Sunday, January 29, 2012

आसावे आपुले घरटे छान

घराबद्दल प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या तरी सध्याच्या जगात निवाऱ्याचा प्रश्न फक्त चार भिंती आणि छत म्हणजे निवारा किंवा घर एवढ्या पुरताच तो मर्यादीत राहिलेला नाही. अर्थात इतर दोन गरजांची व्याख्याही बदलेली आहेच..मी ज्या घराबद्दल बोलतोय ते सामान्य माणसाच्या घराबद्दल बोलतोय. त्यातच घराबद्दल ज्यांच्या काही कल्पना असतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय. तसच मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याच घराबद्दल बोलत नाही तर सर्वसमावेशकपणे घराच्या संपकल्पनेबबद्ल बोलतोय...त्यातच घर घेताना कोणती काळजी घ्यावी या आर्थिक किंवा वास्तूशास्त्राबद्दलही मला इथं फारसं काही बोलायचं नाही..

प्रत्येकजण आपल्या घराबदद्ल आपली एक कल्पना मनात बाळगून असतो..ते घर मग आपल्या आई-वडलांचं असो किंवा आपण नुकतचं खरेदी करणारं असो..घर ही प्रत्येकाची नितांत गरज आहे. त्याचं घरपण हे ते किती मोठं आहे, त्याच्या अंतर्गत सजावटीवर किती खर्च केलाय. यावर ठरत नाही..या भव्य सजावटीतून त्या घराची शोभा वाढेलही पण ज्या घरात घरपण नसतं तिथला हा सर्व डामडौलही भकास वाटतो..घरी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीला क्षणभर त्या वास्तूचा दिमाख भूरळ घालेल पण त्या घरात जर शांतता नांदत नसेल तर तो डामडौल, रुबाब कितीही मोठा असला तरी तो फिकाच वाटतो...आणि असं घरही तिथं राहणाऱ्या लोकांना खायला उठतं. मग घर म्हणजे काय ?..तर त्याची साधी व्याख्या मी तर अशी करेन की..ज्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आपलेपणाचा भाव असतो त्याला घर म्हणतात..किंवा घरातल्या लोकांच्या समाधानावरच त्याचं घरपण टिकलेलं असतं. अन्यथा ती फक्त चार भिंती आणि छत असलेली एक वास्तू राहते...

मी अनेकांना जवळून पाहिलय. ज्यांनी त्यांच्या घरासाठी मोठी मेहनत घेतलीय. त्यावर प्रचंड पैसा खर्च केलाय. पण घरी जायचं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनेक समस्या बोलून जातात..घराबद्दलची आसक्ती त्यांच्या नजरेत दिसत नाही. दिवसभर आपण नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतो तर काहींना दौरेही करावे लागतात. पण घऱी जायची ओढ लागणाऱ्यांची संख्या कमी दिसतेय. घरी परत तर जावचं लागतय. कारण तोच तर एक निवारा आहे. पण निवारा म्हणजे घर आहे का ?..ऑफीस सुटल्यानंतर कधी एकदाचा घर गाठतोय अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या घरात समाधान नांदत असतं. घराकडे जायची ओढचं ही त्या घरातल्या माणसांच्या विश्वास, प्रेम आणि आपलेपणाची लक्षणं आहेत...

घरात आपली कोणीतरी वाट पाहत आहे ही कल्पनाच मनालाच सुखावून जाते. त्यातच घर आणि त्याचं घरपण आलं. पण ज्यांना घरी गेल्यानंतर घरात नाहीतर एखाद्या कोंडवाड्यात आल्यासारखं वाटतं, घरी असणं एक शिक्षा वाटते. असं का होतं ? तर त्यांच्यात काही समस्या असतात त्यामुळं त्यांची घराबदद्लची आसक्ती नाहीशी झालेली असते..घराबदद्लची ओढ राहिलेली नसते. या समस्या असाव्यात असं काही त्यांना वाटत नसतं. पण काही कारणानं अनेकांच्या घरात बेबनाव झालेला असतो. नवरा-बायको असो किंवा आई वडील आणि आपण असो किंवा मुलं असोत...त्यांच्यात सुसंवाद नसेल तर त्या घरात शांतता नांदत नाही..समस्या सर्वांनाच असतात पण त्यातून योग्य मार्ग निघाला नाही तर त्या समस्या उग्र स्वरुप धारण करतात. त्यातूनच घरात राहणाऱ्या लोकांमधे आपलेपणा राहत नाही. ही दरी जर वाढत गेली तर आपल्याच माणसाबद्दल आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतात. त्यांच्याबदद्ल गैरसमज वाढतात. त्यातूनच नात्यातलं हे अंतर वाढत जातं आणि शेवटी रेल्वेच्या दोन रुळासारखे संबंध राहतात, जे दोन रुळ बरोबर तर असतात पण ते एकमेकांना कधीच मिळत नाहीत. त्यांच्यात ठरावीक अंतर राहतच..त्यामुळे समस्या सुटून सुसंवाद झाला तर त्यातून हे ऋणानुबंध घट्ट होतील, आपलेपणा वाढेल आणि घरालाही घरपण येईल.. म्हणूनच मी म्हणतो की घराचं मोठंपण त्यावर केलेल्या खर्चावर किंवा किंमती फर्निचरवर ठरत नाही.. तर घराचं घरपण हे तिथं राहणाऱ्या घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे, समाधानामुळं त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यानं दिसतं...असं प्रेम वासल्य, ममता आपलेपणा, समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटावं अशीच अपेक्षा आहे. आणि मग आपणही त्या छोट्याशा घरालाही आपला चॉकलेटचा बंगला काय, महाल काय, काहीही म्हणू शकतो. कारण घर आणि त्यांचं घरपण हीच आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जाते..हो अगदी यशाच्या चढत्या आलेखावर आरुढ होतानाही हे घरपण मोठी शक्ती देऊन जातं...एवढचं..

2 comments:

  1. good..it's the real fact of life..
    nice writting..
    pramod n rutuja
    mumbai..

    ReplyDelete
  2. gharabaddalchi bhavana pharach bolaki aahe..
    ghar phakt vastu nahi, te ek aapale vishwa aahe.
    chan lihile aahe..khup manatale lihile..
    thanks..
    pranita n dev,
    mumbai

    ReplyDelete