचं आहे..नुसतं कागदावर मजबूत संघ असून चालणार नाही तर त्याची कामगिरीही तेवढीच मजबूत असायला हवी..त्यामुळे ही मरगळ दूर करुन टीम इंडियानं पुन्हा एकदा यशाचा झेंडा फडकवला पाहिजे तरच आपण विश्वविजेते आहोत असं मिरवण्यात काही अर्थ आहे...





Friday, January 13, 2012

हैदराबाद- एक साठवण ( सुरुवातीचे दिवस )

हैदराबाद या शहराशी माझा तसा काहीच संबंध नव्हता..आंध्र प्रदेशची राजधानी, चारमिनार आणि एन. टी. रामाराव यांच्याशिवाय आंध्र आणि हैदराबादबद्दल मला फारशी माहितीही नव्हती..हां..आणखी एक ओळख या शहरातबदद्ल होती ती म्हणजे या शहरातल्या इक्रिसॅट या कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या मल्टीनॅशनल कंपनीच्या नावामुळे..ह्या कंपनीचं एक अभ्यासकेंद्र माझ्या छोट्याशा गावात होतं. वर्षातून अनेकदा वेगवेगळ्या देशांचे लोक या कंपनीच्या माध्यमातून अभ्यासासाठी माझ्या गावात येत..त्यांच्या त्या अलिशान गाड्या काळे- गोरे विदेशी लोक त्याचवेळी मी माझ्या छोट्या गावात पाहिले होते..पण त्यावेळी तो माझ्यासाठी उत्सुकतेचा, कुतुहलाचा विषय होता...पण कधी मला हैदराबादला यावं लागले असं वाटलं नव्हतं..पण तीन जुलाई २००० ला मी या शहरात आलो आणि या शहराचाच होऊन बसलो..


खरं तर नोकरीनिमित्त महाराष्ट्राच्याबाहेर एका वेगळ्या प्रांतात मला यावं लागले असं मला वाटलं नव्हतं..पण आयुष्याच्या वाटा धुंडाळताना एवढा पुढं निघून गेलो होतो की मागं पाहिलं तेव्हा शिल्लक काहीच राहिलं नव्हतं.. त्यामुळे आतापुढे काय असा यशप्रश्न मला भेडसावत होता. त्याचवेळी मला हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत सुरु होत असलेल्या ईटीव्ही मराठीच्या जाहिरातीचा आधार मिळाला..तोच धागा पकडत मी हैदराबाद गाठलं.. माझा एक मित्र रवी वैद्य ह्यानं मला त्यासाठी मोठी मदत केली. आज तो या जगात नाही पण त्याचे ते उपकार माझ्यावर आजही एक मोठं ओझं आहे असं मी मानतो...नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती पण नेहमीप्रमाणे धाडसानच आलो..पण झालं नोकरी मिळाली.. त्या दिवसापासून मी हैदराबाद शहराचा झालो आणि आजही आहे.. उद्या या शहरात असेन का नाही हे सांगू शकत नाही पण या शहराला मी आयुष्यात कधीच विसरणार नाही...या शहरानं मला भरभरुन दिलय. मला जगाला शिकवलंय. मोठा आर्थिक, मानसिक, आणि सामाजिक आधार दिलाय...ह्या शहरानं मला दिलेली नवी ओळख आणि जे काही दिलय ते विसरण्यासारखं नाहीच..म्हणूनच माझं या शहरावर प्रेम आहे..


आज मी बारा वर्षानंतर मागं वळून पाहतो तेंव्हा अनेक घटना डोळ्यासमोरुन पटापट जातात...या शहरात आल्यानंतर राहण्याची सोय नव्हती, भाषेचा प्रश्न होता...आम्ही सर्वजण मराठी मंडळी सुरुवातीचे काही दिवस रामोजी फिल्म सिटीत असलेल्या सहारा हॉटेलवर रहायचो...त्यानंतर शहरात वनस्थलीपूरम या भागात आम्ही रहायला गलो. सुरुवातीला सहा सात जणांनी मिळून एक घर भाड्यानं घेतलं..त्यानंतर लगेच दोन तीन महिन्यात त्याच भागात मोठा बंगला भाड्यानं घेतला...हाच बंगला पुढं ईटीव्ही मराठीच्या हालचालींचा केंद्रबिंद राहिला...( तसा बदनाम केंद्रबिंदू म्हणाना..) ह्या बंगल्यात आम्ही सुरुवातीला सात आठ जण होतो नंतर सहकारी वाढले आणि जवळपास १२ ते १४ जण या बंगल्यात रहात होतो...सुरुवातीला प्रदिप पाटील, श्रेयस जाधव, संतोष कोंपलवार, दत्ता, कृष्णा, पराग, सुनिल दुसाणे, संतोष कांबळे, राजा पाटील, अनिल पाटील असे सहकारी रहात होतो. नंतर राकेश वायंगणकर, राकेश बागल, डोळाभाई असे अनेक सहकारी जमले..या बंगल्याच्या वरच्या भागात प्रविण आंधारकर हे आमचे मित्र रहात होते..तसं या बंगल्याचं नाव आम्ही चॉकलेटचा बंगला ठेवलं होतं. . त्या बंगल्याच्या थोडं पुढं गेल्यानंतर पुढच्या कॉलनित एका मोठ्या घरात आणखी सात आठ जण राहत होते... मेघराज पाटील, रफीक मुल्ला, विठोबा सावंत, सचिन गडहिरे, दिपक शितोळे, नरेंद्र बंडवे,स्वप्निल चव्हाण हे सहकारी या बंगल्यात राहत होते.. मेघराज, अशोक सुरवसे आणि सुनिल पाथरुडकर हे सोलापूरचे असल्यानं थोडा आपलेपणा जाणवायचा...नंतर मी, मेघराज आणि स्वप्निल दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो..( काही नावांचा उल्लेख राहिलेला आहे प्रसंगानुरुप त्यांचा उल्लेख करेनच. )

बघता बघता वनस्थलीपूरममध्ये मराठी लोकांची संख्या वाढली..इथूनच नवे मित्र मिळाले...एकत्र राहणं. मिळून जेवण बनवणं आणि एखादं घर चालवावं तसा आमचा प्रपंच सुरु होता..तसं इतरांबरोबर राहण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती..कॉलेजसाठी सोलापूरातही हॉस्टेल आणि खाजगी खोल्यामधून रहातच होतो..पण हैदराबादमध्ये जेवणाचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सरुवातीला एका मराठी कुटुंबाला आम्ही आग्रह करुन मेस सुरु करायला लावली आणि जेवणाचा प्रश्न सोडवला..पण हा प्रयोग फसला त्यामुळे आम्ही बाहेर हॉटेल किंवा मेसमध्ये भातच खायचा तर घरीच करुन खावू असं ठरवुन आम्ही एकवेळचं जेवण तरी घरीच बनवायचो..कारण ऑफीस कँटीनच्या खाण्याबद्दल काय सांगायचं...ते जेवण करण्यापेक्षा अनेकजण जेवण टाळायचे..( आमची ऑफीस कँटीन हा स्वतंत्र लिहिण्याचा विषय आहे.)

ईटीव्हीच्या अनेक वाहिन्या वाढत होत्या तसतसे नवे मित्रही मिळत गेले. अनेक प्रांतातून हे कर्मचारी आलेले होते. त्य़ामुळे त्यांच्या राज्याबद्दलची माहिती मिळत होती..हा प्रवास असाच सुरु राहिला...अनेक आठवणी, घटना,प्रसंग आठवले की कधी चेहऱ्यावर मंद स्मित हास्य उठतं तर काही आठवणी वेदना देऊन जातात...काही प्रसंग आठवले की आजही डोळे पाणावतात...हा प्रवास सुरु असतानाच अनेकजण हैदराबाद सोडून गेले त्यातले काहीजण संपर्कात राहिले तर काहिजण विस्मृतीत गेले...पण मला मिळालेला हा अनुभवाचा, माहितीचा आणि मैत्रिचा ठेवा मी जपून ठेवलाय आणि तो तसाच जपून ठेवणाराय...तो माझ्यासाठी अमूल्य साठवण आहे..

( हैदराबादच्या आठवणी मी "हैदराबाद एक साठवण" म्हणून लिहित आहे. जस जसा वेळ मिळेल तशा या आठवणी साठवण म्हणून तुमच्याशी शेअर करेन. )