Wednesday, February 1, 2012

गणित-आयुष्यभर न सुटलेलं..

गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणा-यांचा मला हेवा वाटतो. यांना १०० मार्काचा पेपर असो किंवा १५० मार्कांचा पैकीच्या पैकी मार्क पाडतातच. अशा विद्यार्थांची संख्या कमी असली तरी त्यांना एवढे मार्क कसे काय पडतात याचं मला आश्चर्य वाटत राहिलय. बरं त्यातल्या एखाद्याला एक दोन मार्कजरी कमी पडली तरी त्यांच्या चेह-यावरचे भाव जणू काही आभाळ कोसळलय की काय असेच असतात. १०० पैकी ९९ किंवा १५० पैकी १४९ मार्क मिळाले याचा आनंद होण्यापेक्षा एक मार्क कसा काय कमी पडला याचचं त्यांना मोठं टेन्शन.. मला नाही बाबा कोणत्याच विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाली..आपली पोच फक्त फर्स्ट क्लास पर्यंतचीच..गणित म्हणावं तर दहावीला कसंबसं पास झालो आणि इतर विषयांची मार्कस बरी असतानाही फक्त या गणितानं सगळा खेळ खाली आणला..बरं या गणिताचं कोडं कधी मला सुटलच नाही..ती आकडेमोड, लसावी-मसावी, द.सा.द.शे. पर्यंत ठीक होतं. पण ते कंस सोडवा वगैरे प्रकार काय, मला आयुष्यात जमला नाही..काय तर ते कंसात काही आकडे वजाबाकी, भागाकार, गुणिले करा, कंसाच्याबाहेर डोक्यावर एखादा अंक किंवा अक्षर आहेच ! मग ते सोडवा...मला कळत नाही कंस सोडवायचाच तर मग त्यांना कंसात टाकलच का ?..बरं त्या आकड्यांनी किंवा अक्षरांनी काय गुन्हा केलाय म्हणून त्यांना पोलीस कोठडीत टाकावं तसं कंसात बंद केलय ?..आणि त्याचा व्यवहारात तर काय उपयोग झाल्याचं मला आठवत नाही.गणिताबद्दलचं माझं मत हे पहिल्यापासूनचं म्हणजे जेव्हा गणितानं एकमागून एक वर्षात दगा दिला तेव्हापासूनचं..

दहावी झाली आणि या गणिताचा ताप संपला..सुटलो बुव्वा आता, असं म्हणत कला शाखेला गेलो..पण आजही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ते हे की, हे विद्यार्थी एवढे तरबेज कसे ? बरं पेपर हा तीन तास आणि १०० किंवा १५० मार्काच्या मर्यादेत असतो म्हणून बरं. त्यांना अख्खं पुस्तक विचारलं तरी ते सांगणारच..असो मला आता गणित आठवण्याचं कारण असं की जगण्यासाठी धडपड करणा-या माझ्यासारख्या असंख्य मित्रांनी या गणिताचा तिरस्कार केलाय. त्याच्यापासून दहावीनंतर सुटका करुन घेतलीय पण कोणाच्याही आयुष्यातून गणित त्यांना सोडून गेलेलं नाही. आयुष्यातली ही गणितं सोडवताना जीव अनेकदा मेटाकुटीला येतो. पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालताना आकडेमोड करावी लागते. तिथं गणितातलं कुठलचं सुत्र कामाला येत नाही. शाळेतल्या गणिताला कसं त्या विशिष्ट सुत्रात बांधलेलं असतं. ज्याची ती सुत्रं पक्की तो पायरी पायरीनं गणित सोडवतो. एखादी पायरी चुकली तर उत्तर चुकतं, एक दोन मार्क कमी होतात..पण आयुष्यातली गणितं सोडवताना कुठं असतात अशी सुत्रं. एखादी पायरी चुकली की सगळं मुसळ केरात...

जगण्यासाठी सुरु असलेल्या या धडपडीत कोणाची किती गणितं सुटली आणि किती राहिली हे वेगळचं. बरं समस्या थोड्याफार फरकानं सारख्याच असल्या तरी प्रत्येकाची गणित सोडवण्याची पद्धत वेगळी, सुत्र वेगळं आणि अर्थातच उत्तरही वेगळंच...मग ज्यांनी गणितात पैकीच्या पैकी उत्तरं मिळवली होती त्यांच्याही आयुष्यातल्या गणिताची बाकी कधी बेरजेत, शिल्लकी राहत असेल काय. का त्यांच्याही आयुष्यातली गणितं सोडवताना दमछाक होतेच ना.? कितीही आकडेमोड करा सर्वसाधारणपणे सर्वांचीच शिल्लक एकतर शून्य येते किंवा वजा येते, शिलकी गणित कधी बेरजेत राहतच नाही, जसं आपल्या राज्याचं अंदाजपत्रक नेहमी वजाबाकीचचं असतं आणि कर्जाचा डोंगर वाढलेला असतो. जगण्याच्या या धडपडण्यात गणित सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक गणित सुटलं तर दोन तीन पुन्हा उभी राहतातच की..पगाराच्या दिवसाची आतुरतेनं वाट पहायची आणि पगार जमा होतात हिशोबाची वजाबाकी सुरु..पेपरवाला, टीव्हीवाला, दूधवाला. भांडीवाली, कपडेवाली, लाईटचं बिल, घराच्या कर्जाचा हप्ता, मुलांची शाळेची फी, एलआयसीचा हप्ता, महिन्याचा किराणा ह्या सर्व पायऱ्या सोडवता सोडवता शिल्लक काही रहातच नाही.. सगळं कसं जेमतेम, तेवढचं किंवा वजाबाकीतच जातं..मग आयुष्याच्या संध्याकाळचा विचार करुनच सगळं गणित बिघडतं..पगाराचा सर्व पैसा तर महिन्याची आकडेमोड करण्यातच गेला तर मग बाकी काय राहणार ?..आमचा कंस त्यामुळेच कधी सुटला नाही, तो शाळेतल्या गणिताचा असो किंवा आयुष्यातल्या गणिताचा ! आमचे आकडे आणि अक्षर कंसातच राहिली, वर कंसाच्या बाहेर असलेल्या आकड्याप्रमाणं भविष्याची चिंता मुलाची आणि आपलीही कायमच राहते ! नाही सुटत हे गणित. माझचं काय अनेकांचंही असचं होतच.. अगदी कंस न सोडवल्यासारखं...

बरं, आयुष्यातली ही बेरीज वजाबाकी करताना पगार हाच आम्हाला मिळणारा एकमेव आकडा..त्यामुळे वजाबाकीसारखं एक उसणा आकडा घेण्याचंही धाडस होत नाही..कारण घेतलेला तो आकडा पुन्हा परतच करायचाय ना !..त्या लोकांचं आपलं बरं असतं बुआ.. टेबलावरुन खालून आणि कुठुन कुठुन येतात त्यांच्याकडे हे मोठाले आकडे. ते आकडे एकले तरी आपल्या पोटात आकडा येतो..त्यांना नसेल का चिंता त्यांच्या आयुष्याची गणितं सोडवण्याची ? आपण म्हणतो कशी असेल ? सर्व बाजूंनी तर जमाचं होतेय त्यांच्या गणिताच्या या खेळात. त्यांना कुठली आलीय गणित सोडवण्याची समस्या ? पण त्यांच्याही आयुष्यात न सुटलेली गणितं असतातच !...आपली आकडेमोड, गणिताच्या पाय-या कमी असतली म्हणून, त्यांच्या पाय-याही मोठ्या असतील. म्हणूनच तर त्यांचे आकडेही मोठे आणि शिल्लकीचं गणितही मोठं ! ..मग कोणालाच सुटत नाही का या आयुष्याचं गणित ?..अनेकजण मोठ्या फुरशाकीनं सांगत असतात..आपलं बुवा काही गणित अडतच नाही कुणामुळं आणि कशामुळही !...खरचं त्यांची गणितं सुटलेली असतात का ? त्या १०० किंवा १५० पैकी तेवढेचं मार्क घेणा-या विद्यार्थांसारखी ! का एक दोन मार्क पडले म्हणून चिंता करणा-या त्या विद्यार्थासारखी आणि माझ्यासारख्या नेहमीच गणिताचा कंस न सोडवलेल्या माणसासारखी..

No comments:

Post a Comment