Friday, December 23, 2011

महाराष्ट्रातील काका- पुतण्याचे राजकारण








महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याच्या नात्याला वेगळचं महत्व आहे.. जसं त्याला महत्व आहे तसच त्याला वादाची किनारही आहे..हा मुद्दा आता आठवण्याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एका पुतण्यानं काकाला खिंडित पकडलय.. हे काका पुतणे आहेत गोपीनाथ मुंडे आणि त्यांचा पुतण्या धनंजय...परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन पुतण्या धनंजयनं गोपीनाथरावांसमोर आव्हान उभं केलय..परळी हा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला..याच परळीतून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले..राज्यात मास लिडर असणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख आहे.. राज्याच्या राजकारणात मोठं स्थान असलेल्या मुंडेंना पुतण्यानं केलेल्या या बंडामुळं फारच मनस्ताप झाल्याचं दिसतय. परळीचा नगराध्यक्ष आपण सांगेल तोच व्हावा यासाठी पुतण्यानं भाजप , काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मिळून जवळपास २५ -२६ जणांना अज्ञातस्थळी ठेवलंय..आणि दोन उमेदवारांचे अर्जही भरलेत..गोपीनाथ मुंडेंच्या उमेदवाराला त्यांनी थेट आव्हान दिलय...त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले पण पुतण्या काही मागं हटायला तयार नाही..असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा करुनच बंडाचा झेंडा फडकावलाय...त्यामुळे पुतण्यानं काकाची पुरती नाच्चकी केलीय..दिल्लीचं नेतृत्व करायला गेलेल्या गोपीनाथरावांना घर सांभाळणं अवघड जातय.. झोपत धोंडा घातला अशी मोघम नाराजी गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीय..
आता या बंडाची थोडी पार्श्वभूमी पाहूया...गोपीनाथ मुंडेंचं परळीतलं राजकीय व्यवस्थापन हे धनंजय मुंडे पाहत होते..पण आजपर्यंत काकाच्या छायेत राहुन राजकारण करणाऱ्या पुतण्याच्या महत्वाकांक्षा मागच्या काही दिवसात वाढल्या..गोपीनाथ मुंडे हे जोपर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रीय होते तोपर्यंत धनंजय स्थानीक राजकारण पहात असे..जिल्हा परिषद, सहकारी बँक यावर लक्ष ठेवत मुंडेंची स्थानिक जबाबदारी ते पार पाडत होते.. पण मुंडेंनी दिल्लीचा रस्ता धरल्यानंतर मात्र पुतण्याला काकाची जागा घेण्याची स्वप्नं पडू लागली...पण विधानसभेच्या जागेसाठी गोपीनाथ मुंडेंनी धनंजयला उमेदवारी देण्याएवजी मुलगी पंकजाला उमेदवारी देऊन आमदार केलं आणि बंडाची पहिली ठिणगी इथं पडली... आपल्याला उमेदवारी नाकारली असं कळताच या पुतण्यानं बंडाचा पवित्रा घेतला होता. पण त्यावेळी त्याची नाराजी दूर करण्यात आली आणि नंतर विधानपरिषदेवर त्यांना पाठवण्यात आलं..पण महत्वकांक्षा वाढलेल्या पुतण्याच्या मनात डावलल्याची सल डाचत राहिली आणि योग्य संधीची वाट पाहत बसलेल्या धनंजय यांना नगरपालिका निवडणुकीची संधी चालून आली..सुरुवातीला उमेदवारीत बाजी मारल्यानंतर त्यांनी नगराध्यपदासाठी मुंडेंचा आदेश धुडकावला आणि स्वतःचे दोन उमेदवार उभे केले..हाच मुंडेंना मोठा धक्का ठरला..आता या पुतण्याचे पाय राष्ट्रवादीकडे वळलेत असं दिसतय..
राज्याच्या राजकारणात यापूर्वी ठाकरे काका-पुतण्याचा वाद चांगलाच गाजला... बाळासाहेबांनंतर शिवसेनेत कोण याचं उत्तर राज असचं दिलं जात होतं...पण उद्धव ठाकरे यांची राजकारणात अचानक एंट्री झाली आणि कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपवत आपला वारस कोण हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं...त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन स्वतःचा नवा पक्ष काढला..त्यानंतर त्यांनी सेनेला पुरतं जेरीस आणलय...तर दुसरे काका पुतणे आहेत शरद पवार आणि अजित पवार...सध्यातरी पवार काका पुतण्यात काही वाद दिसत नसला तरी सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही.... पवारसाहेबांचे आपणच वारसदार आहोत हे त्यांनी आत्तापासूनच दाखवून द्यायला सुरवात केलीय... वर्षभरापूर्वीच भुजबळांना हटवून उपमुख्यमंत्रीपद पटकावत अजित पवारांनी त्यांचे इरादेही स्पष्ट केलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही काका पुतण्याची लढाई पुढं कुठं जाणाराय हे लक्षात येईलंच..
पण याच महाराष्ट्रात पेशवाईतल्या काका-पुतण्याचे दाखले दिले जातात...काका मला वाचवा असा टाहो फोडणाऱ्या या प्रसिद्ध वाक्याची यापुढे काकालाच पुतण्याकडे पाहुन पुतण्या मला वाचव अशी म्हणण्याची वेळ आलीय असं दिसतय..

No comments:

Post a Comment